कथा * अर्चना पाटील

रिया आणि आशिषचा विवाह खूपच थाटामाटात पार पडला होता. आशिष आपल्या बेडरूममध्ये उत्साहाने दाखल झाला, पण रियाची स्थिती पाहून आशिष काळजीत पडला. रिया खिडकीतून बाहेर पाहात होती, पण तिचे पाणावलेले डोळे आशिषच्या नजरेतून सुटले नाहीत. आशिषने विचारले, ‘‘तू या लग्नामुळे खूश नाहीस का? पाठवणी करून चार तास उलटले, तरीही तू रडतेस.’’ रियाने मान झुकवली. ‘‘असं काही नाहीए, सहजच डोळ्यात पाणी आले,’’ रियाने उत्तर दिले.

आशिषने रियाच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून तिला आश्वासित केले, ‘‘तू आजपासून अग्निहोत्री घराण्याची सून आहेस आणि माझी बायको आहेस. तू विचार करण्याआधीच तुझ्या गरजा पूर्ण केल्या जातील. जस्ट रिलॅक्स बेबी. आता शांतपणे झोप. उद्या बोलू.’’

दुसऱ्या दिवशी घरात पूजा होती. सर्वजण रियाच्या मागे-पुढे करत होते, पण रियाचं लक्ष दुसरीकडेच होतं. पूजेच्या वेळी तिला पुन्हा-पुन्हा हटकले जात होते. संपूर्ण दिवस ती अबोलच होती. आशिष तिच्या वागण्यामुळे काळजीत पडला होता. रात्रीच्या वेळी आशिष बेडरूममध्ये आला. रिया आरशासमोर बसली होती. आशिष तिच्या मागे उभा राहून तिच्या सौंदर्याची स्तुती करू लागला. आशिष रियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण रियाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. ‘‘काय प्रॉब्लेम आहे? मी तुझ्याशी बोलतोय आणि तू दुसराच विचार करतेस.’’ आशिष वरच्या आवाजात ओरडू लागला. रिया आशिषच्या अशा वागण्याने घाबरली आणि तशीच बसून राहिली. आशिष रात्री बारा वाजता पायीच बंगल्याबाहेर निघून गेला.

तिसऱ्या दिवशी रियाचा भाऊ आणि तिच्या माहेरहून एक नोकर संतोष रियाला भेटायला आले. संतोषने गुपचूप रियाला एक पाकीट बेडरूममध्ये जाऊन दिले. रियाने भाऊ सासरहून निघून जाताच पाकीट उघडले आणि अधीरपणे त्यात ठेवलेल्या तिच्या प्रियकर सारंगच्या चिठ्ठ्या वाचू लागली. रिया चिठ्ठ्या वाचत होती आणि बेडच्या खाली टाकत होती. इतक्यात आशिष खोलीत आला. आशिषने एक चिठ्ठी उचलली आणि वाचू लागला. आशिषच्या सर्व हकिकत लक्षात आली. आशिष केव्हा खोलीत आला, हे रियाला कळलेच नाही, पण आशिषला चिठ्ठी वाचताना पाहून ती घाबरली. आशिषने रागाने चार गोष्टी सुनावून रियाला घरातून निघून जायला सांगितले. रियाजवळ काहीही उत्तर नव्हते. रियाला आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आशिषच्या भावनांशी खेळण्याचा तिला काहीही अधिकार नव्हता. रियाने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. आता पुढे काय होणार, या विचाराने ती घाबरली आणि रडू लागली. आता माहेरीही तिला कोणीही स्वीकारणार नाही ही गोष्ट रियाला माहीत होती.

रात्रीचे ९ वाजले होते. रिया आतुरतेने आशिषची वाट पाहात होती. तिला त्याची माफी मागायची इच्छा होती. खिडकीतून तिचे डोळे आशिषला शोधत होते. इतक्यात, एक गाडी बंगल्यासमोर उभी राहिली. आशिषचे मित्र त्याला घरात आणत होते. आशिषच्या एका हाताला फ्रॅक्चर होते आणि तो उभाही राहू शकत नव्हता. आशिषचे मित्र त्याला बेडरूममध्ये घेऊन आले. कुटुंबातील सर्व लोक खोलीत जमा झाले.

‘‘काय झालं माझ्या मुलाला? कोणीतरी सांगा, मला भीती वाटतेय,’’ रियाची सासू आशिषच्या मित्रांना विचारत होती.

‘‘काही नाही आई, बस्स एक छोटेसं अॅक्सिडंट झालंय. आपल्या मुलाचं नवीननवीन लग्न झालंय, होतं असं कधी-कधी बायकोच्या आठवणीने. आता या निमित्ताने या दोघांना सोबत राहता येईल. जे होतं ते चांगल्यासाठी होतं आई.’’

‘‘काय चांगल्यासाठी होतं, माझ्या मुलाचा हात मोडलाय. त्याच्या पायाला जखमा झाल्यात. रिया दुसरा शर्ट आण. किती रक्ताने माखलेय याचे शर्ट.’’

‘‘हो आई.’’

आशिषला तर रियाकडे पाहायचीही इच्छा नव्हती आणि रिया त्याच्या एका कटाक्षासाठी आसुसली होती.

‘‘चला चला, आता सर्व खाली चला. थोडेसे काम वहिनीलाही करू द्या.’’

सर्वजण बेडरूममधून बाहेर निघून गेले. रिया शर्ट घेऊन आली, पण आशिषने रागाने तोंड फिरवले.

‘‘अहो, माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माहीत आहे, मी माफी मागण्याच्या लायकीची नाहीए, पण प्लीज मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या. मला माफ करा, आता तुमच्याशिवाय मला या जगात कोणाचाही आधार नाहीए.’’

‘‘तू लग्नापूर्वीच सर्व गोष्टी सांगितल्या असत्यास, तर माझं आयुष्य बरबाद झालं नसतं ना.’’

‘‘काय बोलताय तुम्ही लोक? रिया, तू काही कामाची नाहीस. आण शर्ट इकडे. मलाच बदलावे लागेल. एक कप आले घातलेली चहा घेऊन ये माझ्या मुलासाठी.’’

दुसऱ्या दिवशी रिया पुन्हा शर्ट घेऊन आशिषच्या समोर उभी राहिली.

‘‘तुला माझ्या मागे-पुढे करण्याची काही गरज नाहीए.’’

‘‘लवकर शर्ट बदल, तुला पाहायला शेजारी आलेत,’’ आई आवाज देत होती.

‘‘घाला ना प्लीज.’’

रिया आशिषच्या जवळ जायला कचरत होती, पण आता तिला आपली चूक सुधारायची होती. एक पत्नी आणि सुनेचे कर्तव्य तिला मनापासून निभवायचे होते. शेजारी बेडरूममध्ये भेटायला आले. रिया सर्वांसाठी नाश्ता घेऊन आली.

‘‘किती सुशील सून मिळाली आहे तुम्हाला अग्निहोत्री सर.’’

‘‘ते तर आहेच, रिया आमची सून नाही, मुलगी आहे.’’

रिया आता सर्वांसोबत छान मिळूनमिसळून राहायची. परंतु तरीही आशिष आणि तिच्यामधील दुरावा संपत नव्हता.

रात्रीचे दोन वाजले होते. घरातील सर्व लोक झोपले होते. आशिषला झोप येत नव्हती. रियाही बेडवर पहुडली होती. पण तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते. रिया आता आशिषचे शर्ट बदलणे, त्याला जेवण भरवणे, स्पंजने त्याला वॉश करणे ही सर्व कामे करत होती. परंतु आशिषकडून कोणतीही प्रेमाची पावती मिळत नव्हती. काही दिवसांतच आशिष बरा झाला. आशिषचा एक मित्र कोलकात्यात राहात होता. आशिषने त्याला सारंगला शोधायला सांगितले. सारंग रियाच्या समोरच्या घरात भाड्याने राहात होता. आपल्या बिझनेससाठी तो काही दिवस दिल्लीला आला होता. पण रिया पुन्हा-पुन्हा जेवण घेऊन त्याच्या घरी जात असे. रियाचे वडील रोज संध्याकाळी सारंगसोबत फिरायला जात असत. सारंगही काही ना काही बहाणा करून रियाच्या घरी येऊन बसत असे. सर्वकाही नीट चालले होते. एके दिवशी सारंगने रियाच्या वडिलांच्या फोनवर मेसेज पाठवून रियाला मागणी घातली होती. सारंगचा मेसेज वाचून रियाच्या वडिलांनी सर्वप्रथम त्याला कॉलनीच्या बाहेर काढले आणि मग आपल्या जीवनातून. सारंग दुसऱ्या जातीचा होता, पण तो जर फॅमिली फ्रेंड बनू शकतो, तर मग जावई का नाही? ही गोष्ट रिया आणि सारंगला शेवटपर्यंत कळली नाही. सारंग लग्नाच्या दिवसापर्यंत त्याच शहरात तिची वाट पाहात राहिला आणि शेवटी कोलकात्याला परतला. एके दिवशी आशिषने नोकर संतोषला पकडले आणि ही सर्व माहिती मिळवली.

आशिषचे आईवडील काही दिवसांसाठी तीर्थयात्रेला निघून गेले. सोबत घरातील नोकरांनाही घेऊन गेले. आता रिया आणि आशिषशिवाय घरात कोणीही नव्हते. तरीही आशिषने रियावर ती बायको असल्याचा हक्क गाजवला नाही आणि ना ही तिच्या जवळ जाण्याचा कधी प्रयत्न केला. आशिषला रिया आवडत होती. परंतु रियाचा आनंद सारंगमध्ये होता.

‘‘तुम्ही नाश्ता करून गेलात तर बरं होईल. मी आईंसारखं काही बनवू शकत नाही, पण मी प्रयत्न केला आहे. तुम्ही मला नाराज करणार नाही, अशी अपेक्षा आहे.’’

‘‘जरूर.’’

‘‘रात्रीच्या जेवणासाठी मी तुमची वाट पाहीन,’’ रिया आशिषचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. नशिबाने त्यांना जवळ येण्याची खूप संधी दिली, पण आशिषने नेहमी रियाला स्वत:पासून दूर ठेवले. रियाने लग्न करून एक चूक केली होती, पण आशिषला आता दुसरी चूक करायची नव्हती. एका आठवड्यानंतर आशिष रियाला घेऊन कोलकात्याला पोहोचला. कोलकात्याचे नाव ऐकताच रिया गोंधळात पडली.  दोघंही एका हॉटेलमध्ये उतरले. आशिषने रियासाठी वेगळी खोली बुक केली.

रात्रीचे दोन वाजले होते. रियाला काही कळत नव्हते. रिया आशिषशी बोलताना नेहमी घाबरत असे. त्याच्याशी नजरानजर करायची हिंमतही तिच्यात नव्हती. रात्रीचे दोन वाजले होते. रियाला झोप येत नव्हती. तिने आशिषच्या खोलीचा दरवाजा वाजवला.

‘‘तू एवढ्या रात्री, झोपली नाहीस का अजून?’’

‘‘मी आत येऊ शकते का?’’

‘‘आपण कोलकात्याला का आलोय?’’

‘‘सारंगला भेटायला. तू सारंगसोबत जास्त खूश राहशील.’’

‘‘मला काय हवंय, याचा निर्णय तुम्ही कसा घेतलात? स्त्रियांचे निर्णय नेहमी पुरुषच का घेतात?’’

‘‘कारण स्त्री स्वत: आपल्या जीवनाचे निर्णय घेत नाही. तू सारंगसोबत पळून जायला हवं होतं किंवा लग्नानंतर त्याला पूर्णपणे विसरायला हवं होतं, पण यातील एकही निर्णय तू घेतला नाहीस. एखाद्या मुलीने घाबरत संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत काढावे, हे मला मान्य नाही. माहेरी तुला जायचे नाहीए. त्यामुळे मी तुला सारंगकडे पाठवत आहे.’’

‘‘मी तुम्हाला घाबरत नाहीए. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला, त्यामुळे मला स्वत:ची लाज वाटते. एखाद्या मुलीसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तिसोबत राहणे किती कठीण असते, जेव्हा त्याला ती आवडत नाही, हे तुम्हाला नाही कळणार. बहुतेक तुम्हाला माझ्यासारख्या उनाड मुलीसोबत आपले आयुष्य घालवायचे नाहीए, पण मला माझ्या जीवनसाथीच्या रूपात तुम्हालाच पाहायला आवडेल. सारंगवर माझे प्रेम होते, पण तो जीवनसाथीच्या रूपात कसा वागेल मला माहीत नाही. त्याच्यासोबत माझं काय भविष्य असेल, हेही मला माहीत नाही, पण अग्निहोत्री कुटुंबासारखे कुटुंब मला दुसरे कुठलेही मिळणार नाही.’’

‘‘तू पूर्ण शुध्दीत आहेस का?’’

‘‘हो,मी आज पहिल्यांदा माझ्या मनातील गोष्ट तुमच्याशी बोलतेय. जर मी तुमच्यासोबत राहिले, तर मला माझ्या माहेरचे प्रेमही मिळत राहील. नेहमी आपल्या इच्छेनुसारच सर्व आपल्या आयुष्यात घडावे हे आवश्यक नाही. माझ्या वडिलांनी मोठ्या विश्वासाने माझा हात आपल्या हातात दिला आहे आणि ते कधी चुकीचे ठरू शकत नाहीत, या गोष्टीवर माझा विश्वास आहे. सारंग केवळ माझ्या घरासमोर राहात होता, त्याची फॅमिली, बिझनेस, मित्र याबाबत मला काहीही माहिती नाही. मला  नाही ठाऊक की, मी त्याच्यामागे एवढी वेडी का झाले होते? लग्न करण्यासाठी मुलाचे घराणे, उत्पन्नाची साधने या गोष्टीही  महत्त्वाच्या असतात. तुमच्यासोबत राहिल्यानंतर तुमच्या चांगल्या गोष्टींनी माझे मन जिंकले आहे, त्यामुळे मला तुम्ही आवडू लागला आहात.’’

‘‘याचा अर्थ आपल्याला आता पुन्हा दिल्लीला जावे लागेल.’’

‘‘हो नक्कीच, मला मिसेस अग्निहोत्री बनल्याचा पूर्ण अभिमान आहे.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...