* रीना जैसवार

पावसाळा म्हणजे रखरखते ऊन आणि अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या गरमीपासून सुटका करणारे सुंदर वातावरण. अशा वातावरणात आपल्याला खायला आणि फिरायला खूप आवडते. परंतु हा मौसम स्वत:सोबत अनेक प्रकारचे आजार घेऊन येतो, ज्यामुळे रंगाचा बेरंग होतो. पावसाळयात बहुतेक आजार दूषित पाणी प्यायल्यामुळे आणि डास चावल्यामुळे होतात.

मुंबईतील जनरल फिजीशियन डॉ. गोपाल नेने यांनी सांगितले की, असे कितीतरी आजार आहेत, जे प्रामुख्याने पावसाळयात निष्काळजीपणामुळे होतात आणि सुरुवातीच्या काळात लक्षणांचे निदान न झाल्यास गंभीर रूप धारण करतात. हे आजार खालीलप्रमाणे आहेत :

इन्फ्लूएं : पावसाळयात इन्फ्लुएंझ म्हणजे सर्दी-खोकला होतोच. हा एक संसर्गजन्य आजार आहे, जिथे हवेतील विषाणू श्वासोच्छाद्वारे शरीरात गेल्यामुळे आजार पसरतो आणि आपल्या श्वसन प्रणालीस संक्रमित करतो, ज्याचा विशेषत: नाक आणि घशावर परिणाम होतो. नाक वाहणे, घशात जळजळ, अंगदुखी, ताप इत्यादी याची लक्षणे आहेत. इन्फ्लूएंझ झाल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

खबरदारी : सर्दीखोकल्यापासून वाचण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे नियमित संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. जो शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा विकसित करुन प्रतिकारक शक्ती वाढवतो.

संसर्गजन्य ताप : वातवरणात अचानक झालेल्या बदलामुळे थकवा, थंडी, अंगदुखी आणि ताप येणे याला संसर्गजन्य ताप म्हणतात. हा ताप एक संसर्गजन्य आजार आहे, जो संक्रमित हवा किंवा संक्रमित शारीरिक स्रावाच्या संपर्कात आल्याने होतो. संसर्गजन्य ताप सामान्यत: ३ ते ७ दिवसांपर्यंत टिकून राहतो. तो सर्वसाधारणपणे आपणहून बरा होतो, परंतु दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास औषधे घेणे आवश्यक असते.

खबरदारी : संसर्गजन्य तापापासून वाचण्यासाठी पावसात भिजू नका आणि ओल्या कपडयांमध्ये जास्त काळ राहू नका. हातांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.

डासांमुळे होणारे आजार

मलेरिया : डॉ. नेने यांच्या म्हणण्यानुसार, पावसाळयात होणाऱ्या आजारांपैकी एक म्हणजे मलेरिया. गलिच्छ पाण्यात जन्मलेल्या अॅनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया होतो. पावसात पाणी साचणे ही एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असते. ताप, अंगदुखी, सर्दी, उलट्या होणे, घाम येणे इत्यादी याची लक्षणे आहेत. वेळेवर उपचार न केल्यास कावीळ, अशक्तपणा, सोबतच यकृत आणि मूत्रपिंड निकामी होणे अशा प्रकारची गुंतागुंत वाढू शकते.

खबरदारी : जेथे मच्छर आहेत अशा परिसरात राहणाऱ्यांनी सुरुवातीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अॅण्टिमेलेरियल औषधे घ्यावती. डासांचा त्रास टाळण्यासाठी मिळणारे क्रीम आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करा. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराभोवती घाणेरेडे पाणी जमा होऊ देऊ नका..

डेंग्यू : डेंग्यू ताप हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. तो मुख्यत: काळया आणि पांढऱ्या पट्टे असलेल्या डासांच्या चाव्यामुळे होतो, जे सामान्यत: सकाळी चावतात. डेंग्यूला ‘ब्रेक बोन फीवर’ असेही म्हणतात.

स्नायू आणि सांध्यातील वेदना व सूज, डोकेदुखी, ताप, थकवा इत्यादी डेंग्यूची लक्षणे आहेत. डेंग्यूचा ताप वाढल्यास ओटीपोटात वेदना, रक्तस्त्राव तसेच रक्ताभिसरणही बिघडू शकते.

महत्त्वाचे म्हणजे डेंग्यूच्या उपचारासाठी कोणतीही विशिष्ट अँटिबायोटिक्स किंवा अँटिव्हायरल औषधे नाहीत. अशा परिस्थितीत, प्रारंभिक लक्षणे ओळखून उपचार करणे योग्य ठरते. जास्तीत जास्त आराम आणि द्र्रवपदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. या आजारात होणारी डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या.

खबरदारी : डेंग्यू हा डासांमुळे होणारा संक्रमित आजार आहे. डास चावण्यापासून वाचण्यासाठी अँटी-क्रीम वापरा. बाहेर पडताना संपूर्ण शरीर कपडयांनी झाकून घ्या. डेंग्यूचा डास हा दिवसा चावतो.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

टायफाइड : डॉ. नेने यांच्या म्हणण्यानुसार टायफाइड साल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेतून, दूषित पाणी किंवा दूषित अन्नाचे सेवन केल्यामुळे हा आजार होतो. रक्त आणि हाडांच्या चाचणीद्वारे यावर उपचार केले जातात. दीर्घकाळपर्यंत ताप, डोकेदुखी, उलटया होणे, पोटदुखी इत्यादी टायफाइडची सामान्य लक्षणे आहेत. या आजाराचा सर्वात वाईट दुष्परिणाम म्हणजे रुग्ण बरा झाल्यावरही संक्रमण रुग्णाच्या मूत्राशयातच राहते.

खबरदारी : स्वच्छ अन्न, पाणी, घराची स्वच्छता यासोबतच हातपाय स्वच्छ ठेवून आपण या आजारापासून वाचू शकतो. टायफाइडच्या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे.

हिपॅटायटीस ए : हा पावसाळयात होणारा यकृताचा एक गंभीर आजार आहे. हिपॅटायटीस ए हे सर्वसाधारणपणे व्हायरल संक्रक्त्रमण आहे, जे दूषित पाणी आणि मानवाच्या संक्रमित स्रावाच्या संपर्कात आल्यामुळे होते. हा आजार जास्तकरून माशांच्या माध्यमातून पसरतो. याशिवाय संक्रमित फळे, भाज्या किंवा इतर पदार्थ खाल्ल्यानेही होतो. याचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होतो, ज्यामुळे तेथे सूज येते. कावीळ, पोटदुखी, भूक न लागणे, मळमळ, ताप, अतिसार, थकवा यासारखी याची अनेक लक्षणे आहेत. याचे निदान करण्यासाठी रक्ताची तपासणी केली जाते.

खबरदारी : या अजारापासून वाचण्यासाठी यकृताला आराम आणि औषधोपचारांची आवश्यकता असते. याशिवाय स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे हा एक चांगला मार्ग आहे. अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी लस उपलब्ध आहे.

अॅक्युट गॅस्ट्रोएन्टेरिटिस : पावसाच्या मौसमात गॅस्ट्रोआर्टेरिटिस किंवा अन्न विषबाधा होऊ शकते. वातावरणातील ओलाव्यामुळे या आजारास कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया वेगाने वाढतात. पोटाची जळजळ, मळमळ, उलट्या आणि अतिसार इत्यादी गॅस्ट्रोटायटिसची लक्षणे आहेत. सतत ताप आणि अतिसारामुळे अस्वस्थता आणि अशक्तपणा येतो. हे टाळण्यासाठी स्वत:ला शक्य तितके हायड्रेट करा.

भात, दही, फळे जसे की, केळी, सफरचंद खा. पेज आणि नारळाचे पाणी हायड्रेशनसाठी उपयुक्त ठरते ताप आणि निर्जलीकरणाच्या उपचारांसाठी ओआरएस पाणी आवश्यक आहे. परिस्थिती पाहून डॉक्टरांचा सल्ला घ्या.

खबरदारी : पावसाळयात कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले म्हणजे सॅलड खाणे टाळा. पावसात बाहेर काहीही खाऊ नका.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...