‘‘कामासाठी कधीच संघर्ष करावा लागला नाही’’  अदिती सारंगधर

* सोमा घोष

अदिती सारंगधर ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. तिने मागील २० वर्षांमध्ये अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अदितीला अभिनयाची आवड नव्हती. मात्र, काळाच्या ओघात तिचे आयुष्य आणि करिअर बदलत गेले आणि शेवटी अभिनयालाच तिने आपले सर्वस्व मानले. तिचे वडील दीपक सारंगधर हे डॉक्टर होते आणि आई शैला सारंगधर बँकेत अधिकारी पदावर काम करत  होत्या.

अदिती मराठी इंडस्ट्रीतली सर्वात प्रसिद्ध आणि जास्त मानधन मिळणारी अभिनेत्री आहे. तिला डेली सोपची राणी म्हटले जाते, कारण तिची कुठलीही मालिका कमीत कमी ४ वर्षे चालते. कसदार अभिनयासाठी ती खूप मेहनत घेते आणि स्वत:ला एक ब्रँड मानते, जो तिला स्वस्तात विकायचा नाही.

अभिनयाव्यतिरिक्त तिला कथ्थक आणि सालसा नृत्यही येते. करिअरच्या या यशस्वी प्रवासात काही मित्र-मैत्रिणींमुळे ती सुहासला भेटली, जो  इंजिनीअर होता. ती त्याच्या प्रेमात पडली आणि तिने लग्न केले. त्यांचा मुलगा अरिन ६ वर्षांचा आहे. सामाजिक विषयावरील तिचे ‘चर्चा तर होणारच’ हे विनोदी अंग असलेले सामाजिक विषयावरील नाटक खूपच प्रसिद्ध आहे. याचे प्रयोग ती मुंबईत करत आहे. यात ती एका सामाजिक कार्यकर्तीच्या भूमिकेत आहे. याशिवाय अदिती मराठी मालिका आणि चित्रपटही करत आहे.

अदितीला ‘गृहशोभिका’ खूप आवडते, कारण हे मासिक महिलांच्या समस्यांना ठामपणे मांडून त्यावर निर्भयपणे आपले विचार मांडते. ती सांगते की, तिची आईही हे मासिक वाचायची.

अभिनयात येण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?

अभिनयात येण्याचा मी कधीच विचार केला नव्हता, कारण वयाच्या प्रत्येक टप्प्याबर माझे विचार बदलत गेले. लहान असताना वडिलांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जायचे, तेव्हा वडील वेटरला टीप्स देताना बघून मला वेटरचे काम करायचे होते. थोडी मोठी झाल्यावर आणि विमानाने प्रवास करू लागल्यावर मला एअर होस्टेस म्हणजे हवाई सुंदरीचे काम आवडू लागले आणि मला तेच करायचे होते. महाविद्यालयात गेल्यावर जेव्हा मी मानसशास्त्राचा अभ्यास करू लागले तेव्हा माझी बाल मानसशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती. महाविद्यालयात असताना रंगभूमीशी जोडले गेले आणि नाटकांमध्ये अभिनय करू लागले.

त्यामुळे एकपात्री प्रयोगाशी जोडले गेले. त्यावेळी माझ्या अभिनयाचे लोकांनी खूप कौतुक केले. यातूनच मला अभिनयची गोडी लागली. माझ्या कुटुंबातील कोणीही  अभिनयाच्या क्षेत्रातील नाही. सर्व डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स आहेत. मी सुट्टीत वैद्यकीय किंवा विज्ञानाच्या सहलीला जायचे.

तुम्हाला संघर्ष किती करावा लागला?

मला कामासाठी कधीच संघर्ष करावा लागला नाही. गेले एक वर्ष मी माझ्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला होता, पण त्यानंतरही मला चांगले काम मिळाले. प्रत्यक्षात कामासाठी संघर्ष करावा लागला नाही, पण मी ज्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे, तो टिकवून ठेवण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागतात. त्यासाठी योग्य माणसे आजूबाजूला असणे आवश्यक असते, जेणेकरून मी योग्य काम निवडू शकेन. माझ्या आयुष्यात मी अनेकदा चुकीचे निर्णयही घेतले आहेत, मात्र ते चुकीचे असूनही मी त्याबद्दल फारसा विचार केला नाही आणि माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला. मी पैशांच्या मागे धावत नाही, पण पैसे नसल्यास दु:खी होत नाही, जीवन जसे असेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.

कोणत्याही कलाकाराने सातत्याने अभिनय करू नये. यामुळे त्याला स्वत:ला समजून घ्यायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत एखादा ब्रेक घेण्याची गरज असते, कारण डेली सोपमध्ये काम केल्याने कलाकाराच्या प्रतिभेत नावीन्य शिल्लक राहात नाही. कोणत्याही कलाकाराला डेली सोप नाईलाजाने करावी लागते. कोणाला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तर कोणाला अन्य काही कारणामुळे डेली सोप हा उत्तम पर्याय वाटत असतो. मी स्पॅनिश शिकण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्यापैकी शिकले आहे, पण पूर्ण करायला मला वेळ मिळत नाही. १० महिन्यांत मी माझी सर्व अर्धवट कामे पूर्ण केली आहेत.

तुम्हाला कौटुंबिक आधार कितपत मिळाला?

माझ्या कुटुंबातील सर्वजण शिक्षण क्षेत्रातील आहेत, त्यामुळे माझी अभिनयाची आवड पाहून त्यांना धक्काच बसला. तरीही जे काही काम करशील त्यात तुझे सर्वोत्तम द्यायला विसरू नकोस, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर मी कामाला सुरुवात केली आणि माझ्या कामाचे कौतुक होताना पाहून त्यांना अभिमान वाटू लागला. अभिनेत्यापेक्षाही एक चांगली व्यक्ती बनणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये मला चांगली झोप लागणे आवश्यक आहे, ज्यामुळे मी सुखाने झोपू शकेन. सुरुवातीला माझ्या वडिलांना माझे काम आवडत नव्हते, पण नंतर माझे काम झाल्यावर ते मला न्यायला गाडी घेऊन स्टेशनपर्यंत यायचे. माझ्या कुटुंबीयांनी मला घराबद्दल कधीच कोणताही तणाव येऊ दिला नाही. म्हणूनच मी प्रत्येक कामात दिलेला शब्द पाळून माझे १०० टक्के देऊ शकले. मी इथपर्यंत पोहोचण्याचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांपासून ते माझ्या सासरच्या सर्वांना देते. माझ्या मुलाला माझे काम माहीत आहे, पण त्याने ते खूपच कमी पाहिले आहे. त्याला बाल रंगभूमी खूप आवडते. मी त्याला तिथे घेऊन जाते.

तुमचे आयुष्य बदलून टाकणारी मालिका कोणती?

‘वादळवाट’ ही मालिका, ज्यात मी प्रमुख भूमिकेत होते आणि ती मालिका साडेचार वर्षे चालली. या मालिकेमुळेच मी घराघरात ओळखले जाऊ लागले. यातील माझ्या कामाचे सर्वांनी कौतुक केले, त्यामुळे मला पुढे जाण्यास मदत झाली.

डिजिटल इंडियामुळे आजकाल मालिकांची रेलचेल वाढली आहे, त्याचा जरा अतिरेकच होत नाही का? तूम्ही त्याकडे कशा पाहतात?

इंडिस्ट्रीची प्रगती होत असून ती मोठी होत असल्याचे पाहून बरे वाटते, मात्र प्रगतीसोबतच काही चुकीच्या गोष्टीही येतात. त्यातून सावरत पुढे जाणे गरजेचे असते. हे खरे आहे की, सध्या कलाकारांना काम करण्याची जास्त संधी मिळत आहे.

तुम्ही कामासोबतच कुटुंबाची काळजी कशी घेता?

आम्ही दोघांनीही आमची जबाबदारी समान वाटून घेतली आहे. गरज पडल्यास तो घरात झाडूही मारतो आणि मी भांडी घासते. मी घराबाहेर अभिनेत्री असले तरी सकाळचा नाश्ता आणि चहा बनवून द्यायला मला आवडते. गरज भासल्यास सुहास मुलाला शाळेत पाठवतो आणि नाश्ताही बनवतो. बघायला गेल्यास हे नाते पती-पत्नीसोबतच एका चांगल्या जोडीदाराचेही आहे. हे नाते शेअर मार्केटसारखे असते जे कधी वर तर कधी खाली जाते.

तुमची प्रेमाची संकल्पना किती बदलली आहे?

प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आज पूर्णपणे बदलला आहे. तो वस्तूनिष्ठ झाला आहे. आजकाल लैंगिक आकर्षण जास्त वाढत आहे आणि प्रत्येकाला जास्त पैसे हवे आहेत. त्यामुळेच सध्या दिखाऊपणा वाढला आहे. कुठेही कोणाच्याही परवानगीची गरज भासत नाही. पूर्वी लपूनछपून भेटण्यात जी मजा यायची ती आता उरलेली नाही. ‘हम आपके है कौन’, ‘हम है राही प्यार के’ यासारखे चित्रपट जास्त आवडीचे झाले आहेत. पूर्वी प्रेमात एक ठेहराव असायचा आता तो दिसत नाही. याशिवाय आज लोकांमध्ये बांधिलकी आणि सहिष्णुता कमी होत चालली आहे.

‘‘प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभ्यास करावा लागतो’’ – जुई भागवत

* सोमा घोष

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली अभिनेत्री जुई भागवत ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेत बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसली. तिने वडिलांकडून संगीताचेही प्रशिक्षणही घेतले आहे. संगीताच्या अनेक कार्यक्रमातही तिने भाग घेतला होता. कलेच्या वातावरणातन जन्मलेल्या जुईची आई दीप्ती भागवत या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि अँकर आहेत तर वडील मकरंद भागवत हे एक प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आहेत. दीप्ती भागवत यांनी अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिकांसोबतच सहाय्यक भूमिकाही केल्या आहेत.

जुई भागवतने ‘उंच माझा झोका’, ‘पिंजरा’, ‘स्वामिनी’, ‘मोगरा फुलला’ यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. तिने झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये मकरंद देशपांडे परीक्षक होते. तिने यात भावनाप्रधान अभिनयासाठी पुरस्कार मिळवला. सध्या जुई सोनी मराठीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत सावनीच्या मुख्य भूमिकेत आहे, ही आतापर्यंत तिला मिळालेली सर्वात मोठी भूमिका आहे, जी प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची आहे. चित्रिकरणात व्यस्त असलेल्या जुईने वेळात वेळ काढून खास ‘गृहशोभिके’साठी गप्पा मारल्या. त्यातील हा काही भाग :

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कुटुंबाचा पाठिंबा किती होता?

माझे आईवडील आणि नातेवाईक सर्वजण सर्जनशील, कल्पक क्षेत्रात आहेत. माझी आई मराठी अभिनेत्री आहे आणि वडील संगीतकार आहेत. संपूर्ण घरातील वातावरण सर्जनशील असल्यामुळे मी बालपणीच कथ्थक आणि गाणे शिकायला सुरुवात केली. मला आठवते की, वयाच्या ८व्या वर्षी मी एकदा आईच्या सेटवर गेले होते, तिथे गेल्यावर मला वाटले, हे माझे क्षेत्र आहे. मी तिथल्या दिग्दर्शकांकडे माझे ऑडिशन घेण्याचा हट्ट धरला. माझ्यातील आत्मविश्वास पाहून त्यांनी लगेचच माझे ऑडिशन घेतले आणि मी एक छोटीशी भूमिकाही साकारली. मला कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायला, जिंकायला आणि बक्षिसे मिळवायला खूप आवडायचे. कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे मी महाविद्यालयापासूनच रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. पदवीचा अभ्यास करताना ५ वर्षे अभिनयही केला. त्यानंतर अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि या क्षेत्रात पदार्पण केले. त्या दरम्यान ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. तिथे मला सर्वोत्कृष्ट भावनाप्रधान अभिनयासाठी ‘बेस्ट एक्सप्रेशन ऑफ दि सीझन’ हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर कोविड आला. त्या काळात मला ही मोठी मालिका मिळाली. यात माझ्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरा वेलनकरसोबत काम करताना मला मजा येत आहे.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

मला पहिला मोठा ब्रेक ‘तुमची मुलगी काय करते’मध्ये मिळाला. ही मालिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. चित्रिकरणादरम्यान, मला उतारावरून कार चालवून अभिनय करायचा होता. मी काही दिवसांपूर्वीच कार चालवायला शिकले होते. त्यामुळे मी खूपच तणावात होते, पण सर्व व्यवस्थित पार पडले.

तुमची मुलगी काय करतेया मालिकेतील व्यक्तिरेखा तुझ्या स्वभावाशी किती मिळतीजुळती आहे?

या मालिकेतील माझी भूमिका आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सावनी मिरजकरची आहे. या मालिकेतून आजच्या तरुणाईची विचारसरणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, कारण महाविद्यालयात जाणारी मुले जेव्हा अमली पदार्थांचे सेवन, एखादे व्यसन किंवा समवयस्कांच्या दबावाला बळी पडतात तेव्हा त्यांच्या नकळत एक वेगळीच व्यक्ती होऊन जातात. ही एक सत्यकथा आहे, जी हरवलेल्या मुलीच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. ती बेपत्ता झाल्यानंतर तिला कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि कुटुंबाची काय स्थिती होते, यावर आधारित हे कथानक आहे. यात शांत महिला ते प्रसंगी वाघिणीचे रूप धारण करणाऱ्या आईची कणखर वृत्ती दाखवण्यात आली आहे. ही व्यक्तिरेखा माझ्या स्वभावापेक्षा खूप वेगळी आणि अवघड आहे. माझ्यासाठी ही पहिलीच मोठी मालिका आहे. ती साकारताना मला खूप काही शिकायची संधी मिळत आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्याचा अभिनय करणे सोपे नाही, कारण मुळात मी तशी नाही. त्यासाठी मला खूप संशोधन करावे लागले. या व्यक्तिरेखेत अनेक चढ-उतार आहेत.

एखाद्या मोठया कलाकारासोबत काम करण्यासाठी तुला किती तयारी करावी लागते?

खूप तयारी करण्याबरोबरच, योग्य शॉट मिळण्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते, कारण या मालिकेतील माझे सर्व सहकारी मुरलेले कलाकार आहेत आणि जवळपास सर्वच रंगभूमीवरून आलेले आहेत. अशा कलाकारांचे काम चोखंदळ असते, त्यामुळे त्यांच्या तोडीचे काम करणे सोपे नसते, पण मला सर्वांचे सहकार्य मिळाले. तांत्रिक ज्ञानही खूप जास्त मिळत आहे.

कोणत्या मालिकेमुळे तुझे आयुष्य बदलले?

मला याच मालिकेतून मोठे नाव मिळाले. प्रेक्षक मला ओळखू लागले. ते कुठेही भेटले तरी मला मालिकेतील नावानेच हाक मारतात.

आईवडील मराठी इंडस्ट्रीत असल्यामुळे तुला काम मिळणे सोपे झाले का?

माझ्यासाठी काहीही सोपे नाही, मात्र इंडस्ट्रीतील लोकांची माझ्यासोबतची वागणूक खूप चांगली असते, पण यामुळे मला कोणतीही संधी मिळाली नाही आणि मला ती नकोही होती. रंगभूमीवर काम करताना मला ही भूमिका मिळाली. मला कोणीतरी ओळखल्यानंतर दडपण येते, कारण माझी तुलना माझ्या आईशी होऊ लागते.

तुला हिंदी चित्रपटात काम करायची इच्छा आहे का?

हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे, काही स्क्रिप्टही मिळाल्या आहेत. चांगले कथानक मिळाल्यास नक्कीच काम करेन. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतही काम करण्याची माझी इच्छा आहे.

रिजेक्शन म्हणजेच नकाराचा सामना तू कसा करतेस?

रिजेक्शनला अनेकदा सामोरे जावे लागले, पण ज्या मालिकेत मला नकार मिळाला, ती न मिळणे माझ्यासाठी फायदेशीर ठरले. म्हणूनच मी कोणत्याही प्रकारे नाराज झाले नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी खूप काही माहीत करून घ्यावे लागते. मी नेहमी प्रयत्न करत राहाते.

तुझ्या स्वप्नांचा राजकुमार कसा आहे?

ज्याच्याशी सूर जुळतील आणि सहजतेने वागता येईल, तोच माझ्या स्वप्नांचा राजकुमार असेल.

आवडता रंग – फिकट जांभळा, फिरोजी.

आवडता पोशाख – भारतीय, पाश्चात्य.

आवडते पुस्तक – अल्केमिस्ट.

पर्यटन स्थळ – हिमालय ट्रेकिंग, युरोप.

वेळ मिळाल्यास – कथ्थक किंवा संगीताचा सराव.

सामाजिक कार्य – वृद्ध, अनाथ मुलांची सेवा.

आवडता पदार्थ – आईच्या हातची पुरणपोळी.

जीवनातील स्वप्न – कलेशी जोडलेले राहाणे.

जीवनातील आदर्श – शिकत राहाण्याची इच्छा.

अक्षया गुरवची ‘बंडखोरी’ रिवणावायली मधून येणार समोर

* सोमा घोष

मराठी चित्रपट हा नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटकांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची दृष्टी प्रेक्षकांना देत आहे. हेच मराठी चित्रपट हे बहू आयामी आणि विषयातील वैविध्य यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या चित्रपटातुन कलाकारांची सामाजिक जाणीवसुद्धा लक्षात येत असून बिटरस्वीट या चित्रपटाच्या नंतर अक्षया गुरव ही अभिनेत्री पुन्हा एकदा एका सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

रिवणावायली असे या चित्रपटाचे नाव असून, येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटही आपल्या भूमिकेविषयी अक्षया सांगते ‘सामाजिक दृष्टया कितीही पुढारलेलो असला तरी कुठे ना कुठे अनिष्ट रूढी परंपरा या आपल्या पाठीमागे तग धरून असतात. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत कितीही जनजागृती होत असली तरी कुठेतरी समाजात अनेक स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. तर शिकलेल्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासूनसुद्धा अडवलं जात आहे. अशाच एकदा बंडखोर मुलीची तिच्या संघर्षाची कथा म्हणजे रिवणावायली.’ तर याच चित्रपटाच्या विषयी पुढे ती सांगते ‘कलाकार आपल्या कलेतून समाजाचं एक प्रतिबिंब उभं करत असतो. कलाकार समाजाचा देणेकरी असतो, त्याने सामाजिक विषय हाताळताना विषयाची सवेंदनशीलता जाणून घेणे आणि त्यावर योग्य ती भूमिका घेणं ही त्याची जबाबदारी असते. तीच जबाबदारी मी या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे.’ अक्षया या चित्रपटात ‘ऐश्वर्या देसाई’ हे पात्र साकारत असून ती उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे.

या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

 ‘माझी मैना’ गाण्यात झळकणार अभिनेत्री मोनालिसा बागल

* सोमा घोष

“हो तिची दुनिया ही न्यारी तिची स्टाईल पुराणी जशी आहे मनाची राणी… कधी राऊंड राऊंड फिरे साऊंड लाऊड लाऊड करे ति गाते मर्जिची गानी…आली लाली गाली माझी मैना आहे निराली…” या दोन-तीन ओळीत मैना कशी आहे हे प्रत्येकाला समजलंय, पण या मैनाला पाहण्यासाठी गेले कित्येक दिवस प्रेक्षक आतुर होते. अखेर, ती मनाची राणी, जी गाते मर्जिची गाणी अशी निराली मैना प्रेक्षकांपर्यंत पोहचलेली आहे एका नव्या गाण्याच्या माध्यमातून ज्याचे नाव आहे ‘माझी मैना’.

साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, सुरेश गाडेकर निर्मित आणि संदेश गाडेकर सहनिर्मित ‘माझी मैना’ हे मराठी गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील मैना आहे अभिनेत्री मोनालिसा बागल आणि जो मैनेचं प्रेमाने आणि मनापासून कौतुक करतोय तो आहे AJ (Oye Its Prank).  या गाण्याच्या निमित्ताने मोनालिसा आणि AJ ही नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. मोनालिसाने आतापर्यंत वेगवेगळ्या पठडीतील भूमिका साकारल्या आहेत, या गाण्याच्या निमित्ताने पण ती सोज्वळ, गोड अशा भूमिकेत दिसणार आहे. त्यापेक्षा असं म्हणा की, ती ख-या आयुष्यात जशी आहे तशीच या गाण्यात दिसणार आहे.

‘माझी मैना’ गाण्याचे दिग्दर्शन शुभम गोणेकर याने केले असून संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अमोल दाते आणि नितिन कुटे यांनी पेलली आहे.

“दिलफेल सारे मागे माझ्या माझ्या दिलाचा तु रं राजा…. ति सोळा वर्षाची कोवळ्या स्पर्शाची चांदन माखून आली” गाण्याच्या या सुंदर ओळी आणि अर्थात संपूर्ण गाणं ऐकायला फार सुरेख वाटतं त्याचे कारण म्हणजे या गाण्याला लाभलेला आवाज. गायिका योगिता गोडबोले आणि गायक नितिन कुटे यांनी हे डुएट गाणं गायलं आहे. या गाण्यात शब्दांची सुंदर रचना, कानाला ऐकावेसे वाटतील असे गोड शब्द प्रशांत तिडके आणि नितिन कुटे यांनी मिळून लिहिले आहेत. नागेश नितरुडकर आणि राहुल धांडेकर हे या गाण्याचे डीओपी आहेत तर विनित गाडेकर आणि विराज गाडेकर यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.

निराळ्या अशा मैनेच्या प्रेमात पडण्यासाठी आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी नक्की ऐका ‘माझी मैना’ साईरत्न एंटरटेनमेंट या युट्युब चॅनेलवर.

सण-उत्सव कुटुंब आणि मित्रांसोबत साजरे करायला आवडतात – रूचिरा जाधव

* सोमा घोष

उच्चशिक्षित कुटुंबातील मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव ही छोटया पडद्यावरील मराठी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मुळे मराठी इंडस्ट्रीजमध्ये चर्चेत आली. यानंतर तिने टीव्हीवरील बरेच कार्यक्रम आणि चित्रपटांतही भूमिका साकारल्या. तिच्या या प्रवासात तिच्या पालकांनी तिला खूपच सहकार्य केले. म्हणूनच ती या क्षेत्रात पुढे जाऊ शकली. मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या रुचिराने अथक परिश्रमाने आपल्या अस्तित्वाचा ठसा मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत उमटवला आहे. नुकतेच तिचे एक मराठी चित्रपट आणि हिंदी वेब शोचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. त्याच्या प्रदर्शनासाठी रुचिरा उत्सुक आहे. तिने फोनवरून या क्षेत्रातील आपल्या प्रवासाबाबत सांगितले, जो खूपच मनोरंजक आहे. सादर आहे यातीलच काही खास भाग :

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

माझ्या कुटुंबात माझ्याव्यतिरिक्त इतर कुठलाही सदस्य अभिनय क्षेत्रात नाही. या कुटुंबातील मी पहिली अभिनेत्री आहे. महाविद्यालयात असताना नाटकात काम करायला मला आवडायचे. याव्यतिरिक्त महाविद्यालयात असताना मी एका नाटकाची संहिताही लिहिली होती आणि अभिनयही केला होता. त्या नाटकासाठी मला राज्यस्तरावर सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार आणि त्या नाटकाच्या लेखनासाठीही द्वितीय पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘इंडियन नॅशनल थिएटर’ स्पर्धेतही सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अशा सर्व गोष्टी एकाच वेळी जुळून आल्यामुळे मी याच क्षेत्रात कारकीर्द घडवायचे ठरविले. त्यानंतर मला नाटक, चित्रपट, टीव्ही आणि वेब सर्वांकडूनच कॉल येऊ लागले आणि अभिनय हाच माझा पेशा झाला.

अभिनय क्षेत्रात काम करणार असल्याचे पहिल्यांदाच घरी सांगितले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

सुरुवातीला खूपच अवघड होते, कारण पूर्वी जेव्हा मी नाटकात काम करायचे तेव्हा मला महाविद्यालयातून घरी यायला उशीर व्हायचा. त्यामुळे घरून ओरड खावी लागायची. माझ्या पालकांना इंडस्ट्री आणि त्याच्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीची माहिती नव्हती. जेव्हा मला पुरस्कार मिळू लागले आणि माझे नाव वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागले तेव्हा त्यांना वाटले की, मी काहीतरी चांगले काम करीत आहे. त्यामुळे ते मला सर्वतोपरी सहकार्य करू लागले. हे खरे आहे की, इंडस्ट्रीत कधीच कायमस्वरूपी काम मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावाच लागतो आणि मी अजूनही तो करीत आहे. पण मला स्वत:वर विश्वास आहे. महिनाभर जरी काम मिळाले नाही तरी तणाव वाढतो.

गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीत काम करणे किती अवघड असते?

सुरुवातीला संघर्षाकडे मी तणाव म्हणून पाहायचे. आता मात्र हसून त्याला सामोरी जाते. सध्याच्या कोरोना काळात घरातून ऑडिशन द्यावे लागते, पण माझे घर लहान आहे. माझ्यामुळे घरातल्यांना मी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही. माझ्याकडे स्वत:ची कार नाही. त्यामुळे शूटिंग म्हणजे चित्रिकरणासाठी मला ठाणे येथून खासगी टॅक्सी करून जावे लागते. चित्रिकरण १२ ते १३ तास चालते. मात्र मुंबईत वाहतूक कोंडीमुळे आणखी काही तास वाया जातात. त्यामुळे झोपण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळेच प्रसन्न चेहऱ्याने चित्रिकरण करणे हे मोठे आव्हान असते. मी जास्त करून कॅबने प्रवास करते. बाहेरून सर्वांना वाटते की, इंडस्ट्रीत केवळ ग्लॅमर आहे, पण त्याआड जी प्रचंड मेहनत करावी लागते ती कोणालाही दिसत नाही. मी काम मनापासून एन्जॉय करीत असल्यामुळे कराव्या लागणाऱ्या संघर्षाची जाणीव मला होत नाही. अनेकदा जेव्हा एक किंवा दोन महिने झाले तरी काम मिळत नाही तेव्हा मात्र मी खूपच तणावाखाली येते. म्हणूनच काम कितीही दूर आणि प्रचंड मेहनतीचे असले तरी मी नकार देत नाही.

या इंडस्ट्रीजशी संबंधित नसल्यामुळे चांगले काम मिळविण्यासाठी तुला अडचणी आल्या का?

या ६ वर्षांत बराच संघर्ष केला आहे. इंडस्ट्रीला नवशिके नव्हे तर थेट प्रतिभावान कलाकार हवे असतात. मात्र ही प्रतिभा अभिनयातून आणि त्यातून मिळत जाणाऱ्या अनुभवातून गवसते. अभिनयाव्यतिरिक्त तुमची पोहोच आणि या क्षेत्रातील प्रत्येक छोटी-मोठी माहिती मिळविणे फारच गरजेचे असते. पण मी अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही, कारण यामुळे परफॉर्मन्स खराब होतो.

तुझे राहणीमान, बोलण्याच्या पद्धतीमुळे कधी काही सहन करावे लागले आहे का?

मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. फॅशन डिझायनर बनण्याची माझी इच्छा होती. पण घरातल्यांचा विरोध होता. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. अभ्यासासोबतच मी नाटकात काम करू लागले. माझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे. ही समज माझ्यात खूप आधीपासूनच आहे. त्यामुळे कधी कोणाकडून त्यासाठी ऐकून घ्यावे लागले नाही. याशिवाय नाहक बडबड करण्यापेक्षा मी नेहमीच शांत राहते. कॅमेरा, दिग्दर्शक आणि संवाद या तीन गोष्टींवर नेहमीच लक्ष केंद्रित करते.

कोणत्या मालिकेमुळे तुझ्या जीवनाला कलाटणी मिळाली?

मी बरेच ऑडिशन दिले. काम मिळत राहिले. पण हो, मिळेल त्या कामाला मी होकार देत नाही. जे काम करायचे मी ठरवले आहे तशी भूमिका असेल तरच ती स्वीकारते. तेच काम करण्याची माझी इच्छा असते. स्क्रिप्ट, दिग्दर्शक आणि बॅनर पाहूनच मी चित्रपटाची निवड करते. मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. यात मी ‘माया’ ही व्यक्तिरेखा साकारली. माझ्या आईचे नावही माया आहे. माझ्यासाठी आईच्या नावासोबत काम करणे ही मोठी गोष्ट होती. या भूमिकेने मला ओळख मिळवून दिली. सर्वांना मी माहीत झाले. अनेकदा मराठी मालिकांमध्ये ग्लॅमर फार कमी असते, पण या मालिकेत माझ्या भूमिकेतील अभिनयातच ग्लॅमर होते. यामुळे मला कामाव्यतिरिक्त खूप काही शिकण्याची संधी मिळाली. मला विविध भाषेत वेगवेगळया धाटणीच्या भूमिका साकारायला आवडतात.

तुझे स्वप्न काय आहे?

बायोपिकवर आधारित भूमिकेपेक्षा महिला केंद्रित विषयांवर काम करण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचे आव्हान स्वीकारायला मला निश्चितच आवडेल. ऐतिहासिक पात्रांमध्ये मला द्र्रौपदीची भूमिका साकारायला आवडेल, कारण यात प्रत्येक चरित्राशी द्रोपदीचे कुठल्या ना कुठल्या रूपातील नाते जोडले गेलेले आहे.

तू सण-उत्सव कसे साजरे करतेस?

मला प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो. सण-उत्सवांमुळेच आपण आपले कुटुंब, मित्रांशी जोडलेले राहतो. दिवाळीत कंदिल, रांगोळी, पणत्या, चांगले कपडे घालणे, असे सर्व एकत्रच जुळून येते. याशिवाय आई अनेक पारंपरिक पदार्थ बनवते. ते मला सर्वात जास्त आवडतात. दिवाळीत फटाके फोडणे मला आवडत नाही. यामुळे प्रदूषण होते, शिवाय फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरून लपून राहण्याइतकी जागाही जीवजंतूंसाठी शिल्लक राहिलेली नाही.

आवडता रंग – गुलाबी, निळा, काळा, पांढरा.

आवडता पोशाख – भारतीय.

आवडते पुस्तक – मृत्युंजय.

वेळ मिळाल्यास – मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा करणे.

आवडता परफ्युम – नॅचरल इसेन्स.

आवडता पदार्थ – आईच्या हातचे जेवण.

आवडते पर्यटन स्थळ – देशात काश्मीर, विदेशात मालद्वीप.

जीवनातील आदर्श – ज्या गोष्टीमुळे कोणी दुखावले जाईल ती न करणे किंवा असे काहीच न बोलणे.

आवडते काम – अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात प्रत्यक्ष जाऊन काम करणे. आर्थिक मदत करणे.

स्वप्नातील राजकुमार – बाहुबलीसारखा असण्याची गरज आहे.

‘कशा असतात बायका’ या लघुपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

* सोमा घोष

मुंबई – भावा बहिणीच्या नात्यातले, नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रिची सर्व पातळ्यांवर लढण्याची आणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट म्हणजे ‘कशा असतात ह्या बायका’. नुकताच हा लघुपट सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. या लघुपटास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: महिलावर्गाची लघुपटास पसंती मिळत आहे.

भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणाऱ्या या लघुपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता अभिजीत खांडकेकर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरेनेसुद्धा या भावस्पर्शी लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण केले आहे. या तिघांच्या अभिनयाची सध्या चर्चा सुरु आहे.

या लघुपटामध्ये एक महत्वाची बाब आहे,  ती अत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश देते. अप्रत्यक्षपणे, ही शॉर्ट्फिल्म नवीन पिढीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते. जरी भाऊबीज ह्या थीमवर हा लघुपट असला तरी ही कथा केवळ बहिणीबद्दल नाही. ती आपल्या समाजातील बहुतांश महिलांची भावना व्यक्त करते. तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी पाहणं ही एक मेजवानी आहे.

http://

पुरुषांचा ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ’कॉटन किंग’ यांनी स्त्रियांच्या सन्मानार्थ या लघुपटाची निर्मिती केली आहे. महिलांचं भावविश्व खूप वेगळं असतं. माया, ममता, त्याग, विश्वास, नि:स्वार्थ प्रेम, समर्पित भावना हे सारे गुण स्त्रियांच्या ठायी दिसतात. आपल्या परिवारावर या गुणांची त्या मनसोक्त उधळण करतात. स्त्रियांच्या या भावविश्वाचे हळूवार पदर सदर लघुपटाद्वारे उलगड्ण्य़ात आले आहे.

‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम वर पाहायला मिळेल. अदभूत क्रिएटीव्हज निर्मित हा लघुपट दिग्दर्शित केला आहे वैभव पंडित यांनी आणि लिहिला आहे मोनिका धारणकर यांनी.

दिग्दर्शक वैभव पंडित म्हणतात, ”भाऊबीजेच्या निमित्ताने शॉर्ट्फिल्म बनवण्य़ासाठी कॉटनकिंगकडून असा ब्रिफ मिळणे विलक्षण होते. उत्तम चर्चा, विचारमंथन आणि अनेकवेळा लिखाण केल्यानंतर आम्ही कथेची योग्य नस पकडू शकलो. कॉटनकिंगने आम्हाला जी मोकळीक दिली, जो पाठिंबा दिला त्यासाठी आम्ही आभारी आहोत.’’

”आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या स्त्रिया या विविध पातळीवर विविध भूमिका सक्षमपणॆ बजावत असताना त्यांची तारांबळ उडते आणि तरीही घरातील पुरुष मात्र त्यांना गृहीत धरत असतात. हा लघुपट निव्वळ एक कलाकृती नसून प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारी कलाकृती आहे,” असे लघुपटाचे प्रस्तुतकर्ता कॉटन किंगचे संचालक कौशिक मराठे यांनी सांगितले.

चला, थोडे आणखी समजून घेऊया ’कशा असतात ह्या बायका’!

लघुपट पाहण्यासाठी लिंक – https://www.youtube.com/watch?v=2zW1z081xgQ&t=199s

विनोदवीरांना मिळाली महानायकाची कौतुकाची थाप

* सोमा घोष

लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचं. अगदी बरोबर वाचलंत मंडळी. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं, ‘तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं काम करताहात. ते सतत असंच करत राहा’, असं ते म्हणाले आणि ते स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

सर्वांची आवडती हास्यजत्रा ही रविवारी केल्यावर अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा चार दिवस व्हावी आणि त्यांचा हास्याचा डोस आठवड्यातून चार दिवस मिळावा, अशी मागणी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीचा मान राखून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ २० सप्टेंबरपासून, सोमवार ते गुरुवार रात्री ९ वा. असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे.

आता हसण्याचे वार होणार आठवड्यातून चार, पाहायला विसरू नका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  आजपासून सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

मराठी चित्रपटसृष्टिचं भविष्य उज्ज्वल आहे – वीणा जामकर

– सोमा घोष

मराठी नाटय आणि चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख बनविणारी मराठी अभिनेत्री वीणा जामकरचा जन्म मुंबईजवळच्या पनवेल आणि पालनपोषण रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यात झालं. तिचं कौटुंबिक वातावरण कला आणि संस्कृतीचं राहिलंय, या कारणामुळेच तिने शाळा आणि महाविद्यालयातून नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने अविष्कार नाटयसंस्थेत प्रवेश घेतला आणि मराठी चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला लागली, तिला नाटकांबरोबरच चित्रपट करण्याचीदेखील संधी मिळाली. हसमुख आणि विनम्र स्वभावाच्या वीणाचा प्रवास आणि मराठी चित्रपटसृष्टीबद्दल बोलणं झालं, सादर आहेत त्याचे काही खास अंश :

अभिनयात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

अभिनयात येण्याची प्रेरणा माझी आई अलका जामकरकडून मिळाली. शाळेत शिक्षक असली तरी तिलादेखील नाटकांची आवड होती. खरं म्हणजे महाराष्ट्रात कलेचं वातावरण आहे, त्यामुळे अनेक कुटुंब कला आणि संस्कृतिशी संबंधित असतात. मला आठवतंय की लहानपणी मी आईला उरणमध्ये छोटयाछोटया नाटकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. मला अभिनयाची आवड आहे की नाही हे पाहण्यासाठी तिने मला काही संवाद बोलायला सांगितले, जे मी अनाहुतपणे करून दाखवलं. बाबा सरकारी कर्मचारी होते, परंतु त्यांना पेंटिंग, कॅलिग्राफीची आवड होती. त्यांनी ९० च्या दशकात आम्हा दोघींना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं, कारण त्याकाळी गावात काम करण्यासाठी माझी आई संकोचायची. माझ्या बाबांचे विचार खूप सुधारक होते. माझा भाऊ केमिकल इंजिनिअर आहे.

तुझ्या प्रवासात कुटुंबाने किती सहकार्य केलं?

मी वयाच्या १५व्या वर्षीच सांगून टाकलं होतं की मला अभिनयाची आवड आहे आणि मी शाळेच्या नाटकात सहभागी व्हायची. त्यावेळी माझा भाऊ मुंबईत शिकत होता आणि मलादेखील तिथे जाऊन शिकायचं होतं. अभिनय करण्यासाठी मुंबईत येऊन सर्वांना भेटता येणार होतं. मराठी साहित्यात पदवी घेतल्यानंतर मी नाटकातदेखील व्यस्त राहिली. मानसिक आधारदेखील खूप मिळाला, ज्यामुळे मला काम करताना मजा आली.

पहिला ब्रेक केव्हा आणि कसा मिळाला?

मुंबईची जुनी आणि प्रचलित नाटयसंस्था अविष्कार संस्थेत मी गेली आणि तिथे दिग्दर्शक राजेंद्र बडे त्यांचा पहिला चित्रपट बनवत होते. त्यावेळी मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांची रुची वाढत चाललेली. त्यादरम्यान मला दिग्दर्शकांनी कास्ट केलं आणि त्यामुळे मला चित्रपटात काम करण्याची पद्धत, कॅमेरा फेस करणं इत्यादी समजलं. थिएटरमध्ये काम करणं आणि चित्रपटात काम करणं खूप वेगळं आहे. दुसरा चित्रपट वळू होता, जो खूप चालला आणि आजदेखील तो चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना कसं वाटलं?

अजिबात आवडलं नव्हतं. नाटकात कोणी ना कोणी मागून बोलत असतं, वेळ ठरलेली असते, त्यामुळे मला अभिनय करताना आनंद मिळतो. एक लिंक बनते. चित्रपटात काम करताना वारंवार कट बोलणं, इमोशनचं मागेपुढे होणं छान नाही वाटतं. त्यामुळे मी बाबांनादेखील सांगून टाकलं की मी फक्त नाटकामध्ये कामे करेन. त्यांनी मला फोर्स न करता माझ्यावर सोडून दिलं. मी २०११ साली मी चित्रपट आणि नाटक दोन्हीमध्ये काम करत होती. त्यामुळे मला एकत्रित पैसे मिळत होते त्यामुळे मला मुंबईत राहण्याची वा खाण्यापिण्याची आबाळ होत नव्हती. माझं पॅशन नाटक होतं, परंतु नंतर मला चित्रपट आवडू लागले.

कोणत्या चित्रपटामुळे घरोघरी ओळख मिळाली?

कामाला सुरुवात ‘वळू’  चित्रपटाने झाली, परंतु २०१०साली मी महेश मांजरेकरचा ‘लालबाग परळ’ चित्रपट २०१० साली केला होता, जो मुंबईच्या मिल कामगारांवर बनविला गेला होता, त्यामध्ये माझी मंजुची भूमिका सर्वांना आवडली होती. त्यानंतर ‘कुटुंब’ चित्रपट आला आणि घरोघरी ओळख मिळाली.

मराठी चित्रपटसृष्टित काम करताना कसं वाटतं?

मराठी चित्रपटसृष्टित साहित्य, कलाकृती, कथा आणि कलाकार खूप छान आहेत, एवढी विविधता कुठे पहायला मिळत नाही. या इंड्रस्ट्रीत काम करून छान वाटतं. याव्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टित स्टार सिस्टीम नाही, कारण हा व्यवसाय नाहीए. त्यामुळे बॉलिवूड आणि टॉलीवूड चित्रपटामधून कायम चढाओढ लागते. त्याचं बजेट आणि इन्फ्रास्ट्रॅक्चर पुढे मराठी सिनेमा काहीच नाहीए. कधीकधी ‘सैराट’ सारखे सिनेमा येतात, जे सुपरहिट होतात. मराठी चित्रपटसृष्टित पैसा टाकण्यापूर्वी निर्माता एकवार विचार करतोच. मराठीत खूप एक्सप्रेमेंटल आणि लो बजेटचे सिनेमे बनतात, परंतु आता चांगले चित्रपट येत आहेत, पुढे जाऊन भविष्य उज्ज्वल आहे.

तुला इथे पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला?

संघर्ष अजूनही आहे. चित्रपट एक व्यवसाय आहे, त्यामध्ये खूप पैसा लागलेला असतो. चित्रपट न चालल्यास तुमचं मानधन कधी नाही वाढत. चांगलं काम करुनदेखील सिनेमा चालला नाही तर मानधन खूप कमी मिळतं आणि निर्मातेदेखील अधिक पैसा गुंतवायला घाबरतात. आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे आजदेखील दुसरा मार्ग स्वीकारावा लागतो. टॉलीवूडमध्ये साधारण कलाकाराला ५० कोटी एका सिनेमासाठी मिळतात. तसंच इथे चांगले नाटय आणि चित्रपटगृह नाहीत. त्यामुळे लोकांना चांगली कलाकृती पाहता येत नाही. टीव्ही कलाकार अधिक प्रसिद्ध होतात, कारण टीव्ही प्रत्येक घरात  असतो. याशिवाय अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनातील तफावत.

मराठी चित्रपटसृष्टीत नेपोटीज्मचा सामना करावा लागला होता का?

इथे नेपोटीज्म नाहीए, मी गेल्या १५ वर्षापासून या इंडस्ट्रित काम करतेय, इथले मोठे कलाकारदेखील बाहेरून येणाऱ्या कलाकारांचं कौतुक करतात आणि कधीही स्वत:च्या मुलांना इंडस्ट्रित आणण्यासाठी कोणावर जोर देत नाहीत. इथे सगळे एकमेकांच काम पाहतात आणि प्रंशसा करतात. इथे असं कोणतंही असं कुटुंब नाहीए जे परंपरेने इंडस्ट्रित आहे, जे हिंदीत पहायला मिळतं. इथे मोकळं वातावरण आहे. कथा खूप वेगळया पद्धतीने लिहिल्यामुळे सर्व कलाकारांना त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार काम करण्याची संधी मिळते. इथे खूप हँडसम दिसणारा कलाकार हिरो बनतो आणि साधारण दिसणारादेखील हिरो बनू शकतो. इथे  सिनेमाची कथा स्टार असते. क्रिएटीव्हीटीमध्ये स्वातंत्र्य असल्यामुळे पावर सेंट्रलाईज्ड होत नाही.

किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

फॅशन मला फार आवडत नाही, परंतु खूप फुडी आहे आणि प्रत्येक प्रकारचं महाराष्ट्रीयन जेवण बनविते.

हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल का?

मी काही खूप ग्लॅमरस अभिनेत्री नाहीए. आता हिंदीत खूपच प्रयोग केले जात आहेत आणि मला काम करायचं देखील आहे.

आवडता रंग – पिवळा.

आवडता पेहराव – भारतीय, खासकरून साडी.

आवडतं पुस्तक – पाडस, लेखक – राम पटवर्धन.

आवडतं पर्यटन स्थळ – देशात मनाली, परदेशात पॅरिस.

वेळ मिळतो तेव्हा – सोलो ट्रिप आणि खाणं बनविणं.

आयुष्यातील आदर्श – सहानुभूती, प्रेम आणि काळजी.

सामाजिक कार्य – मुलं आणि त्यांची मानसिकता.

स्वप्नातील राजपूत्र – फ्रेंडली.

मी अभिनयासाठी फारसा संघर्ष नाही केला – किरण ढाणे

* सोमा घोष

मराठी मालिका ‘लागीर झालं जी’मधून अभिनयाला सुरुवात करणारी मराठी अभिनेत्री किरण ढाणे महाराष्ट्रातील साताऱ्याची आहे. तिने या मालिकेत जयश्री (जयडी) ही नकारात्मक भूमिका साकारली होती. मालिका हिट झाल्यामुळे किरणला घरोघरी ओळख मिळाली, परंतु तिने ही मालिका मध्येच सोडून ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत अभिनय करण्यासाठी गेली, कारण यामध्ये किरणची सकारात्मक प्रमुख भूमिका होती. तिला सकारात्मक भूमिका साकारायला आवडते. किरणला पहिला ब्रेक ‘पळशीची पी. टी’ या मराठी चित्रपटात वयाच्या विसाव्या वर्षी मिळाला, ज्यामध्ये तिने धावपटू पी. टी. उषाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेला समीक्षकांनी खूपच कौतुक केलं आणि या चित्रपटाला तीन नामांकन आणि दोन पुरस्कार मिळाले. किरणच्या या प्रवासात तिची आई राणी ढाणे, वडील मारुती ढाणे आणि बहीण प्रतीक्षा ढाणे यांची खूप मदत झाली. विनम्र आणि हसतमुख स्वभावाच्या किरणला प्रत्येक नवीन कथा आकर्षित करते. प्रत्येक व्यक्तीरेखेशी ती स्वत:ला जोडते. किरणशी तिच्या प्रवासबद्दल बातचीत झाली. सादर आहेत काही खास अंश :

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मी अभिनयबद्दल फारसा विचार केला नव्हता, परंतु लहान वयातच मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची. कॉलेजमध्ये शिकत असताना युथ फेस्टिवलसाठी मी नाट्य स्पर्धेत शिक्षकांच्या सांगण्यावरून भाग घेतला आणि सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी मला अभिनय करण्याचा सल्ला दिला. हे खरंय की मला अभिनयात एक वेगळी व्यक्तीरेखेत जगायला आवडायचं, कारण ते जगून तो भाव दाखवणं एक आव्हान होतं. याव्यतिरिक्त मला वाचायला आवडतं आणि वाचन करताना पूर्ण दृश्य व्हीज्युअलाईज करू लागायची. गोष्टीत मी स्वत:ला पहायला लागायची. त्यानंतर मी अभिनयात जाण्याचं ठरवलं. लहानपणी मी वेगवेगळया क्षेत्रात जाण्याबद्दल विचार करायची. कधी पोलिस, कधी एअर हॉस्टेस, तर कधी आणखीन काही… मग विचार केला या सगळया व्यक्तीरेखा अभिनयात करता येतील आणि अभिनय माझ्यासाठी योग्य आहे.

पहिल्यांदा अभिनयाच्या इच्छेबद्दल पालकांना सांगताना त्यांचे भाव कसे होते?

त्यांनी अगोदर नकार दिला, तसं माझ्या कुटुंबियांनी मला प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य दिलंय, परंतु फिल्म इंडस्ट्रीबद्दल गैरसमज होते. त्यांना वाटायचं की मुली तिथे सुरक्षित नाहीएत. याशिवाय साताराहून मुंबईला जाऊन राहणं आणि संघर्ष करणं माझ्यासाठी खूप कठीण असेल. मीदेखील अभिनयाची इच्छा थिएटरने पुर्ण करायचं ठरवलं होतं. कॉलेजमध्ये थिएटर करत असताना माझ्या पालकांनी मला सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला सांगितलं. मग अभिनय सोडून अभ्यास सुरु केला. यादरम्यान अभिनय शिकविणाऱ्या एका सरांनी माझ्यासाठी एक ‘वन अॅक्ट’ नाटक लिहिलं, परंतु मी अभिनय करण्यास नकार दिला, परंतु त्यांनी विनंती केल्यानंतर मी केलं आणि मला त्यावर्षी युनिव्हर्सिटीचं बेस्ट अॅक्ट्ररेसचा पुरस्कार मिळाला.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

‘वन अॅक्ट’ नाटक करत असताना मला ‘पळशीची पी. टी.’च्या दिग्दर्शकांनी पाहिलं आणि चित्रपटाची ऑफर दिली. यापूर्वीदेखील मला दोन चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, परंतु मी नकार दिला. या चित्रपटाची कथा ऐकून ती करण्याची इच्छा झाली त्यानंतर घरातल्यांची परवानगी घेऊन मी तो चित्रपट केला. त्या चित्रपटाचे लेखक तेजपाल वाघ एक नवीन मराठी मालिका ‘लागिर झालं जी’ लिहित होते. त्यांनी चित्रपटाच्या सेटवरच माझी ऑडिशन घेऊन त्या मालिकेच्या चॅनेलला पाठवलं. यामध्ये मी नकारात्मक प्रमुख भूमिका साकारली होती.

तुला हिंदीमध्ये काही करण्याची इच्छा आहे का?

मी काही दिवसांपूर्वी वेब सिरीजच हिंदीमध्ये पायलट शूट केलं होतं, परंतु पुढे काही रिस्पॉन्स नाही मिळाला. मला हिंदीत अभिनय करण्याची इच्छा आहे. मराठी मालिकेनंतर मला हिंदीत निगेटिव्ह भूमिकेसाठी ऑफर आली होती, परंतु मला ते करायचं नव्हतं. ‘लागिर झालं जी’मध्ये मी नकारात्मक भूमिका जयडी साकारली होती आणि आणि ती मालिका यशस्वी झाल्यामुळे लोकं मला त्याच नावाने अजूनही ओळखतात.

मराठी फिल्म इंडस्ट्रित तुला कधी कास्टिंग काऊचला समोर जावं लागलं का?

मला इंडस्ट्रित काम करण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही कारण मला समोरूनच पाहिली ऑफर मिळाली. त्या सेटवर मला दुसरी मालिका मिळाली, त्यानंतर माझा अभिनय पाहून ‘एक होती राजकन्या’मध्ये काम मिळालं. मी मराठी चित्रपट अगोदर केला होता, परंतु मालिका अगोदर टीव्हीवर आली आणि नंतर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने माझं आयुष्य बदललं, कारण हा चित्रपट फिल्म फेस्टिवलमध्ये गेला. मला २०१८ साली डेब्यू बेस्ट अॅक्ट्ररेस म्हणून ‘संस्कृती कला दर्पण’ पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत मिळाला, ज्यामुळे मला मराठी चित्रपट सृष्टीत ओळख मिळाली आणि काम मिळणं सहजसोपं झालं. अजून मी तीन चित्रपटांचं चित्रीकरण केलंय, परंतु लॉकडाऊनमुळे डबींगचं काम बाकी आहे, जे लॉकडाऊननंतर करायचं आहे. सगळं काम पूर्वीचा अभिनय पाहून मिळालंय. मला मुंबईला जाऊन अभिन्यासाठी काम शोधावं नाही लागलं. साताराला काम मिळाल्यानंतर मुंबईत आली. त्यामुळे मला कास्टिंग काऊच वा नेपोटीजमबद्दल माहिती नाहीए.

सध्या तुझी दिनचर्या कशी असते?

मला वेगवेगळया भूमिका साकारायची इच्छा आहे आणि याची मी वाटदेखील पाहतेय. याशिवाय सध्या आगामी प्रोजेक्टसाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करते. त्याचा सराव करते, ज्यामध्ये आरशात पाहून स्वत:शी बोलणं, भाव वेगळया पद्धतीने प्रकट करणं इत्यादी करते.

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमर तुला किती आकर्षित करतं?

मी सुरुवातीला जेव्हा काम करायला आली होती, तेव्हा इंडस्ट्रीचं काम पाहून घाबरल्यामुळे मला ते करावंसं वाटत नव्हतं, कारण इंडस्ट्रीत माझ्या मागून लोकं काहीही बोलायची, जे मला नंतर समजायचं. गैरसमज पसरविणारी लोकं मला आवडत नाहीत. खरं म्हणजे ते माझ्या यशावर जळतात, खरंतर त्यांचं आणि माझं काम पूर्णपणे वेगळं होतं. यासार्व गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत मी पुढे काम करत गेली, तेव्हा चांगली लोकं मिळाली.

तू किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

मला वेगवेगळे पेहराव घालायला आवडतात, मी ते घालत असते. शॉपिंग खूप आवडते. मी खूप फुडी आहे आणि वेगवेगळया डिश आवडतात. तणावात असते तेव्हा अधिक खाते. आईच्या हातचं चिकन खूप आवडतं. मी गुलाबजाम खूप छान बनवते.

तू पावसाळयात स्वत:चं सौंदर्याची काळजी कशी घेतेस?

सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दिवसभराचा मेकअप उतरवणं गरजेचं आहे, कारण यामुळे चेहऱ्यावर रॅशेस येतात. मी पाणी खूप पिते आणि चेहऱ्यावर फक्त नॅचरल प्रॉडक्ट्स लावते. साताऱ्यातदेखील मी नैसर्गिक गोष्टींनी बनलेल्या स्किन केयर प्रॉडक्ट्सने त्वचेची काळजी घ्यायची.

आवडता रंग – सर्व रंग, खास काळा, बॉटल ग्रीन, इंद्र्रधनुष्य रंग.

आवडता पेहराव – भारतीय पेहराव, साडी, सलवार सूट.

पर्यटन स्थळ – परदेशातील मालदीव, भारतात केरळ आणि काश्मीर.

आवडतं पुस्तक – अट्मोस्ट हॅप्पीनेस -अरुंधती रॉय.

वेळ मिळाल्यावर – चित्रपट पाहणं आणि पुस्तकं वाचणं.

परफ्यूम – अर्माफ

स्वप्नातील राजकुमार – शाहरुख खान वा शाहिद कपूरसारखा.

जीवनातील आदर्श – गरजवंत आणि पेट्सची मदत करणं.

सोशल वर्क – आजूबाजूला राहणाऱ्या गरजवंताना मदत, तेदेखील जात, धर्म न जाणून घेता.

फिल्म लूप लपेटाचे पोस्टर शूट केले

*सोमा घोष

तनुज गर्ग आणि सोनी पिक्चर्ससह लूप लपेटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी काल मुंबई मध्ये फिल्म लूप लपेटाचे पोस्टर शूट केले आणि हा त्यांच्या कारकीर्दीमधील 200 वा चित्रपट आहे ज्याच्या पब्लिसिटी कँपैनचा शूट त्यांनी केलं. विशेष बाब म्हणजे ह्या चित्रपटाचे ते प्रोडूसरही आहेत आणि आपल्याच चित्रपटाच्या पोस्टर शूटने त्यांनी 2 शतक पूर्ण केले.

फॅशनच्या दुनियेत नामांकित असूनही चित्रपटाचे पोस्टर शूटिंग करणे हा त्याचा दुसरा छंद आहे.

अतुल कसबेकर म्हणतात, “कॅमेरा हे माझं पहिलं प्रेम आहे आणि चित्रपटाच्या निर्माता या नात्याने मला ह्या चित्रपटाच्या पब्लिसिटी कँपैनमध्येदेखील तो विजन शेप देण्याची परवानगी मिळाली. मी 3 दशकांहून अधिक काळ चित्रपटांच्या मोहिमेचे शूटिंग करत आहे आणि हा चित्रपट खरोखरच विशेष आहे.

२०२२ मधील ‘लूप लपेटा’ हा बहुप्रतिक्षित बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. टीझरच्या घोषणेच्या वेळी बरीच चर्चा रंगली होती आणि आता पोस्टर पाहण्याची उत्सुकता आहे ज्याचे रविवारी मुंबई मध्ये एका फिल्म स्टुडिओमध्ये शूट झाले.

सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिसिस एंटरटेनमेंट आणि आयुष माहेश्वरी निर्मित ‘लूप लपेटा’ हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें