* शैलेंद्र सिंह द्य

मेघा आणि सचिन दोघेही खासगी कंपनीत नोकरी करतात. दोघेही दररोज जवळपास एकाच वेळेला घरातून निघतात. त्यांचे खणेपिणेही व्यवस्थित होत नसे. त्यांच्या स्वयंपाकघरात जेवण बनविण्याचे सामान कमी आणि जेवण ऑनलाईन घरपोच करणाऱ्या साईट्सचे फोन नंबरच जास्त लिहून ठेवलेले होते. तोंडाची चव बदलावी यासाठी ते वेगवेगळया साईट्सवरून जेवण मागवित असत. त्यांना वीकेंड म्हणजेच आठवडयाची सुट्टी सर्वात आनंददायी वाटत असे. शनिवार आणि रविवार त्यांच्या जीवनात सर्वात मोठा आंनद घेऊन येत असत.

मेघा सांगते, शनिवारी सकाळी उशिरापर्यंत झोपायची संधी म्हणजे जीवनातील सर्व सुख मिळाल्यासारखे वाटत असे. वीकेंडलाच आम्ही घरात आवडीचे जेवण बनवित असू.

शालिनी आणि रमेश दोघेही आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करीत होते. नुकतेच दोघांचे लग्न झाले होते. वय झाल्यानंतर त्यांनी लग्न केले होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला वर्ष झाल्यानंतर घरच्यांची इच्छा होती की, त्यांना लवकर मूल व्हावे, अन्यथा पुढे जाऊन मूल होणे अवघड होईल. घरच्या मंडळींचा दबाव वाढतच होता. त्यामुळे शेवटी दोघे डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी पतीपत्नीच्या नोकरीसाठी लागणाऱ्या वेळेबाबत माहिती करून घेतली. दोघे एकमेकांसोबत किती वेळ घालवतात, हे समजून घेतले. तणावमुक्त होऊन काही वीकेंड सोबत राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वागल्यानंतर काहीच दिवसांनी बाळाची चाहूल त्यांना लागली.

कोरोना काळातील ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘क्वारंटाईन’ यामुळे शनिवार, रविवारच्या सुट्टीतील मौजमजा संपली आहे. घरातील तणाव वाढू लागला आहे. लोकांमध्ये मानसिक आजार वाढू लागले आहेत. जे लोक वीकेंड आणि सुट्टयांची वाट बघायचे आज तेच लॉकडाऊन संपून कामावर कधी जाता येईल, याची वाट बघत आहेत. आता घरात राहणे त्यांच्यासाठी कैदेत राहण्यासारखे झाले आहे. कुटुंबात आपापसातील तणाव वाढत आहे. एकत्र कुटुंबाला हा प्रश्न जास्तच भेडसावत आहे. त्रिकोणी कुटुंबातील समस्याही वाढत आहेत.

वीकेंडची क्रे

वीकेंड म्हणजे शनिवार आणि रविवारच्या सुट्टीची क्रेझ काही वर्षांपूर्वीपर्यंत मोठया प्रमाणावर होती. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा वीकेंड तयार करून एखाद्या पॅकेजप्रमाणे ते कर्मचाऱ्यांना देण्यात आले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या या पॅकेजकडे सुरुवातीला देशी कंपनीतील कामगार आशाळभूत नजरेने पाहत असत. आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची चांगली काळजी घेतात, असे त्यांना वाटत असे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही वीकेंडच्या या क्रेझला अशा प्रकारे सादर केले होते की, पगारापेक्षा याचीच जास्त भुरळ कर्मचाऱ्यांना पडली होती. नव्यानेच जेव्हा लोक आंतरराष्ट्रीय कंपनीत रुजू व्हायचे तेव्हा आपल्या जुन्या कंपनीतील सहकाऱ्यांना अभिमानाने सांगायचे की, आमच्याकडे ‘पाच दिवसांचा आठवडा’ असतो. २ दिवसांच्या सुट्टीमुळे वीकेंड आरामात घालवता येतो.

राहिली नाही क्रे

देशी कंपन्यांमध्ये जिथे केवळ रविवारी सुट्टी असते तेथील कर्मचारी तिरस्काराने वीकेंड साजरा करणाऱ्यांकडे पाहायचे. त्यानंतर वीकेंडची ही पद्धत हळूहळू चांगलीच प्रचलित होऊ लागली. देशी कंपन्यांनीही स्वत:ला आंतरराष्ट्रीय असल्यासारखे भासविण्यासाठी वीकेंडची पद्धत सुरू केली. देशी कंपन्या या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये देण्यात येणाऱ्या पगाराशी स्पर्धा करत नव्हत्या, पण तेथे देण्यात येणाऱ्या वीकेंडशी मात्र स्पर्धा करू लागल्या. एक अतिरिक्त सुट्टी देण्यात येणार असल्यामुळे ‘वर्किंग हवर’ म्हणजे इतर दिवसांतील कामाचे तास वाढविण्यात आले. आधी साडेनऊ ते साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे कर्मचाऱ्यांना ८ तास काम करावे लागत होते.

कोरोनाने संपवली क्रे

जेव्हा एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळते तेव्हा ती नुकसानदायी ठरते. अशीच काहीशी अवस्था वीकेंडची झाली. कोरोनामुळे २०२० च्या मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत संपूर्ण देशात सुरुवातीला ३ महिन्यांचे लॉकडाऊन जाहीर झाले. त्यानंतर वीकेंड लॉकडाऊन सुरू झाले. कार्यालये आणि इतर कार्यक्षेत्रे बंद झाली. लोकांवर घरातून काम करण्याची वेळ आली. अर्थात घरातूनच ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले. यामुळे नोकरदार महिलांना जास्त त्रास होऊ लागला, कारण पतीचे ऑफिस आणि मुलांची शाळाही घरातूनच ऑनलाईन सुरू झाली. त्यामुळे एकाच घरात आणि एकाच छताखाली राहूनही एकमेकांशी बोलण्यासाठी आवश्यक असलेला वेळ मिळेनासा झाला.

पूर्वीसारखे काहीच नाही

आकांक्षा जैन यांनी सांगितले की, ‘‘ऑफिसमधून काम करण्याचा असा फायदा होता की, घरी आल्यानंतर जो वेळ शिल्लक राहायचा त्या वेळेत कुटुंबासोबत गप्पा मारता येत होत्या. आता वर्क फ्रॉम होममुळे घरच्यांच्या जवळ असूनही त्यांच्याशी बोलायला वेळ मिळत नाही. ३-४ तास फक्त झूम मीटिंगमध्ये जातात. घर छोटे असल्यास आणि त्या घरातील तिघे वर्क फ्रॉम होम करीत असल्यास त्यांच्यासाठी काम करणे अवघड होऊ लागले. जागा कमी पडू लागली. मीटिंगशिवायही इतर अनेक कामे करावी लागतात. आंतरराष्ट्रीय कंपन्या तर रात्रीही काम करायला सांगतात, जे एक प्रकारे त्रासदायक ठरते. ऑफिसमध्ये ७-८ तास काम करण्यासाठी जे वातावरण आणि सुविधा मिळायची ती घरी मिळू शकत नाही.’’

शनिवार, रविवार मिळत नसल्यामुळे नकारात्मक परिणाम

ऑनलाईन प्रोफेशनल नेटवर्क लिंकेडीनच्या एका सर्वेक्षणात असे निदर्शनास आले आहे की, जवळपास ५० टक्के नोकरदार महिलांना कोरोनामुळे जास्त दडपण आल्यासारखे वाटते. केवळ शारीरिक श्रमामुळेच नाही तर भावनात्मकरित्याही त्रासल्यासारखे त्यांना वाटत आहे. या सर्वेक्षणातील ४७ टक्के महिला आणि ३८ टक्के पुरुषांनी हे मान्य केले. 27 जुलैपासून २३ ऑगस्ट 2020 च्या दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. यात २५००हून अधिक व्यावसायिकांशी संवाद साधण्यात आला. सर्वेक्षणात नोकरदार माता आणि नोकरदार महिला दोघांचाही समावेश करण्यात आला होता. नोकरदार मातांनी असे सांगितले की, मुलांकडे व्यवस्थित लक्ष देणे, हे कोरोना काळातील सर्वात मोठे आव्हान ठरले.

महिला व पुरुषांच्या वेगवेगळया दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर असे निदर्शनास आले की, ३१ टक्के महिलांना संपूर्ण दिवस मुलांना सांभाळावे लागले. आधी शाळा आणि ऑफिस असल्यामुळे दोघांचा बराचसा वेळ तिथेच जायचा. केवळ १७ टक्के पुरुषांनीच मुलांना सांभाळण्यासाठी बायकोला मदत केली. मुलांना सांभाळण्यासाठी कामावरील दिवसभराच्या तासांपेक्षाही बराच जास्त वेळ काम करावे लागले, असे ४४ टक्के महिलांनी तसेच २५ टक्के पुरुषांनी मान्य केले. मुलांना सांभाळण्यासाठी कुटुंबातील सदस्यांवर किंवा मित्र-मैत्रिणींवर अवलंबून रहावे लागले, असे २० टक्के महिलांनी मान्य केले. याचप्रमाणे मुलांना सांभाळण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागले असे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३२ टक्के पुरुषांनी मान्य केले.

वर्क फ्रॉम होममुळे वाढले कामाचे तास

वर्क फ्रॉम होम करताना शनिवार आणि रविवारसह कामाचे एकूण तास वाढले. ४६ टक्के महिलांनी हे मान्य केले की, कामावरचे काम घरात करताना ते जास्त वेळ करावे लागते. जास्त काम करूनही कामाचा दर्जा मात्र तितकासा चांगला नसतो. ४२ टक्के महिलांनी मान्य केले की, मुले घरी असल्यामुळे त्या ऑफिसच्या कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे आता शनिवार आणि रविवारच्या सुट्टीची तितकीशी क्रेझ राहिलेली नाही. उलट त्या तणावाचे कारण ठरत आहेत. कधी ही दीर्घ सुट्टी संपेल आणि कामावर जाऊन काम करता येईल, याची त्या वाट पाहत आहेत.

आकांक्षा जैन यांनी सांगितले की, आम्हाला आठवडयातील २ दिवस ऑफिसला जायला सांगितले आहे. आता मला तेच २ दिवस वीकेंडसारखे वाटू लागले आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीची आता कोणतीच क्रेझ उरलेली नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...