गृहशोभिकेचा सल्ला

 प्रश्न.  मी २४ वर्षीय तरुणी आहे. गेल्या ४ वर्षांपासून माझं एका मुलावर प्रेम   आहे. काही काळापूर्वी सर्व काही ठीक होतं. त्याचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. आम्ही आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्नं पाहिली होती. आम्ही रोज भेटायचो. फोनवर खूप गप्पा मारायचो पण काही महिन्यांपासून त्याचं वागणं खूप बदललं आहे. भेटण्यासाठी दिवस-दिवस वाट पाहावी लागते आणि भेटला की त्याला परतण्याची घाई असते. एवढंच नाही, आता तो पूर्वीसारखा स्वत:हून फोनही करत नाही. विचारल्यावर निरर्थक कारणं देतो. त्याचं दुसऱ्या कुणावर प्रेम तर नाही ना? असं असेल तर काय? मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. मी काय करू?

उत्तर. ४ वर्षं म्हणजे खूप मोठा काळ आहे. तुम्हाला जर वाटतं की तुमचा बॉयफ्रेंड तुमच्या बाबतीत जास्तच निष्काळजीपणा दाखवत आहे. तुम्हाला भेटू इच्छित नाही, फोन करत नाही, तर तुम्ही त्याच्याशी मोकळेपणाने बोललं पाहिजे आणि त्याच्या उदासीनतेचं कारण जाणून घेतलं पाहिजे. कदाचित तो घाबरला असेल किंवा त्याच्या घरच्यांना हे नातं मंजूर नसेल. तुम्ही बसून बोललं पाहिजे. काही वाद असेल तर तो सोडवला पाहिजे. कारण कळलं की उपायही कळेल. त्याला तुम्हाला सोडायचं असेल तर तयार राहिलं पाहिजे.

प्रश्न. मी २६ वर्षांची तरुणी आहे. हल्लीच माझा साखरपुडा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. लग्नाची तारीखही ठरली होती. पण लग्नाच्या २ महिने आधी मुलाकडच्यांनी लग्न मोडलं. माझं कुटुंबं यामुळे निराश आहे. आता त्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर दुसरा एखादा मुलगा मिळू दे आणि लग्न ठरल्या तारखेलाच पार पडू दे. त्यांना वाटतं की ही गोष्ट लोकांना कळली तर माझ्यासाठी दुसरा मुलगा मिळणं कठिण होईल. घाईगडबडीत ते माझं अशा मुलाशी तर लग्न लावणार नाहीत ना जो माझ्यासाठी योग्य नाही याची मला भीती वाटते. मी काय करु?

उत्तर. तुमच्या कुटुंबाची निराशा अयोग्य आहे. त्यांनी तर खूश असलं पाहिजे की तुम्ही अशा लोकांच्या जाळ्यात अडकता-अडकता वाचलात. लग्नानंतर त्यांचा खरा चेहरा समोर आला असता तर गोष्टी अधिक किचकट झाल्या असत्या. दुसरा मुलगा शोधून ठरल्या तारखेला लग्न करण्याचा अट्टहास करू नका. घाईत आणि निराशेत कोणंतही काम चांगलं होत नाही. तुम्हाला एकदा धक्का बसला आहे आणि आता आणखी काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. संपूर्ण चौकशी करूनच लग्न ठरवा. याबाबत तुम्ही कुटुंबीयांशी चर्चा करू शकता. कारण हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे.

प्रश्न. मी २७ वर्षांची आहे. माझी अडचण ही आहे की मला सतत हात-पाय धुण्याची सवय आहे. टॉयलेटला गेल्यावर मी गुडघ्यापर्यंत पाय धुते. अंघोळीला मला एक तास लागतो. माझ्या या सवयीमुळे मी कुठेही जाऊ शकत नाही. घरातले याला माझा वेडेपणा म्हणतात. मी काय करु?

उत्तर. तुम्ही एखाद्या मनोविकार तज्ज्ञाकडून सल्ला घ्या. ते तुम्हाला तुमच्या या विचित्र सवयी बदलण्यास मदत करतील.

प्रश्न. मी २२ वर्षांची आहे. माझं एका अशा मुलावर प्रेम आहे जो कधीही बाप बनू शकत नाही. माझं त्याच्यावर इतकं प्रेम आहे की मी त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. मला त्याच्याशी लग्न करायचंय. पण माझ्या घरातले याविरोधात आहेत. ते आम्हाला या लग्नासाठी परवानगी देणार नाहीत. आम्ही कोर्ट मॅरेजही करू शकत नाही. कारण त्याचे सर्व कागदपत्रं मुलीच्या नावे बनले आहेत. कृपया सांगा मी काय करू?

उत्तर. लग्नासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्याइतकी तू मोठी झालेली नाही. म्हणून तू असं म्हणते आहेस. आयुष्य भावनेच्या आधाराने चालत नाही हे तुला समजलं पाहिजे. सत्य स्वीकारायला शिक. आईवडिलांच्या अनुभवी डोळ्यांना जे दिसतंय त्याकडे तु पाठ फिरवत आहेस. आईवडिल तुझ्या भल्याचाच विचार करत आहेत. त्यांच्या विरोधात जाऊ नकोस.

प्रश्न. माझ्या लग्नाला एक वर्षं झालं आहे. तसे तर नवरा आणि सासरचे सगळे चांगले आहेत. पण माझ्या नवऱ्याला माझं माहेरी जाणं आवडत नाही. खरंतर माझा कोणी भाऊ नाही. त्यामुळे माझी मोठी बहिण सहकुटुंब आईबाबांकडे राहाते. माझी बहीण माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. माझे भावोजी माझ्यावर मोठ्या भावासारखं प्रेम करतात. पण ते माझ्या नवऱ्याला आवडत नाही. तसं तो काही बोलत नाही. पण त्याचा चेहरा सगळं सांगून जातो. नवऱ्याला कसं समजावू?

उत्तर. तुमच्या लग्नाचा कालावधी कमी आहे. तुम्ही तुमच्या नवऱ्याला वेळ दिला पाहिजे. तुमचं माहेरी जाणं किंवा बहिणीच्या नवऱ्याशी मोकळं वागणं त्याला आवड् नसेल तर तुम्ही त्याला तक्रार करण्याची संधी देऊ नका. कदाचित वेळेनुसार त्याचं वागणं बदलेल आणि त्याला नात्यांचं महत्त्व कळू शकेल.

जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात.

प्रश्न:  मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. जवळपास ६ वर्षांपूर्वी       मला सिझेरियनने मुलगा झाला होता. आता जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते,  तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात. त्या शरीरिक संबंध बनवल्यानंतर दीर्घकाळ मला त्रस्त करतात. यामागे काय कारण असू शकते?

उत्तर:आपल्याप्रमाणेच बऱ्याचशा महिला आई बनल्यानंतर      त्रासदायक सहवासाच्या समस्येतून जातात. ज्या महिलांची मुले नैसर्गिकरीत्या योनीमार्गातून जन्म घेतात आणि त्यात योनीमार्ग मोठा करण्यासाठी डॉक्टर प्रसूतीच्या वेळी अॅपीसिओरोमीचा चीर पाडतात. त्यातील १७ ते ४५ टक्के महिला आई बनल्यानंतर या त्रासातून जातात. उलट सिझेरियनने आई बनणाऱ्या २ ते १९ टक्के महिला अशा प्रकारचा त्रास असल्याचे सांगतात.

म्हणजेच याचा अर्थ असा की सिझेरियननंतर त्रासदायक संबंधाची समस्या कमी दिसते, परंतु ती असू शकते. यामागे योग्य कारण काय आहे, याबाबत केवळ अंदाजच लावला जाऊ शकला आहे. असे समजले जाते की काही महिलांमध्ये सिझेरियनच्या प्रक्रियेतून जाण्याची मानसिक द्विधावस्था पुढे जाऊन त्यांच्या मनात एवढी तीव्र चिंता निर्माण करते की त्यांना संबंधांची भीती वाटू लागते. त्यांचे मन विचार करू लागते की पुन्हा जर गरोदर राहिले, तर पुन्हा सिझेरियनमधून जावे लागेल आणि याच मानसिक द्विधावस्थेत त्यांचे मन सेक्सबाबत नकारात्मक होते.

अन्य मानसशास्त्रीय कारणंही समस्या निर्माण करतात. नुकत्याच आई बनलेल्या महिलांची जर रात्री झोप पूर्ण झाली नाही, व्यवस्थित आराम मिळाला, व्यवस्थित पोषण मिळाले नाही, एकमेकांसोबत प्रेमळ सहवालाची संधी मिळाली नाही, तसेच पतीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा झाली नाही, तर अशी मन:स्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे.

सिझेरियननंतर जर टाक्यांत पू झाला, तर नंतर ते भरल्यानंतरही वरील टिश्यूमध्ये झालेल्या दुष्परिवर्तनामुळे महिलांना वेदना जाणवतात. काही महिलांमध्ये हार्मोनल समस्याही निर्माण होत. एस्ट्रोजन हार्मोनच्या कमतरतेमुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता घटते. परिणामी, संबंध कष्टदायक होतात.

काही शारीरिक समस्या जसं की योनीद्वाराला आलेली सूज, मूत्रनलिकेला आलेली सूज, त्यावर उत्पन्न झालेली मांसाची गाठ, योनीद्वाराशी सलग्न बार्थोलिन ग्लँडमध्ये आलेली सूज किंवा गुदद्वाराला फिशर झाल्यानेही सहवास क्रीडेच्या वेळी त्रास होणे स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे गर्भाशयाची सूज आणि एंडोमिट्रिओसिससारखे रोगही त्रास देतात.

शिवाय समस्या हीसुध्दा आहे की एकदा सुरुवातीला वेदना निर्माण झाल्यावर पुढे मनात शारीरिक संबंधाबाबत तणाव जाणवतो. केवळ स्पर्शानेही योनी भागातील पेशी संकुचित होतात, योनी संकुचित होते आणि संबंध बनवणे कठीण होते. समस्या एकदा सुरू झाल्यानंतर पुढे नेहमीच चक्रव्यूह बनते. जेव्हा जेव्हा पती-पत्नीला मिलनाच्या बंधनात अडकायची इच्छा असते, पत्नी वेदनेने तळमळते. सर्वप्रथम आपण एखाद्या योग्य स्त्रीरोग विशेषज्ञाला भेटून आपली अंतर्गत तपासणी करून घ्यावी. त्यामुळे समस्येच्या मूळ कारणाचे निदान होईल व आपण समस्येवर योग्य उपचार घेऊन त्यातून बाहेर पडू शकाल.

जर अंतर्गत एखादा विकार नसेल तर आपण आणि आपले पती दोहांनी दाम्पत्य मानसशास्त्रात निपुण एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आपसात प्रेमाचा सेतू असेल, तर सर्व समस्या कालांतराने दूर होतील. सहवासापूर्वी प्रणयक्रीडेला वेळ देणेही लाभदायक होऊ शकेल. त्यामुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता वाढते, त्यामुळे संबंध सोपे होतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें