लग्नातील वारेमाप खर्च निरर्थक

* शाहनवाज

तुम्ही कधी विचार केला आहे की २ व्यक्तींना नात्यात बांधण्यासाठी बाजारात किती किंमत मोजावी लागते? साहजिकच जेव्हा गोष्ट खर्चाची येते तेव्हा त्याकडे डोळेझाक करून चालत नाही.

मला २ वर्षांपूर्वी माझ्या मित्राने त्याच्या काकाच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. लग्न उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे होणार होते. लग्नाच्या एक दिवस आधी मी तिथे पोहोचलो. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हे घर पाहून माझ्या लक्षात आले. त्याचे काका छोटयाशा जमिनीवर शेती करायचे आणि शेतीचा हंगाम संपला की शहरात जाऊन मजुरी करायचे.

माझ्या मित्राने मला सांगितले की, मुलाकडून कोणत्याही प्रकारची हुंडयाची मागणी करण्यात आलेली नाही. फक्त त्यांनी लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतात कोणतीही कमतरता ठेवू नका, असे सांगितले आहे.

जेव्हा वधू आणि वराला ७ फेऱ्या मारण्यासाठी उभे केले जात होते, तेव्हा मला मंडपाच्या बाहेर एक ट्रक दिसला, ज्यामध्ये टीव्ही, फ्रीज, पलंग, कपाट इत्यादी घरगुती वस्तू ठेवण्यात येत होत्या. अचानक मला माझ्या मित्राने हुंडा न घेण्याबाबत जे सांगितले होते ते आठवले, पण त्यावेळी त्याच्याशी या विषयावर काही बोलणे मला योग्य वाटले नाही.

लग्न आटोपून आम्ही दिल्लीला निघालो. बसमधून प्रवास करत असताना मी त्याला विचारले की, नवऱ्या मुलाकडून हुंडा मागण्यात आला नाही, असे तूच मला सांगितले होतेस ना? मग ते  सामान का भरले जात होते?

त्याने उत्तर दिले की, काकांनी ते सर्व सामान स्वत:च्या वतीने भेट म्हणून दिले होते, जेणेकरून उद्या काहीही घडले तरी कोणीही त्यांच्या मुलीला नावे ठेवू नयेत. मुलीला रिकाम्या हाती पाठवले असे टोमणे नवऱ्याकडच्या मंडळींसह काकांच्या स्वत:च्या नातेवाईकांनीही मारू नयेत, हे त्यामागचे कारण होते.

त्याने सांगितले की, कुटुंबातील इतर लग्नांमध्येही काकांना अशाच पद्धतीने मुलींना घरासाठीच्या सर्व वस्तू  द्याव्या लागल्या होत्या. कारण या वस्तू न दिल्यामुळे आपल्याच नातेवाईकांमध्ये रंगणाऱ्या गप्पा, कुजबूज, टोमणे त्यांना ऐकायचे नव्हते. आपल्या नातेवाईकांच्या गोतावळयात असलेली चांगली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी ते हा सर्व खर्च झेपत नसतानाही करत होते.

काही अशा प्रकारचे असते सामाजिक दडपण

तुम्हीही तुमच्या आयुष्यात कधीतरी असे घडताना पाहिले असेलच. हे फक्त एक प्रकारचे दडपण असते, जे वडिलांवर येते. या यादीत इतर अनेक प्रकारची सामाजिक दडपणे येतात आणि ती आपण नेहमीच पाहत असतो, पण पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करतो.

मी जिथे राहतो तिथे माझ्या शेजारीच रामदासजी राहतात. नुकतेच त्यांनी त्यांचा मुलगा रवीचे लग्न लावून दिले. एकतर आधीच कोरोनामुळे सर्वांचे खिसे रिकामे झाले आहेत, अशातच लग्नावर होणारा खर्चही तुटपुंजा नसून भरमसाठ असतो.

तसे तर रामदासजींचे दिल्लीत स्वत:चे घर आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या या कठीण काळात त्यांना एखाद्या भाडेकरूप्रमाणे खोलीचे भाडे भरण्याची गरज नाही. पण कोरोना सुरू झाल्यापासून आणि लॉकडाऊन लागल्यानंतर इतर अनेक लोकांप्रमाणेच त्यांनाही नोकरी गमवावी लागली.

समाजातील प्रतिमा तर मलीन होणार नाही ना?

याच काळात रवी आमच्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्याचा त्याने हट्ट धरला. रामदासजींनी त्याला बरेच समजावले की, घरची आर्थिक परिस्थिती सध्या ठीक नाही, सर्व पूर्वपदावर आल्यानंतर लग्न लावून देतो, पण रवी काही केल्या ऐकायला तयार नव्हता. अखेर रामदासजी मुलाच्या लग्नासाठी तयार झाले. त्यांनी असा विचार केला की, कोरोना काळ असल्यामुळे जास्त लोकांना आमंत्रण द्यायचे नाही आणि मुलीच्या घरच्यांकडेही कुठलीच मागणी करायची नाही.

रवीचे मित्र, नातेवाईक आणि काही ओळखीचे मिळून पन्नासच्या आसपास लोकांना आमंत्रण द्यायचे ठरले. लग्न झाल्यानंतर रवीला त्याच्या सासरच्या मंडळींकडून एक बाईक आणि काही संसारोपयोगी वस्तू मिळाल्या.

लग्नाच्या ३ दिवसांनंतर मुलीच्या घरच्यांना आणि काही मित्रांना बोलवून घरीच छोटेखानी रिसेप्शन देण्याचा हट्ट रवीने वडिलांकडे धरला. असे केले नाही तर नातेवाईक आणि मुलीच्या कुटुंबीयांमध्ये आपली काय इज्जत राहणार, असे तो म्हणाला. त्यामुळे अखेर नाईलाजाने रामदासजींना त्याचे ऐकावेच लागले.

रामदासजी आणि रवीच्या अशा वागण्यावरून हेच स्पष्ट होते की, केवळ सामाजिक दडपणच नाही तर आपल्या मुलाचा किंवा अनेक ठिकाणी आपल्या मुलीचाही दबाव वडिलांवर असतो. आता या छोटयाशा लग्नातील खर्चाचा विचार तुम्हीच करू शकता. खिशात पैसे नसतानाही सामाजिक दबावामुळे लोकांना अशा लग्न सोहळयासाठी खर्च करावाच लागतो, जेणेकरून त्यांची समाजातील प्रतिमा खराब होऊ नये, त्यांची लाज जाऊ नये.

लोक काय म्हणतील?

आता कोणी असेही म्हणेल की, हे सर्व ऐकून लग्नच करायचे नाही का? किंवा लग्नात आपल्या नातेवाईकांना बोलवायचेच नाही का? इथे लोकांनी एकत्र येऊन आनंद सोहळा साजरा करण्यावर चर्चा सुरू नाही किंवा कोणाला लग्न न करण्याचा सल्लाही द्यायचा नाही, पण या विषयाचे तात्पर्य अगदी सहज सोपे असेच आहे. ते म्हणजे लोक लग्नावर खर्च करण्यापूर्वी इतर लोक किंवा समाज काय म्हणेल, याचा विचार करून खर्च करतात, अर्थात समाजाचा विचार करतात एवढेच.

सध्याच्या काळात समाजाची अर्थव्यवस्था खेळती राहण्यासाठी लग्नांमध्ये होणारा खर्च अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्याशी अनेक प्रकारचे व्यवसाय जोडले गेले आहेत, उदाहरणार्थ, कॅटरर्सकडून जेवण घेणे, बँक्वेट हॉल बुक करणे किंवा कम्युनिटी हॉल बुक करणे, वेटरचे काम, लग्न लावण्यासाठी ब्राह्मण, मौलवी किंवा पाद्री इत्यादी. म्हणूनच या लोकांसाठी लग्न होत राहणे खूप गरजेचे आहे.

प्रवीणच्या वडिलांनी प्रवीणचे लग्न मोठा बँक्वेट हॉल किंवा मोठया पार्कमध्ये नव्हे तर परिसरातील एसडीएम कार्यालयात जाऊन कायदेशीररित्या विवाह नोंदणी करून लावून दिले. नोंदणीच्या २ किंवा ३ दिवसांनंतर, त्यांनी स्वागत समारंभासाठी एक सरकारी कम्युनिटी हॉल बुक केला. त्यांनी १५० लोकांना आमंत्रण दिले होते. मुलाचे लग्न पारंपारिक पद्धतीने केले असते तर त्यांना कदाचित सध्याच्या खर्चाच्या ३ पट जास्त खर्च आला असता. त्यांनी त्या उर्वरित पैशांची एफडी प्रवीणच्या नावे करून घेतली, जी त्याच्या वाईट काळात त्याला उपयोगी पडेल. मुलीकडच्या लोकांनीही बँकेत वधूच्या नावे एफडी करून घेतली, जेणेकरून ती गरजेच्या वेळी मोडता येईल.

प्रवीणच्या वडिलांनी त्याचे लग्न किती समजूतदारपणे लावून दिले, याचा अंदाज तुम्ही स्वत: लावू शकता. सध्याच्या काळात समाजाची गरज आहे की, त्याने वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करू नये. समाजाच्या या ओझे बनत चाललेल्या मानसिकतेला मोडून काढण्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढे टाकून विवाह पारंपरिक पद्धतीने वारेमाप खर्च करून न करता फक्त कायदेशीर नोंदणी करून करणे गरजेचे आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें