सुखाचा सोबती – पहिला भाग

दीर्घ कथा * सीमा खापर

गुळगुळीत डांबरी रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहर अन् पीतमोहराच्या झाडांची लांबलचक रांग होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंद फुटपाथ होते. अन् दिवे लागले की तो रस्ता अधिकच सुंदर भासायचा. गेली कित्येक वर्षं याच वाटेवरून तिची येजा असते.

गेल्या आठ वर्षांत अनेक नोकऱ्या केल्या पण हीच नोकरी बरी दोन वर्षं टिकून आहे. त्या आधीच्या नोकऱ्या ८-१० महिने, फार तर वर्षंभर केल्या. कधी तिने राजीनामा दिला,  कधी नोकरीने ‘बाय बाय’ केलं.

या गुलमोहराच्या झाडाखालून जाताना तिला हमखास वसंत आठवतो. वसंत तिच्या आयुष्यात आला आणि जणू वसंतोत्सव सुरू झाला. दिवस सुगंधी अन् रात्री रेशमाच्या झाल्या.

‘‘तुला माहीत आहे, मला वसंत फार आवडतो.’’ ती स्वप्नाळूपणे म्हणाली.

‘‘खरंच?’’ खट्याळपणे तिच्याकडे बघत त्याने म्हटलं अन् ती लाजून लाल झाली.

‘‘मी वसंत ऋतूबद्दल बोलतेय…’’

‘‘मी पण तेच म्हणतोय,’’ पुन्हा तेच खट्याळ हसणं अन् त्याच्या गालाला पडणाऱ्या खळ्यांमध्ये ती हरवून जाते.

कंपनी पार्कच्या मधोमध असलेल्या घड्याळ्याच्या टॉवरमधून सहाचे टोल पडले अन् ती भानावर येऊन भराभर चालू लागली.

ती घरी पोहोचली तेव्हा शुभी शाळेचा होमवर्क करत बसली होती.

‘‘माझी गुणाची पोर गं ती, छान अभ्यास कर हं!’’ तिने शुभीच्या पाठीवर प्रेमाने थोपटत म्हटलं. हातातली पर्स कपाटात ठेवून हातपाय धुऊन ती स्वयंपाकघरात गेली. चहा पिण्याची प्रबळ इच्छा होती. पण ज्याच्यामुळे चहाची सवय लागली होती तो आता कुठे होता, कुणास ठाऊक.

‘‘अरेच्चा? थर्मासमध्ये चहा अन् हॉटपॉटमध्ये खाण्यासाठी काहीतरी तयार दिसतंय?’’ तिने हसून कौतुकाने म्हटलं.

तेवढ्यात शुभी उठून आली अन् तिच्या गळ्यात पडली. हा लाड कशासाठी आहे हे सुमा जाणून होती. काही न बोलता तिने शुभीचा मुका घेतला.

चहाचा ट्रे घेऊन ती ड्रॉईंगरूममध्ये आली. चहा घेता घेता ती लक्षपूर्वक शुभीकडे बघत होती. शुभी काय, काय, किती, किती बोलत होती. पण चहा संपता संपता ती मुद्दयावर येईल याची सुमाला खात्री होती.

‘‘ममा, प्लीज मला जाऊ दे ना शाळेच्या ट्रिपबरोबर. उद्या पैसे भरण्याचा शेवटचा दिवस आहे. प्लीज ममा, नंतर वाटलं तर कुठेही पाठवू नकोस…ममा, प्लीज, अगं शालू, विजू, जया, निमा सगळ्या जाताहेत गं!’’ शुभी बोलता बोलता रडवेली झाली होती.

थोडी वैतागून सुमा म्हणाली, ‘‘तुला मी आधीच सांगितलं होतं, पाणी असलेल्या ठिकाणी मी तुला पाठवणार नाही म्हणून.’’

‘‘शिट् ममा, अगं मी काय कुक्कुलं बाळ आहे का? उगीचच पाण्यात जाऊ बसेन का मी? मलासुद्धा कळतं ना? एक तर स्वत: मला कुठे नेत नाही आणि आता सगळ्या मैत्रिणी शाळेतून जाताहेत तर तिथेही पाठवत नाहीस?’’ शुभी रडायला लागली.

तिला पोटाशी घेऊन आपणही मोठ्यांदा रडावं असं सुमाला वाटलं. गेली कित्येक वर्षं तीच तर एकटीने सगळं निभावते आहे.

शुभीच्या बाबतीत ती फार हळवी आहे. तिला शुभीची फार काळजी वाटते. नोकरीमुळे ती तशीच दिवसभर शुभीपासून दूर असते त्यामुळे घरी परतल्यावर शुभीपासून दूर राहाणं तिला सहन होत नाही.

शुभीचे अश्रू तिला बघवत नाहीत, तिने प्रेमाने शुभीला जवळ घेतलं. कळतंय तिला की किती दिवस ती शुभीला असं आपल्याजवळ ठेवू शकेल?

शुभीने स्ट्राँग व्हावं, आपल्या पायावर उभं राहावं असं तिलाही वाटतंय. थोडी मोठी झाल्यावर तिला एखाद्या कोर्ससाठी बाहेर पाठवावं लागेल, अशावेळी ती शुभीला अडवून धरेल का? अन् शुभीच्या आयुष्यात कुणी वसंत आला तर? छे: छे:, नकोच! शुभीला मुक्त आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. इतकं ओव्हर प्रोटेक्टिव राहून चालणार नाही.

‘‘उद्या तुझ्या क्लास टीचरला माझ्याशी बोलायला सांग.’’ तिने प्रेमाने शुभीच्या गालावर ओठ टेकवत म्हटलं. शुभी खुदकन् हसली.

सकाळी शुभीला उठवावं लागलं नाही. स्वत:च उठली, आवरून सरळ आईजवळ स्वयंपाकघरात आली. गळ्यात हात घातले. गालाचा मुका घेतला. पुन्हा तेच खुदकन् हसणं. आईने दिलेले पैसे व्यवस्थित कंपास बॉक्समध्ये ठेवले अन् टाटा करून शुभी घराबाहेर पडली.

शुभीची सणसणीत उंची अन् गालावरच्या खळ्या…हुबेहूब वसंतची कार्बन कॉपीच जणू. आधी किती दिवस लग्न होतंय की नाही ही काळजी. त्यानंतर दोन वर्षांनी तिला दिवस गेले. वसंतला मूल नको होतं. पण सुमा आपल्याच आनंदात दंग होती.

वसंतच्या छातीवर डोकं टेकवत ती म्हणाली होती, ‘‘मला मुलगाच हवाय, तुझ्यासारखा.’’

‘‘अन् मुलगी झाली तर?’’

‘‘नाही, मुलगाच होईल.’’

‘‘लोक म्हणतात, ‘पहिली बेटी, धनाची पेटी’ अन् तू मुलगा हवा म्हणतेस?’’

‘‘हो, मला पहिला मुलगाच हवाय…’’

‘‘पहिला म्हणजे? अजून यानंतर एक मुलगी हवीय? महागाई इतकी आहे अन्…’’ वसंतची ठराविक बडबड सुरू झाली.

‘‘कमालच करतोस. अरे आयतं घर तुला राहायला मिळालंय. घरात सगळ्या वस्तू, सगळं सामान आहे. आता तुला काय मुलं पोसायचीही ऐपत नाही का? तुला मुलंच आवडत नाहीत का? महागाईत काय लोक मुलं जन्माला घालत नाहीत का?’’ तिला संताप यायचा. वसंतचं गप्प बसणं असह्य व्हायचं.

वसंतला तिने प्रथम बघितलं ते शाळेच्या कॅण्टीनमध्ये. शाळेच्या कॅम्पसमध्ये ते कॅण्टीन होतं. उंच, रुबाबदार बांधा, गव्हाळ कांती, मोठमोठे डोळे. पॅण्टच्या खिशात हात घालून तो बेदकारपणे इकडेतिकडे बघत उभा होता.

कॅण्टीनच्या एका कोपऱ्यात उभी राहून ती अगदी अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे बघत होती. कोवळं वय…कुणाचंही आकर्षण वाटावं असं अडनिड वय, चुंबकाकडे आकर्षित व्हावं तशी ती त्याच्याकडे ओढली गेली होती. रमा कधीची तिच्याजवळ येऊन उभी होती, पण सुमाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. रमाने तिला जोरदार चिमटा काढला तेव्हा ती दचकून ओरडली.

तिच्या ओरडण्यामुळे वसंताने मान वळवून तिच्याकडे बघितलं. दृष्टिभेट झाली अन् तो हसला. त्याच्या गालावरच्या खळ्यांमध्ये ती अशी हरवली की तिला स्वत:चा शोधा लागेना.

दुसऱ्या दिवशी तिच्याही नकळत की पुन्हा त्याच कॅन्टीनकडे वळली. वसंत आजही तिथे होता पण कालच्यासारखा नाही तर तिची वाट बघत असल्यासारखा. त्यानंतर भेटी ठरवून होऊ लागल्या. हॉस्टेलमधून फक्त शनिवारी बाहेर पडायला परवानगी होती. तेव्हा ती दोघं भेटायची. हॉस्टेलची वॉर्डन तरुणच होती. फारशी बंधनं लादत नव्हती.

सुमा शनिवारची आतुरतेने वाट बघायची. खूप नटायची, छान दिसायचा प्रयत्न करायची. हातात हात घालून दोघं याच रस्त्यावरून लांबपर्यंत फिरायला जायची. ते गुलमोहर तिच्या प्रेमाचं साक्षीदार होतं. वसंतच्या बाहुपाशात ती सगळं जग विसरायची. त्याच्या आधारावर ती कुठल्याही संकटाशी भिडायला तयार होती.

शाळेचे दिवस आता संपत आले होते. पुन्हा अलवरला राजस्थानात परत जावं लागणार होतं. सुमाचे आईवडील बरेच आधी अपघातात दगावले होते. तिची सगळी जबाबदारी मोठी बहीण हेमाताई व मेहुणे रतन भावोजींवर होती.

‘‘वसंत काही तरी केलं पाहिजे. मला परत जायचं नाहीए. इथेच राहायचं आहे,’’ ती रडतच बोलली.

‘‘तू रडू नकोस. काही तरी मार्ग निघेल. अन् अजून बरेच दिवस आहेत. मी तरी बरा तुला जाऊ देईन?’’

बारावीचा निकाल येऊ लागला होता. तेवढ्यात बारावीच्या मुलांमुलींसाठी ज्यूनियर कॉलेजाने उन्हाळी सुट्टीत हॉबी क्लासेस सुरू केले होते. तीच संधी सुमाने साधली. हॉबी क्लासमुळे गावी जाणं टाळता आलं.

बारावीचा निकाल चांगला लागला. वसंतने झकास पार्टी दिली.

‘‘मला अजूनही काहीतरी हवंय.’’ त्याच्या डोळ्यांत बघत ती धिटाईने बोलली.

‘‘बोल ना?’’ कपाळावर आलेले तिचे केस बोटाने बाजूला करत वसंतने म्हटलं.

‘‘मला इथून जाऊ देऊ नकोस. मला तुझ्याजवळच राहायचं आहे.’’

‘‘प्रॉमिस! तुला कुठेही जाऊ देणार नाही.’’

स्कूल कॉलेजच्या हॉस्टेलमधून वसंतने तिला एका दुसऱ्या हॉस्टेलमध्ये शिफ्ट केलं. एक प्रौढ ख्रिश्चन महिला ते हॉस्टेल चालवायची. जवळच फॅशन इन्स्टिट्यूट होती. रमाची बहीण तिथे कोर्स करत होती. बी.ए.चा अभ्यास प्रायव्हेट करायचा अन् फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा असा कार्यक्रम ठरला. आता इथे राहाण्याचं भक्कम कारण हेमाताई आणि भावोजींना सांगता येणार होतं.

हॉस्टेलच्या रूमवर हेमाताई तिला राग भरत होती. ‘‘वेड लागलंय तुला? का राहायचं आहे इथे? आहे तरी काय एवढं? तुझ्या हट्टामुळे तुझं स्कूलिंग इथे केलं. यांना तर तू आमच्याकडे राहून शिकावं असं वाटत होतं. एवढे दिवस ऐकून घेतलं त्यांनी, पण आता नाही हं ते ऐकून घेणार. त्यांनी तर एक छानसा मुलगाही बघून ठेवलाय तुझ्यासाठी. कमावता, देखणा, चांगल्या घराण्यातला. तू बी.ए झाल्याझाल्या लग्न करणार आहोत तुझं आमची जबाबदारी आहे गं ती. आम्हालाही काळजीतून मोकळं कर गं बाई!’’

हेमाताई चिडलेली होती. सुमा मान खाली घालून मुकाट्याने ऐकून घेत होती. लहानपणापासून ती असंच करायची. कधी वाद घातला नाही, दुरुत्तरं केली नाहीत. बस्स, गप्प राहूनच आपल्याला काय हवं ते करून घ्यायची. आत्ताही तेच झालं, शेवटी हेमाताई मुकाट्याने परत गेली. पण रमा अन् तिच्या घरच्यांनी ‘‘आम्ही सुमाची काळजी घेऊ’’ म्हणून तिला आश्वस्त केलं होतं. हॉस्टेलची मालकीण विलियमनेही तिला ‘‘काळजी करू नका. मी लक्ष ठेवते तिच्यावर,’’ म्हणून सांगितलं होतं.

हेमाताईने जाताजाता शंभर सूचना केल्या होत्या. ती गेली अन् आठ दिवसांत भावोजी आले. ते नाराज होते. पण तिच्या राहाण्याजेवण्याची हॉस्टेलच्या फीची, कॉलेजच्या फीची सर्व व्यवस्था जातीने लावून गेले. सुमाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली होती.

काळ पुढे सरकत होता. सुमाला हा कोर्स खूप आवडला होता. तिचा जीव त्यात रमत होता. बी.ए.चा अभ्यासही सुरूच होता. दोन वर्षं बघता बघता संपली. बी.ए.चं शेवटचं वर्षं अन् फॅशन डिझायनिंगचंही शेवटचं वर्षं…त्यानंतर?

एका सायंकाळी बागेत फिरता फिरता तिने वसंतला विचारलं, ‘‘आपण लग्न कधी करायचं? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशी लग्न करण्याचा विचारही मी करू शकत नाही.’’

inside-pic

वसंतने उत्तर दिलं नाही.

‘‘काही तरी बोल, मला भीती वाटायला लागली आहे.’’

‘‘हो गं बाई, होईल सगळं,’’ बेपर्वाईने वसंत उत्तरला.

‘‘आयुष्यभर काय मी शिकतंच राहीन का? हेमाताईला लक्षात आलंय. आपल्याला लग्न करावं लागेल. ताई आली की तू बोल तिच्याशी.’’

ती आशाळभूतपणे त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. तो गप्प होता. चेहराही मख्ख!

‘‘ताई पुढल्या महिन्यात येतेय. मी तिच्याबरोबर परत जावं असं तिला वाटतंय. तिचं म्हणणं पेपर देण्यापुरतंच इथे यावं… तू यावेळी तिच्याशी आपल्या लग्नाबद्दल बोलशील का?’’ तिने गळ घातली.

‘‘बघूया…घाई काय आहे? तू आधी आपला अभ्यास पूर्ण कर.’’ वसंत टाळण्याच्या मूडमध्ये होता. ती चिडली. बराच वेळ दोघंही गप्प होती. मग वसंतने तिला आपल्याजवळ ओढून घेतली. त्याच्या उष्ण स्पर्शाने ती लोण्यासारखी विरघळली. तो विषय तिथेच संपला.

‘‘उद्याच येतेय हेमाताई अन् तुला नेमकं आत्ताच बाहेर जावं लागतंय? खरंच काम आहे की तू तिला भेटणं टाळतो आहेस?’’ ती जोरजोरात रडायला लागली.

वसंतने तिला जवळ घेऊन समजावलं. तिला गप्प केलं. ‘‘माझ्यावर विश्वास ठेव, मी पुढल्या वेळी नक्की तुझ्या ताईला भेटतो,’’ वगैरे गोड गोड बोलून शेवटी तिला स्वत:च्या मनाप्रमाणे राजी केलं. पुन्हा हेमाताईच्या सरबत्तीला उत्तरं द्यायला ती एकटीच उभी होती.

यावेळी तर ती हेमाताईशी खूप काही खोटं बोलली. आयुष्यात प्रथमच खोटं बोलणं, तेही आईसारख्या हेमाताईशी. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. हेमाताईही कधी नव्हे ती खूप चिडली. या पोरीचं कसं होणार या काळजीने काळवंडून हेमाताई निघून गेली आणि सुमा धाय मोकलून रडू लागली. काही तरी मनात सलत होतं. कुठे तरी काही तरी खटकत होतं.

विलियमने प्रेमाने तिच्या खांद्यावर, डोक्यावर थोपटलं, ‘‘तू तुझ्या ताईला वसंतबद्दल सांगत का नाहीस?’’ तिने म्हटलं. वसंत अन् सुमाचं प्रकरण विलियमला ठाऊक होतं. इतक्या दिवसात प्रथमच तिने त्याबद्दल बोलून दाखवलं होतं.

‘‘खरं म्हणजे वसंतने हे तिला सांगायला पाहिजे.’’ सुमाला पुन्हा रडू फुटलं.

‘‘तो तुझ्या बहिणीला भेटत का नाही? का टाळतोय? हे बघ, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू त्याला अगदी स्पष्ट विचार,’’ विलियम याहून अधिक काही बोलली नाही पण प्रश्नांच्या गुंत्यात सुमाला मात्र अडकवून गेली.

आठ दिवसांसाठी बाहेर जायचंय म्हणून सांगून गेलेला वसंत दुसऱ्याच दिवशी परत आला. वसंतला बघून ती आनंदली. पण प्रथमच तिला त्याचं वागणं खूप खटकलं. इतक्या लवकर परत आलाय तर एक दिवस नंतरही जाऊ शकला असता ना? निदान ताईला भेटला असता. पण वसंतने जणू तिच्यावर जादू केली होती. ती त्याला काहीही म्हणू शकली नाही.

फायनल परीक्षाही येऊन ठेपली. अभ्यासाचा ताण अन् काळजी होतीच पण त्यापेक्षाही अधिक काळजी होती ती वसंतच्या बेपर्वाईची. लग्नाच्या बाबतीत तो काहीच बोलायला तयार नव्हता. सुमाला खात्री होती, इथून ती घरी गेली की तिचं लग्न होईल हे नक्की. तिला वाटे, वसंतनेच होऊन लग्नाचा विषय काढावा अन् तिने जसं स्वत:विषयी सगळं सांगितलं आहे तसं त्यानेही मोकळेपणाने तिला सांगावं. पण तसं होत नव्हतं.

एकदा गुलमोहराच्या झाडाखाली तिने वसंतला म्हटलं होतं, ‘‘आता लवकरच मी इथून परत जाईन. तुला माझी आठवणही येणार नाही.’’

‘‘काय एकसारखं जाण्याचंच रडगाणं गात असतेस? म्हटलं ना, काही तरी करतो म्हणून?’’ वसंत तिरसटला.

‘‘तू काहीही करणार नाहीएस. अन् आता तर मीही काही करणार नाहीए.’’ ती हसली.

‘‘लग्न केलं नाही तर प्रेम खोटं ठरतं का? अगं, लग्न म्हणजे वैताग असतो. लग्न केल्यावर म्हणशील, ‘आधीच आपण बरे होतो,’ ’’ वसंत गळ्यात हात घालून म्हणाला.

‘‘तुला कसं माहीत लग्न म्हणजे वैताग असतो म्हणून? अशी किती लग्न केली आहेत तू?’’

वसंतने डोळा मारत म्हटलं, ‘‘फार नाही, चार-पाच लग्न केलीएत.’’

‘‘वसंत, प्लीज मला स्पष्ट काय ते सांग,’’ बोलता बोलता तिला रडू कोसळलं.

तिचे अश्रू पुसत वसंत निर्विकारपणे म्हणाला, ‘‘माझ्याजवळ काहीही नाहीए. घर नाही, पैसे नाहीत, कामधंदा नाही. लग्न केलं तरी तू माझ्याबरोबर राहाशील कशी?’’

‘‘राहीन मी, फक्त तू लग्नाला हो म्हण. माझ्या आईवडिलांची जी प्रॉपटी आहे ती आम्हा दोघी बहिणींची आहे. लग्नानंतर माझा वाटा मला मिळेल. आपण त्यातून घर घेऊ. तुझ्या धंद्यालाही भांडवल होईल.’’

वसंत मुकाटपणे सगळं ऐकत होता. शेवटी त्याने लग्नाला होकार दिला.

विचारांच्या नादात ती ऑफिसला कधी पोहोचली तेही तिला कळलं नाही.

नेहमीचंच आहे हे. मनात नसतानाही ती भूतकाळात भरकटत जाते. ऑफिसात पाय ठेवल्या ठेवल्या तिथला शिपाई धावतच तिच्याकडे आला, ‘‘मॅडम, आज सकाळपासूनच खूप लोकांची धुलाई केलीय सरांनी. तुमचीच वाट बघताऐत ते.’’

तिने पर्स आपल्या टेबलाच्या खणात टाकली अन् ती मेजर आनंदच्या केबिनकडे वळली.

‘‘मे आय कम इन, सर?’’

‘‘येस, प्लीज,’’

‘‘सर, तुम्ही बोलावलंत?’’

‘‘बसा…’’ मेजर आनंद म्हणाले, ‘‘दिवाण असोसिएशनच्या पेमेण्टचा चेक त्यांना मिळाला नाहीए, ही पहिली गोष्ट अन् दुसरं म्हणजे स्टोअरमघल्या डाळींचा स्टॉक जवळ जवळ संपला आहे.’’

‘‘सॉरी सर, असं व्हायला नको होतं. पण आज मी जातीने लक्ष देऊन सगळं व्यवस्थित करून घेते,’’ ती हळू आवाजात म्हणाली.

‘‘ठीक आहे, संस्थेचं काम व्यवस्थित व्हायलाच हवं, यासाठी सांगितलं. बरं मी बोललो होतो, त्यावर काही विचार केलात का?’’ मेजर तिच्याकडे बघत बोलले.

तिला उत्तर सुधरेना, ‘‘मी विचार करून सांगते, सर,’’ एवढं बोलून ती आपल्या टेबलाशी आली अन् कामाला लागली.

फायलीचं काम पूर्ण करून स्टोअरमध्ये गेल्यावर लक्षात आलं की डाळींखेरीज इतरही अनेक गोष्टी संपत आल्या आहेत. मन लावून ती कामं आटोपत होती. लंच टाइम झाला अन् आपण डबा आणलेला नाही हे तिला आठवलं. संस्थेच्या केबिनमध्ये चहा अन् ब्रेडरोल ऑर्डर करून ती टेबलाशी येऊन बसली. मेजर आनंदही बरेचदा कॅण्टीनमध्ये लंच घ्यायला यायचे. जवळच त्यांची इन्स्टिट्यूट होती. तिथे मुलामुलींना लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभं राहून आयुष्य जगता येईल असे कोर्सेस शिकवले जात होते. गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण दिलं जायचं. पैसे देऊन शिकणाऱ्यांना आपण दिलेल्या पैशाचं सार्थक झालंय असं वाटायचं. संस्थेचा पैसा सत्कार्यातच खर्च होईल याकडे मेजर जातीने लक्ष द्यायचे. संस्थेला सरकारी मान्यता होती. त्याखेरीज शेतकरी, कुटीर उद्योग करणारे कारागीर या लोकांचा माल वाजवी किमतीत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते जागोजागी ट्रेड फेअर भरवत असत. स्वच्छ चारित्र्य आणि त्यांचा पारदर्शक आर्थिक कारभार यामुळे समाजातही त्यांना मान होता. त्यांची बायको व दोन मुलं एका कार अपघातात दगावली. त्यानंतर त्यांनी लष्कराची नोकरी सोडली व आपली कोट्यवधी रुपयांची पिढीजात प्रॉपटी विकून ही संस्था व इतर सामाजिक उपक्रम सुरू केले असं सुमा ऐकून होती.

इथली नोकरी सुरू केली तेव्हा आपण इथे किती काळ टिकून राहू याबद्दल सुमा साशंक होती. कारण लष्करातली माणसं फार कडक शिस्तीची असतात हे ती ऐकून होती. मेजर आनंद होतेही तसेच. पण हळूहळू तिला इथलं काम, इथली शिस्त सगळं आवडायला लागलं, अंगवळणीही पडलं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण इथे जे काम करतो त्यातून अनेक गरजू लोकांना मदत होते. अनेक होतकरू मुलांचा भविष्यकाळ घडतो अन् किती तरी स्त्रिया स्वावलंबी होतात ही गोष्ट फारच समाधान देणारी होती. तिला आठवलं, सकाळी तिला मेजर आनंदने जवळच भरणाऱ्या ट्रेफेअरमध्ये चलण्याबद्दल विचारलं होतं अन् तिने विचार करून सांगते म्हणून त्यांना म्हटलं होतं. यापूर्वीही ती जवळपासच्या टे्रड फेअरमध्ये टीमसोबत गेली होती. पण सकाळी जाऊन सायंकाळी परत आली होती. पण यावेळी दोनतीन दिवस तिथेच थांबावं लागणार होतं.

अशावेळी नेहमीच तिचं उत्तर नकारार्थी असायचं पण यावेळी मात्र तिलाच थोडा बदल हवा असेल किंवा रूटीनमधून ब्रेक हवासा वाटला म्हणून तिने जाण्याचा निर्णय घेतला. दुपारची कॉफी घेतली अन् ती सरळ मेजर आनंदच्या केबिनमध्ये गेली.

‘‘सर, कधी निघावं लागेल?’’

मेजरने हसून तिच्याकडे बघितलं अन् म्हटलं, ‘‘या संपूर्ण महिन्यात जेव्हा तुम्हाला सोयीचं असेल त्याप्रमाणे जाता येईल.’’

ती परत आपल्या टेबलाशी येऊन कामाला लागली. कामं संपवून घरी जाताना ट्रेड फेअरचाच विचार मनात होता. चहा वगैरे घेतल्यावर तिने कपाट उघडलं. इतक्या वर्षांत हौशीने, आवडीने काही घालणं तिने बंदच केलं होतं. फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय हेही ती विसरली होती. तिला हसायला आलं. मन शांत, आनंदी अन् थाऱ्यावर असायला हवं ना? मनच शांत नाही तर देहाची शुद्ध तरी कशी राहाणार? ती अंथरुणावर पडली अन् तिच्याही नकळत पुन्हा भूतकाळात शिरली.                                     (क्रमश 🙂

नातं जन्मांतरीचं – पहिला भाग

(पहिला भाग)

दिर्घ कथा * रजनी दुबे

फोनच्या घंटीमुळे डोळे उघडले, तेव्हा लक्षात आलं मी बेडवर आहे…आपल्याच हॉस्पिटलच्या रूममध्ये. मी इथं केव्हा अन् कशी आले ते आठवेना. पुन्हा फोनची घंटी वाजली अन् लख्खकन् वीज चमकावी तसं सगळं आठवलं. मी दुपारी सगळी वर्तमानपत्रं घेऊन बसले होते. त्या सगळ्या वृत्तपत्रातून माझ्या लेकीचे अन् जावयाचे फोटो आले होते. दोन दिवसांपूर्वीच आम्ही तिचा साखरपुडा खूप थाटात केला होता. त्या समारंभाला राज्यपालही आले होते. फोटो त्यांच्या सोबतचा होता. शहरातील नामांकित डॉक्टरांच्या लेकीचा साखरपुडा शरद यांच्याबरोबर झाला. दोघेही आयएएस होण्यासाठी ट्रेनिंग घेत आहेत. अशी फोटो ओळही छापलेली होती.

फोटोत मी व माझे पतीही होतो. मला खूप समाधान आणि अभिमानही वाटत असतानाच फोन वाजला. मी रिसीव्हर उचलला, तेव्हा पलीकडून कर्कश्श आवाजात कुणीतरी ओरडलं. ‘‘माझ्या पोरीला आपली म्हणवून गर्वानं फुगली’ आहेस. ती माझी लेक आहे. ते माझं रक्त आहे. मी सांगतोय येऊन तिला सत्य काय आहे ते…’’

एवढं ऐकलं अन् रिसीव्हर माझ्या हातून गळून पडला अन् मी बेशुद्ध पडले. ती आत्ता शुद्धीवर येते आहे. थोडी मान वळवून बघितलं तर माझा हल्लीच डॉक्टर झालेला मुलगा तिथंच खुर्चीवर बसल्या बसल्या झोपलेला दिसला.

मुलगी…दिसली नाही. बाप रे! ती कुठं असेल? तो दुष्ट माणूस तिला भेटून तर गेला नाही ना? माझी पोर माझ्या काळजाचा तुकडा…माझ्या आयुष्याचा आधार…माझं सर्वस्व आहे माझी मुलगी…पण तो म्हणत होता ती त्याची आहे…तिच्या धमन्यांमधून त्याचं रक्त वाढतंय म्हणाला खरंय का ते?

पाऊस पडायला लागल्याचं आवाजावरून जाणवलं…पावसाच्या आवाजानं मन थेट भूतकाळात जाऊन पोहोचलं.

बाबांशी खूप वाद घालून, भांडूनच मी आमच्या छोट्या गावातून आयएएस होण्याच्या जिद्दीनं दिल्लीला आले होते. कोचिंग छान सुरू होतं. दुपारी दोन तास मधे वेळ असायचा. त्या वेळात मी जवळच्याच एका हॉटेलात लंच आटोपून पुन्हा क्लासला जायचे. त्या दिवशीही मी लंचसाठी निघाले अन् अवचित खूपच जोराचा पाऊस आला. जवळच्याच एका बंगल्याचं फाटक उघडं दिसलं अन् मी पळतच त्या घराच्या व्हरांड्यात जाऊन उभी राहिले. अन् मग मनात आलं की घरातल्या लोकांना माझं इथं असं येऊन उभं राहणं खटकणार तर नाही? पण पाऊस जोरात होता काय करू?

तेवढ्यात हळूहळू घराचा दरवाजा उघडला अन् आठ दहा महिन्यांची एक गोंडस मुलगी रांगत रांगत बाहेर आली. मी चकित होऊन तिच्याकडे बघत होते. ती माझ्याकडे बघून खुदकन् हसली अन् तिनं आपले चिमुकले हात पसरले. न राहवून मी तिला उचलून घेतली. मी दाराकडे बघत होते की तिची आई किंवा कुणीतरी बाहेर आलं तर मी सांगेन की बाळ पावसात जात होतं म्हणून उचलून घेतलं. पण बराच वेळ कुणी बाहेर आलं नाही, तेव्हा मीच आत जाण्याचा निर्णय घेतला. बाळाला कडेवर घेऊन मी दारातून आत आले. समोरच्याच भिंतीवर एका अत्यंत देखण्या तरूणीचा फोटो होता. त्याला हार घातलेला होता. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक वयस्कर स्त्री त्या हॉलमध्ये आली. मी त्यांना नमस्कार करून बाहेर पावसापासून बचाव करण्यासाठी मी उभी असताना हे बाळ रांगत बाहेर आलं अन् पावसात जात होतं म्हणून मी उचलून घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं.

marathi-koutumbik-katha

त्यांनी हसून मला बसायला सांगितलं. मी बाळाला खाली ठेवायला गेले तर ती मुलगी मलाच बिलगली. मला काय करू समजेना.

त्या स्त्रीनं म्हटलं, ‘‘मुली, थोडा वेळ खाली बस. तू उभी आहेस, त्यामुळे तू तिला बाहेर नेशील या लालसेने ती तुझ्याकडून माझ्याकडे येत नाहीए.’’

मी बाळासकट सोफ्यावर बसले. घर खूपच छान होतं. अभिरूची अन् वैभवाच्या खुणा सर्वत्र दिसत होत्या. जवळच टेबलावर जेवायचं ताट वाढलेलं होतं अन् त्यातलं अन्न गार झालं होतं. बाळामुळे म्हणजे प्रियामुळे त्या मावशींना जेवायला मिळालं नसावं असा मी अंदाज बांधला.

मी त्यांना म्हटलं, ‘‘मी सांभाळते हिला. तुम्ही शांतपणे जेवण घ्या.’’

त्या हसून म्हणाल्या, ‘‘हे तर रोजचंच आहे. हिला सांभाळणारी आया सध्या रजेवर आहे. हिच्या खोड्या आवरता आवरता माझं जेवण गार होतं.’’

माझ्या लक्षात आलं ही स्त्री म्हणजे बाळाची आजी आहे अन् त्या फोटोतली स्त्री म्हणजे बाळाची आई आहे. आता ही स्त्री म्हणजे त्या फोटोतल्या सुंदर तरूणीची आई किंवा सासू असणार.

माझ्या मांडीवर असलेली प्रिया माझ्या थोपटण्यामुळे झोपी गेली होती. ‘‘तिला इथं पाळण्यात झोपव,’’ मावशी म्हणाल्या.

मी हळूवारपणे बाळाला पाळण्यात झोपवलं अन् जाण्याची परवानगी मागितली.

‘‘तूच आता बोलली होतीस की लंचसाठी निघालीस अन् पाऊस आला याचा अर्थ तुझंही जेवण झालेलं नाहीए. ये आपण दोघी एकत्र जेऊयात.’’ मावशी बोलल्या.

मी प्रथम नकार दिला, पण त्यांच्या प्रेमळ आग्रहाला नकार देणं बरं वाटेना, शिवाय भूकही खूप लागली होती. त्यांनी अन्न गरम करून दोन ताटं वाढून आणली अन् मी पोटभर जेवले. जेवण स्वादिष्ट होतं. बरेच दिवसांनी घरचं जेवण मिळालं होतं. त्यामुळे पोट तुडुंब भरेपर्यंत जेवले. जेवणाचं कौतुकही केलं.

हसून मावशी म्हणाल्या, ‘‘आता रोजच तू लंचला इथं येत जा. तू भेटलीस की प्रियालाही आनंद होईल.’’

मी त्यांना विचारलं की हिची बाई किती दिवस रजेवर आहे? तर त्या म्हणाल्या, ‘‘बाईची सासू वारल्यामुळे ती गावी गेलीय. आता पंधरा दिवस तरी लागतीलच. दुसरी बाई शोधतोय, पण स्वच्छ अन् प्रेमळ शिवाय प्रामाणिक बाई मिळत नाही. स्वंयपाकाला आचारी आहे…पण बाळाला सांभाळायला कुणी स्त्रीच हवीये.’’

मला काय सुचलं कोण जाणे. मी अभावितपणे बोलून गेले, ‘‘मावशी, काळजी करू नका. मी तुमचे हे अडचणीचे दिवस निभावून नेते. मलाही हा वेळ मोकळा असतो. त्या कठीण अभ्यासक्रमाच्या ताणातून थोडा विरंगुळा म्हणून मी दोन तास तुमच्याकडे येऊन प्रियाला सांभाळेन, खेळेन तिच्यासोबत. तेवढ्यात तुमचं जेवण निवांत ओटापून घेत जा.’’

मावशींनी एका अटीवर माझं म्हणणं मान्य केले…रोजचा लंच मी त्यांच्याबरोबर घ्यायचा.

मी गमतीनं म्हटलं, ‘‘मावशी, इतका विश्वास कुणावरही टाकणं बरोबर नाही.’’

‘‘पोरी, जग बघितलं…इतकं वय झालंय. माणूस ओळखता येतो मला.’’ मावशींनी म्हटलं.

मग तर हा रोजचा नियमच झाला. लंच टाइममध्ये मावशींकडे जायचं. प्रियाशी खेळायचं, मावशींशी गप्पा मारत जेवायचं.

मावशी थोडंफार घरच्यांबद्दल सांगायच्या. त्यांचा मुलगा डॉक्टर आहे…लग्नाच्या वयाचा आहे, पण लग्नच करायला तयार नाही…घरात सून येणं गरजेचं आहे. माझी तब्येतही बरी नसते. प्रियाची काळजी वाटते वगैरे वगैरे…मलाही वाटायचं, इतकी देखणी होती यांची सून, मुलगा तिच्या प्रेमातून बाहेर पडणार कसा?

एक दिवस दुपारची घरी पोहोचतेय तोवर बाहेरूनच प्रियाच्या जोरजोरानं रडण्याचा आवाज ऐकला. धावतच आत गेले. किचनच्या दाराशी मावशी बेशुद्ध पडल्या होत्या. पाळण्यात प्रिया रडत होती. आधी तिला पाळण्यातून खाली घेतली. मावशींना चेहऱ्यावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होते. पटकन् सुचलं, मैत्रिण निशाला फोन करून डॉक्टराला पाठवून दे म्हटलं. तिला पत्ताही सांगितला. तिही ताबडतोब धावत आली. पाठोपाठ डॉक्टरही आले. मी व निशानं मावशीला बेडवर झोपवलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की बी.पी. एकदम कमी झाल्यामुळे चक्कर आली. आवश्यक उपचार करून डॉक्टर गेले. निशाही तिचा क्लास होता म्हणून निघून गेली. मी टेलिफोनजवळ एका कार्डावर मोठ्या अक्षरात लिहिलेले नंबर बघितले. गरजेच्यावेळी लागणारे ते टेलिफोन नंबर्स होते. त्यात डॉ. प्रियांशूंचा फोन नंबर सगळ्यात वर होता. आता मी त्यांना फोन केला. तो आईच्या तब्येतीबद्दल ऐकून एकदम हवालदिल झाला. ‘ताबडतोब येतो’ म्हणाला. मावशी आता शुद्धीवर आल्या होत्या. पण अजून पडूनच होत्या. त्यांचा गोरापान चेहरा मलूष्ठ दिसत होता. चेहऱ्यावर अन् सर्वांगावर थकवा जाणवत होता. या वयात लहान बाळाची जबाबदारी खरोखर फार अवघड असते.

माझी आईही माझ्या लहानपणीच वारली होती. बाबांनी दुसरं लग्न केलं नव्हतं. पण माझ्या काकीनं माझी जबाबदारी घेतली अन् खूप प्रेमानं मला वाढवलं…कदाचित त्यामुळेच मला प्रियाविषयी विशेष लळा होता…इथं मावशींची गोष्ट वेगळी होती. त्यांची तब्येत अन् वय बघता त्यांच्या मुलानं लग्न करणं गरजेचं होतं. मी विचारातच होते, तेवढ्यात, दारातून एका देखण्या तरूणानं घाईघाईनं प्रवेश केला. धावतच तो बेडपाशी पोहोचला. ‘‘आई काय झालं तुला? आता कशी आहेस? मला लगेच बोलावलं का नाही? फोन केला असता…’’

मला त्याच्या त्या बोलण्याचा रागच आला. मला तो फार मानभानी वाटला. मी जरा तडकूनच बोलले, ‘‘आता मारे इतकी काळजी दाखवताय…त्या लहान अजाण पोरीची काळजी घ्यायची जबाबदारी आईवर टाकताना काही नाही वाटलं? का नाही दुसरं लग्न करून घेत? तुम्हाला काय वाटतं सगळ्याच सावत्र आया वाईट असतात? मिस्टर, जगात चांगली माणसंही आहेत…मला तर वाटतं तुम्ही स्वत:ला देवदास समजताय अन् आपल्या देवदासी दु:खात तुम्हाला आईचं दु:ख लक्षात येत नाहीए.’’

डॉक्टर प्रियांशुचा आश्चर्यानं वासलेला ‘‘आ’’ बंद होईना. कॉलेजात मी उत्तम डिबेटर, उत्तम वक्ता म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी ज्या आक्रमकपणे मी बोलायची तसंच आत्ताही बोलून गेले. ‘‘बोला ना? का नाही म्हणताय दुसऱ्या लग्नाला?’’

एकाएकी माझ्या लक्षात आलं की डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा विस्मय नाहीसा होऊन तिथं आता मिश्किल, खट्याळ हसू उमटलं होतं. तेच मिश्किल हास्य ओठांवर असताना ते म्हणाले, ‘‘अगं बाई, दुसरं लग्न कधी करणार? अजून तर माझं पहिलंच लग्न झालं नाहीए…’’

‘‘म्हणजे?’’ मी आश्चर्यानं मावशींकडे बघितलं. आता ‘आ’ वासायची माझी पाळी होती.

एव्हाना मावशी हळूहळू उठून बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरही तसंच मिश्किल हास्य होतं. त्यांनी सावकाश बोलत मला समजावलं की प्रियांशु त्यांचा मुलगा आहे. प्रिया त्यांच्या मुलीची प्रियंवदाची मुलगी आहे, जिचा फोटो हॉलमध्ये लावलेला आहे. आता माझी चांगलीच गोची झाली होती. मी ओशाळून त्यांना ‘येते’ म्हटलं अन् निघायची तयारी केली.

इतक्या सगळ्या गोंधळात मावशीचं अन् माझं सकाळचं जेवण झालंच नव्हतं. एव्हाना संध्याकाळ ओसरून रात्र व्हायला आली होती. ‘‘तू आता जेव. आपण सगळेच जेवू. मग प्रियांशू तुला होस्टेलवर सोडून येईल.’’ मावशीनं म्हटलं.

डॉक्टरांनीही आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आचारी स्वयंपाकाला लागला. त्यानं झटपट जेवण बनवलं. तेवढ्या वेळात डॉक्टर कपडे बदलून आले.

जेवताना मी गप्प होते. प्रियांशूने म्हटलं,‘‘तुमचं कौतुक वाटतं मला. कारण तुम्ही हे अगदी बरोबर ओळखलं आहे की मला प्रियाची फार काळजी वाटते. कोणतीही मुलगी लग्न होऊन घरी येताच बाळाची जबाबदारी घ्यायला तयार होणार नाही. त्यातून म्हातारी सासू सांभाळायची…खरं ना?’’

आता मीही जरा सावरले होते. मी बोलून गेले, ‘‘असं काही नाहीए. इतका देखणा डॉक्टर, सधन घरातला मुलगा, प्रेमळ सासू हे बघून तर कुणीही मुलगी लग्न करेल तुमच्याशी.’’

माझ्या लक्षात आलं की मावशी अन् प्रियांशु पुन्हा तसंच मिश्किल हसताहेत. मला स्वत:च्या बोलण्याचा त्याक्षणी राग आला अन् लाजही वाटली. मी जेवण संपवून पटकन् हात धुतले.

तेवढ्यात प्रियांशुही हात धुवायला उठला अन् त्यानं विचारलं, ‘‘तुम्ही तयार आहात माझ्याशी लग्न करायला? कराल का माझ्याशी लग्न?’’

बाप रे! मला तर घामच फुटला.

मावशींनी सांभाळून घेत म्हटलं, ‘‘अरे, तिला लवकर सोडून ये. उशीर झाला तर बोलणी खावी लागतील.’’

प्रियांशुनं गाडी काढली. मावशींचा निरोप घेऊन मी गाडीत जाऊन बसले. होस्टेलच्या आधी एका आइस्क्रीम पार्लरसमोर त्यांनी गाडी थांबवली.

माझ्या बाजूचा दरवाजा उघडत ते म्हणाले, ‘‘अजून हॉस्टेलचं गेट बंद व्हायला अवकाश आहे. या ना, आइस्क्रीम खाऊयात. मी तर कित्येक दिवसात खाल्लं नाहीए आइस्क्रीम.’’

मी मुकाट्यानं उतरले. आम्ही आत जाऊन बसलो. त्यांनी माझी आवड विचारली.

मी चॉकलेट फ्लेवर सांगताच ते दोन आइस्क्रीम घेऊन आले. माझी नजर खाली होती, पण ते सतत माझ्याकडे निरखून बघत आहेत हे मला जाणवत होतं.

आइस्क्रीम संपल्यावर ते दिलगिरीच्या सुरात म्हणाले, ‘‘माझ्या बोलण्यानं तुम्ही दुखावला गेला असाल तर मी क्षमा मागतो. पण आईकडून जे काही तुमच्याबद्दल ऐकलं होतं अन् आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्ही इतर सामान्य मुलींपेक्षा वेगळ्या आहात. खरंतर मी अशा वेगळ्या मुलीच्या शोधात होतो. त्यामुळेच मी पुन्हा तुम्हाला लग्नाची मागणी घालतो आहे. मला ठाऊक आहे की तुमची स्वप्नं वेगळी आहेत. तुम्हाला कलेक्टर वगैरे व्हायचंय. पण लग्नानंतरही ते करता येईल. माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा असेल. प्रियावर जे निरपेक्ष प्रेम तुम्ही करता, तसं दुसरी कुणी मुलगी करू शकणार नाही…मला उत्तराची घाई नाहीए. तुम्ही विचार करा. भरपूर वेळ घ्या. तुमचा नकारही मी खिलाडूपणे स्वीकारेन. फक्त एकच अट. आई व प्रियाला मात्र नेहमीप्रमाणेच भेटत राहा.’’

काय उत्तर द्यावं मला समजत नव्हतं. त्यांनी मला होस्टेलच्या गेटपाशी उतरवलं अन् ते ‘गुडनाइट’ म्हणून निघून गेले.

आपल्या रूमवर गेल्यावर मी स्वत:ला पलंगावर झोकून दिलं. आत्तापर्यंत कुणा मुलानं अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलण्यासाठी मैत्री वाढवली तर मी त्याला असा काही झापायची की बिचारा पुन्हा बोलायचं धाडस करायचा नाही. पण आज प्रियांशुनं सरळ मला लग्नाची मागणी घातली अन् मी मुकाट ऐकून घेतलं. खरं तर मला राग यायला हवा होता अन् मला चक्क लाज वाटतेय? काहीतरी वेगळं छान छान वाटतंय. कितीतरी वेळ मी विचार करत होते. काहीच निर्णय घेता येईना, तेव्हा मी बाबांना फोन लावला. बाबांचा आवाज ऐकताच मला एकदम रडू फुटलं. ‘‘बाबा, तुम्ही ताबडतोब इथं या. मला तुमची फार गरज आहे.’’ बाबांनी नेमकं काय झालंय विचारलं तरीही मी काहीच बोलले नाही.

दुसऱ्यादिवशी बाबा आले. मी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. बाबांनी सगळी हकिगत शांतपणे ऐकून घेतली, मग मलाच विचारलं, ‘‘तुझी काय इच्छा आहे? मी त्या कुटुंबाला ओळखतो. प्रियांशु माझ्या मित्राचा, डॉक्टर नीरजचा मुलगा आहे.’’ बाबा स्वत:ही डॉक्टर होते.

मी म्हटलं, ‘‘मला समजतच नाहीए…म्हणून तर तुम्हाला बोलावून घेतलंय.’’

‘‘हे बघ, बेबी, एक बाप म्हणून विचारशील तर मुलगा आणि घराणं, दोन्ही उत्तम आहे. खरं सांगायचं तर इतकं चांगलं स्थळ मी ही तुझ्यासाठी शोधू शकलो नसतो. पण एक मित्र म्हणून विचारशील तर तुझी स्वप्नं यूपीएससी करून कलेक्टर व्हायचं आहे. अशावेळी लग्नाचा विचार दूरच ठेवावा लागतो. पण प्रियांशुनं तुला  लग्नानंतरही शिक्षण चालू ठेव, तो तुला सपोर्ट करेल असंही म्हटलंय, तर तू त्याला होकार द्यायला हरकत नाही.’’

मी बाबांना घेऊन प्रियांशुच्या घरी गेले. बाबांना भेटून मावशींना खूपच आनंद झाला अन् त्यानंतर दहा दिवसात मी डॉक्टर प्रियांशुशी लग्न करून, त्यांची बायको म्हणून त्या घरात आले. मावशींना मी आता आई अन् मम्मी म्हणत होते. सगळा वेळ माझ्यासोबत राहायला मिळत असल्यानं प्रियाही खुश होती.

खूपच दिवस गेले. खरं तर खूपच भराभर गेले. मी माझ्या संसारात खूपच रमले होते. आई अन् प्रियांशु मला अभ्यासाला बस म्हणून दटावत असले तरी मी अभ्यास करणं टाळतच होते. घर नित्य नव्या पद्धतीनं सजवणं, प्रियाला सांभाळणं आणि तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करून प्रियांशु व आईंना खायला घालणं यातच माझा वेळ जात होता. बाबांचे एक मित्र दिल्लीत वकिली करत होते. माझं कोचिंग सुरू असताना मी दर आठवड्याला त्यांच्याकडे जात होते. ते लग्नाला आले, तेव्हाही त्यांनी मला त्यांच्याकडे येत राहाण्याबद्दल सांगितलं होतं. पण मी त्यांच्याकडेही जात नव्हते. आपल्या या नव्या जगात मी खूपच आनंदात होते अन् तेवढ्यात माझ्या सुखाला दृष्ट लागली.

आमच्या बंगल्यातली प्रियंवदाची खोली तिच्या लग्नापूर्वी जशी होती, तशीच आईंनी ठेवली होती. मी विचार केला, एकदा  ही खोलीही छान स्वच्छ करून तिची पुन्हा नव्यानं मांडणी करूयात. खोली आवरताना  मला प्रियंवदाच्या काही डायऱ्या सापडल्या. मला एव्हाना इतकं समजलं होतं की प्रियंवदानं घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. प्रियांशु त्यावेळी एमएस करायला अमेरिकेला गेले होते. वडिलांनी परवानगी दिली नाही तेव्हा प्रियंवदा घरातून निघून गेली. तिनं लग्न केलं अन् मुलगी झाली तेव्हा मुलीला जन्म देतानाच तिचा मृत्यू झाला होता. तेव्हाच प्रियाशुनं प्रियाला आपल्याकडे आणलं होतं. मुलीचं पळून जाऊन लग्न करणं अन् त्यानंतर तिचा अकाली मृत्यू यामुळे बाबा इतके खचले की तेही पॅसिव्ह हार्ट अटॅकनं गेले. या पुढची माहिती मला प्रियंवदाच्या डायऱ्यांवरून मिळाली. एक डायरी प्रियाच्या जन्माची चाहूल लागल्यानंतची होती. प्रत्येक दिवसाची हकिगत त्या डायरीत नोंदलेली होती. शेखर म्हणजे प्रियंवदाचा नवरा. तिच्यावर जिवापाड प्रेम करत होता. त्याला मुलगीच हवी होती. त्यानं तिच्यासाठी शिखा नावही ठरवलं होतं. प्रियंवदाला मुलगा हवा होता. तिनं   त्याच्यासाठी प्रियंक हे नाव ठरवलं होतं. त्याची ती प्रेमळ, खोटी खोटी भांडणं वाचून तर माझे डोळेच भरून आले. त्याचक्षणी माझ्या मनात आलं की बिचारा शेखर! त्याला त्याच्या मुलीची म्हणजे प्रियाची नक्कीच खूप खूप आठवण येत असणार. पण प्रियांशु किंवा आई, कधीच?शेखरचं नावही घेत नाहीत…का बरं? पण आपल्या लेकीला भेटण्याचा हक्क तर बाप या नात्यानं शेखरला आहेच. मी कायद्याचा अभ्यास करत होते, त्यामुळे हक्क वगैरे मला जास्तच कळत होते.

मी गुपचुप एक पत्र शेखरला टाकलं की तुम्हाला प्रियाला भेटायची इच्छा होत असेल तर तुम्ही केव्हाही येऊ शकता. शेवटी ती तुमची मुलगी आहे. आता मी शेखरची वाट बघत होते की ते जेव्हा येतील तेव्हा आई व प्रियांशुला कसा आश्चर्याचा धक्का बसेल अन् प्रियाला बघून शेखरला किती आनंद होईल.                                                       क्रमश:

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें