इंद्रधनुष्याचा आठवा रंग

कथा * आशा शहाणे

वसुधा अजूनही दाराकडे बघत होती. नुकतीच त्या दारातून रावी आपल्या पतीसोबत बाहेर पडली होती. अंगावर प्रसन्न पिवळ्या रंगाची साडी, मॅचिंग ब्लाउज, हातात बांगड्या, कपाळावर छानशी टिकली, केसांचा सुरेखसा अंबाडा, गळ्यात मंगळसूत्र, कानांत कर्ण फुलं अगदी सोज्वळ सात्त्विक भारतीय सौंदर्याची मूर्ती दिसत होती. हातातल्या तान्हुल्यानं तिच्या मातृत्त्वाचं तेज अधिकच वाढवलं होतं.

वसुधाच्या नजरेपुढे काही वर्षांपूर्वीचा प्रसंग एखाद्या सिनेमातल्यासारखा दिसू लागला. रावीचे आईबाबा तिला समुदेशनासाठी वसुधाकडे घेऊन आले होते.

वसुधा हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्याच्याच जोडीनं ती पेशंटना समुपदेशही देते. या दोन्ही कामांमुळे तिच्याकडे वेळ कमी असतो. पण सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम ती अत्यंत निष्ठेनं करते. मानसिक दृष्टीनं खचलेल्या, निराशेनं ग्रासलेल्या पेशंटना त्या गर्तेतून बाहेर काढून पुन्हा नव्यानं आयुष्य जगण्याची उमेद देणं, त्यांचं आयुष्य मार्गी लावणं हेच तिच्या आयुष्याचं उद्दीष्ट होतं.

रावीला वसुधाच्याच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं. तिनं पंख्याला ओढणी बांधून गळफास घ्यायचा प्रयत्न केला होता. वेळेवर आईनं बघितलं, आरडाओरडा केला. रावीला गळफासातून सोडवून हॉस्पिटलमध्ये आणलं. योग्य वेळेत योग्य ते उपचार मिळाले आणि रावी वाचली. डॉ. वसुधाला त्या क्षणीच लक्षात आलं, तिच्या शरीरापेक्षाही तिचं मन घायाळ झालेलं आहे. गरज मनावरच्या उपचारांची आहे.

वसुधानं खरं काय ते जाणून घेण्यासाठी रावीच्या आईशी, शांताशी संवाद साधला. आधी तर ती काही बोलायलाच तयार नव्हती. पण वसुधानं हळूहळू तिला विश्वासात घेतलं. रावीच्या उपचारांसाठी सगळी माहिती गरजेची आहे. ही सगळी माहिती अगदी गुप्त ठेवली जाते. असं सगळं पटवून दिलं, तेव्हा त्यांनी कसंबसं एकदाचं काय ते सांगितलं. ते ऐकून वसुधेच्या मनात निरागस रावीबद्दल ममता दाटून आली.

शांतानं सांगितलं, ‘‘रावीवर बलात्कार झाला आहे आणि तो ही तिच्या वडिलांच्या खास मित्राकडून. वडिलांचे मित्रच असल्यामुळे त्या घरी ती केव्हाही जात होती. त्यांची मुलगी रावीची मैत्रिणच होती. दोघी एकाच वर्गात होत्या. एक दिवस रावी एक प्रोजक्ट फाईल घ्यायला त्यांच्या घरी गेली. तेव्हा मैत्रीण व तिची आई बाहेर गेलेल्या होत्या. ‘तिची बॅग आत आहे, तू हवं तर त्यातून फाईल काढून घे’ तिचे बाबा म्हणाले. त्यानंतर रावी घरी आली. ती सरळ खोलीत जाऊन झोपली. रात्री तिला तापच भरला. असेल वायरल म्हणून आम्ही डॉक्टरांचं औषध दिलं. तार उतरल्यानंतरही रावी कॉलेजला जात नव्हती. आम्हाला वाटलं, अॅन्युअल गॅदरिंग, स्पोर्ट्स वगैरे चालू असेल म्हणून क्लासेस लागत नसतील. म्हणजे फारसं गंभीरपणे आम्ही ते घेतलंच नाही.

मग एक दिवस यांचे मित्र घरी आले. हॉलमध्ये वाचत बसलेली रावी घाबरून तिथून उठली आणि खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. एरवी काकांसाठी पाण्याचा ग्लास घेऊन ती स्वत:च जायची. मला ते खूप खटकलं. मग मी हळूवारपणे रावीला विश्वासात घेतलं. तिनं रडत रडत त्या किळसवाण्या घटनेबद्दल सांगितलं. तेव्हा माझा संताप संताप झाला. असं वाटलं, ताबडतोब पोलिसात तक्रार द्यावी. पण रावीचे बाबा म्हणाले, ‘‘संयम ठेवायला हवा, पोलिसांत तक्रार दिली तरी पुढले सोपस्कार अवघड असतात. कोर्टात केस गेली तर अजूनच अब्रूचे वाभाडे निघतील. कोर्ट पुरावा मागतं. आपला पुरावा कुठून देणार? वकील अत्यंच वाईट भाषेत प्रश्न विचारतात. आपली भाबडी पोर तिथं कशी टिकून राहील? तिला पुन्हा त्या सगळ्या घटनाक्रमातून गेल्यासारखं वाटेल. आता ही गोष्ट फक्त आपल्यातच आहे, उद्या सर्वतोमुखी झाली तर पोर पार कोलमडेल. सगळं आयुष्य काढायचंय तिला…कुणी तिच्याकडे निर्दोष म्हणून बघणार नाही…आपण शांत रहायचं, रावीचं आयुष्य मार्गी लावायचं…तिला या धक्क्यातून सावरायला मदत करायची.’’

शांतानं हे सगळं सांगितलं तेव्हा संतापानं, भावना अनावर झाल्यानं ती थरथरत होती. एक दीर्घ श्वास घेऊन तिनं म्हटलं, ‘‘लेकीची अवस्था बघून आतडं तुटायचं. वाटायचं त्या नराधमाला भर बाजारात फोडून काढावं. पण पुन्हा विचार यायचा तिचा आज तर उध्वस्त झालाच आहे, निदान उद्या तरी नीट सावरायला हवा. आम्ही तिला खूप समजावलं. ती कॉलेजात जाऊ लागली. भाऊ सतत तिच्यासोबत असायचे. मीही सतत तिच्याभोवती असायची. तिचं हसणंबोलणं बंद झालं होतं. पण असं वाटलं होतं ती हळूहळू सावरते आहे, आज मी थोडा वेळ शेजारी गेले होते तेवढ्यात तिनं हा आत्मघातकी प्रयत्न केला.’’ शांताला रडू अनावर झालं.

वसुधानं सर्व काही शांतपणे अन् मनापासून ऐकून घेतलं. तिनं शांताला सांगितलं, ‘‘रावीला माझ्या घरी घेऊन या. तिला समुपदशनाची गरज आहे. ती नक्की यातून बरी होईल. तिचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याबद्दल तुम्ही निश्चत असा..’’

पहिल्या भेटीत वसुधाशी रावी एक चकार शब्दही बोलली नाही. वसुधा बोलत होती अन् रावी खाली मान घालून नुसती बसून होती. दुसऱ्या मिटिंगमध्येही तसंच घडलं. तिसऱ्या भेटीत रावीनं फक्त नजर उचलून वसुधाकडे बघितलं. याप्रमाणे अजून एक दोन मिटिंग्ज झाल्या. वसुधा तिला परोपरीनं समजावत होती अन् रावी निर्विकार मुद्रेनं फक्त भिंतीकडे बघत बसायची.

एका मिटिंगमध्ये मात्र रावी कठोरपणे म्हणाली, ‘‘सगळं काही विसरून जगणं सुरू करा हे सांगणं खूप सोपं आहे. पण जे माझ्या बाबतीत घडलंय ते वाळूवर लिहिलेल्या अक्षरासारखं नाही. एक लाट आली अन् सगळं धुवून घेऊन गेली…मी काय भोगलयं हे तुम्ही समजू शकणार नाही अन् हे करणारा कुणी आपलाच असतो तेव्हा मनाला होणाऱ्या यातना कुणाला कशा कळणार?’’ बोलता बोलता ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली.

वसुधानं तिला जवळ घेतलं. काही वेळ ती रावीला थोपटत होती. रावीच्या मनातली खळबळ अश्रूंच्या रूपानं वाळळून जात होती. काही वेळानं वसुधानं तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेतला अन् ती कोमल शब्दात म्हणाली, ‘‘या यातना माझ्याखेरीज कोण जाणून घेईल…माझ्या पोरी, शांत हो…’’

रावीनं दचकून तिच्याकडे बघितलं…वसुधाच्या चेहऱ्यावरची वेदना अन् डोळ्यातले अश्रू बघून ती आपले हुंदके विसरली. वसुधानं तिला स्वत:च्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगितला…वीस वर्षांपूर्वीचा.

‘‘शाळेचं ते शेवटचं वर्ष होते. शाळेनं जंगी फेयरवेल पार्टी दिली होती. भाषणं, मनोरंजनाचे कार्यक्रम, जेवण वगैरे आटोपेपर्यंत बराच अंधार पडला होता. मी अन् माझी मत्रिण रागिणी शाळेपासून थोडया अंतरावर उभ्या होतो. तिथं रिक्षा नेहमीच मिळायच्या. पण त्यादिवशी एकही रिक्षा नव्हती. आम्ही थोड्या घाबरलो होतो. काळजीत होतो. कारण रस्त्यावर दिवेही नव्हते. तेवढ्यात एक कार आमच्यापाशी येऊन थांबली. काही कळायच्या आत दोन धटिंगणांनी मला कारमध्ये ओढून घेतलं. अंधाराचा फायदा घेऊन रागिणी कशीबशी निसटली. तिनं माझ्या घरी जाऊन ही बातमी दिली. पोलिसांच्या मदतीनं घरचे लोक माझ्यापर्यंत पोचेतो त्या गुंडांनी माझ्या अब्रूची लक्तरं करून मला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकलं होतं. कोण, कुठले काही कळायला मार्ग नव्हता.’’

मला घरी आणलं, तेव्हा मी अर्धमेल्या अवस्थेत होते. आईबाबा सुन्न झाले होते. डॉक्टरांनी मला औषध दिलं. सलाइन लावलं…शुद्धीवर आले अन् त्या प्रसंगाच्या आठवणीनं धाय मोकलून रडायला लागले. आई बाबा समजूत घालत होते. धीर देत होते. पण मला काहीच समजत नव्हतं. तो ओंगळ स्पर्श दूर व्हावा म्हणून घासून घासून अंघोळ करायचे. तरीही वाटायचं अनेक झारळं अंगावरून फिरताहेत…कशीबशी परीक्षेला बसले. मुळात हुशार होते. अभ्यास छानच झालेला होता म्हणून पेपर लिहिता आले…

तेवढ्यात माझ्या लक्षात आलं माझी मासिकपाळी चुकली आहे. आता जगण्यात काय अर्थ होता. मी जीव द्यायचा प्रयत्न केला पण आईनं मला वाचवलं. तिनं अन् बांबानी पुन्हा पुन्हा मला समजावलं. मी स्वत:ला हकनाक अपराधी मानते आहे. विनाकारण त्रास करून घेते आहे. अपराधी तर ते गुंड आहेत. लाज त्यांना वाटायला हवी.

आईनं ओळखीच्या लेडी डॉक्टरला सगळं सांगितलं. तिनं मला त्या संकटातून मोकळं केलं. तिनंही तेच सांगितलं, ‘‘मी स्वच्छ आहे. पवित्र आहे. ताठ मानेनं मी जगायचं आहे. त्याक्षणी मी ठरवलं…यापुढे आयुष्य माझ्यासारख्या मुलींसाठी वेचीन. निष्पाप, निरपराध मुलींना स्वाभिमानानं जगायला शिकवेल. तू जर पुन्हा ठामपणे उभी राहिलीस, तर मला आनंद होईल…’’ वसुधानं आपली कहाणी संपवली अन् एक दीर्घ श्वास घेतला.

‘‘पण…पण तुम्हाला समाजाची भीती नाही वाटली?’’ रावीनं विचारलं.

‘‘कुणाची भीती? कुठला समाज? आता मला कुणाचीच भीती वाटत नव्हती. जे घडायचं ते घडून गेलं होतं. आता फक्त मला मिळवायचं होतं.’’

‘‘मग काय झालं? म्हणजे…तुम्ही आजच्या या मुक्कामावर कशा पोहोचलात?’’ अजूनही रावीचा विश्वास बसत नव्हता वसुधाच्या बोलण्यावर.

‘‘तो प्रसंग आयुष्यातून पुसून टाकण्यासाठी मी ते शहर सोडलं. पुढचं सगळं शिक्षण मी विद्यापीठाच्या वसतीगृहात राहून पूर्ण केलं. तेव्हा माझ्या डोळ्यापुढे एकच ध्येय होतं मानस शास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवायची. माणसाच्या मनांत अगदी आतवर जाऊन शोध घ्यायचा. मनाच्या तळाशी जिथं माणूस आपले विकार, निराशा, विचार अन् अनेक रहस्य लपवून ठेवतो, तिथपर्यंत पोहोचायचं. माझ्या वीकनेसलाच मी माझी शक्ती बनवली. ती लढाई माझी एकटीची होती अन् मी जिंकले.’’

काही वेळ कुणीच बोललं नाही. मग रावीच्या खांद्यावर हात ठेवून वसुधा म्हणाली, ‘‘हे बघ रावी, आपलं आयुष्य फार फार मौल्यवान आहे. ते भरभरून जगण्यासाठी मिळालं आहे. दुसऱ्या कुणाच्या पापाची शिक्षा स्वत:ला का म्हणून द्यायची? तुलाही आता तुझी लढाई एकट्यानंच लढायची आहे. धीर खचू द्यायचा नाही, निराश व्हायचं नाही. तुझं वयच असं कितीसं आहे गं? तू आपलं शिक्षण पूर्ण कर. छानसा जोडिदार शोधून लग्न कर. मला लग्नाला बोलवायला विसरू नकोस.’’

रावीनं लगेच प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही लग्न का नाही केलंत?’’

एक नि:श्वास सोडत वसुधानं म्हटलं, ‘‘त्यावेळी मी एक चूक केली…माझ्याबरोबर शिकणाऱ्या डॉ. नमननं मला मागणी घातली होती. मलाही तो आवडत होता. पण आयुष्याच्या जोडीदारापासून आपला भूतकाळ लपवून ठेवण्यापेक्षा त्याला सगळं स्वच्छ सांगावं असा विचार करून मी माझ्या आयुष्यातली ती घटना त्याला सांगितली. त्यानंतर त्यानं लग्नाला नकार दिला नाही पण त्याची वागणूक बदलली. त्याच्या प्रेमात आता दयेची, उपकाराची झाक होती. ती मला सहन होईना. या मुक्कामावर पोहोचल्यानंतर मला कुणाचीची दया नको होती. मीच मग पाऊल मागे घेतलं. कारण पुढल्या आयुष्यात मला नमनच्या पुरूषी अंहकाराचा नक्कीच त्रास झाला असता. ते मला नको होतं.’’

‘‘मग तुम्ही मला लग्न करायला का सांगताय? ही परिस्थिती माझ्याही बाबतीत उद्भवू शकते ना?’’

‘‘तेच मी तुला सांगते आहे. जी चूक मी केली ती तू करू नकोस. स्वत:ला अनेक गर्लफ्रेंडस् असणाऱ्या पुरूषाला पत्नीचा बायफ्रेंड चालत नाही. बायको व्हर्जिनच हवी असते. हे कटूसत्य आहे. तुला कुणालाही काहीही सांगायची गरज नाहीए. तू सांगितलं नाहीस तर कुणालाही यातलं काहीही कळणार नाहीए…’’

‘‘पण…मग ही फसवणूक नाही का ठरणार?’’ रावी अजूनही गोंधळलेलीच होती.

‘‘फसवणूक तुझ्या बाबांची झालीय…त्यांच्या मित्रानं केलीय. फसवणूक त्या मित्राच्या कुटुंबीयांची झालीय. फसवणूक माणुसकीची अन् एका निरागस आयुष्याची झालीय. तू या एका गोष्टीचं काय घेऊन बसली आहेस? आता मुलींनी, स्त्रियांनी थोडं चतुर आणि स्वार्थी व्हायला हवंय. आयुष्याच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यात आता एक आणखी म्हणजे आठवा रंग जोडावा लागणार आहे. झगमगत्या आत्मविश्वासाचा, झळाळत्या मन:शक्तीचा, थोड्याशा बेदरकारपणाचा.’’ रावीच्या डोळ्यात रोखून बघत वसुधा अगदी शांत पण ठाम स्वरात बोलत होती.

ते शब्द रावीच्या मनांत खोलपर्यंत झिरपत होते. वसुधा पुन्हा म्हणाली, ‘‘असं बघ, तुझे ते तथाकथित अंकल तर आजही समाजात उजळ माथ्यानं वावरताहेत. खरं ना? मग तू का खाली मान घालून भीत भीत जगायचं? अगं शुद्ध सोन्यावर चिखल उडाला तरी सोनं ते सोनंच असतं. तू स्वत: शंभर नंबरी सोनं आहेस. फक्त त्यावरचा त्या घटनेचा डाग आत्मविश्वासाच्या फडक्यानं पुसून टाक. समाजात वावरताना बेदरकारपणे वावर.’’

रावी विचार करत होती. मग तिनं म्हटलं, ‘‘पण जर त्यांनी मला कधी ब्लॅकमेल केलं तर?’’

‘‘तसं होणार नाही. माझ्या ओळखीच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याला चांगलाच दमात घेतलाय. यापुढे तो या गावातही दिसणार नाही. स्वत:च्या बायको अन् मुलांसमोर आपलं पाप उघड व्हावं हे कुणाही पुरूषाला सहन होणार नाही. त्या बाबतीत तू नि:शंक राहा.’’

त्यानंतर एकदोन मिटिंग्ज अजून झाल्या. रावी आता पूर्ण आत्मविश्वासानं आयुष्याला सामोरी जाणार होती. तिनं शिक्षण पूर्ण केलं. चांगली नोकरीही मिळाली. चांगलं स्थळ सांगून आलं. लग्नही झालं.

मधल्या काळात वसुधा रावीला भेटली नाही. पण ती शांताच्या सतत संपर्कात होती. वेळोवेळी मार्गदर्शन करत होती. रावीची प्रगती ऐकून तिला समाधान वाटत होतं. लग्न होऊन रावी सासरच्या गावी निघून गेली होती. ती आज आपल्या तान्हुल्याला घेऊन त्याच्या बारशाचं आमंत्रण द्यायला वसुधाकडे आली होती.

एक कळी कोमेजता कोमेजता पुन्हा उमलली होती. वसुधाला अगदी कृतकृत्य वाटत होतं. ती समाधानानं उठली. रावीच्या बाळासाठी अन् रावीसाठी काहीतरी आहेर करायचा होता. पर्स घेऊन घराबाहेर पडताना प्रसन्न हास्य तिच्या मुखावर होतं.

परिणाम

कथा * भावना प्रराते

गोष्ट खरी आहे. शंभर टक्के सत्य आहे याचे पुरावे मिळाल्यानंतर सोनी प्रथम स्तब्ध झाली. बधिर होऊन बसून राहिली. काळ जणू थबकला होता. वाराही वाहायचा थांबला होता. पण थोड्याच वेळाने ती भानावर आली. एकदा आधी रोहनलाच विचारायला हवं. तिला मनांत वाटलं. तो म्हणेल हे सगळं खोटं आहे. कदाचित सोनीनं त्याच्यावर संशय घेतला म्हणून तो संतापेल, रागवेल, अबोला धरेल. मग त्याला कसं समजवायचं, क्षमा मागायची, त्याचा रागरूसवा कसा घालवायचा याचीही उजळणी तिच्या वेड्या मनात करून टाकली. पण तसं घडलंच नाही. रोहननं सत्य स्वीकारलंच. अगदी नि:संकोचपणे, खरंतर निर्लज्जपणे. सोनीला वाटलं आत्तापर्यंत ज्या घराला, संसाराला आपलं सर्वस्व समजत होती तो फक्त काचेचा शोपीस होता. वाऱ्याचा झोत आला अन् तो फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले. ते विखुरलेले काचेचे तुकडे अन् कण वेचताना मन रक्तबंबाळ झालं.

त्यांच्या लग्नाला दहा वर्षं झाली होती. अन् हे पहिलं भांडण त्यांच्यात झालं. नको असलेलं एखादं पृष्ठ अवचित उघडावं अन् कॉम्प्यूटर हँग व्हावा असं काहीसं झालं. रोहनची वाक्य तिच्या मनावर खोलवर आघात करून गेली. रडता रडता ती त्याला दुषणं देत होती. त्याला नको नको ते बोलत होती. रोहन अगदी शांतपणे ऐकून घेत तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण सोनी आता ऐकणार नव्हती. तशी ती काही गरीब गाय किंवा बिच्चारी वगैरे नव्हती. चांगल्या सुधारक घरातली, सुबत्तेत वाढलेली, भरपूर शिकलेली मुलगी होती. कमवत नाही तर काय झालं? कमवू शकेल इतकं शिक्षण, इतकी योग्यता आहे तिच्याकडे. अशी कशी सवत उरावर नांदवून घेईल? एक महिना दोघांमधलं शीतयुद्ध चालू होतं. शेवटी ही कोंडी फोडायलाच हवी म्हणून निर्धारानं तिनं सांगितलं, ‘‘तुम्हाला त्यांना सोडावंच लागेल.’’

‘‘अन् ते शक्य नसेल तर?’’ रोहननं शांतपणे विचारलं.

‘‘तर मला वेगळं व्हावं लागेल. सोडू शकत नसाल तर मला…’’ अनेक दिवसांपासून सोनीनं हा संवाद पाठ करून ठेवला होता. वेळ आली की ऐकवायचाच म्हणून. आत्ता मात्र हे बोलताना तिचे डोळे भरून आले.

रोहनला तेवढ्यात तिला भावनिक बनवून गुंडाल्ल्याची संधी मिळाली. ‘‘असं कसं सोडेन तुला? तुझ्यावर प्रेम आहेच माझं. अन् एकाच वेळी अनेकांवर प्रेम करणं शक्य आहे माणसाला. आईबाप नाही का दोन मुलांवर सारखंच प्रेम करतात?’’

‘‘दोघींपैकी एक हीच तर अडचण होती ना? तुला ऐकायचं असेल तर नीट बैस. मी कॉफी करून आणतो. त्याबरोबर तुला आवडणाऱ्या कुकीजही आणतो.’’

सोनीचा संताप आता अनावर झाला. तिनं रोहनकडे एकदा आग ओकणाऱ्या डोळ्यांनी बघितलं अन् सरळ तोंड फिरवलं. ‘‘एखाद्या मनोरंजक सिनेमाची गोष्ट ऐकल्याप्रमाणे मी हे सगळं ऐकून घेईन असं वाटलंच कसं तुम्हाला?’’ तिनं तिरस्कारानं विचारलं.

पण रोहननं तरीही कॉफी करून आणलीच! तो सांगू लागला, ‘‘आम्ही तिघं कॉलेजात एकत्र होतो. एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतो. जेव्हा त्यांना दोघींना समजलं की त्या दोघीही माझ्यावर प्रेम करताहेत तेव्हा निर्णय त्यांनी माझ्यावर सोपवला. मी स्वत:च्या मनाचा कौल घेतला तेव्हा मलाही एकूण परिस्थिती बरीच अवघड असल्याचं जाणवलं. मला दोघीही सारख्याच आवडत होत्या. मी त्यांना तसं सांगितलं. शेवटी निर्णय असा झाला की आता सगळं परिस्थितीवरच सोपवावं. मी माद्ब्रया वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यांचा एवढा छान बिद्ब्रानेस. मला घर सोडून जायचं नव्हतं. मी इथंच धंदा सांभाळणार होतो. आता योगायोग असा की रीता मुंबईला अन् सारा बंगलोरला स्थायिक द्ब्राली. या दोन्ही ठिकाणी?धंद्याच्या निमित्तानं मला बरेचदा जावं लागतं. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या शहरात जातो तेव्हा आम्ही मित्रत्त्वाच्या नात्यानं भेटतोच. मग गप्प्पा, भटकणं, विचारांची देवाणघेवाण, वादविवाद, खाणंपिणं…सगळंच होतं. त्यात एक दिवस…’’

रोहननं कॉफीचा कप सोनीपुढे धरला. विचारलं, ‘‘पुढे सांगू?’’ कॉफीचा कप दूर सारत सोनीनं होकारार्थी मान डोलावली.

‘‘एकदा माझ्या नेहमीच्या हॉटेलमध्ये रिनोव्हेशन चालू असल्यानं माझी राहण्याची पंचाईत झाली. रीताला हे कळलं तेव्हा ती मला तिच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेली. वाटेत जोराचा पाऊस लागला. आम्ही दोघंही चिंब भिजलो होतो. गारठलो होतो. कारण रीताची गाडी वाटेत बंद पडली होती अन् टॅक्सी मिळत नव्हती. शेवटी एकदाचे तिच्या घरी पोहोचलो. गरमागरम कॉफी घेत गप्पा मारता मारता आमची मैत्री दैहिक पातळीवर कशी अन् केव्हा पोहोचली ते आम्हाला कळलंच नाही. मैत्रीची मर्यादा ओलांडली गेली हे खरं.

आम्ही तिघंही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून कधीच लपवत नाही. साराला जेव्हा हे समजलं, तेव्हा तिला वाटलं की मी आता रीताशी लग्न करून तिच्याशी कायमचे संबंध तोडीन. ती त्यादिवशी फारच उदास होती. सारखी रडत होती. मी तिला समजवत होतो. ‘‘तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही, ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पना तर मलाही असह्य होती. तिची समजूत घालता घालता मग केव्हा आम्ही एकमेकांच्या…’’

‘‘पुरे करा! ऐकवत नाहीए मला,’’ सोनीचा संताप उफाळून आला. हे सगळं होतं तर माझ्याशी लग्न करून तुम्ही माझ्या आयुष्याचं का वाटोळं केलंत?

‘‘मला खरं तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. पण आई बाबांच्या हट्टापुढे मला नमावं लागलं. मी तुला बघायला गेलो नाही तर ‘विष खाऊन जीव देईन’ अशी धमकी दिली होती आईनं मला. असंही वर म्हणाली होती की मुलगी आवडली नाही तर नकार दे म्हणून. पण तुला बघितल्यावर नकार देणं शक्य तरी होतं का? तू आयुष्यात येणं हे तर कोणत्याही पुरुषाचं भाग्यच ठरलं असतं.’’

हीच गोष्ट अत्यंत रोमँटिक पद्धतीनं रोहननं तिला आधीही सांगितली होती अन् प्रत्येक वेळी सोनी आनंदानं अन् अभिमानानं फुलून आली होती. आज मात्र कुत्सितपणे तो बोलली, ‘‘मला बघून तुम्हाला वाटलं असेल, बरी आहे घरगुती मुलगी. दिसायला तरुण अन् सुंदर आहे. आईवडिलांची सेवा करेल, घर सांभाळेल, नातलगांचं आदरातिथ्य करेल, पोरांना जन्माला घालेल, त्यांना सुसंस्कृत बनवेल. तुम्ही तृप्त, तुमचं कुटुंब, घरदार संतुष्ट! असं प्रकरण समजा तिला कळलंच तर ती जास्तीत जास्त काय करेल? रडेल, भेकेल अन् गप्प बसेल.’’ डोळ्यातले अश्रू पुसून सोनीनं निश्चयी सुरात रोहनना ऐकवलं. ‘‘पण मी इतकी गरीब बिच्चारीही नाहीए. मी पूर्णपणे तुम्हाला समर्पित होते अन् आहे. प्रेम मी फक्त तुमच्यावर अन् तुमच्यावरच केलंय. त्यामुळेच तुम्ही पूर्णपणे माझे असाल नाही तर…’’ आवाज पुन्हा घशात अडकला…पुढे बोलवेना.

रोहनच्या अनुभवी वक्तृत्वानं पुन्हा सूत्रं हातात घेतली. ‘‘ठीक आहे. तुझी इच्छा असेल तर तसंच होईल. चूक माझी आहे, तेव्हा सहनही मीच करायला हवं. तुला जे हवं ते तुला मिळेल. पोटगी, मुलांची कस्टडी…पण…’’ रोहननं वाक्य अपूर्ण ठेवलं. काही क्षण तो गप्प राहिला मग एक उसासा सोडून म्हणाला, ‘‘तू अजून घराबाहेर पडली नाहीस, त्यामुळे एकट्या स्त्रीला काय सोसावं, भोगावं लागतं याची कल्पना नाहीए तुला. उपाशी लांडगे लचके तोडतात बाहेरच्या जगात. रीता अन् सारासारख्या स्वावलंबी, हुशार, कर्तबगार स्त्रियांनासुद्धा भावनिक आधाराची गरज पडते. लाखो रुपये कमावतात त्या. पण त्या घरकाम स्वत:च करतात. कारण एकट्या स्त्रीला घरात नोकर ठेवणंही धोक्याचं वाटतं. शिवाय प्रश्न आपल्या मुलांचा आहे. त्यांना आपल्या दोघांची सवय आहे. दोघांपैकी एकाचबरोबर ती राहू शकतील का? त्यांच्यावर किती परिणाम होईल याचा विचार केला आहेस का?’’

मुलांचा मुद्दा निघताच सोनी एकदम दचकली. जणू झेपेतून खडबडून जागी झाली. आत्तापर्यंत तिनं फक्त कस्टडीचा विचार केला होता. दोघांपैकी एकाशिवाय राहणं मुलांना मानसिक, भावनिकदृष्ट्या पेलवेल का? याचा तर तिनं विचारच केला नव्हता. क्षणभर ती बावरली, पण लगेच सावरून म्हणाली, ‘‘तुम्ही मला धमकी देताय?’’

‘‘नाही, जे आयुष्य तू जगू बघते आहेस, त्याचे परिणाम सांगतोय. का उगीच मोडते आहेस इतका चांगला मांडलेला संसार?’’ रोहननं काळजाला हात घालत विचारलं.

एकटीनं बसून तिनं काल घडलेल्या गोष्टींचा विचार केला. एकूण परिणाम काय झाला? तिच्या लक्षात आलं की रोहनच्या आवाजात नम्रता होती, सहानुभूती होती, प्रेमही होतं. पण घडलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप नव्हता. स्वत:ची चूक घडलीय हे त्याला मान्य नव्हतं. त्यानं एकदाही क्षमा मागितली नाही. तो जे करतोय, ते केवळ अनैतिकच नाही तर पाप आणि गुन्हा आहे हे त्याला सोनी समजावू शकली नव्हती. बायको असाध्य रोगानं अंथरूणाला खिळली असेल किंवा शरीरसुख द्यायला असमर्थ असेल तर दुसऱ्या स्त्रीशी संबंध एकवेळ समजू शकतो. पण तसं काहीच नव्हतं. खरं तर तिनं ठरवलं होतं की रोहनला स्पष्टच विचारेल ‘इतकी साधी सोपी गोष्ट होती तर लग्नाच्या आधीच का सांगितलं नाहीस?’ पण हे ती बोलूच शकली नाही उलट रोहननंच चतुराईने तिला सांगून टाकलं की तो तिलाही सोडणार नाहीए. संसार मोडला तर जबाबदार सोनी असणार आहे. तो तिला पैसा अडका देऊन स्वत:ला मोकळंच ठेवेल अन् संसार मोडला नाही तर जे चाललंय त्यासाठी सोनीची स्वीकृती आहे असंच मानलं जाईल.

म्हणजे आत्तापर्यंत जे लपूनछपून चाललं होतं ते आता राजरोस चालेल? तिचं डोकं भणभणू लागलं. रोहननं बॉल तिच्या कोर्टात टाकला होता. आता जे करायचं ते तिनेच करायला हवंय. तिनं एक दिर्घ श्वास घेतला. अजून प्रश्नाची तड नाही लागली हे खरं असलं तरी वस्तुस्थिती स्पष्ट आहे. बोलून रडून मनही मोकळं झालंय. आता ती शांतपणे आपली स्टे्रटेजी ठरवू शकते. काय केलं की काय होईल याचा एक ढोबळ आराखडा तिनं मनांत तयार केला. दुखणं अवघड जागेचं होतं त्यामुळे शस्त्रक्रिया फार काळजीपूर्वक व्हायला हवी. यशाची खात्री काही टक्केच असली तरी प्रयत्न करायलाच हवा. गाजराची पुंगी म्हणा…वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. पण प्रयत्न न करता, लढाई न लढताच पराजय स्वीकारण्यापेक्षा लढणं केव्हाही चांगलंच.

दुसऱ्या दिवशी सकाळी सोनी खूपच लवकर उठली. स्वत:चं सगळं आवरून मुलांच्या बरोबरच तीसुद्धा तयार होती. सकाळी सात वाजता टॅ्रकसूटमध्ये बघून आपापला पेपर उघडून खुर्च्यांवर वाचत बसलेल्या रोहननं अन् बाबांनी आश्चर्यानं अन् प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं.

‘‘त्याचं काय आहे बाबा,’’ अत्यंत नम्रपणे अन् आवाजात मध, खडीसाखर घोळवून सोनीनं म्हटलं, ‘‘मुलांच्या बसस्टॉप समोरच एक अतिशय प्रसिद्ध लेडीज जिम आहे. मला फार वाटायचं की आपणही तिथं जावं. आता तर तिथं ५० टक्के डिस्काऊंट आणि ब्यूटी ट्रीटमेंटचं संपूर्ण पॅकेज ऑफर करताहेत. त्यामुळे मला फारच मोह झाला. आज आळशीपणाला शह देत मी माझं आवरू शकले. आता मुलांना बसमध्ये बसवून मी जरा जिमला जाऊन येईन.’’

‘‘आणि आमचा चहा…नाश्ता?’’ रोहननं घाबरून विचारलं.

‘‘प्लीज, तेवढं तुम्ही बघाल ना? मला फार मदत होईल.’’ नम्रता अन् मध खडीसाखर ओसंडून चालली होती. मुलांना घेऊन सोनी निघून गेली. रोहननं वडिलांकडे बघितलं. दहा वर्षांत पहिल्यांदाच सोनी साडीऐवजी टीशर्ट टॅ्कपॅण्टमध्ये त्यांच्यासमोर आली होती आणि असं काही बोलली होती. त्यांना फारच आश्चर्य वाटलं होतं…ते नाराजही होते का? रोहननं काही न बोलता स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला.

रात्री दहा वाजता बेडरूममध्येच भेट झाली तेव्हा बोलायची संधी मिळाली. रोहन काही बोलणार त्यापूर्वीच सोनीनं कॉफीचा कप त्याच्यापुढे धरला, ‘‘जरा आरामात बसून बोलूयात?’’ तिनं विचारलं आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता म्हणाली, ‘‘मी आज सायंकाळी कुठं गेले होते हेच विचारायचं आहे ना तुम्हाला? हे अन् रोजच असं कसं चालेल? खरं ना?’’ मग प्रेमानं नवऱ्याचा हात हातात घेत ती म्हणाली, ‘‘लग्नाला दहा वर्षं झालीत. एवढ्या वर्षांत माझ्या समर्पणात काही उणीव जाणवली तुम्हाला? माझ्या मनावर जो आघात झाला आहे तो सहन करणं ही साधीसुधी गोष्ट नाही हे तर तुम्हीही मान्य कराल. कधीतरी तुमच्या मनांत आलं. तेव्हा मी बंगलोर आणि मुंबईला जाण्यासाठी तुमची बॅग भरेन तेव्हा माझ्या मनाला किती यातना होतील?

‘‘पण तेवढ्यानं भागणार नाही. मेंदू अन् मन शांत रहायला हवं म्हणूनच मी संध्याकाळी योगासन आणि प्राणायामचा क्लास सुरू केला आहे. दुपारी एक दोन कोर्सेस अन् रात्री सोसायटीच्या सोशल वर्क कमिटीसाठी वेळ ठरवला आहे. कारण स्वत:ला असं गुंतवून घेतलं नाही तर रिकामा वेळ मला सतत तुमच्या त्या…’’ वाक्य पूर्ण न करताच ती हुंदके देऊ लागली. मग थोडी सावरून पुढे म्हणाली, ‘‘मला तुमची मदत हवीए. थोडा मानसिक आधार आणि सहकार्य हवंय. मला स्वत:ला थोडं पक्कं व्हायचंय. सेल्फ डिपेंडंट व्हायचंय. म्हणजे मला…कसं सांगू तुम्हाला…म्हणजे मी गरीब बिच्चारी, असहाय्य आहे म्हणून प्रेमात वाटेकरी सहन करते आहे, ही भावना मला नकोय, तर माझं तुमच्यावर अलोट प्रेम आहे, त्या प्रेमापोटी मी तुमच्या प्रेमात वाटेकरी सहन करतेय असं मला जाणवलं पाहिजे…तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय ते?’’

‘‘ठीक आहे.’’ तिच्या हातावर थोपटत रोहननं म्हटलं, ‘‘मी प्रयत्न करतो.’’ सोनीच्या प्लॅनिंगचं पहिलं पाऊल तर यशस्वी ठरलं होतं.

सोनीचा रोजचा दिनक्रम ठरला होता. सकाळी सातला मुलांबरोबर बाहेर पडायचं. दुपारी त्यांना घेऊन घरी जायचं. त्यांचं व स्वत:चं जेवण आटोपून मुलांचा अभ्यास, होमवर्क पूर्ण करून घ्यायचा. मग सायंकाळी योगासनच्या वर्गाला जाताना त्यांना खेळायच्या मैदानावर सोडायचं. खेळून, पोहून मुलं दमून आल्यावर त्यांना खायला घालायचं. मग थोडा वेळ मुलं टीव्ही बघत बसायची तेवढ्या वेळात सोनीकडे गरीब मुलं शिकायला, ट्यूशनला यायची.

सोनीची नणंद अनन्या गावातच दिलेली होती. सोनीचे आणि तिचे संबंध खूपच प्रेमाचे अन् मैत्रीचे होते. ती नोकरी करायची. त्यामुळे तिच्या मुलांना ती आजोळी म्हणजे सोनीकडेच सोडायची. आजी आजोबा मुलांना थोडा वेळ द्यायचे पण दिवसभर त्यांचं खाणंपिणं, कपडे बदलणे, खेळायला नेणं वगैरे सर्व सोनी करायची. घरात कामासाठी मोलकरीण होती. स्वयंपाकघर मात्र पूर्णपणे सोनी बघायची. मुलांना नेणं, आणणं वगैरे सोनीच सांभाळायची कारण ती उत्तम गाडी चालवायची.

पूर्णवेळ घरात राहून संपूर्ण घर व्यवस्थितपणे सांभाळणारी सोनी जेव्हा दिवसभर घराबाहेर राहू लागली तेव्हा घरात गडबड, गोंधळ, अव्यवस्था हे सर्व होणारच होतं. स्वयंपाकाला आता बाई ठेवली गेली होती. तिच्या हातचा बेचव स्वयंपाक आणि स्वत:चं चहापाणी, ब्रेकफास्ट वगैरे बघावं लागत असल्यानं आईबाबाही चिडचिडे झाले होते. सोनीचं वागणं, तिचं घराकडे दुर्लक्ष करणं यामुळे घरातला ताणतणाव वाढला होता. रोहनच्या संतापावर सोनीनं अश्रूरूपी पाणी ओतून आपली बाजू बळकट केली होती.

आज रविवार होता. सोनी अन् मुलं सकाळीच आवरून कुठंतरी निघून गेली होती. अनन्या व जावईबापू जेवायला येणार होती अन् स्वयंपाकघरात चार चांगले पदार्थ करताना आईची दमछाक झाली होती. त्यातच सोनीनं अनन्याच्या मुलांना दुपारी पाळणाघरात ठेवण्याचा विषय काढून आगीत तेल ओतलं होतं.

रात्री दहा वाजता सोनी घरी आली, तेव्हा बॉम्बस्फोट होणार हे नक्की होतं. मुलांना सोनीनं खोलीत जायला सांगितलं. रोहन श्वास रोखून वाट बघत होता. सासू-सुनेच्या भांडणात कुणाला न्याय देता येतो याचा विचार करत होता.

सोनीनं सरळ खुर्चीवर बसलेल्या सासूच्या पायाशी बसकण मारली अन् त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडू लागली. ‘‘आई, तुम्हाला काय सांगू? हल्ली हे माझ्याशी फार वाईट वागतात. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या स्मार्ट स्त्री सहकाऱ्यांशी माझी तुलना करतात. म्हणतात त्या एकट्यानं सगळं मॅनेज करतात आणि तुला काहीही करता येत नाही. त्यांची सारा नावाची मैत्रीण व सहकारी कमालीची फिगर कॉन्शस आहे तर रीतू सुंदर आणि स्मार्ट आहे. हे म्हणतात, त्यांच्याकडून शिक काहीतरी. मी तर एक घरगुती स्त्री. फक्त गृहिणी, सून, आई, मामी, भावजय, पण ठरले शेवटी गांवढळच! मला सांगा आई, मला या सगळ्या गोष्टींचं किती दु:ख झालं असेल?’’ रडून रडून सोनीनं सासूचा पदर ओला करून टाकला. सासू बिचारी तिच्या हुंदक्यांनी, डोळ्यातल्या पाण्यांनं आणि बोलण्यानं विरघळली होती. ‘‘म्हणून मी स्वत:ला त्यांच्यासारखं करायचा प्रयत्न करतेय. आई, माझ्या मनांत एक कल्पना आली आहे.’’

सोनीनं आईच्या वर्मावरच बोट ठेवलं. आईची कधीपासून इच्छा होती असं काही तरी करायची पण सोनीनं फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. म्हणताना त्यांनीही नाद सोडला होता. बाबा पक्के व्यापारी होते. काही चांगलं काम करून पैसा घरात येणार असेल तर त्यांची हरकत नव्हतीच. सोनीनं सासूशी भांडणही केलं नाही. रोहनची गैरवर्तणूक लपवून त्याच्यावर उपकारच केले होते. दुसरी स्टेपही यशस्वी झाली होती.

ऑक्टोबर महिन्यात भरपूर गरम झालं होतं. हवेतला असा बदल रोहनला नेहमीच त्रासदायक ठरायचा. त्याचा दमा अन् खोकला उफाळून यायचा. बिघडलेली तब्येत रूळावर यायला फार वेळ लागयचा.

सोनीनं शोधाशोध करून, गल्ल्याबोळ फिरून एका आयुर्वेदिक डॉक्टरकडून औषध मिळवलं होतं. त्या औषधामुळे गेली कित्येक वर्षं रोहनला खोकल्याचा, दम्याचा त्रास झाला नव्हता. वैद्यांनी दिलेली पाल्याची, मुळ्यांची औषधं सोनी स्वत: पाट्यावर वाटून मधातून सकाळसंध्याकाळ रोहनला देत असे. वेडीवाकडी तोंडं करत रोहन ती औषधं घ्यायचा. यावेळी सोनीनं वैद्यांकडून औषधं आणली नाहीत. वाटून, पूड करून रोहनला खाऊ घातली नाहीत. व्हायचं तेच झालं.

रोहनचा खोकला आटोक्यातच येईना. आठ दिवस खोकून खोकून तो थकून गेला. त्यात तीन दिवस तापही येत होता. डॉक्टरांची औषधं लागू पडत नव्हती. तोंडाची चव गेलेली…त्यात स्वयंपाकवाल्या बाईंच्या हातचा बेचव स्वयंपाक. रोहन वैतागला होता. संतापला होता. कारण सोनी त्याच्याकडे फिरकतच नव्हती. एकेकाळी त्याचं साधं डोकं दुखलं तर ती त्याच्याजवळून हलायची नाही आणि आता तापात होता तरी कपाळावर पाण्याच्या पट्टया आईच ठेवत होती. सोनीची दिनचर्या अजिबात बदलली नव्हती. त्याचा ताप उतरला आणि दोन दिवसातच बाबांना ताप आला. सोनी शांतपणे नव्या दिनक्रमात व्यग्र होती. आता मात्र रोहनचा संयम संपला. आता बोलायलाच हवं.

‘‘आता अधिक स्वातंत्र्य मिळणार नाही. बंद कर हा सगळा तमाशा.’’ रोहनच्या आवाजात हुकूमत आणि संतापही होता.

‘‘अन् ते नाही झालं तर?’’ नम्र सुरात, अत्यंत थंडपणे सोनीनं विचारलं.

‘‘नाही झालं तरचा अर्थ काय? नवरा आहे मी. कळतंय का तुला? नवरा म्हणून कर्तव्यात मी कसूर केली नाही. घर आहे की धर्मशाळा? तू जे करत आलीस ती तुझी जबाबदारीच होती ना?’’ अनावर संतापानं तो बोलत होता पण प्रश्न विचारला गेला आणि सोनीला बोलायची संधी मिळाली.

‘‘नाही, नाही…म्हणजे मला तसं काहीच म्हणायचं नाहीए…पण…’’ सोनी प्रेमानं बोलत होती पण वाक्य मुद्दामच अर्धवट सोडलं तिनं. मग काही क्षणानंतर म्हणाली, ‘‘ऐकायचंय मला काय म्हणायचं ते? असं करा, आरामात बसूनच बोलूयात. मी कॉफी करून आणते आणि तुमची आवडती बिस्किटंही आणते त्याच्या सोबत.’’ ती हसत उठली अन् कॉफी करायला गेली.

कॉफीचा कप त्याच्या हातात देत ती म्हणाली, ‘‘हा मनुष्य स्वभावच आहे…माणूस जे देतो त्याची आठवण तो नेहमीच ठेवतो, पण त्याला जे मिळतं त्याची त्याला आठवणही राहात नाही. तुम्ही मला एक चांगलं कुटुंब दिलंत. पुन्हा पुन्हा तुम्ही ते बोलून दाखवलंत, पण ते कुटुंब तृप्त, सुखी, संतुष्ट, निरोगी, आनंदी रहावं म्हणून मी किती कष्ट घेतले ते तुम्ही सोयीस्करपणे विसरलात…’’

‘‘पण मी असं कधी म्हणालो की तू घराच्या सुखासाठी कष्ट घेतले नाहीस म्हणून? तुझा स्वाभिमान मी कधी दुखावला?’’ रोहन अजूनही रागातच होता.

त्याच्या डोळ्यांत बघत, त्याचे हात हातात घेत सोनी म्हणाली, ‘‘मी घटस्फोट घेतला तर मला हवं ते तुम्ही द्याल हे किती सहजपणे बोललात तुम्ही रोहन? काय देणार होतात तुम्ही मला? आयुष्याची ही दहा वर्षं जी केवळ मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठीच जगले. कुटुंबाचा कणा होताना स्वत:चं अस्तित्त्वच उरलं नाही. ती दहा वर्षं आता फक्त माझ्या स्वत:च्या जगण्यासाठी तुम्ही मला परत करू शकाल? मी तुमच्यावर स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करते रोहन. लग्न झाल्यादिवसापासून माझे आयुष्य फक्त तुमच्याभोवती फिरतंय. दिवस तुमच्यापासून सुरू होतो, तुमच्यापाशी संपतो. मुलांची कस्टडी आणि काही रुपये माझ्या दहा वर्षांच्या तपश्चर्येचं कॉम्पेनसेशन असू शकतं,?’’ सोनीनं रडत रोहनला मिठी मारली.

पण रोहन इतकं भावनाविवश झाला नाही. सोनीची मिठी सोडवून घेत तो म्हणाला, ‘‘एक मिनिट, तू इथं बैस. तू गोष्टी उलट्यापालट्या करून ओव्हर रिएक्ट होते आहेस. तुला सारा आणि रीता नकोशा का वाटतात? तू त्यांना एक्सेप्ट का करू शकत नाहीस? मी काय प्रॉपटी दिलीय त्यांना? माझ्या कोणत्याही संपत्तीवर त्यांचा कुठलाही लीगल राइट नाहीए. आता त्यांच्या घराच्या आसपासचे, सोसायटीतले लोक मला त्यांचा नवरा म्हणून ओळखतात ते सोड. पण त्यांनीही कधी लिमिट क्रॉस केली नाही आणि घटस्फोट देण्याची गोष्ट मी बोललो नव्हतो. मी तर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण करणारच होतो. मी तुम्हा तिघींपैकी कुणालाच सोडू इच्छित नाही. मला तुम्ही तिघी हव्या आहात.’’

सोनी तुच्छतेनं हसली आणि बोलली, ‘‘तिघींपैकी कुणालाही? फॉर युअर काइंड इनफरमेशन…, तुम्ही जेव्हा त्यांच्या शहरात जाता तेव्हा तुमची कपड्यांची बॅग मी भरते. जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा मळके, चुरगळलेले कपड्यांचे बोळे निघतात बॅगेतून. त्या तुमचे कपडे धुवत नाहीत. कारण त्या तुम्हाला त्यांची जबाबदारी किंवा बांधीलकी मानत नाहीत. एकदा मुंबईची फ्लाइट कॅन्सल केली तुम्ही कारण तुम्हाला ताप आला होता. कारण आजारपण निस्तरणं, सेवा करणं त्यांना जमणार नव्हतं. तुमच्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नो ड्यूटीज, नो राइट्सच्या व्यवहारी प्रेमात माझ्या एकनिष्ठ प्रेमाला, कर्तव्यनिष्ठेला एकाच तागडीत तोलताय तुम्ही? त्यांच्यापासून काही लपवलं नाही, त्यांना सोडणार नाही इतकं कोरडेपणाने सांगून टाकलंत? आणि जिच्यापासून आयुष्यातली घोडचूक लपवलीत तिला सोडायला तयार झालात? त्या दोघी तुमचं प्रेम वाटून घेत असतील कारण तेवढं प्रेमही त्या तुमच्यावर करत नाहीत. जो बंधन स्वीकारतो तोच बांधू शकतो. त्यांना बंधन नकोय म्हणूनच त्या जबाबदारीही घ्यायला तयार नाहीत.’’

प्रेम ‘मी’ केलंय तुमच्यावर. यावेळी औषध दिलं नाही तुम्हाला. तुमचा दमा, खोकला, ताप, सगळं बघत ऐकत होते. किती रडले मी त्या काळात. तुमच्या खोकल्यानं माझा श्वास कोंडत होता.

बोलता बोलता सोनीचा कंठ दाटून आला. ‘‘मग मीही विचार केला की उगीचच घटस्फोट घेण्यात अर्थ नाही. मांडलेला संसार फुकाफुकी मोडायचा कशाला? चूक तुमची आहे, मी का म्हणून शिक्षा भोगू? सारा अन् रिता स्वत:च्या आयुष्याच्या स्वत: निर्मात्या आहेत. माझे आयुष्य तुमच्याभोवतीच फिरतंय. तुमची आवड, तुमचा आनंद, तुमचं कुटुंब, तुमचं समाधान म्हणजे तुम्ही अन् फक्त तुम्हीच! स्वत:चं असं काहीच माझ्या आयुष्यात उरलं नाहीए. इतकी मी तुमच्यात विरघळून गेले आहे. पण जेव्हा लक्षात आलं की तिघी तुमच्या दृष्टीनं सारख्याच आहेत. तेव्हा मी विचार केला आपणही तुमच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून बघूयात. नो ड्यूटीज, नो राइट्स! काही दिवसांसाठी मीही स्वत:चं आयुष्य स्वत:च्या कर्तबगारीवर, स्वत:च्या मर्जीनं जगून बघतेय. माझी आवड, माझी तृप्ती म्हणजे फक्त मी अन् मीच! फेसबुकवर शाळा कॉलेजातल्या मित्रमैत्रीणींचे ग्रुप मला मोहात पाडत होते. मी त्यांना जॉइन झाले आहे. उद्या त्यांच्यापैकी कुणाबरोबर माझे संबंध अधिक निकटचे झाले अन् ते तुम्हाला कळलं तर तुम्ही ओव्हररिएक्ट कराल की नाही ते मी ही बघेन!’’

रोहनचा चेहरा रागानं लाल झाला, ‘‘म्हणजे, तू मला…’’

‘‘माझं बोलणं अजून संपलं नाहीए.’’ रोहनला पूर्ण बोलू न देता तिनं म्हटलं, ‘‘आणि कुठे? दोघांपैकी केवळ एकासोबत राहणं त्यांना त्रासदायक होईल हे तुम्हीच ठरवून टाकलंत. पण खरी गोष्ट त्यांना समजली, तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार नाही केलात? आईवडिल मुलांचे रोल मॉडेल असतात. त्यांच्या त्या कल्पनेला धक्का लागला तर दोन गोष्टी घडतात. एक तर मुलं फ्रस्टे्रट होतात, डिप्रेस होतात नाही तर त्यांच्याच प्रमाणे वागू लागतात. तुमची करिअर माइंडेड मुलगी उद्या तुम्हाला म्हणाली की आईच्या आयुष्यापेक्षा मला स्वतंत्र, स्वावलंबी अन् मुक्त असं सारा किंवा रिताचं आयुष्यच आवडतं…मी नोकरी करेन पण लग्न न करता अमक्यातमक्या बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहीन तर तुम्हाला ते झेपेल का? किंवा तुमचा मुलगा सून न आणता…’’

रोहन खरोखर हादरला. हा विचार त्याच्या मनात आलाच नव्हता. फक्त आपलं निरपराधित्त्व सिद्ध करण्याच्या नादात तो हा पैलू विसरलाच होता. तरी त्याने संतापून विचारलं, ‘‘मला धमकी देते आहेस?’’

‘‘नाही. अजिबात नाही. फक्त जे आयुष्य तुम्ही जगताय त्याचे परिणाम सांगतेय. मी तुम्हाला विनवते आहे, आपला सुखाचा संसार उगाच अट्टहासापायी मोडू नका. जे घडलं ते तिथंच सोडायची तयारी असेल तर मी ही सर्व विसरायला तयार आहे. कारण माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा…सगळ्यात तुम्हीच आहात. मी तुमच्याहून वेगळी नाहीए. पण…जर त्यांना सोडणं तुम्हाला जमणार नसेल तर संसार मीही मोडणार नाही, पण उगीचच त्याला ठिगळं लावत बसायला मलाही जमणार नाही. स्वतंत्रपणे जगणं मला आवडतंय, जमंतही आहे. काय?’’

रोहनच्या हातावर थोपटून सोनीनं आपलं बोलणं पूर्ण झाल्याचं सूचित केलं आणि दिवा मालवून ती शांतपणे झोपून गेली. आता बॉल रोहनच्या कोर्टात होता. निर्णय त्याला घ्यायचा होता. नेहमीची वाक्पटुता आज कामी आली नव्हती…परिणामांचं गांभीर्य लक्षात आलं होतं.

पाठराखीण

कथा * सुधा काळेले

मुलगा अन् त्याच्या घरचे लोक पारुलताईंना बघायला येऊन गेले. त्यांच्या एकूण आविर्भावावरून ताई त्यांना पसंत नसाव्यात असं जाणवलं होतं. खरं तर ताईंना नाकारावं असं त्यांच्यात काहीच नव्हतं. उंच सडसडीत बांधा, उत्तम शिक्षण, चांगली नोकरी, आकर्षक नाक डोळे, फक्त रंग सावळा होता. ताई, स्वभावानेही नम्र, आनंदी अन् कुणाच्याही मदतीला धावून जाणाऱ्या होत्या. पण लग्न मात्र ठरत नव्हतं. ‘‘ठीक आहे. योग आला की पटकन् ठरेलच लग्न.’’ असं म्हणून जवळचे नातलग आईबाबांना धीर द्यायचे. पण ताई मात्र मिटून जायच्या. मनातल्या मनात खंतावत राहायच्या. त्यांचं वयही वाढत होतं.

या मे महिन्यात पारुल तीस वर्षांची होईल. वय वाढतं तसं स्थळ मिळणं अधिकच अवघड होईल. हाच एक विचार सतत आईबाबांची झोप उडवत होता.

आमची कुचंबणा बघून काही दुष्ट, विघ्नसंतोषी नातलगांनी, परिचितांनी जी काही स्थळं सुचवली ते बघून त्यांच्या वृत्तीची अन् बुद्धीची कीव करावीशी वाटली. कुणी तरी फीट्स येणाऱ्या मुलाचं तर कुणी तरी पैसे खाण्याच्या आरोपावरून बडतर्फ केलेल्या मुलाचंही स्थळ सुचवलं होतं. सावळा रंग आहे म्हणून काय वाट्टेल त्याला आम्ही आमच्या पारुलताई थोडीच देणार होतो?

माझे पती रवी पारुलताईंहून दोनच वर्षं लहान. ताईंचं लग्न लवकर ठरेना म्हणताना मग सासूसाऱ्यांनी म्हणजे आईबाबांनी रवीच्या लग्नाचा निर्णय घेतला. आमचा प्रेमविवाह होता. लग्न लवकर व्हावं ही माझ्या आईबाबांची घाई होती. ठरवून तरी किती दिवस ठेवायचं ना? शेवटी आमचं लग्न झालं.

रवी अन् पारुलताईंचं एकमेकांवर खूप माया होती. रवीने मला आधीच बजावलं होतं की पारुलताईला या घरात ती बिनलग्नाची मुलगी म्हणून ओझं वाटतेय असं कधी जाणवून द्यायचं नाही. कोणताही निर्णय प्रथम तिचं मत विचारायचं. मोठी बहीण, थोरली नणंद म्हणून तिचा योग्य तो मान राखला गेलाच पाहिजे. पारुलताई मला पहिल्या भेटीतच आवडल्या. मी माझ्या घरात आईवडिलांची एकटीच मुलगी होते. त्यामुळेच मला तर पारुलताईंच्या रूपात मोठी बहीणच मिळाली जणू. तीही माझ्यावर खूप माया करायची. माझं कोडकौतुक पुरवायची.

एकदा ऑफिसच्या टूरवर रवी गेले होते. रात्र बरीच झाली तरी पारुलताई आल्या नव्हत्या. मी आईबाबांना वेळेवर जेवायला घालून झोपायला पाठवलं होतं. मी मात्र अजून जागीच होते. मला काळजीही वाटत होती. तेवढ्यात कार फाटकाशी थांबल्याचा आवाज आला. मी खिडकीतून बघितलं, ताईच एका कारमधून उतरत होत्या. ड्रायव्हरसीटवर कुणी पुरुष होता. मला थोडं नवल वाटलं. एरवी ताईंना ऑफिसची कॅब सोडते घरी. आज कार कशी?

मला जागत असलेली बघून तिने विचारलं, ‘‘तू अजून जागीच आहेस?’’

‘‘तुमचीच वाट बघत होते. तुम्ही घरी परत येत नाही तोवर मला झोप येत नाही.’’

मी उत्तरले अन् शोधक नजरेने त्यांच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं, ‘‘जेवण गरम करू? जेवायचंय ना?’’

‘‘नको, आज ऑफिसात जेवण झालंय.’’ त्या म्हणाल्या. ‘‘दमलेय मी, झोपते आता. तूही झोप.’’

‘‘ताई गुड नाईट,’’ मी म्हटलं अन् माझ्या खोलीत आले.

पण झोप लागेना. काही तरी गडबड आहे. गेले काही दिवस ताई बैचेन वाटत होत्या. काही तरी मानसिक ताण किंवा दडपण आल्यासारखं जाणवत होतं. एरवी ऑफिसच्या अनेक गोष्टी त्या रवीसोबत, माझ्यासोबत शेअर करायच्या. पण असं ऑफिसातून इतक्या उशिरा येणं, कुणा पुरुषाबरोबर कारमधून येणं मला जरा खटकलं. त्यांना त्याच्याबरोबर लग्न करायचं असेल तर सगळं घर आनंदाने होकार देईल. त्यांच्या आनंदासाठी, त्यांनी निवडलेल्या, त्यांना आवडलेल्या कोणत्याही पुरुषाला आम्ही आपला म्हणू. पण त्या तसं काही सांगत नाहीएत. नाही का सांगेनात, मी शोधून काढल्याशिवाय राहाणार नाही. एकदा हे ठरवलं अन् मग मात्र मी गाढ झोपले.

सकाळी सहाला जाग आली तेव्हा पारुलताई ऑफिसला जायला आवरून तयार होत्या. मी आश्चर्याने विचारलं, ‘‘आज काय आहे, ताई? इतक्या लवकर?’’

‘‘अगं, एक मीटिंग आहे…महत्त्वाची आहे. आमचा ब्रेकफास्टही ऑफिसमध्येच होईल…चल मी निघते, मला उशीर होतोए..बाय…’’

मी काही म्हणणार त्याआधीच झपाट्याने ताई निघून गेल्या. मी त्यांच्या मागे जातोए तोवर त्या, त्या कालच्याच गाडीने फुर्रकन गेल्यासुद्धा!

मला आजही त्या ड्रायव्हरचा चेहरा दिसला नाही. मला शंका आली, ताई कुणा लफंग्याच्या जाळ्यात अडकल्या आहेत. शिवाय तो पुरुष विवाहितही असावा. मला शोध घ्यायलाच हवा. पण ताईंच्या अन् घरच्यांच्याही नकळत. ताईंचा अपमान व्हायला नको.

रात्री पुन्हा तीच गाडी ताईंना सोडायला आली. यावेळी मात्र मला ड्रायव्हरचा चेहरा थोडासा दिसला. कारण मी अगदी टपून अन् लपून बसले होते. आईबाबा आज हॉलमध्येच बसलेले होते. त्यांनी जेव्हा उशिरा येण्याचं कारण विचारलं तेव्हा थकलेल्या आवाजात त्या म्हणाल्या, ‘‘मीटिंग होती ऑफिसात, सकाळपासूनच कामं होती. दमलेय मी. झोपते आता.’’ ताई खोलीत निघून गेल्या.

‘‘काय झालंय या पोरीला कुणास ठाऊक? उशिरा येते, जेवत नाही, सोड म्हणावं ही अशी नोकरी. आम्हाला नकोय तिचा पैसा. धड झोप नाही, धड जेवण नाही, कशाला हवी असली नोकरी?’’ आई चिडून बडबड करायला लागल्या. मी त्यांना गोड बोलून शांत केलं. ‘‘मी ताईंना जेवायला लावते,’’ असं सांगून झोपायला पाठवलं.

मी जेवणाचं ताट घेऊन ताईंच्या खोलीत गेले. त्या फोनवर कुणाशी तरी बोलत होत्या. थोड्या त्रासलेल्या अन् चिडचिडलेल्या आवाजात बोलत होत्या. मला बघताच त्यांनी पटकन् फोन बंद केला. मी आग्रह केल्यावर हात धुऊन त्या जेवायला लागल्या. पण त्यांच्या आवडीचा स्वयंपाक असूनही त्या जेमतेम खात होत्या. धड माझ्याकडे बघितलंही नाही. मी त्यावेळी काहीच बोलले नाही. त्यांनी हात धुताच मी ताट उचलून खोलीबाहेर पडले.

दोन दिवसांनी रवी परत येणार होते. मी आईंना म्हटलं, ‘‘जरा एका मैत्रिणीला भेटून येते.’’ अन् मी घराबाहेर पडले. मी सरळ ताईंच्या ऑफिसात जाऊन थडकले. त्या जरा घाबरल्याच, घरी काही विपरीत घडलंय का? मला ऑफिसमध्ये का यावं लागलं?

मी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होते. हसून म्हटलं, ‘‘विशेष काहीच नाही. या भागात एका मैत्रिणीकडे आले होते, म्हटलं डोकावून जावं तुमच्याकडे. हल्ली तर तुम्ही ऑफिसच्या मीटिंग्जमुळे आमच्या वाट्यालाच येत नाही म्हटलं, इथेच तुमच्याशी थोडं भेटून बोलून घरी जावं.’’

‘‘इथे?’’ त्या घाबरून बोलल्या.

‘‘नाही तर असं करा ना, आज ऑफिसमधून रजाच घ्या ना,?थोडं भटकून घरीच जाऊ.’’

‘‘नाही ग! बॉस रजा देणार नाहीत. कामं फार आहेत.’’

‘‘विचारून तर बघा, कदाचित हो म्हणतीलही.’’

‘‘बघते विचारून…’’ नाइलाजाने त्या उठून बॉसच्या केबिनकडे गेल्या.

ताई केबिनमधून बाहेर आल्या तेव्हा तो बॉसदेखील त्यांच्यासोबत बाहेर आला. ‘‘अरेच्चा? हा तर तोच माणूस आहे जो ताईंना सोडायला अन् घ्यायला येतो.’’

माझ्या मेंदूने नोंद घेतली. ताईंना सुट्टी मिळाली होती. पण बॉसने त्यांना बाहेरपर्यंत सोडायला येणं मला काही रूचलं नाही. मी मुद्दाम बॉस समोर म्हटलं, ‘‘ऐट आहे ताई तुमची…दस्तुरखुद्द बॉस तुम्हाला सोडायला येतात… ऑफिसच्या इतर मुली जळत असतील तुमच्यावर…खरं ना?’’

ताई काही बोलल्या नाहीत. फक्त उदास हसल्या. आम्ही थोडं भटकलो. काही बारीकसारीक खरेदी करून घरी पोहोचलो. ताई लवकर आल्याने आईबाबांनाही खूप आनंद झाला.

रात्रीची जेवणं झाली. सगळे आपापल्या खोल्यांमधून झोपायला गेले. मी हॉलमध्येच एक नवी आणलेली कादंबरी वाचत बसले होते. मला ताईच्या खोलीतून काही आवाज ऐकू आला. मी धावत तिकडे गेले. खोलीचं दार आतून बंद नव्हतं. मी बघितलं, ताई खोलीतल्या बाथरूमच्या वॉशबेसिनवर ओणवलेल्या होत्या. त्यांना ओकारी झाली होती. मी पटकन् पाण्याचा ग्लास त्यांच्यापुढे धरला. चुळा भरून त्या पलंगावर येऊन बसल्या. मी वॉशबेसिनचा नळ सोडून वॉशबेसिन स्वच्छ केलं अन् त्यांच्याजवळ येऊन बसले.

‘‘काय झालं, ताई? अजीर्ण होण्यासारखं तर आपल्या घरात जेवण नसतं. तुम्हाला त्रास का झाला? अन् बोलता बोलता मला एकदम शंका आली.

‘‘ताई, तुमचा बॉस. खरं सांगा ताई, तुमची चिडचिड, तुमची काळजी, ताण त्या बॉसचंच हे काम आहे ना? मला खरं खरं सांगा. मी यातून मार्ग काढेन. कुणाला काहीही कळू देणार नाही, फक्त मला विश्वासात घेऊन खरं खरं सांगा.’’

माझा आधार देणारा प्रेमळ स्पर्श अन् माझं आश्वासन यामुळे त्या एकदम मला मिठी मारून हमसून हमसून रडू लागल्या. मी आधी तर त्यांना मनमोकळं होईतो रडू दिलं. ताईंना दिवस गेले होते…पण निदान अॅबॉर्शन करता येईल इतपत तरी परिस्थिती असायला हवी. मला माझी डॉक्टर मैत्रीण आठवली. तिची मदत घेता येईल.

ताई थोड्या सावरल्या. त्यांनी हळूहळू सांगायला सुरूवात केली. ‘‘हे बॉस नव्यानेच ट्रान्सफर होऊन आमच्या ऑफिसला आले. आल्या आल्याच त्यांनी माझ्यात इण्टरेस्ट घ्यायला सुरुवात केली. बोलताना म्हणाले, दोनतीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला आहे. मूलबाळ नाही. घरातला एकांत, एकटेपणा खायला उठतो. मी त्यांच्या आयुष्यात सहचरीची भूमिका घेऊ शकेन का? माझ्या मनात आलं, आपणही तिशीच्या आहोत, लग्न करून घरसंसार थाटायचं आपल्याही मनात आहे, तेव्हा हा शिकलेला, कमावता, चांगला माणूस आहे, त्याला हो म्हणायला काय हरकत आहे? मी त्यांना होकार दिला व घरी येऊन त्यांनी माझ्या आईबाबांना भेटावं असंही सांगितलं. ते म्हणाले, ठीक आहे. मी लवकरच येऊन भेटतो. मला खूप आनंद झाला. दाखवण्याच्या वगैरे भानगडीशिवाय लग्न ठरत होतं. आईबाबा तुम्ही दोघं सगळ्यांनाच किती आनंद होईल. या स्वप्नांत मी दंग होते. त्यांनी एक दिवस मला म्हटलं, ‘‘तूही आधी माझं घर बघून घे. चहाला ये.’’ मी अगदी नि:शंकपणे त्यांच्या घरी गेले. तिथे त्यांचा सभ्यपणाचा मुखवटा गळून पडला. त्यांनी माझ्यावर चक्क बलात्कार केला. मी घाबरून बेशुद्धच पडले. शुद्धीवर आल्यावर काय घडलंय ते मला कळलं. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मी या गोष्टीची वाच्यता कुठेही करू नये. कारण त्यांच्या कॅमेऱ्यात माझे अश्लील फोटो आहेत. कुठल्याही क्षणी ते त्यांचा वापर करून मला आयुष्यातून उठवू शकतात. मी मुकाट्याने घरी आले. त्यानंतर मला कळलं की त्यांचं लग्न झालेलं आहे. पत्नी हयात आहे व दोन मुलंही आहेत. पण त्या फोटोंच्या धमकीवर ते अजूनही मला ब्लॅकमेल करताहेत. मी काय करू? कशी मी फसले. त्यांच्या बोलण्यावर भाळले अन् एकटीच त्यांच्या घरी गेले. आता मी काय करू? आईबाबांना काय वाटेल?’’ ताई पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागल्या.

मी त्यांना मिठीत घेतलं. धीर देत म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही शांत व्हा. अजिबात काळजी करू नका. प्रथम आपण माझ्या डॉक्टर मैत्रिणीकडे जाऊ. ती तुम्हाला या संकटातून मोकळं करेल. त्यानंतर तुमच्या बॉसला मी बघते. तुमची खरं तर काहीच चूक नाहीए. तुम्ही सज्जन, भीरू आहात म्हणूनच त्याने तुमचा गैरफायदा घेतला. पण मी त्याचे दात त्याच्याच घशात घातल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. ही गोष्ट फक्त तुमच्या माझ्यातच असेल. रवी, आई किंवा बाबा कुणालाही काहीही कळू द्यायचं नाही. आता तुम्ही शांतचित्ताने झोपा.’’

दिवा मालवून, त्यांना निजवून मीही झोपले. अगदी गाढ झोपले. सुदैवाने रवी टूरवरून परतले नव्हते. अन् आईबाबांची खोली अगदी शेवटी असल्याने त्यांना काहीच कळलं नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मी अन् ताई एकत्रच घराबाहेर पडलो. मैत्रिणीकडे गेलो. तिने तपासलं अन् म्हणाली, ‘‘फारच वेळेत आलात, अजून आठ दिवस गेले असते तर कठीण झालं असतं,’’ मी आनंदाने मैत्रिणीला मिठीच मारली.

ती म्हणाली, ‘‘अगं अशा अनेक मुली येतात माझ्याकडे, फसवल्या गेलेल्या, बलात्कार झालेल्या, मी त्यांना मोकळं करते. त्यांना समजावते, धीर देते. यामुळे जपून अन् सावधपणे राहायचं आणि पूर्ण आत्मविश्वासानेच वावरायचं. स्वत:ला अपराधी समजू नका. लोकांना घाबरू नका, समाजापासून तोंड लपवू नका अन् त्या अपराध्याला शासन करता आल्यास तसंही करा. नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी.’’

ताईंचं अॅबॉर्शन अगदी व्यवस्थित झालं. आम्ही दोघी रिक्षाने घरी आलो अन् मी आईंना सांगितलं, ताईंना ऑफिसातच घेरी आली. त्यांनी मला मैत्रिणीकडून बोलावून घेतलं. मी सरळ त्यांच्या ऑफिसमधून त्यांना घेऊन माझ्या डॉक्टर मैत्रिणीकडे गेले. तिने तपासून सांगितलं, अॅनिमिया आहे. औषधं, फळं अन् विश्रांती घेऊन बरं वाटेल. काळजीचं कारण नाहीए.

आई म्हणाल्या, ‘‘मी तर सतत सांगते, नीट जेवत जा, झोपता जा, सारखं आपलं काम, काम! बरं झालं आता आठ दिवस विश्रांती घ्यावी लागतेय, तेवढा तरी जिवाला आराम.’’

आठ दिवसांतच ताई खडखडीत बऱ्या झाल्या. मला मिठी मारून म्हणाल्या, ‘‘मोठ्या संकटातून तू मला सोडवलंस…कसे तुझे उपकार फेडू?’’

मी हसून म्हटलं, ‘‘उपकाराचा प्रश्नच नाही येत. अजून तर बघा, काय काय घडणार आहे…’’

मग आम्ही बॉसच्या बायकोला जाऊन भेटलो. त्यांना बॉस ताईला त्रास देतात, ब्लॅकमेल करायला बघतात वगैरे सांगितलं. अॅबॉर्शनचा विषय आम्ही पूर्णपणे टाळला. पण त्याने बायको हयात नाही, मूळबाळ नाही वगैरे सांगून लग्नाची मागणी घातल्याचंही सांगितलं. ती बिचारी अवाक् झाली. काही वेळाने म्हणाली, ‘‘या माणसाने इथेही हेच धंदे सुरू केलेत. कशीबशी आम्ही लखनौहून ट्रान्सफर घेतली होती. निदान नव्या ठिकाणी तरी हा चांगला वागेल अशी आशा होती. पण आता मी त्यांना क्षमा करणार नाही. चला, सरळ पोलिसात जाऊया. धडा शिकवायलाच हवाय त्यांना.’’

त्यांचे आभार मानून, त्यांच्या धाडसाचं कौतुक करून आम्ही त्यांच्यासह पोलीस चौकीत गेलो. तिथे रीतसर तक्रार नोंदवून पोलीस कुमुक घेऊन ऑफिसात पोहोचलो.

आम्हाला, पत्नीला अन् पोलिसांना बधून बॉसचा चेहरा पांढराफटक पडला. ऑफिसातही लोक चक्रावून गेले. तेवढ्यात ऑफिसातली अजून एक मुलगी म्हणाली की, त्याने तिलाही त्रास दिलाय. पोलिसांनी सरळ त्याला अरेस्ट केलं.

घरी आलो तोवर रवी आले होते. त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की ताईंना व इतर मुलींनाही बॉस त्रास देत होता म्हणून त्याला धडा शिकवलाय.

आईबाबांना सुनेचा फारच अभिमान वाटला. रवीही म्हणाले, ‘‘तुझ्यासारखी चतुर व धाडसी मुलगी मी बायको म्हणून निवडली याचा मलाच फार अभिमान वाटतोय.’’

आम्ही दोघी, मी अन् ताई एकमेकींकडे बघून फक्त हसलो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें