तर कमी किंमतीत मिळेल टूर पॅकेज

* पारूल भटनागर

जर तुम्हीही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, जेणेकरून निवांत क्षण घालवता येतील, पण त्यासाठी स्वत:च टूरचे नियोजन करायचे की टूर पॅकेज घ्यायचे, या संभ्रमात तुम्ही असाल तर दोन्ही गोष्टी योग्यच आहेत, पण या दोघांपैकी कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी तुम्ही कोणत्या प्रसंगी, कधी, कोणासोबत आणि कसे फिरायला जाण्याचा विचार करत आहात, हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.

त्यामुळेच आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींची माहिती करून देत आहोत, ज्या लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या टूरचे नियोजन करताना, एकतर स्वत: टूरची योजना आखू शकता किंवा त्यासाठी संपूर्ण टूर पॅकेज घेऊ शकता. चला तर, जाणून घेऊया कोणता पर्याय कधी आणि कसा सर्वोत्तम ठरेल.

हनिमून टूर

लग्न आणि त्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन हा प्रत्येक जोडप्यासाठी वेगळा आणि रोमांचक अनुभव असतो, कारण ही वेळ पुन्हा फिरून येत नाही आणि त्यावेळेस एकमेकांसोबत घालवलेले क्षण कायम आठवणीत राहतात. त्यामुळेच तुम्हाला तुमची हनिमून टूर आरामदायी आणि तणावमुक्त करायची असेल, तर टूर पॅकेज घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.

यामध्ये तुम्हाला घेऊन जाणे आणि परत आणून सोडणे, तुम्ही जाण्यासाठी ठरवलेल्या ठिकाणाची माहिती देणे, निवास, खाणे इत्यादींचा समावेश असतो, जेणेकरून तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची, उगाचच भटकण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संपूर्ण टूरचा आनंद लुटू शकता, पण याऐवजी तुम्ही स्वत: टूर बुक केल्यास सर्व काही व्यवस्थित असेलच, परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर शोधाशोध करावी लागेल. कधीकधी घाईगडबडीत किंवा तुमच्या जोडीदाराला कोणताही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही तिथे जाऊन महागडे हॉटेल, सोबतच इतर सर्व महाग गोष्टी बुक करता, जे तुमचा वेळ तर वाया घालवतातच, पण तुमच्या खिशावरही भार टाकतात.

म्हणूनच, पॅकेज बुक करणे चांगले. फक्त लक्षात ठेवा की, नेहमी एका विश्वासार्ह साइटवरून पॅकेज घ्या, कारण त्यात पैसे आधी भरावे लागतात.

भेट दिलेल्या ठिकाणांना पुन्हा भेट देण्याची तयारी

समजा तुम्ही मनालीला एकदा तुमच्या मित्रांसोबत भेट दिली असेल, पण आता तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत त्याच ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर अशावेळी तुम्ही स्वत: टूर प्लॅन करू शकता, कारण ते ठिकाण तुम्ही चांगल्या प्रकारे बघितलेले असेल, त्यामुळे तिथे कसे आणि कोणत्या मार्गाने जायचे, याची तुम्हाला कल्पना असेल.

जिथे तुम्ही मजेत, आरामात राहू शकाल आणि जे तुमच्या खिशाला परवडणारे असेल, अशा ठिकाणी तुम्ही राहू शकता. याशिवाय तिथे अॅडवेंचर अर्थात साहसी ठिकाणे पाहायची की नाहीत, तिथे थेट जायचे की एजंटच्या माध्यमातून, हेही तुम्हाला माहीत असेल.

तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असल्यामुळे तुम्ही स्वत: टूरचे नियोजन करणे, जास्त चांगले ठरेल. यामुळे तुम्ही फिरायचा चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकाल.

अचानक आखलेला बेत

जर तुम्ही अचानक कुठेतरी आणि तेही कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर टूर पॅकेज घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. त्यामुळे तुम्हाला जास्त धावपळ करावी लागणार नाही, सोबतच टूर व्यवस्थापक तुमच्यासाठी सर्व नियोजन करून ठेवतील. यात वाहतूक, निवास, खाण्यापिण्याची व्यवस्था, तिथली सर्व ठिकाणे दाखवणे आदींचा समावेश असेल.

यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जायचे अचानक ठरवले असेल तरी फिरण्याचा आनंद घेऊ शकाल, कारण या टूरच्या नियोजनासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, फक्त आधी पैसे भरा, मग पाहा टूरचा व्यवस्थापक सर्व सुविधा देण्यासाठी हजर असेल.

याउलट जर तुम्ही अचानक तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यासाठी स्वत:हून टूरचे नियोजन करू शकता, कारण जेव्हा मित्र एकत्र असतात तेव्हा गोष्टी व्यवस्थापित करण्यास फारशी अडचण येत नाही. राहण्याची, जेवणाची व्यवस्था, भेट देण्यासाठी ठिकाणे शोधणे, या सर्वांची व्यवस्था करणे सर्वजण एकत्र असल्यामुळे फारसे कठीण होत नाही. थोडी अडचण आलीच तरी मित्रांसोबत हे सगळं सांभाळणं फारसं अवघड नसते.

विविध ठिकाणांना भेट

जर चंदिगड, शिमला, मनाली इत्यादी ठिकाणी जाण्याची तुमची योजना असेल आणि तुम्ही स्वत:हून वेगवेगळी ठिकाणे बुक केलीत, तर ते महागडे ठरेल, सोबतच त्या सर्व ठिकाणी जाणेही थोडे अवघड होईल. याउलट तुम्ही त्या सर्व ठिकाणांसाठीचे टूर पॅकेज घेतले तर तिथे जाणेही सोपे होईल आणि दुसरे म्हणजे तुम्ही काहीसे स्वस्तात फिरू शकाल.

टूर पॅकेजवाले एकाच वेळी विविध ठिकाणांच्या भेटीसाठी बरेच कमी पैसे घेतात, पण तेच जर तुम्ही तेथे स्वत:च नियोजन करुन जायचे ठरवले तर ते थोडे दगदगीचे होईल, शिवाय थोडेसे महागडेही पडेल.

त्यामुळे विविध ठिकाणांना एकाच वेळी भेट देण्यासाठी तुम्ही टूर पॅकेजच घ्या, पण जर पैशांचा प्रश्न नसेल तर तुम्ही स्वत:ही टूर बुक करू शकता, कारण स्वत: बुकिंग करण्याचा फायदा असा होतो की, तुम्ही तुमच्या पद्धतीने मजा करू शकता, सोबतच तुमच्या आवडीनुसार कुठे राहायचे, कुठे खायचे, हे सर्व स्वत:ला हवे तसे ठरवून फिरण्याचा आनंद घेऊ शकता.

सुरक्षितता आणि सुसंवाद

समजा, जर तुम्ही भारताबाहेर फिरायचा विचार करत असाल तर सर्व काही स्वत:हून करण्याऐवजी एखाद्या चांगल्या संस्थेकडून टूर पॅकेज बुक करा, कारण अशा प्रकारे तुम्ही अनेक लोकांसोबत एकत्र जाल, त्यामुळे आणखी मजा येईल, शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही ते योग्य ठरेल. याउलट  स्वत: टूरचे नियोजन केल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्मण होईल.

टूर पॅकेज घेतल्यास तुम्हाला संवाद साधण्यासाठीही जास्त अडचण येणार नाही, अन्यथा तुम्ही फिरण्याची मजा घेण्याऐवजी तिथली भाषा समजून घेण्यातच अडकून पडाल, जे तुमच्या संपूर्ण टूरची मजाच बिघडवून टाकेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें