मला क्षमा कर

कथा * रेणू श्रीवास्तव

न्यूयॉर्कच्या विमानतळावर उतरताच आकाशने आईवडिलांना मिठी मारली. किती तरी दिवसांनी मुलाला प्रत्यक्ष भेटल्यामुळे राधाचे डोळे भरून आले. तेवढ्यात एक कार समोर येऊन थांबली. एक अत्यंत देखणी तरुणी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. आकाशने आईबाबांचं सामान गाडीच्या डिक्कीत ठेवलं. त्यांना गाडीत मागच्या सीटवर बसवून स्वत: पुढल्या सीटवर बसला. त्या तरुणीने मागे बघत डोळ्यांनीच राधा व अविनाशला ‘वेलकम स्माइल’ दिलं. राधाला वाटलं स्वर्गातली अप्सराच समोर बसली आहे.

मुलाची निवड उत्तम असल्याचं राधाला जाणवलं. दीड दोन तासांच्या प्रवासानंतर गाडी एका अपार्टमेंटसमोर थांबली. गाडीतून उतरून जुई दोघांच्या पाया पडली. राधाने तिला प्रेमाने जवळ घेतलं. जुई व आकाशने सामान घरात घेतलं. आकाशचं ते छोटंसं घर सुरेख मांडलेलं होतं. राधा व अविनाश फ्रेश होताहेत तोवर जुईने चहा करून आणला.

दुपारचं जेवण करून राधा व अविनाश झोपली अन् त्यांना गाढ झोप लागली.

‘‘आई, ऊठ ना, तुमच्या जागं होण्याची वाट बघून बघून शेवटी जुई निघून गेली.’’ आकाशने तिला बळेच उठवलं.

अजून झोपायची इच्छा होती तरीही राधा उठून बसली. ‘‘काही हरकत नाही. अमेरिकेतही तू आपल्या जातीची अशी सुंदर गुणी मुलगी निवडलीस हेच खूप आहे. आम्हाला जुई पसंत आहे. फक्त आमची तिच्या घरच्या लोकांशी भेट घडवून आण. लग्न इथेच करायचं आहे तर मग उशीर कशाला?’’

राधाच्या बोलण्याने आकाशचा उत्साह वाढला. म्हणाला, ‘‘तिच्या घरी तिची आजी अन् वडील आहेत. तिच्या लहानपणीच तिची आई वारली. वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही. जुई तिच्या आजोळीच वाढली. आजीची इच्छा होती मी घरजावई व्हावं पण मी स्पष्ट शब्दांत नाही म्हणून सांगितलं. उद्या आपण त्यांच्या घरी जाऊयात.’’

राधा कौतुकाने त्याचं बोलणं ऐकत होती. पोरगा अमेरिकेत राहूनही साधाच राहिला होता. अजिबात बदलला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशारच होता. शाळेपासून इंजिनीयर होईपर्यंत त्याने नेहमीच टॉप केलं होतं. पुढल्या शिक्षणासाठी अमेरिकेला आला. शिक्षण संपवून छानपैकी नोकरीही मिळवली अन् जुईसारखी छोकरीही. लोकांना आमचं हे सगळं सुख पाहून किती हेवा वाटेल या कल्पनेने राधाला हसू फुटलं.

‘‘आई का हसतेस?’’ आकाशने विचारलं.

‘‘काही नाही रे, सियाटलला पण आपण जायचंय ना? आनंद अन् नीताशीही जुईची भेट व्हायला हवी. लग्नाची सर्व तयारी करूनच आली आहे मी.’’ राधाने म्हटलं.

आकाशाने जुईला रात्रीच फोन करून सांगितलं की आईबाबांना ती आवडली आहे.

दुसऱ्यादिवशी जुई सकाळीच भेटायला आली. येताना तिने राधा व अविनाशसाठी आजीने केलेले काही भारतीय पदार्थ आणले होते.

‘‘मी तुम्हा दोघांना आकाशप्रमाणेच आईबाबा म्हटलं तर चालेला ना?’’ जुईने विचारलं.

‘‘चालेल ना? तू आकाशहून वेगळी नाहीए अन् आता आमचीच होणार आहेस.’’

थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर जुईने विचारलं, ‘‘तुम्ही माझ्या आजीला व वडिलांना भेटायला कधी येताय? त्यांना फार उत्सुकता आहे तुम्हाला भेटण्याची.’’

‘‘बघूयात. जरा विचार करून दिवस ठरवूयात,’’ राधाने म्हटलं.

‘‘नाही हं! असं नाही चालणार. मी उद्याच सकाळी गाडी घेऊन येते. तुम्ही तयार राहा.’’ जुईने प्रॉमिस घेतल्यावरच राधाला खोलीत जाऊ दिलं.

दुसऱ्यादिवशी सकाळपासूनच राधा खूप उत्साही होती. बोलत होती. हसत होती. अविनाशने तिला त्यावरून चिडवूनही घेतलं. तेवढ्यात जुई गाडी घेऊन आली.

राधा अन् अविनाश तयार होऊन खोलीतून बाहेर पडली तेव्हा जुईच्या मनात आलं, आकाश देखणा आहेच, पण त्याचे आईबाबाही या वयात किती छान दिसतात.

त्या तासाभराच्या प्रवासात सुंदर रस्ते, स्वच्छ वातावरण अन् झाडाझुडपांच्या दर्शनाने राधाच्या चित्तवृत्ती अधिकच बहरून आल्या.

गाडी जुईच्या घरासमोर थांबली. एका कुलीन वयस्कर स्त्रीने पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं. ती जुईच्या आईची आई होती. ती त्यांना ड्राँइंगरूममध्ये घेऊन गेली. जुईचे वडील येऊन अविनाशच्या जवळ बसले. त्यांनी एकमेकांची ओळख करून देत अभिवादन केलं. मग जुईचे वडील राधाकडे वळले. दोघांची नजरानजर होताच दोघांचेही चेहरे बदलले. नमस्कारासाठी उचललेले हात नकळत खाली वळले. इतर कुणाच्या लक्षात आलं नाही पण अविनाशला ते सगळं जाणवलं, लक्षात आलं. राधा एकदम स्तब्ध झाली. मघाचा आनंद, उत्साह पार ओसरला. मनाची बैचेनी शरीराच्या माध्यमातून, देहबोलीतून डोकावू लागली.

जुईची आजी एकटीच बोलत होती. वातावरणात ताण जाणवत होता. अविनाश तो दूर करण्याचा प्रयत्न करत होता.

जुईने अन् आजीने जेवण्यासाठी विविध चविष्ट पदार्थ केले होते. पण राधाचा मूड जो बिघडला तो काही सुधरेना. आकाश अन् जुईलाही या अचानक परिवर्तनाचं मोठं नवल वाटलं होतं.

शेवटी जुईच्या आजीने विचारलंच, ‘‘राधा, काय झालंय? मी किंवा आशीष म्हणजे जुईचे बाबा तुम्हाला पसंत पडलो नाहीए का? एकाएकी का अशा गप्प झालात? ते जाऊ देत, आमची जुई तर पसंत आहे ना तुम्हाला?’’

हे ऐकताच राधा संकोचली, तरीही कोरडेपणाने म्हणाली, ‘‘नाही, तसं काही नाही. माझं डोकं अचानक दुखायला लागलंय.’’

‘‘तुम्ही काही म्हणा, पण अमेरिकेत जन्माला आलेल्या जुईचं संगोपन तुम्ही फार छान केलंय, तिच्यावर केलेले संस्कार, तिला मिळालेलं उच्च शिक्षण व त्यासोबतचं घरगुती वळण, या सर्वच गोष्टींचं श्रेय तुम्हा दोघांना आहे. जुई आम्हाला खूपच आवडली आहे. आम्हाला भारतातही अशी सर्वगुणसंपन्न मुलगी शोधून मिळाली नसती. राधा, खरंय ना मी म्हणतो ते?’’ अविनाश म्हणाला.

राधाने त्यांचं बोलणं कानाआड केलं. पण अविनाशच्या बोलण्याने सुखावलेले, थोडे रिलॅक्स झालेले जुईचे वडील तत्परतेने म्हणाले, ‘‘तर मग आता पुढला कार्यक्रम कसा काय ठरवायचा आहे? म्हणजे एंगेजमेण्ट…अन् लग्न?’’

अविनाशला बोलण्याची संधी न देता राधानेच उत्तर दिलं, ‘‘आम्ही नंतर कळवतो तुम्हाला…आम्हाला आता निघायला हवं…आकाश चल, टॅक्सी बोलाव. आपण मॅनहॅटनला जाऊन मग घरी जाऊ. निशा तिथे आमची वाट बघत असेल. मामामामी येणार म्हणून खूप तयारी करून ठेवली असेल. जुईला तिथे आपल्याला कशाला पोहोचवायला सांगतोस? जाऊ की आपण.’’

राधाच्या बोलण्याने सगळेच दचकले.

‘‘यात त्रास होण्यासारखं काही नाहीए. उलट तुमच्या सहवासात जुई खूप खूश असते.’’ आशीषने, जुईच्या वडिलांनी म्हटलं, ‘‘सर, अविनाश, तुमची परवानगी असेल तर मला दोन मिनिटं राधा मॅडमशी एकांतात बोलायचं. जुई सहा वर्षांची असतानाच तिची आई वारली. त्यानंतर स्वत:लाच एका चुकीचं प्रायश्चित्त घेण्यासाठी मी दुसरं लग्न केलं नाही. जुईच्या आजीनेही फार आग्रह केला. पण मी एकट्यानेच जुईच्या आईवडिलांची भूमिका पार पाडली. जोपर्यंत राधा मॅडमकडून लग्नाच्या तयारीसाठी पूणपणे ‘हो’ असा सिग्नल मिळत नाही तोवर माझा जीव शांत होणार नाही.’’

अविनाशने मोकळेपणाने हसून सहमती दर्शवली अन् आशीष व राधाला तिथेच सोडून इतर मंडळी बाहेरच्या लॉनवर आली.

आशीष राधाच्या समोर येऊन उभा राहिला. हात जोडून दाटून आलेल्या कंठाने बोलला, ‘‘राधा, तुझा विश्वासघात करणारा, तुला फार फार मनस्ताप देणारा, मी तुझ्यापुढे उभा आहे. काय द्यायची ती दूषणं दे. हवी ती शिक्षा दे. पण माझ्या पोरीचा यात काही दोष नाहीए. तिच्यावर अन्याय करू नकोस. तुला विनंती करतो, तुझ्याकडे भीक मागतो, जुई अन् आकाशला एकमेकांपासून वेगळं करू नकोस. माझी जुई फार हळवी आहे गं, आकाशशी लग्नं झालं नाही तर ती जीव देईल…प्लीज राधा, मला भीक घाल एवढी.’’

आकाशने भरून आलेले डोळे पुसले, घसा खाकरून स्वच्छ केला अन् तो बाहेर लॉनवर आला. ‘‘जुई बाळा, यांना मॅनहॅटनला घेऊन जा. तिथून घरी सोड अन् त्यांची सर्वतोपरी काळजी घे हं!’’ वडिलांचे हे शब्द ऐकताच जुई व आकाशचे चेहरे उजळले.

राधाने गाडी सरळ घरीच घ्यायला लावली. संपूर्ण प्रवासात ती गप्प बसून होती. घरी पोहोचताच कपडेही न बदलता ती बेडवर जाऊन पडली.

अविनाश टीव्ही बघत बसला.

राधाच्या डोळ्यांपुढे ३२ वर्षांपूर्वीचा प्रसंग एखाद्या सिनेमासारखा उभा राहिला.

आशीष व राधाचा साखरपुडा खूप थाटात पार पडला होता. कुठल्या तरी समारंभात आधी त्यांची भेट झाली अन् मग आशीषच्या घरच्यांनी राधाला मागणी घातली. त्यावेळी मोबाइल नव्हते. रात्री सगळे झोपले की राधा हळूच टेलीफोन उचलून स्वत:च्या खोलीत न्यायची अन् मग तासन्तास राधा व आशीषच्या गप्पा चालायच्या. चार महिन्यांनंतरचा लग्नाचा मुहूर्त ठरला होता. तेवढ्यात ऑफिसकडूनच त्याला एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवण्यात आलं.

त्यामुळे लग्न लांबवण्यात आलं. राधाला फार वाईट वाटलं. पण आशीषच्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी एवढा त्याग करणं तिचं कर्तव्य होतं. तिने आपलं लक्ष एमएससीच्या परीक्षेवर केंद्रित केलं. पण सहा महिन्यांसाठी अमेरिकेला गेलेला आशीष पुन्हा परतून आलाच नाही. तिथे तो एका गुजराती कुटुंबात पेइंगगेस्ट म्हणून राहू लागला. अमेरिकन आयुष्याची अशी मोहिनी पडली की त्याने तिथेच राहाण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात सोपा उपाय होता की अमेरिकन नागरिकत्त्व असलेल्या मुलीशी लग्न करायचं अन् तिथेच नोकरी शोधायची. आशीषने कंपनीची नोकरीही सोडली अन् भारतात येण्याचा मार्गही बंद केला. राहात होता त्या घरातल्या मुलीशी त्याने लग्न केलं. पुढे अमेरिकन नागरिकत्त्वही घेतलं. या विश्वासघातामुळे राधा पार मोडून पडली. पण आईवडिलांनी समजावलं, आधार दिला. पुढे अविनाशशी लग्नं झालं. अविनाश खूप प्रेमळ अन् समजूतदार होता. त्याच्या सहवासात राधा दु:ख विसरली. संसारात रमली. दोन मुलं झाली. त्यांना डोळसपणे वाढवलं. मुलंही सद्गुणी होती. हुशार होती. रूपाने देखणी होती. मुलीने बी.टेक. केलं. तिला छानसा जोडीदार भेटला. लग्न करून ती इथे सियाटललाच सुखाचं आयुष्य जगते आहे. जावई मुलगी मल्टीनॅशनल कंपनीत उच्चाधिकारी आहेत.

आकाश सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. टेनिस उत्तम खेळतो. टेनिस टूर्नामेंट्समध्येच जुईशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत अन् पुढे प्रेमात झालं. फेसबुकवर जुईची भेट राधाशी आकाशने करून दिली. जुई त्यांना आवडली. त्यांनी लग्नाला होकार दिला. फार खोलात जाऊन चौकशी केली नाही, तिथेच चुकलं. मुलीच्या वडिलांविषयी अधिक माहिती मिळवायला हवी होती. सगळं खरं तर छान छान चाललेलं अन् असा या वळणावर आशीष पुन्हा आयुष्यात आला. कपाटात बंद असलेल्या स्मृती पुन्हा बाहेर आल्या. राधाला काय करावं कळत नव्हतं. मुलाला कसं सांगावं की या पोरीचा बाप धोकेबाज आहे. जुईशी लग्न करू नकोस यासाठी त्याला काय कारण सांगावं? मनावरचा ताण असह्य होऊन राधा हमसूनहमसून रडायला लागली.

अचानक खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. अविनाश जवळ येऊ बसला होता. तिचे हात हातात घेऊन तो म्हणाला, ‘‘राधा, मनातून तू इतकी कच्ची असशील मला कल्पनाच नव्हती. अगं किती क्षुल्लक गोष्टींसाठी स्वत:ला त्रास करून घेते आहेस? काही कानावर होतं…काही अंदाजाने जाणलं…अगं, आशीषने जे तुझ्याबाबतीत केलं, ते खूप लोक करतात. हा देश त्यांच्या स्वप्नातलं ध्येय होतं. जुईकडे बघूनच कळतंय की तिची आई किती सुंदर असेल. व्हिसा, नागरिकत्त्व, राहायला घर, सर्व सुखसोयी, सुंदर बायको त्याला सहज मिळाली तर त्याने केवळ साखरपुडा झालाय म्हणून भारतात येणं म्हणजे वेडेपणाच होता. तुझं अन् त्यांचं तेच विधिलिखित होतं. माझा मात्र फायदा झाला. त्यामुळेच तू माझ्या आयुष्यात आली. अन् तुझी माझी गाठ परमेश्वराने मारली होती तर तू आशीषला मिळणारच नव्हतीस…मला मान्य आहे, मी तुला खूप संपन्न सुखसोयींनी परिपूर्ण आयुष्य नाही देऊ शकलो. पण मनापासून प्रेम केलं तुद्ब्रझ्यावर, हे तर खरं ना? मघापासून आकाश विचारतोय, आईला एकाएकी काय झालंय? मी काय उत्तर देऊ त्याला.’’

अविनाशच्या बोलण्याने राधा थोडी सावरली. डोळे पुसून म्हणाली, ‘‘माझ्या मनात एकच गोष्ट सतत घुमतेय की वडिलांचेच जीन्स जुईत असतील तर? तर ती आमच्या मुलाला आमच्यापासून तोडेल…आशीष किती क्रूरपणे वागला. आईवडिलांनाही भेटायला आला नाही. घरजावई होऊन बसला इथे. त्याच्या मुलीने माझ्या साध्यासरळ पोराला घरजावई व्हायला बाध्य केलं तर? मुलाला बघायला आपण तडफडत राहाणार का?’’

राधाच्या बोलण्यावर अविनाश अगदी खळखळून हसला. तेवढ्यात आकाश आत आला. रडणारी आई, हसणारे बाबा बघून गोंधळला. शेवटी अविनाशने त्याला सर्व सांगितलं. राधाला वाटणारी भीतीही सांगितली.

आकाशही हसायला लागला. आईला मिठी मारून म्हणाला, ‘‘हेच ओळखलंस का गं आपल्या मुलाला? अगं मी कधीच घरजावई होणार नाही अन् मुख्य म्हणजे जुईही मला घरजावई होऊ देणार नाही. उलट आता तुम्ही इथे आमच्याजवळ राहा. मी मोठं नवं घर घेतलंय. उद्या आपण ते बघायला जातोए. इथे राहिलात तर नीताताई अन् भावजींनाही खूप आनंद होईल.’’

राधाची आता काहीच तक्रार नव्हती. महिन्याच्या आतच आकाश व जुईचं थाटात लग्न झालं. नवपरीणित वरवधू हनीमूनसाठी स्वित्झर्लण्डला गेली. लेक अन् जावई नात, नातवासह आपल्या गावी परत गेले.

अविनाशने राधाला म्हटलं, ‘‘आता या भल्यामोठ्या सुंदर, सुखसोयींनी सुसज्ज घरात आपण दोघंच उरलो. तुला आठवतंय, आपलं लग्न झालं तेव्हा घरात ढीगभर पाहुणे होते. एकमेकांची नजरभेटही दुर्मीळ होती आपल्याला. बाहेरगावी जाण्यासाठी माझ्यापाशी रजाही नव्हती. पैसेही नव्हते. पण आता मुलाने संधी दिलीय, तर आपणही आपला हनीमून आटोपून घेऊयात. आपणही अजून म्हातारे नाही आहोत. खरं ना?’’

राधाने हसून मान डोलावली अन् प्रेमाने अविनाशला मिठी मारली.

आजी बदलली आहे

कथा * ऋतुजा सोनटक्के

गेली पंधरा वर्ष आम्ही अमेरिकेत राहतोय. इथल्या नोकरीमुळे आम्ही जणू इथलेच झालो आहोत. तीनचार वर्षांनी एकदा आम्ही आईबाबांना भेटायला भारतात जात असू. मुलंही आता इथंच रूळलीत. अनेकदा मी नवऱ्याला म्हटलं, ‘‘आपण आता कधीच भारतात जाऊन राहणार नाही का?’’ तो म्हणाला ‘‘अशी नोकरी तिथं मिळत नाही अन् तिथली नोकरी आपल्याला आवडत नाही, म्हणजे शेवटी आपल्याला इथंच राहणं आलं,’’ तर आम्ही दोघं आपापल्या नोकऱ्या करतोय.

मला आईवडिल नाहीत. नवऱ्याच्या म्हणजे आकाशच्या आईबाबांना मी आईबाबाच म्हणते. ती दोघं भारतात असतात. माझी एकुलती एक नणंद आशूही मुंबईत असते. तिचा नवरा मर्चंट नेव्हीत असतो. तिच्या दोघी मुलींसह ती आईबाबांच्या फ्लॅटच्या शेजारीच असते. ती त्यांची काळजी घेते. यामुळे आम्हीही निर्धास्त असतो. पण आम्हाला असं वाटतं की आता आईबाबांनी तिथं एकटं राहण्यापेक्षा आमच्याकडे येऊन राहावं.

पण त्यांचं एकच म्हणणं आहे की इथल्या घराचे बंध तुटत नाहीत. अन् अमेरिकेत आम्हाला आवडणार नाही. तिथं फारसे भारतीय नाहीत, भाषेचा एक मोठा अडसर आहेच. पण आशूताईनं त्यांना समजावलं की अमेरिकेत आता खूप भारतीय राहतात. शिवाय थोडे दिवस राहिलात तर भाषाही समजते, बोलता येते. मग ती दोघं आमच्याकडे यायला तयार झाली. आकाश भारतात गेला, आईबाबांचा फ्लॅट विकायला काढला. नाही म्हटलं तरी तो फ्लॅट विकताना आईबाबांना वाईट वाटलं. तिथल्या एकेका वस्तूवर त्यांचा जीव होता. अत्यंत कष्टानं त्यांनी संसार जमवला होता.

पण त्याचवेळी आयुष्याचे उरलेले दिवस आपण नातवंडांसोबत घालवू ही गोष्ट उमेद देत होती. दोनच महिन्यात सगळं काही मार्गी लावून आशुताईचा निरोप घेऊन आईबाबा आमच्याकडे अमेरिकेत आले. आशुताईलाही फार वाईट वाटत होतं. कारण आता भारतात तिलाही कुणाचा आधार नव्हता. मनातलं सांगायला आईएवढं हक्काचे कोण असतं?

माझी मुलं अक्षय आणि अंशिका यांना भेटून आईबाबा सुखावले. मुलंही आपल्या परीनं त्यांच्याशी जुळवून घेत होती. आईंना मुलांचे इंग्रजी एक्सेंट समजत नसत, पण खाणाखुणा करून त्यांचं संभाषण चालायचं. त्यांना इथं बरं वाटावं म्हणून मी बरीच मराठी, हिंदी पुस्तकं व मासिकं ऑनलाइन मागवून घेत होते. हळूहळू इथल्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांनाही जमवून घेता आलं.

एक दिवस मी म्हटलं, ‘‘आई, इथं संध्याकाळी काही भारतीय बायका एकत्र जमतात. आपल्याकडे कसा कट्टा असतो, कट्टयावरच्या गप्पा असतात, तसंच! काही तर तुमच्या वयाच्या अन् मुंबईत राहून आलेल्याही आहेत. आज सायंकाळी आपण तिकडे जाऊ, तुमची ओळख करून देते मी. काही मैत्रीणी मिळाल्या की तुमचीही संध्याकाळ मजेत जाईल.’’

आई कबूल झाल्या. मग मी सायंकाळी त्यांना घेऊन कट्टयावर गेले. रूपा मावशी, विनिता मावशी, कमल मावशी अन् लीला मावशींशी ओळख करून दिली. त्या सर्व आईंच्याच वयाच्या होत्या. त्यांनी आनंदानं, प्रेमानं आईंचं स्वागत केले. रूपा मावशी म्हणाल्या, ‘‘आमच्या या कट्टयावर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपण रोज भेटूयात. कट्टयावरच्या गप्पांमध्ये, आपल्या वयाच्या आणखी एक सभासद आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.’’

त्यानंतर आई रोजच त्या सर्वांसह बागेत जाऊ लागल्या. तिथं त्यांचे दोन तास अगदी मजेत जायचे. आता त्यांना इथं राहणंही आवडू लागलं. बाबांनाही इथं मित्र भेटले होते. त्यांनाही इथं आवडत होतं. सकाळी पायी फिरून येणं, सायंकाळी कट्टा, दुपारी वाचन वामकुक्षी व मला स्वयंपाकात मदत करण्यात आईंचा दिवस भर्रकन् संपायचा. रोज सायंकाळी घरी आल्यावर त्या मला तिथं काय काय गप्पा झाल्या ते सांगायच्या. एक दिवस मात्र त्यांचा मूड जरा नीट नव्हता. वालाच्या शेंगा मोडता म्हणाल्या, ‘‘आज रूपा सांगत होती इथं एक भारतीय जोडपं आहे. त्यातला पुरूष नपुंसक आहे. त्याच्या बायकोचं तिच्या ऑफिसमधल्या कुणाशी तरी सूत आहे म्हणे.’’

‘‘आई, इथं अशा गोष्टी सर्रास घडतात. फार कुणी त्यावर चर्चा करत नाही. मी ओळखते त्या दोघांना…दोघंही सज्जन आहेत.’’ मी म्हटलं.

‘‘डोंबलाचे सज्जन, अगं नवरा असताना बाईनं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवायचे हे काय सज्जनपणाचं लक्षण म्हणायचं का?’’ आई चिडून बोलल्या.

मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांच्या पिढीला अन् भारतात तर हे सगळं भलतंच, अपवित्र किंवा पाप वाटणार. अर्थात् भारतात लपूनछपून अशा गोष्टी घडत असतातच. उघड झालं तर मात्र कठीण असतं. पण आपल्याकडेही रखेल, देवदासी, अंगवस्त्र बाळगणारे लोक होतेच की! श्रीमंत लोक तर उघड उघड हे करायचे. श्रीमंतांना अनेक गोष्टींची मुभा असते. एरवी लपून छपूनही लोक भानगडी करतात. इथं मात्र (म्हणजे अमेरिकेत) सगळं उघड असतं. लोक मोकळेपणानं अशी नाती स्वीकारतात. पण हे आईंना कुणी समजवायचं? मी गप्प बसले. त्यांच्यासोबत शेंगा मोडू लागले. विषय बदलला अन् वेगळ्याच विषयावर आम्ही बोलू लागलो.

आता आईंनाही बऱ्यापैकी इंग्रजीत बोलता येऊ लागलं. त्यामुळे मुलांशी त्या खूप गप्पा मारायच्या. मुलांनाही त्यांच्याकडून भारतातल्या गमतीजमती ऐकायला आवडायचं. आईची मला घरकामात खूप मदत व्हायची. इथं नोकरचाकर हा प्रकारच नसतो. सगळं स्वत:च करायला लागतं. आईंची घरकामतली मदत मला मोलाची वाटायची.

आता त्या इथं छानच रूळल्या होत्या. दर महिन्याला एकदा सगळ्या मैत्रिणी मिळून रेस्टारंण्टमध्ये जायच्या. एकत्र जमायच्या. तेव्हाही प्रत्येकीनं काहीतरी नवा पदार्थ करून आणायचा. आईंना ही कल्पना आवडली. त्या सुरगण होत्या. त्यांनी केलेला पदार्थ नेहमीच भरपूर प्रशंसा मिळवायचा. आता त्या सलवार सूट वापरायला लागल्या होत्या. नवी पर्स, मॅचिंग चप्पल वगैरेची त्यांना मजा वाटत होती. लिपस्टिकही लावायच्या. कधी कधी पत्ते नाही तर एखादा वेगळाच खेळ असायचा. एकूण त्यांचं छान चाललं होतं.

एकदा मी ऑफिसातून परतले, तेव्हा त्या ही त्यांच्या कट्टयावरून घरी परतल्या होत्या. माझी वाट बघत होत्या. त्यांना काहीतरी मला सांगायचं होतं. मी घरात आले तशी पटकन् दोन कप चहा करून त्या माझ्याजवळ येऊन बसल्या.

‘‘काय म्हणतोय तुमचा कट्टा?’’

‘‘बाकी सगळं छानच आहे गं, पण काही गोष्टी मात्र फारच विचित्र असतात इथं. आज तर स्पर्म डोनेशनचा विषय होता चर्चेला. जर एखाद्या पुरुषाला शुक्राणू (स्पर्म) पुरेसे किंवा सशक्त नसल्यामुळे मूल होत नसेल तर त्याच्या बायकोच्या गर्भाशयात दुसऱ्या कुणाचे तरी शुक्राणु ठेवून गर्भ तयार करतात किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाच्या दोषामुळे पोटात मूल वाढवता आलं नाही तर ती आपलं मूल भाड्याचं गर्भाशय घेऊन (दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ ठेवून) मूल जन्माला घालू शकते. शी शी काय हा अधर्म? घोर कलियुग गं बाई!!’’

मी शांतपणे म्हटलं, ‘‘पण जर मूल हवं म्हणून अशी मदत घेतली तर त्यात वाईट काय आहे?’’

‘‘पण ज्या मातेच्या गर्भात ते मूल वाढेल, तिचेच गुणधर्म, दोष वगैरे घेऊन बाळ जन्माला येईल ना? मग ते मूल स्वत:चं कसं म्हणायचं?’’

यावेळी वाद वाढवण्यात अर्थ नव्हता. मी बोलण्याचा विषय बदलायचा प्रयत्न केला, पण आई अजूनही तणतणत होत्या. ‘‘कसला देश आहे…अन् कसली माणसं आहेत. काही संस्कृती, संस्कार यांना नाहीतच जणू. यापुढची पिढी अजून काय काय करेल, कुणास ठाऊक?’’

माझ्या अमेरिकन झालेल्या मुलांना आजीचं हे वागणं, बोलणं फारच मागासलेलं, बुरसटलेलं वाटत होतं. ‘‘ममा, आजी असं का बोलते? जो तो आपला स्वतंत्र आहे ना आपल्या पद्धतीनं वागायला?’’ लेकीनं मला हळूच म्हटलं.

‘‘हो गं! पण आजी आताच भारतातून आली आहे ना, तिला हे सगळं विचित्र वाटतंय.’’ मी लेकीची समजूत घातली.

बघता बघता तीन वर्षं उलटलीसुद्धा. आईंना एकदा भारतात जाऊन आशाताईंना भेटायची फार इच्छा झाली होती. मुलांनाही सुट्या होत्या. मी त्यांची तिकिटं काढून दिली. बाबांना इथंच त्यांच्या मित्रांचे वाढदिवस असल्यामुळे मुंबईला जायचं नव्हतं. ते इथंच राहणार होते.

आई आणि मुलं आल्यामुळे आशुताईला खूप आनंद झाला. गेली तीन वर्षं ती ही फार एकटी पडली होती. आशुताईनं मुलांसाठी, आईसाठी खूप कार्यक्रम ठरवून ठेवले होते. रोज सगळी मिळून कुठं तरी भटकायला जायची. रोज घरात नवे पदार्थ केले जायचे. मुलांच्या आवडीनिवडी, कोडकौतुक पुरवताना आशुताईला खूप आनंद वाटायचा. निशांत म्हणजे माझे मेव्हुणे, आशुताईचा नवरा शिपवरच असायचा. आपल्या दोन मुलींना तर आशुताईनं एकटीनंच वाढवलं होतं. अर्थात निशांत पूर्ण क्रेडिट आशुताईना द्यायचा.

एकदा रात्री आईंना थोडं बेचैन वाटायला लागलं म्हणून त्या आपल्या खोलीतून बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावर येऊन लवंडल्या. रात्री माझी व आशुताईची मुलं एकाच बेडरूममध्ये झोपत होती. एक खोली आईंना दिली होती. एक खोली आशुताईची होती. आईंना झोप येत नव्हती.

तेवढ्यात आशुताईच्या खोलीचं दार उघडलं. एक तरूण पुरुष खोलीतून बाहेर पडला. त्याला सोडायला गाऊनमध्येच असलेली आशुताईही खोलीबाहेर पडली. जाता जाता त्यानं आशुताईना पुन्हा मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन् बाय करून तो निघून गेला.

आपली आई सोफ्यावर बसली आहे हे आशुताईला ठाऊकच नव्हतं. तो पुरुष निघून गेला अन् आईंनी ड्रॉइंगरूमचा दिवा लावून जोरानं विचारलं, ‘‘कोण आहे हा? तुला असं वागणं शोभतं का? तुझा नवरा इथं नाही, तुझ्या मुली मोठ्या होताहेत…’’

‘‘आई, जाऊ दे…तुला कळायचं नाही,’’ आशुताईनं म्हटलं.

आईचा पारा चढलेलाच होता. ‘‘मला कळायंचं नाही का? तुझी अक्कल शेण खायला गेली आहे, माझी नाही,’’ आईनं ताबडतोब फोन लावून अमेरिकेत माझ्या नवऱ्याला ही बातमी दिली.

क्षणभर तर आकाशही भांबवला. मग म्हणाला, ‘‘आई, तू आशुताईला काही बोलू नकोस, मला आधी सगळं प्रकरण समजून घेऊ दे.’’

‘‘तुम्ही ताबडतोब इथं या. मी काय म्हणते ते कळेल तुम्हाला.’’ आईंनी रागानं फोन आपटला.

दुसऱ्याचदिवशीची तिकिटं मिळवून आम्ही दोघं भारतात आलो. आम्हाला बघून आशुताई खूपच घाबरली. त्या दिवशी आम्ही काहीच बोललो नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्यापाशी हा विषय काढला. ती जे सांगत होती ते फार विचित्र होतं. ती सांगत होती,

‘‘दादा, तुला ठाऊक आहे. आमचं लग्नं आम्हा दोघांनाही न विचारता ठरवलं गेलं. मर्चंट नेव्हीच्या नोकरीमुळे निशांत सहा महिने बोटीवर असतो. त्या काळात त्याचे अनेक मुलींशी संबंध येतात. इथं तो येतो तेव्हाही त्याला माझ्यात फारसा इंटरेस्ट नसतो. तो घरातला कर्ता पुरुष म्हणून कर्तव्य पार पाडतो. आमच्या दोन मुलींसाठी खरं तर आम्ही एकत्र आहोत. हा फ्लॅट मला घेऊन दिलाय. घर खर्चाला भरपूर पैसाही देतो. मुलींना काही कमी पडू देत नाही, पण आमच्यात पतिपत्नी म्हणून तसा संबंध नाही.

मी त्याला या बाबतीत विचारलं तर तो म्हणतो तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस, तुला हवं तर तू घटस्फोट घे. इतर कुणाशी संबंध ठेवायचे तर ठेव. फक्त बाहेर या गोष्टीची चर्चा व्हायला नको. बाहेरच्या जगात आम्ही पतिपत्नी आहोत. पण तशी मी एकटी आहे. मुलींना सोडून कुठं जाऊ? डिव्होर्स घेतला तर मुलींच्या लग्नात अडचण येऊ शकते. पण मलाही प्रेम हवंय. शरीराची ओढ काय फक्त पुरुषालाच असते? स्त्रीला शरीरसुख नको असतं?’’

आशुताई एवढं बोलतेय तोवर आईंनी तिच्या थोबाडीत मारलं. ‘‘लाज नाही वाटत असं बोलायला,’’ त्या ओरडल्या.

आकाशनं आईचा हात धरून तिला बाजूला घेतलं. ‘‘आई, शांत हो, मला आशुशी एकट्याला बोलू दे,’’ आकाश शांतपणे म्हणाला. त्यानं आईला तिच्या खोलीत नेलं.

आता आशुच्या खोलीत आम्ही तिघंच होतो. आशु सांगत होती, ‘‘इथं ही आकाशचे दोन तीन मुलींशी संबंध आहेत. त्यातली एक तर विवाहित आहे. तिच्या नवऱ्यालाही हे माहीत आहे. काल माझ्याकडे आलेला तरूण डायव्होर्सी आहे. एकटाच राहतो. आम्ही दोघं एकटेपणातून एकमेकांच्या जवळ आलो. निशांतला हे ठाऊक आहे. त्याला याबद्दल ऑब्जेक्शन नाही. फक्त हे सगळं चोरून घडतं. बाहेर कुणालाही काहीही ठाऊक नाही. तसं मुंबईतही कुणाला कुणाशी काही देणंघेणं नसतं. वेळही नसतो, तरीही समाजाची भीती असतेच,’’ बोलता बोलता आशुताई रडायला लागली.

मी तिला जवळ घेत म्हटलं, ‘‘ताई, तुम्ही, काळजी करू नका, आपण यावर नक्की तोडगा काढू. फक्त विचार करायला थोडा वेळ द्या.’’

आम्ही दोघं तिथून उठलो अन् बागेतल्या बाकावर येऊन बसलो. ‘‘आशुताई सांगते आहे ते जर खरं असेल तर यात तिचा काय दोष? पुरुषानं हवं तिथून शरीरसुख मिळवायचं अन् त्याच्या बायकोनं मात्र घुसमट सहन करायची हा कुठला न्याय?’’ मी म्हटलं.

आकाशनं मान हलवून संमती दर्शवली. तो म्हणाला, ‘‘तुझं म्हणणं खरंय, पण आईला कसं पटवून द्यायचं? ती तर आशुलाच दोष देणार?’’

मीही विचार करत होते ताई म्हणाली ते खरंय, स्त्रीच्याही शारीरिक गरजा असतातच ना? जर नवरा तिची शारीरिक भूक भागवू शकत नसेल तर तिनं काय करावं? खरं तर यात आशुची काहीच चूक नाही. समाजानं पुरुषाला झुकतं माप दिलंय म्हणून तो हवंय ते करेल का? जर तो शेजारी अन् आशू स्वखुषीनं एकत्र येताहेत तर हरकत काय आहे? जगात असे किती तरी लोक असतील.

‘‘आकाश, आपण आईंना समजावून बघूयात. प्रयत्न तर करायलाच हवा,’’ मी म्हटलं. तोही कबूल झाला.

शेवटी आम्ही आई व मुलांना घेऊन परत अमेरिकेत आलो आणि निशांत बोटीवरून घरी परतल्यावर पुन्हा लगेच मुंबईला आलो. आकाशनं निशांतला एकूण परिस्थितीबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं खरेपणानं आपल्या इतर संबंधांबद्दल कबूली दिली. ‘‘मी आशुपासून काहीही लपवलेलं नाही अन् तिलाही मी पूर्ण मोकळीक दिली आहे. फक्त आम्ही या गोष्टी आमच्यातच ठेवल्या आहेत. बाहेर हे कुणाला माहीत नाही. आकाश, तू अमेरिकेत राहतो आहेस, तुलाही यात काही प्रॉब्लेम वाटतो का?’’

‘‘प्रश्न माझा नाहीए. आईचा आहे. तिला कसं पटवून द्यायचं?’’

‘‘मी बोलेन त्यांच्याशी, उद्याच बोलतो.’’ निशांत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट आटोपल्यावर निशांत आईजवळ बसले, ‘‘आई, मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर अन् आशुवर फार चिडला आहात. तुमचा रागही बरोबरच आहे. पण तुम्हीही जाणता की आमचं लग्न आमची संमती न घेताच तुम्ही मोठ्यांनी ठरवलंत. समाजाच्या रिवाजानुसार लग्न झालं, पण आम्ही दोघंही एकमेकांना अनुरूप नव्हतो, पुरक नव्हतो. आम्ही प्रयत्नही केला. पण कुठंतरी काही तरी बिनसलं हे खरं. निसर्ग नियमानुसार आम्हाला मुलंही झाली. म्हणजे संतानोत्पत्ती हा लग्नाचा उद्देश तर सफल झाला. पण आम्ही दोघंही संतुष्ट नव्हतो. पतिपत्नी म्हणून जी एकरूपता असावी ती आमच्यात नव्हती. कदाचित माझी भूक जास्तच असेल…त्यातून नोकरीमुळे मी सहा महिने घराबाहेर असतो. अशावेळी शरीराची गरज भागवायला मला दुसरा आधार शोधावा लागला. आशुलाही त्याच भावना आहेत. मी सुख भोगणार अन् माझी पत्नी इथं तळमळणार हे मला मान्य नाही. मीच तिला पूर्ण मोकळीक दिली आहे. तिला पूर्णपणे सुखावू शकेल अशा पुरुषाशी तिनं संबंध ठेवायला माझी हरकत नाही. त्यामुळे आम्ही दोघंही सुखी होतो अन् आमचे आपसातले संबंधही चांगले राहतात. एकमेकांविषयी आमच्या मनांत राग, द्वेष, संताप नाही…’’

आई अजूनही रागातच होती. निशांतलाही ते समजलं. त्यानं अत्यंत प्रेमानं अन् आदरानं आईचा हात आपल्या हातात घेतला, ‘‘आई, मला कळंतय, या गोष्टींमुळे तुम्ही खूप दुखावला आहात. तुम्हाला खूप रागही आला आहे. पण मला एक सांगा, एखाद्या जिवंत माणसाच्या आनंदापेक्षा निर्जीव रीतीरिवाज किंवा नियम कायदे महत्त्वाचे आहेत का? अन् या गोष्टी पूर्वीही घडतंच होत्या. अगदी आपल्या महाभारतातही असे दाखले आहेतच ना?’’

एवढं बोलून निशांतने इंटरनेटमधून डाऊनलोड केलेले महाभारतातले प्रसंग सांगायला सुरूवात केली. ‘‘पांडूला एका ऋषीनं शाप दिल्यामुळे तो पत्नीशी रत होऊ शकत नव्हता. पण त्याला पुत्र हवा होता, तेव्हा त्याची पत्नी कुंतीनं तिला मिळालेल्या वराचा उपयोग करून वेगवेगळ्या देवांकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. महाभारतातली पांडवांच्या जन्माची कथा काय सांगते? तिथंही नवऱ्याखेरीज इतर पुरुषांची मदत घेतली गेली ना?’’

महाभारतातच द्रौपदीची कथा आहे. द्रौपदीला पाच पती होते. कारण आईनंच पाचही भावांना तिला वाटून घ्यायला सांगितलं होतं. अर्जुनाला सुभद्रा आवडली अन् तो तिला पत्नी म्हणून घेऊन आला. भीमाला हिंडिंबेपासून घटोत्कच नावाचा मुलगा होता. धृतराष्ट्र राजाचा मुलगा युयुत्सु तर म्हणे एका वेश्येपासून झाला होता.

आता तुम्हीच बघा, तुम्ही रोज महाभारत वाचता, अगदी श्रद्धेनं वाचता. त्यातला खरा अर्थ तुम्हाला लक्षात आलाय का? आयुष्य स्वेच्छेनं, आनंदात घालवा. हसतखेळत घालवा. फक्त एकच लक्षात ठेवा की तुमच्या सुखासाठी दुसऱ्याला त्रास होता कामा नये, तुमचं सुख दुसऱ्याला दु:ख देऊन मिळवलेलं नसावं आणि कुणी कुणावर बळजबरी करू नये. असा साधा संदेश हे ग्रंथ देतात ना?

मग आज आम्ही, म्हणजे मी आणि आशु जर परस्पर सहमतीनं आमचं सुख मिळवतो आहोत तर त्यात गैर काय आहे? मी इथं नसताना तिनं मुलींना उत्तमरित्या एकटीनं वाढवलं, याचं मला कौतुक आहे, तिच्याविषयी अभिमान आहे. मी बोटीवर अत्यंत धोकादायक परिस्थितीत राहतो. मुबलक पैसा मिळवताना मला सतत धोक्यांना सामोरं जावं लागतं. याबद्दल आशुच्या मनात माझ्याबद्दल कौतुक आणि आदर आहे. आम्ही पतिपत्नी म्हणून नाही तर चांगले मित्र म्हणून राहतोय. यात चुकीचं काय आहे? आता तुम्ही समाजाचे नियम म्हणाला तर हे नियम केले कुणी? ज्यांनी कुणी हे नियम केले त्यांना समाजातला वेश्या व्यवसाय दिसत नाही? राजरोसपणे चालणारा शरीराच्या सौदेबाजार त्यांना खटकत नाही? हे नियम करणारे पुरुष असतात, स्वत:साठी पळवाटा काढतात अन् स्त्रियांना मात्र दु:खाच्या खाईत लोटतात. स्त्रियांना का हक्क नसावा हवं ते सुख मिळवण्याचा? नियम सर्वांसाठी सारखे असावेत. त्यात स्त्री पुरूष असा भेदभाव कशासाठी? अन् मी तर म्हणतो त्रासदायक ठरतील असे नियम, कायदे, कानून नसावेतच म्हणजे माणूस मुक्तपणे जगेल. नाहीतर मग चोरून लपवून काम करेल.’’

आई आपल्या जावयाचं बोलणं ऐकून स्तब्ध झाल्या होत्या. नि:शब्द बसून होत्या. तिथंच बसलेली आशूताई गदगदून रडत होती. निशांतने उठून तिला मिठीत घेतलं. थोपटून  शांत शांत करत म्हणाला, ‘‘आशू, रडू नकोस, तुझं काहीही चुकलेलं नाहीए. माझ्याकडून  तुला पूर्ण मोकळीक आहे. तू तुझा आनंद मिळव.’’

खरं तर आईंना हे सगळं पचवायला जडच जात होतं पण निशांत आणि आशुताईंचे उजळलेले चेहरे बघून आम्ही ही सुखावलो होतो. वातावरणातला ताण कमी झाला होता.

आईंनी आशुताईला म्हटलं, ‘‘पोरी, मला क्षमा कर, फार वाईट वागले मी तुझ्याशी,’’ आशुनं आईला मिठीच मारली.

निशांतनं ज्या धीरगंभीरपणे अन् हुषारीने सर्व परिस्थिती हाताळली, त्याला तोड नव्हती. त्याच्या स्वच्छ मनाचं, प्रामाणिकपणाचं अन् समजावून सांगण्याच्या कसबाचं आम्हाला कौतुक वाटलं.

आकाश म्हणाला, ‘‘मला आता भूक लागलीये. आज आपण जेवण बाहेरूनच मागवू, निशांत जेवण ऑर्डर करतोस का?’’

निशांतनं लगेच विचारलं, ‘‘आई, पहिला पदार्थ तुम्ही सांगा?’’

वातावरण निवळलं. आम्ही आईंना घेऊन अमेरिकेत परत आलो. आता आईंना अमेरिकेतल्या गोष्टी विचित्र वाटत नव्हत्या. त्यांनी इथलं कल्चर समजून घेतलं होतं. मुलंही म्हणत होती, ‘‘आजी, आता बदलली आहे बरं का!’’

उष्ट अन्न

– करूणा साठे

मेरठला पोहोचल्यावर राकेशचं घर शोधायला सीमाला फारसा त्रास झाला नाही. कारमधून उतरून ती बंगल्याच्या गेटपाशी आली. वरकरणी ती अगदी शांत अन् संयमित वाटत असली तरी मनात मात्र प्रचंड खळबळ माजली होती.

बेल वाजल्यावर ज्या स्त्रीनं दार उघडलं, तिलाच सीमानं विचारलं, ‘‘राकेश घरी आहेत का?’’

त्या स्त्रीच्या डोळ्यात एकदम ओळखीचे भाव उमटले. ‘‘तुम्ही सीमा…सीमाचना?’’
तिनं हसून म्हटलं, ‘‘हो, पण तुम्ही कसं ओळखलंत?’’

‘‘एकदा यांनी ऑफिसमधल्या कुठल्या तरी समारंभाचे फोटो दाखवले होते, त्यात तुम्हाला बघितलं होतं, तेच लक्षात राहिलं, या ना, आत या,’’ तिनं प्रेमानं सीमाचा हात धरून तिला घरात घेतलं.

‘‘मी कोण ते तुम्ही ओळखलंच असेल? माझं नाव…’’

‘‘वंदना!’’ सीमानं तिचं वाक्य पूर्ण केलं.

‘‘मी ओळखते तुम्हाला. राकेशच्या फ्लॅटमध्ये तुमचा फॅमिली फोटो आहे, त्यात बघितलंय मी तुम्हाला.’’

चेहऱ्यावर फारशी प्रतिक्रिया न दाखवता वंदनाने सहजच विचारलं, ‘‘यांच्या आजारपणाचं कसं कळलं?’’

‘‘राकेश माझे सीनिअर आहेत,  त्यांच्याशी मला फोनवर रोजच बोलावं लागतं. ऑफिसचे अपडेट्स द्यावे लागतात.’’

सीमाच्या बोलण्यात संकोच किंवा भीतीचा लवलेशही नव्हता. ‘‘आता कशी आहे तब्येत?’’ तिनं विचारलं.

‘‘ते स्वत:च सांगतील तुम्हाला. मी पाठवते त्यांना. मला फक्त एवढंच सांगा की तुम्हाला चहा, कॉफी किंवा सरबत यापैकी काय आवडेल?’’

‘‘गरम कॉफी मिळाली तर मजा येईल.’’

‘‘तुम्ही आमच्या खास पाहुण्या आहात सीमा. आजतागायत यांच्या ऑफिसमधल्या कुठल्याच सहाकाऱ्याला मी भेटले नाहीए. तुम्हीच पहिल्या.’’ अगदी जवळच्या मैत्रीणीशी बोलावं इतक्या आपलेपणानं वंदना बोलत होती.

मग सीमा वंदनाच्या व्यक्तीमत्त्वाचा विचार करू लागली. रंगानं गोरीपान नसली तरी नाकीडोळी आकर्षक होती. चेहऱ्यावर हसरा भाव अन् मार्दव होतं. दोन मुलांची आई होती पण हालचालीत चपळपणा होता. किंचित गोलाई असलेल्या बांध्याला निरोगीपणाचा तजेला होता.

ती फक्त दहावीपर्यंत शिकली आहे हे सीमाला ठाऊक होतं, पण तिच्या वागण्याबोलण्यात सुसंस्कृतपणा अन् आत्मविश्वास होता हे सीमाला मान्य करावंच लागेल.

थोड्या वेळानं राकेशनं ड्रॉइंगरुममध्ये प्रवेश केला. सीमाच्या अगदी जवळ येत त्यानं हसून म्हटलं, ‘‘तुला इथं बघून मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. काल फोनवर तू इथं येण्याबद्दल काही बोलली नव्हतीस?’’

‘‘मी सांगितलं असतं तर तू मला इथं येऊ दिलं असतंस?’’ त्याच्या हातावर हात ठेवत सीमानं विचारलं.

‘‘नाही…बहुधा नाहीच.’’

‘‘म्हणूनच मी सांगितलं नाही अन् सरळ येऊन थडकले. आज तब्येत कशी आहे?’’

‘‘गेले दोन दिवस ताप नाहीए, पण फार थकवा वाटतोय.’’

‘‘एकूणच सर्वांगावर अशक्तपणा जाणवतोय…अजून काही दिवस विश्रांती घे,’’ सीमानं म्हटलं.

‘‘नाही, परवा, सोमवारी मी जॉईन होतो. खरंतर तुझ्यापासून फार काळ दूर राहवत नाहीए.’’

‘‘जरा हळू बोल. तुझी बायको ऐकेल,’’ सीमानं त्याला दटावलं. मग म्हणाली, ‘‘एक विचारू?’’

‘‘विचार.’’

‘‘वंदनाला आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल माहीत आहे का?’’

‘‘असेल, पण कधीच काही म्हटलं नाहीए,’’ राकेशनं खांदे उडवून खूपच बेपर्वाइनं म्हटलं.

‘‘माझ्याशी ती इतकी छान वागली की माझ्याविषयी तिच्या मनात राग किंवा तक्रार असेल असं मला वाटत नाही.’’

‘‘तू माझी परिचित अन् सहकारी आहेस, त्यामुळेच ती तुझ्याशी वाईट वागण्याचं धाडस करणार नाही. तू माझ्या घरात अगदी बिनधास्तपणे वावर. हास, बोल…वंदनाचं टेन्शन घ्यायची गरज नाहीए,’’ प्रेमानं सीमाच्या गालावर थोपटून राकेश समोरच्या सोफ्यावर बसला.

‘‘राकेशच्या आजारपणामुळे सीमाची व त्याची भेट होत नव्हती, त्यामुळे आज त्याच्यासमोर बसून त्याच्याशी गप्पा मारताना सीमाला वंदनाची आठवणही आली नाही. वदंना रिकामा कप, प्लेटस् उचलून घेऊन गेली तरीही ती दोघं बोलतच होती.’’

सीमा राकेशच्या प्रेमात पडली त्याला एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला होता. आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा राकेश तिला पहिल्या भेटीतच इतका आवडला की तिच्या नकळत ती त्याच्यावर प्रेम करू लागली. लोक काय म्हणतील याचा विचारही न करता काही महिन्यातच तनमनानं ती त्याला समर्पित झाली.

त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी खूप आकांडतांडव केलं.

‘‘हे बघा, मी आता तीस वर्षांची होतेय. मला लहानशी मुलगी समजून दिवसरात्र मला समजावण्याचा खटाटोप आता सोडा. दोघांनाही सांगतेय, समजलं का?’’ एकदा सीमानं चढ्या आवाजातच त्यांना ऐकवलं. ‘‘माझ्या लग्नाची काळजी करू नका. कारण योग्य वयात तुम्ही माझ्यासाठी चांगला मुलगा बघू शकला नाहीत. माझ्या भविष्याची काळजी, माझ्या सुखदु:खाची चिंता माझी मलाच करू द्या. राकेशशी माझे असलेले संबंध तुम्हाला पसंत नाहीत तर मी वेगळी राहते.’’

सीमाच्या या धमकीमुळे आईबाबा गप्प बसले. त्यांचा राग ते अबोल्यातून व्यक्त करायचे. कमावत्या आणि हट्टी पोरीला बळजबरीनं काही करायला लावणं त्यांना आधीही जमलं नव्हतं, आताही जमणार नव्हतं.

वय वाढत गेलं अन् मनाजोगता जोडीदार भेटला नाही, तेव्हा सीमानं मनातल्या मनातच अविवाहित राहण्याचा निश्चय केला होता. पण एकट्यानं आयुष्य काढणंही सोपं नसतंच. त्याचवेळी फॅमिली मेरठला ठेवून तिच्या गावी नोकरीसाठी आलेल्या एकट्या, देखण्या राकेशनं तिचं मन जिंकून घेतलं. राजीखुशीनं ती त्याला समर्पित झाली.

‘‘मी तुझ्याबरोबर तुझी प्रेयसी, मैत्रीण बनून जन्मभर राहायला तयार आहे. तरीही लग्न करून एकत्र राहण्याची मजाच काही वेगळी असते. तुला काय वाटतं राकेश?’’ सुमारे एक महिन्यापूर्वी सीमानं राकेशच्या फ्लॅटमध्ये सकाळी त्याला बेड टी देता देता विचारलं होतं.

‘‘तू तयार असशील तर आजच मी तुझ्याशी दुसरं लग्न करायला तयार आहे,’’ राकेशनं तिच्या प्रश्नाला फारसं गंभीरपणे न घेता म्हटलं.

सीमा मात्र गंभीर होती. ‘‘असं करणं म्हणजेच स्वत:लाच फसवणं आहे.’’

‘‘तुला जर असं वाटतंय तर मग लग्नाचा विषय कशाला काढतेस?’’

‘‘माझ्या मनातलं तुला नाही तर कुणाला सांगणार मी?’’

‘‘ते बरोबर आहे,’’ राकेश म्हणाला, ‘‘पण आपलं लग्न होऊ शकत नाही…तसा काही पर्यायच नाहीए.’’

‘‘तू माझ्यावर खरं खरं, मनापासून प्रेम करतोस ना?’’

‘‘हा काय प्रश्न आहे?’’ तिच्या ओठांचं चुंबन घेत तो म्हणाला.

‘‘तू नेहमीच मला सांगतोस की तुझी पत्नी वंदना नाही तर मीच तुझी हृदयस्वामिनी आहे, हे खरंय ना?’’

‘‘होय, वंदना माझ्या दोन मुलांची आई आहे. ती सरळसाधी स्त्री आहे. जे आकर्षक व्यक्तिमत्त्व मला आवडतं तशी ती नाही. खरं तर आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी मी लग्नच करायला नको होतं. पण तरीही लग्न करावं लागलं. आता केवळ कर्तव्य म्हणून मी तिच्याशी बांधलेला आहे,’’ राकेश गंभीरपणे म्हणाला.

सीमाही एव्हाना थोडी घायकुलीला आली होती. ‘‘आपल्या प्रेमासाठी, माझ्या आनंदासाठी तू वंदनाला घटस्फोट देऊ शकतोस ना?’’ तिनं आपल्या मनातली इच्छा बोलूनच दाखवली.

‘‘नाही, कधीच नाही. याबाबतीत या विषयावर तू मला कधीच प्रेशराइज करू नकोस. वंदनानं मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी. कारण ती पूर्णपणे मला, माझ्या मुलांना, माझ्या संसाराला समर्पित आहे. तिचा काहीही दोष नसताना मी तिला घटस्फोट देणं म्हणजे तिच्यावर अन्याय करणं आहे,’’ राकेश इतक्या कठोरपणे बोलला की त्यानंतर सीमानं हा विषय पुन्हा काढला नाही.

त्याच दिवशी सीमानं वंदनाला भेटण्याचा निश्चय केला. त्यामागे काय हेतू आहे हे ही तिला कळलं नाही. तरीही तिला वंदनाला भेटायचं होतं, समजून घ्यायचं होतं. कदाचित मनात सुप्त इच्छा होती की वंदनाला तिचं अन् राकेशचं प्रेमप्रकरण कळलं की ती आपण होऊनच त्याच्यापासून दूर होईल.

वंदना अत्यंत सालस अन् साधी होती. तिनं ज्या आपलेपणानं सीमाचं स्वागत केलं, त्यामुळे तर सीमाला तिच्याविषयी कौतुकच दाटून आलं. चीड, संताप, हेवा असं काहीच वाटलं नाही.

उलट राकेश वंदनाशी जसं वागत होता, ते तिला खूपच विचित्र आणि असंस्कृतपणाचं वाटत होतं. फक्त ती राकेशवर प्रेम करत होती म्हणूनच ते तिनं सहन केलं होतं.

स्वत:च्या घरातही राकेश तिच्याशी इतका मोकळेपणानं वागत होता की तिलाच संकोच वाटत होता. सीमाचा हात हातात घेणं, सूचक बोलणं, तिच्या गालाला हात लावणं वगैरे बिनधास्त चालू होतं.

वंदनानं हे पाहिलं तर याचा धाक फक्त सीमाला होता. एकदा तर त्यानं सीमाला मिठीत घेऊन तिचं चक्क चुंबन घेतलं…सीमा खूप घाबरली.

‘‘हे काय करतोय राकेश? अरे, वंदनानं बघितलं तर? मलाच खूप लाजल्यासारखं होईल.’’ सीमा खरोखर रागावली होती. धास्तावली तर होतीच.

‘‘रिलॅक्स सीमा,’’ अत्यंत बेपर्वाइनं राकेशनं म्हटलं. तो हसून म्हणाला, ‘‘माझ्या हृदयात तुझ्याविषयी खरं प्रेम आहे. तू माझ्यासाठी वासनापूर्तीचं साधन नाहीस खरं सांगतो. जो आनंद वंदनाच्या संगतीत कधी मिळाला नाही तो तुझ्या संगतीत मिळतो.’’

‘‘पण इथं…घरात वंदना असताना… तिच्या घरात तू माझ्यावर प्रेम करतोस हे मलाच विचित्र वाटतंय…सहन होत नाहीए…’’

‘‘बरं बाई, आता काही गडबड करत नाही. शांत राहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव.’’

‘‘काय?’’

‘‘वंदनाला घाबरू नकोस. जर तिनं कधी मला संधी दिली तर मी तुझ्याचकडे येईन. तिला सोडून देईन…’’ राकेश खूपच भावनाविवश झाला होता. त्याचं ते भावनाविवश होणं तिला सुखावून गेलं तरीही मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी बोच वाटतच होती.

एकाएकी सीमाला वाटलं, याक्षणी वंदनाशी बोलायला हवं. तिचं एकूण व्यक्तिमत्त्व, तिचे प्लस अन् मायनस पॉईंट जाणून घ्यायला हवेत. तिच्यात कुठं, कसली उणीव आहे अन् कुठं तिचे गुण सीमापेक्षा जास्त ठरतात ते कळायलाच हवं. त्याशिवाय तिला राकेशपासून दूर करता येणार नाही, तोपर्यंत सीमाचं राकेशशी लग्न होणार नाही.

‘‘मला जेवायला घालूनच वंदना स्वत: जेवायला बसते. तू सुरूवात कर, ती नंतर जेवून घेईल,’’ राकेश अलिप्तपणे बोलला. त्याच्या शब्दातून पत्नीविषयीची बेपर्वाई स्पष्ट जाणवत होती. राकेशनं स्वत: खूप उत्साहानं सीमाचं ताट वाढलं.

सीमाला जाणवलं जेवण खरोखर चविष्ट आहे अन् सगळेच पदार्थ राकेशच्या आवडीचे आहेत.

वंदना समोर असतानाच राकेशनं सीमाला विचारलं, ‘‘स्वयंपाक कसा झालाय?’’

‘‘स्वयंपाक अतिशय सुरेख झालाय. प्रत्येक पदार्थ इतका चविष्ट आहे की कौतुक करायला शब्द अपुरे पडतील,’’ सीमानं मनापासून कौतुक केलं.

‘‘वंदना उत्तम स्वयंपाक करते, त्यामुळेच माझं वजन कमी होत नाही.’’

राकेशच्या तोंडून स्वत:चं कौतुक ऐकून वंदनाचा चेहरा आनंदानं डवरून आला हे सीमाच्या लक्षात आलं. राकेश तिच्याकडे बघतही नव्हता, ती मात्र प्रेमळ नजरेने त्याच्याकडेच बघत होती.

वंदनाचं राकेशवर प्रेम आहे. ती कधीच त्याला घटस्फोट देऊन त्याच्यापासून वेगळी होणार नाही. हा विचार मनात येताच सीमा एकदम बैचेन झली.

जेवण झाल्यावर राकेश ड्रॉइंगरूममधल्या दिवाणावर आडवा झाला. थोडा वेळ सीमाशी गप्पा मारल्या अन् त्याला झोप लागली. सीमा तिथून उठून स्वयंपाक घरात आली.

वंदना जेवणाची दोन ताटं वाढत होती, ‘‘तुम्ही अन् आणखी कोणी अजून जेवायचं राहिलंय का?’’ सीमाने विचारलं.

‘‘हे दुसरं ताट त्या पाठीमागच्या घरात राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीसाठी आहे,’’ घराकडे बोट दाखवत वंदनानं म्हटलं.

‘‘तुमची मैत्रीण इथं येईल जेवायला?’’

‘‘नाही. निशाकडे ताट पोहोचवायचं काम माझा मोठा मुलगा सोनू करेल.’’

‘‘तुमच्या दोन्ही मुलांना तर मी भेटलेच नाहीए, आहेत कुठं दोघं?’’ सीमानं विचारलं.

‘‘छोट्या भानूला थोडा ताप आलाय. तो बेडरूममध्ये झोपून आहे. सोनूला बोलावते मी. सकाळपासून तो निशाकडेच आहे.’’ वंदनानं मागचं दार उघडून सोनूला हाक मारली. काही वेळातच तो धावत आला. वंदनानं त्याची सीमाआण्टीशी ओळख करून दिली. त्यानं दोन्ही हात जोडून नमस्कार केला. मग आईनं सांगितल्याप्रमाणे झाकलेलं ताट घेऊन तो हळूहळू निशाच्या घरी गेला.

‘‘गोड आहे मुलगा,’’ निशानं म्हटलं.

‘‘निशाही त्याच्यावर खूप प्रेम करते. अगदी आपल्या मुलाप्रमाणे. सोनूला दोन दोन आयांचं प्रेम मिळतंय,’’ सीमाच्या डोळ्यात बघत वंदनानं म्हटलं.

किचनला लागून असलेल्या व्हरांड्यात एक छोटसं गोल टेबल होतं. भोवती चार खुर्च्या होत्या. त्या दोघी तिथंच बसल्या. वंदनानं जेवायला सुरूवात केली.

‘‘निशाला स्वत:चं मूल नाहीए का?’’ सीमानं विचारलं.

‘‘तिनं लग्नच केलेलं नाही. तुझ्यासारखीच अविवाहित आहे ती,’’ वंदना आता एकेरीवर आली. ‘‘प्रत्येक स्त्रीच्या हृदयात आईचं प्रेम असतं. तिच्या हृदयातलं प्रेम निशा माझ्या सोनूवर उधळतेय,’’ वंदना हसत म्हणाली.

काही वेळ कुणीच बोललं नाही. मग सीमा म्हणाली, ‘‘मी लग्न करणार नाही असं ठरवलं होतं, पण आता मी कुणाबरोबर तरी लग्न करून वैवाहिक आयुष्य जगायचं ठरवलं आहे.’’ याच संदर्भात बोलायला इथं आले आहे.

 

‘‘मी निशालाही नेहमी म्हणते की लग्न कर, पण ती ऐकत नाही. म्हणते, लग्नाशिवाय मला सोनूसारखा छान मुलगा मिळाला आहे तर विनाकारण कुणा अनोळखी माणसाशी लग्न करून मी आपलं स्वातंत्र्य का घालवून बसू? तिला अगदी खात्री आहे की माझा सोनू तिची म्हातारपणची काठी ठरेल,’’ सीमाच्या बोलण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करत वंदना बोलत राहिली.

‘‘मी आणि राकेश, एकमेकांना ओळखतो, त्याला वर्षापेक्षा अधिक काळ उलटला आहे. ते भेटल्यामुळेच माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झाला. त्या आधीचं आयुष्य अगदीच नीरस, उदासवाणं, एकाकी होतं,’’ वंदनाचं बोलणं मनावर न घेता सीमानं आपल्या विषय पुढे दामटला.

‘‘आता या निशाच्या आयुष्यातही सगळा आनंद माझ्या सोनूमुळेच आहे. दर दिवशी ती सोनूला काही ना काही गिफ्ट देतच असते.’’

 

‘‘राकेशचे अन् माझे संबंध केवळ सहकारी किंवा मित्रत्त्वाचे नाहीत. आम्ही त्या पलीकडे पोहोचलो आहोत. त्यांचं माझ्यावर अन् माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे,’’ सीमानं आपल्या मनातलं बोलून दाखवलं.

वंदना उदास हसली, ‘‘माझ्या सोनूला स्वत:च्या कह्यात करण्यासाठी निशाने त्याला सतत महागड्या हॉटेलात जेवायला नेऊन त्याची सवय बिघडवली आहे. आता त्याला घरचा, माझ्या हातचा स्वयंपाक आवडत नाही. सतत बाहेरचं चमचमीत खायला हवं असतं त्याला.’’

‘‘तू पुन्हा पुन्हा सोनूबद्दल बोलते आहेस. तू माझ्याशी राकेशबद्दल का बोलत नाहीस?’’ सीमानं आता चिडूनच विचारलं.

खूपच आपलेपणानं, डाव्या हातानं सीमाच्या खांद्यावर थोपटत वंदनानं त्याच लयीत बोलणं सुरू ठेवलं, ‘‘निशाला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. सोनू जर तिचा स्वत:चा मुलगा असता तर तिला असं स्वयंपाक न करता जगता आलं असतं? मुलाची किंवा पाल्याची संपूर्ण जबाबदारी घेणं सोपं नसतं. आपल्या पोटच्या मुलाला स्वत: कष्ट घेऊन, स्वत:च्या हातानं करून घालण्यात कसला आलाय त्रास? ते काही ओझं वाटावं असं काम आहे का?’’

‘‘छे छे, आईला आपल्या मुलासाठी काही करणं म्हणजे ओझं वाटत नाही,’’ सीमानं म्हटलं.

‘‘ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यासाठी, त्याच्या आनंदासाठी काहीही करायला त्रास वाटत नाही, ओझं वाटत नाही. ही निशा तर सोनूला कायदेशीरपणे दत्तक घेण्यासाठी माझ्यावर सतत दबाव आणते आहे.’’

‘‘या बाबतीत तुझं स्वतचं काय मत आहे, वंदना.’’

वंदना तशीच उदास हसली, ‘‘खऱ्या अर्थानं प्रसववेदना सोसल्याशिवाय कुणी स्त्री आई झाली आहे का? आई होऊ शकते का? घर संसाराचा रामरगाडा ओढायला लागणारी उर्जा, शक्ती फक्त आईकडे असते. मुलाला वळण लावणं, गरजेला धाक दाखवणं, एरवी आधार देणं, मदत करणं, निरपेक्ष प्रेम करणं हे आईशिवाय कुणीच करू शकत नाही. मावशी, काकी, मामी, आत्या किंवा मोलानं ठेवलेली बाई आईची जागा घेऊच शकत नाही.’’

‘‘बरोबर बोलते आहेत तू. मीही आता आपला संसार मांडायचा…’’

वंदनानं तिला हातानं गप्प राहण्याची खूण केली. ‘‘निशानं सोनूवर कितीही प्रेम केलं तरी शेवटी तो माझाच मुलगा असेल. समाजात लोक त्याला माझा मुलगा म्हणूनच ओळखतात. निशानं दिलेल्या महागड्या भेटवल्तू, त्याच्यासाठी करत असलेला भरमसाट खर्च, सोनू सध्या तिच्याकडे घालवत असलेला वेळ हे सगळं मान्य केलं तरी तो माझा मुलगा आहे. हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही…तुला एक विचारू का?’’

‘‘विचार…’’ सीमा एकदम गंभीर झाली. त्यासाठीच तो विषय तिनं लावून धरला आहे.

‘‘माझ्या काळजाचा तुकडा आहे माझा सोनू…समजा अगदी नाइलाजानं, काळजावर दगड ठेवून मी निशाला माझा मुलगा दत्तक दिलाही, तरी ती त्याची आई होऊ शकेल का? सोनूला जन्माला घातल्याचा जो आनंद मी उपभोगला, तो तिला मिळेल का? त्याच्याबरोबर घालवलेल्या गेल्या आठ वर्षांतले अनेक सुखदु:खाचे प्रसंग जे मी जगले, ते तिला जगता येतील का? त्याच्या ज्या काही खस्ता मी खाल्ल्या त्या तिला खाव्या लागल्याच नाहीत…हे सगळे अनुभव ती कुठून मिळवणार? अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला रडवून, दु:खी करून ती हसू शकेल का? आनंदात राहू शकेल?’’ वंदनाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

वंदनानं तिच्या हातावर हात ठेवला. तिचा कंठ दाटून आला होता, ‘‘सीमा, तुला धाकटी बहीण मानून माझ्या मनातल्या काही गोष्टी मी तुझ्याशी बोलणार आहे. माझ्या आयुष्यात माझा संसार, माझा नवरा अन् माझी मुलं यांच्या खेरीज दुसरं काहीही नाही. माझं सगळं जीवन या तिन्हीभोवती विणलेलं आहे. राकेशना सोडण्याची कल्पनाही मला असह्य होते.’’

‘‘राकेश तुझ्यावर प्रेम करतात ही गोष्ट माझ्यासाठी फार दु:खद आहे. त्यांचे सगळे दोष पोटात घालून मी त्यांच्यासाठी सतत खपत असते. आनंदानं त्यांची सेवा करते. त्यांचं त्यांच्या दोन्ही मुलांवर जिवापाड प्रेम आहे. मुलांमुळे का होईना ते या घराशी, पर्यायाने माझ्याशीही कायम बांधील राहतील. एरवी त्यांचं प्रेम माझ्यापेक्षा तुझ्यावर अधिक आहे ही भावना मला असुरक्षितपणाची जाणीव करून देते, पण ते आमची बांधीलकी तोडणार नाहीत या भावनेनं खूपच सुरक्षित वाटतं.’’

वंदनाच्या चेहऱ्यावर तेच खिन्न हास्य होतं,  ‘‘माझ्या हृदयात डोकावण्याची क्षमता तुझ्यात असेल तर तुला माझ्याविषयी सहानुभूतीच वाटेल, कारण प्रेमाच्या मोबदल्यात प्रेम न मिळण्याची खंत मला नेहमीच वाटत राहिलीय, ती वेदना फक्त ज्याला प्रेम करूनही प्रेम मिळालं नाही तीच व्यक्ती समजू शकते.’’

राकेश अन् सोनू दोघांच्या वयात खूप अंतर आहे पण तरीही, त्यांच्यात एक साम्य आहे. माझा नवरा तुझ्याशी अन् सोनू निशाशी केवळ त्यांच्या स्वार्थासाठी संबंध ठेवून आहेत. त्या संबंधासाठी घर सोडण्याचं धारिष्ट्य दोघांमध्येही नाही. आईसारख्या खस्ता निशा मावशी काढू शकत नाही हे या वयातही सोनूला कळतं अन् बायको इतकं झिजणं तुला जमणार नाही हे राकेश जाणून आहेत.

सोनू अन् राकेशच्या आनंदासाठी मी त्यांचे निशाशी अन् तुझ्याशी असलेले संबंध कुठल्याही तक्रारीविना स्वीकारले आहेत.

पण माझे त्यांच्याशी असलेले संबंध फक्त माझ्या मृत्यूनंतरच संपतील. मी तर ते दोघं जसे आहेत तसेच त्यांना स्वीकारलंय, कोणतीही तक्रार न करता, मी त्यांच्यासोबत आनंदानं राहतेय, पण मला एक कळलेलं नाहीए की निशा काय किंवा तू काय, तुम्हाला यांच्याशी भावनिक बांधिलकी बाळगायची गरजच का आहे? तिला मुलगा हवाय किंवा तुला नवरा, आयुष्याचा जोडीदार हवाय तर तुम्ही दोघी अगदी नवी सुरूवात का करत नाही? कितीही चविष्ट अन्न असलं, तरी दुसऱ्याचं उष्ट खायची तुम्हाला काय गरज आहे? उष्ट अन्न…मी काय म्हणतेय कळतंय का? ’’

बोलता बोलता वंदनाला अश्रू अनावर झाले. काही क्षण सीमा तशीच उभी होती. मग झटकन पुढे होऊन तिनं वंदनाचे अश्रू पुसले. तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिनं मनापासून म्हटलं, ‘‘थँक यू.’’

पुढे एक अक्षरही न बोलता ती झटकन ड्रॉइंगरूममध्ये निघून आली.

अजूनही राकेश तिथं दिवाणावर झोपला होता. सीमानं टेबलवरची आपली पर्स उचलली अन् राकेशकडे वळूनही न बघता त्याच्या घराबाहेर पडली.

राकेशशी असलेले आपले अनैतिक प्रेमसंबंध कायमचे संपवायचे हाच एक विचार तिच्या मनात प्रबळ.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें