* सोमा घोष

आकर्षक उंची, मृदुभाषी २७ वर्षीय मराठी अभिनेत्री सीमा कुलकर्णी ही महाराष्ट्रातील उस्मानाबादमधील तुळजापुरातली आहे. तिने मराठी चित्रपट, वेब सीरिज आणि अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. २०१६ मध्ये तिने ‘शिनमा येडा’ या चित्रपटातून या क्षेत्रातील प्रवास सुरू केला. त्यानंतर तिने अनेक वेब मालिका, चित्रपट आणि टीव्हीवरील मालिकांमध्ये काम केले. ‘मी पुन्हा येईन’ या मराठी वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

सीमा खऱ्या आयुष्यात फारशी संयमी नसली तरी अभिनयात मात्र ती प्रचंड संयम बाळगते. फिल्मी भाषेत सांगायचे तर तिला ‘अँक्शन’ आणि ‘कट’मध्ये जगायला खूप आवडते. तिच्या मते अभिनय क्षेत्र कधीच सोपे नसते. एका दृश्यासाठी तिने सुमारे ८ ते १० रिटेक दिलेत, जे तिला एका मोठया अभिनेत्यासोबत अभिनय करताना द्यावे लागले होते. मराठीशिवाय तिने हिंदी आणि मल्याळम मालिकांमध्येही काम केले आहे. सीमा तिच्या यशाचे श्रेय तिची आई शीतल कुलकर्णी आणि वडील विकास कुलकर्णी यांना देते. सन मराठी वाहिनीवर तिची ‘सावली होईन सुखाची’ ही मालिका सुरू आहे. यात ती गौरीच्या मुख्य भूमिकेत आहे.

ही मालिका करतानाचा तुझा अनुभव कसा आहे? ती तुझ्या वास्तविक जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

यामध्ये माझी भूमिका एका खेडयातील मुलीची आहे, जिला कुटुंबातील सर्व नातेसंबंध खूप आवडतात, परंतु तिच्या आई-वडिलांची इच्छा असते की तिने एका वृद्धाशी लग्न करावे, त्यामुळे गौरी पळून जाते आणि शहरात येते. तिथे घरकाम करू लागते. त्यादरम्यान, तिला एक ६ वर्षांची मुलगी भेटते, जिच्यावर ती आईसारखे प्रेम करते. दोघींमध्ये आई-मुलीचे नाते फुलते. हे खूपच भावनिक वळण आहे आणि मला ते करताना खूप मजा येत आहे.

वास्तविक जीवनात मला प्रत्येक नाते आणि कुटुंब खूप जास्त प्रिय आहे. त्यामुळे मालिकेतील नातेसंबंध माझ्या प्रत्यक्ष आयुष्याशी मिळतेजुळते आहे, पण ही मालिका असल्याने यात नाट्य थोडे अधिक आहे. याशिवाय आपल्या समस्यांशी कसे लढायचे हे मला माहीत आहे, पण मालिकेतील गौरीला ते समजायला आणखी काही वेळ लागेल. सुरुवातीला आईची भूमिका साकारणे अवघड वाटत होते. विशेषत: लहान मुलीसोबत अभिनय करणे अवघड आहे, कारण मुले मुडी असतात, पण ही मुलगी लहान असूनही चांगले काम करत आहे.

तुला किती तयारी करावी लागली?

मी त्या मुलीची आई आणि माझ्या आईचे वागणे पाहिले आणि तसे वागण्याचा प्रयत्न केला.

तुला अभिनयात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

लहानपणापासून टीव्हीवर चित्रपट आणि मालिका पाहून मी अभिनय करण्याचा विचार करत होते. तेव्हा मला नायिका व्हायचे होते. मला त्यावेळी अभिनेत्री आणि नायिकेतील फरक समजत नव्हता. मला नृत्याची आवड होती. माझे लहानसे शहर तुळजापूरमध्ये कोणालाच अभिनयाविषयी माहिती नव्हती आणि या क्षेत्रातील एकही कलाकार तिथला नव्हता, त्यामुळेच माझी इच्छा ऐकून सर्व माझ्यावर हसायचे. माझ्यावर माधुरी दीक्षित आणि मुक्ता बर्वेच्या कामाचा खूप प्रभाव होता. त्यांचे चित्रपट पाहिल्यानंतर मी त्याच जगात जगायचं, तेव्हाच मी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

तुला कुटुंबाकडून किती पाठिंबा मिळाला?

सुरुवातीला या क्षेत्राबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्यावेळी सोशल मीडियाची फारशी क्रेझही नव्हती. मी नृत्याची सुरुवात व्हिडीओ पाहून गणपती उत्सवात नृत्याच्या पथकात सहभागी होऊन केली. तुळजापुरात नृत्याचे वर्ग नव्हते. जेव्हा मी थोडी मोठी झाले तेव्हा आजूबाजूचे लोक नाचणे चुकीचे आहे असे म्हणू लागले. त्यामुळे घरचे वैतागले आणि त्यांनी मला नृत्य करण्यास नकार दिला. मी ठरवले की मला इथे राहायचे नाही. त्याच दरम्यान पुण्याच्या जवळपासहून एक दिग्दर्शक आला आणि त्याने स्थानिक चित्रपट बनवण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने स्थानिक कलाकारांना घेतले. आधी चित्रीकरण सुरू केले, पण त्यानंतर त्याने अचानक चित्रीकरण थांबवून आर्टिस्ट कार्ड बनवण्यासाठी पैसे मागायला सुरुवात केली. मी आईला येऊन सर्व सांगितले आणि २०१२ मध्ये मी त्याला आर्टिस्ट कार्डसाठी २५ हजार रुपयेही दिले. वडिलांना न सांगता आईने सर्व पैशांची व्यवस्था केली होती. त्या लोकांनी आमची मेहनत पाहून तो चित्रपट स्थानिक पातळीवर गावातील दोन चित्रपटगृहांत प्रदर्शित केला. सर्व कलाकारांचे सर्व पैसे वाया गेले, कारण गावातील कोणालाच अभिनय क्षेत्राची माहिती नव्हती. नंतर समजले की ते सर्व फसवणूक करणारे होते. माझ्या वडिलांनी तो चित्रपट पाहिला होता आणि त्यांनी मला पुढील कामासाठी पुण्याला पाठवले. तोपर्यंत सोशल मीडिया थोडा सक्रिय झाला होता. त्यामार्फत मी अनेक ठिकाणी माझे फोटो पाठवले, पण सर्वांनी मुंबई आणि पुण्याला यायला सांगितले.

तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?

पुण्यात आल्यावर मी मास मीडियाचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि थिएटरमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. तिथेही मला खूप चुकीचे लोक भेटले. मुंबईत आल्यानंतर मला या इंडस्ट्रीबद्दल खूप काही समजले. पहिला ब्रेक मिळणे सोपे नव्हते, पण पुण्यात असताना मी ‘मॅरेथॉन जिंदगी’ हा चित्रपट केला होता, ज्यात विक्रम गोखले आणि संजय नार्वेकर यांच्यासारखे मोठे कलाकार होते. तो माझा पहिला ब्रेक होता, पण मला त्यातून फारसा फायदा झाला नाही. मी पुण्यातून मुंबईला आले आणि छोटया भूमिका करू लागले. २०१८ मध्ये मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील काही भागांत काम केले. त्यानंतर ‘गुलमोहर’, ‘आणीबाणी’ ‘मेकअप’ आदी चित्रपटांत काम केले. एका रियालिटी शोमध्येही पहिल्या ६ मध्ये पोहोचले होते.

तुला किती संघर्ष करावा लागला?

कुठल्याही कलाकाराचा संघर्ष सुरूच असतो. आधी काम मिळवण्यासाठी, नंतर ते टिकवण्यासाठी आणि भविष्यात चांगले काम करण्यासाठी संघर्ष करावाच लागतो.

कोणत्या मालिकेने तुझे आयुष्य बदलले?

‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबसीरिज मी केली होती, ज्याने मला ओळख मिळवून दिली, सर्वांनी माझ्या भूमिकेचे कौतुक केले. थोडी टीकाही झली, कारण त्यात मी काही बोल्ड सीन दिले होते. एका दृश्यात मी बिकिनी घालून आले होते, पण त्या कथेत ते दृश्य आवश्यक होते.

इंटिमेट सीन म्हणजेच अंतर्गत दृश्य तू किती सहजतेने करू शकतेस?

कथेच्या मागणीनुसार मी कोणतीही भूमिका करण्यास मागेपुढे पाहात नाही. मला असा एक चित्रपट मिळाला होता, ज्यामध्ये अभिनेत्री फक्त बिकिनीमध्ये दिसणार होती, मात्र त्याचा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता, त्यामूळे मी नकार दिला.

हिंदी चित्रपटसृष्टीत तुला काम करण्याची इच्छा आहे का?

अर्थातच. मला मराठीच नाही तर प्रत्येक भाषेतील वेगवेगळया चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. मला विकी कौशल आणि ऋतिक रोशन यांच्यासोबत काम करायचे आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याचीही माझा इच्छा आहे.

तू उस्मानाबादची आहेस, तिथे काय काम करायची तुझी इच्छा आहे?

मला तिथल्या लोकांना अभिनयाची माहिती द्यायची आहे. होय, कारण तिथे या क्षेत्राबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. छोटया शहरातील असूनही तेथील अनेकांमध्ये खूप प्रतिभा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मी प्रसंगानुरुप फॅशन करते. कुठलाही ट्रेंड पाहून फॅशन करत नाही तर मला जे शोभेल तेच घालते.

मला खायला खूप आवडते. आईने बनवलेली डाळ ढोकळी खूप आवडते.

तू सण कसे साजरी करतेस?

सण कुठलाही असो, मला तो कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो.

तुला नवोदितांना काही संदेश द्यायचा आहे का?

तुमच्या कामावर प्रेम करा, मेहनत, समर्पण आणि संयम ठेवा, तरच तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.

आवडता रंग – पांढरा.

आवडता पोशाख – भारतीय साडी.

आवडते पुस्तक – कोसला कादंबरी.

आवडता परफ्यूम – टायटनचा कोणताही.

आवडते पर्यटन स्थळ – उटी.

वेळ मिळाल्यास – पुस्तकं वाचणे आणि वेब सिरीज पाहाणे.

जीवनातील आदर्श – प्रत्येकाला आदर देणे.

सामाजिक कार्य – प्राण्यांसाठी काम करणे.

स्वप्नातील राजकुमार – काम आणि कुटुंबाचा आदर करणारा.

जीवन जगण्याचा मंत्र – कृतज्ञत, कृज्ञत राहाणे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...