युक्ती

कथा * गरिमा पंकज

आई, तुला एक गोड बातमी सांगायची आहे.’’

‘‘हो का बाळा? सांग ना, कोणती गोड बातमी आहे? मी आजी होणार आहे का?’’ सरला देवींनी उत्सुकतेने विचारले.

नेहा लाजली आणि म्हणाली, ‘‘हो आई, असेच घडणार आहे.’’

आज सकाळीच नेहाला ही गोड बातमी समजली होती. तिने दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेतली होती. पती अभिनवनंतर तिने सर्वप्रथम तिच्या आईला ही आनंदाची बातमी सांगितली होती.

ही बातमी ऐकून आईने आनंदाने उडी मारली, ‘‘माझ्या बाळा, तू तुझ्यासारख्याच गोड मुलीची आई होशील. तुझी मुलगी माझ्यासारखी हुशार आणि तुझ्यासारखी सुंदर असेल.’’

‘‘आई,, मला मुलगी होईल हे तू आताच कसे काय सांगू शकतेस?’’

कारण माझ्या मनाला असे वाटतेय आणि मलाही हेच हवे आहे. माझ्या बाळा, तुला मुलगीच होईल. मी आताच ही बातमी तुझ्या वडिलांना सांगते.

नेहाने हसून फोन ठेवला आणि सासूबाईंना हाक मारली, ‘‘सासूबाई, तुम्ही आजी होणार आहात.‘‘

‘‘बाळा, काय सांगतेस काय? खरंच मला नातू होणार आहे? तू खूप छान बातमी दिलीस. मी कधीपासून याच दिवसाची वाट पाहात होते. सुखी राहा मुली,’’ सासू तिला आशीर्वाद देऊ लागली.

नेहा हसली आणि म्हणाली, ‘‘सासूबाई, कशावरून नातू होईल? मुलगीही होऊ शकते ना?’’

‘‘बाळा, मला नातू हवा आहे आणि बघत राहा, नातूच होईल. आता तू स्वत:ची खूप काळजी घ्यायला हवीस. जास्त वजन उचलू नकोस आणि लीला येणार आहे की नाही काम करायला?’’

‘‘हो सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, ती नियमितपणे घरकाम करायला येते. आजकाल फार सुट्टया घेत नाही.’’

‘‘तिला अजिबात सुट्टी देऊ नकोस. अशा अवस्थेत विश्रांती घेणे खूप गरजेचे असते. विशेषत: सुरुवातीचे आणि शेवटचे ३ महिने खूप महत्त्वाचे असतात.

‘‘हो सासूबाई, मला माहीत आहे. तुम्ही निश्चिंत रहा. मी स्वत:ची पूर्ण काळजी घेईन,’’ असे बोलून नेहाने फोन ठेवला.

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत नेहाला खूप मळमळ व्हायची. अभिनव तिची काळजी घेत होता. कामवालीही तिला जमेल तशी मदत करत होती. सर्व व्यवस्थित सुरू होते. नेहाला पाच महिने झाले होते. त्या दिवशी सकाळी ती बाल्कनीत उभी असताना तिला तिची आई गाडीतून उतरताना दिसली. तिच्या हातात एक मोठी बॅग होती. आई राहायला आली होती. आनंदाने नेहा खाली गेली. अभिनवही मागोमाग गेला.

आईच्या हातातून सुटकेस घेऊन पायऱ्या चढत त्याने विचारले, ‘‘आई, तुमच्या शिकवणी वर्गाचे काय होणार? इथे आलात तर मुलांना कसे शिकवणार?’’

‘‘बेटा, हल्ली ऑनलाइन क्लासेस होतात. त्यामुळे मला वाटले की, अशा अवस्थेत मी माझ्या मुलीसोबत असावे.’’

‘‘तुम्ही खूप छान केलेत आई. नेहालाही बरे वाटेल आणि तिची काळजीही घेतली जाईल.’’

‘‘हो बाळा, हाच विचार करून आले.’’

‘‘पण आई… तुझ्याशिवाय तिथे बाबा सर्व सांभाळू शकतील ना?’’ नेहाने शंका व्यक्त केली.

‘‘बाळा, तुझ्या वडिलांना सांभाळायला त्यांची सुनबाई आहे. आता ती त्यांची सर्व कामे करते. मी घरी फक्त आराम करते.’’

‘‘हो का? आई तू आल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे,’’ नेहा आज खूप खुश होती. आज कितीतरी दिवसांनी तिला आईच्या हातचे खायला मिळणार होते.

नेहाची आई येऊन १० दिवस झाले होते. आई गरोदरपणात आवश्यक असलेले खायचे पदार्थ नेहाला वेळच्यावेळी करून स्वत:च्या इच्छेनुसार खायला घालायची. तिने नेहाला काय करावे, कसे बसायचे, हे शिकवले. तिच्या गरोदरपणावेळच्या गोष्टी ती नेहाला सांगायची. एकंदरीत, नेहा खूप छान वेळ घालवत होती. तिची आई खूप शिकलेली होती. ती महाविद्यालयात प्राध्यापिका होती. त्यामुळे जरा जास्तच शिस्तप्रिय होती. नेहाचा स्वभाव मात्र आईपेक्षा खूपच वेगळा होता. तरीही आई आणि मुलीचे नाते खूप गोड होते आणि या क्षणी नेहा तिच्या आईची जवळीक, तिचे प्रेम अनुभवत होती.

वेळ आनंदात जात होता, दरम्यान एके दिवशी अभिनवच्या आईचा फोन आला, ‘‘बाळा, मी तुमच्याकडे येतेय. नातवाला पाहण्याची खूप इच्छा आहे.’’

‘‘पण आई, तुझा नातू अजून कुठे आला आहे?’’ अभिनवने विचारले.

‘‘अरे वेडया, आला नसला तरी लवकरच येणार आहे. नेहाच्या पोटातील माझ्या नातवाची सेवा केली नाही तर मी कसली आजी? चल फोन ठेव, मला सामान भरायचे आहे.’’

‘‘पण आई, तुझा सत्संग आणि तू रोज ज्या चर्चासत्राला जातेस त्याचे काय? शिवाय तू खानावळही चालवतेस ना? ते सर्व सोडून तू इथे कशी काय राहू शकतेस?’’

‘‘अरे बाळा, खानावळ चालवायला मी दोघांना पगारावर ठेवले आहे. माधुरी आणि निलय अशी त्यांची नावे आहेत. दोघेही चांगल्या प्रकारे खानावळ सांभाळतात. ही वेळ परत येणार नाही. चर्चासत्रात तर मी नंतरही सहभागी होऊ शकते.

‘‘ठीक आहे आई, तू ये. नेहाची आईही आली आहे. तुला त्यांचीही सोबत होईल.’’

‘‘त्या कधी आल्या?’’

‘‘१५ दिवसांपूर्वी.’’

‘‘तू ये, आता मी फोन ठेवतो.’’

अभिनवची आई दोन दिवसांनी आली. नेहाच्या आईने त्यांचे मनमोकळेपणे स्वागत केले. अभिनवच्या आईनेही त्यांना मिठी मारली आणि सांगितले की, फार छान झाले, या निमित्ताने आपल्यालाही एकत्र राहता येईल. मनातून मात्र दोघींनाही एकमेकींबद्दल राग होता. लवकरच हा राग उघडपणे दिसू लागला.

नेहाची आई सकाळी ५ वाजता उठून नेहाला फिरायला घेऊन जायची. हे लक्षात येताच अभिनवची आई ५ वाजण्यापूर्वीच उठू लागली आणि नेहाला योगा शिकवू लागली. फेरफटका मारण्याऐवजी नेहाने गर्भधारणेदरम्यान उपयोगी पडणारी काही आसने शिकावीत यासाठी त्या तिच्या मागे लागल्या. इकडे नेहाच्या आईला तिला तिच्यासोबत फिरायला घेऊन जायचे असायचे. कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही, असा संभ्रम नेहाला पडायचा.

नेहाची आई नाराज झाली होती, ‘‘ताई, ही माझी मुलगी आहे आणि मी तिला यावेळी फिरायला घेऊन जाणार आहे.’’

‘‘ताई, पण ही व्यायामाची वेळ आहे. तुम्ही का समजून घेत नाही? मी माझ्या गरोदरपणात माझ्या सासूबाईंच्या सांगण्यावरून योगा केला, मग बघा कसा निरोगी मुलगा झाला,’’ अभिनवची आई म्हणाली.

अभिनवने लगेच यावर तोडगा शोधला आणि आईला समजावून सांगितले की, ‘‘आई नेहा सकाळी व्यायाम करेल आणि संध्याकाळी योगा करेल. शिवाय संध्याकाळी योगा करणे खूप चांगले असते, कारण त्या वेळी वातावरणात भरपूर ऊर्जा असते.’’

त्यानंतर रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून दोघींमध्ये खटके उडू लागले. नेहाची आई नेहाला जे काही करायला सांगायची ते अभिनवची आई काहीतरी निमित्त काढून तिला करू देत नसे. दोघीही नेहाच्या आवडीबद्दल बोलत असत, पण कुठेतरी त्यांचा हेतू एकमेकींना अपमानित करून स्वत:ला वरचढ दाखवायचा असायचा. अभिनव आणि नेहा असा विचार करत होते की, हळूहळू सर्वकाही ठीक होईल, पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की, दोघींपैकी कुणीही कमीपणा घ्यायला तयार नव्हते.

त्या दिवशीही उठल्यावर नेहाच्या आईने आपल्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिला रस प्यायला दिला आणि म्हणाली, ‘‘बेटा, अशा अवस्थेत गाजर आणि बिटाचा रस पिणे फायदेशीर असते.’’

तेवढयात अभिनवची आई तिथे आली. ‘‘अरे बेटा, असा रस पिऊन काही होणार नाही. डाळिंब, सफरचंद अशी कच्ची फळे सकाळी खावीत. त्यामुळे शरीराला फायबरसोबतच ताकदही मिळते. एवढेच नाही तर डाळिंब रक्ताची कमतरताही भरून काढते.’’

हे ऐकून नेहा दोघांकडे बघतच राहिली. त्यानंतर दोघांकडील वस्तू घेऊन म्हणाली, ‘‘या दोन्ही गोष्टी मला आवडतात. मी रसही पिईन आणि फळेही खाईन. तुम्ही दोघी बाहेर फिरून या. तोपर्यंत मी जरा आराम करते.’’

दोघी बाहेर गेल्यावर नेहाने सुटकेचा निश्वास टाकला आणि अभिनवला हाक मारली. अभिनव बाजूच्या खोलीतून आला आणि म्हणाला, ‘‘हे काय सुरू आहे? दोघीही ऐकायला तयार नाहीत. रात्री १२ वाजेपर्यंत तुझ्यासोबत असतात, आपल्याला स्वत:साठी अजिबात वेळ मिळत नाही.’’

‘‘हो अभिनव, मीही तोच विचार करत आहे. दोघीही छोटया-छोटया गोष्टींवरून भांडतात. माझ्या आईला वाटते की, ती प्राध्यापिका आहे, त्यामुळे तिला जास्त समजते, तर तुझ्या आईला अभिमान आहे की, तिने तुला स्वत:च्या बळावर वाढवले आहे. त्यामुळे मी तिच्या सल्ल्यानुसार वागायला हवे.’’

‘‘अगं, मला तुझ्याशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलायची इच्छा होते. पण काय करणार? या दोघींच्या शीतयुद्धात आपण आपला एकांत, आपली शांतता गमावून बसलो आहोत.’’

तितक्यात दोघीही फेरफटका मारून आल्या. नेहमीप्रमाणे दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. ‘‘सरला ताई, नेहाला जास्त गोड खायला देऊ नका. तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही.’’

‘‘पण नयना ताई, मी स्वत:च्या हाताने बनवलेले हे डिंक आणि सुक्यामेव्याचे लाडू आहेत. गरोदरपणात माझ्या सासूबाई मला हे सर्व खायला द्यायच्या. त्यामुळेच मला अभिनवच्या जन्मावेळी कोणतीही अडचण आली नाही. अभिनव जन्माला आला तेव्हा ४ किलो वजनाचा होता. तो इतका सुदृढ आणि सुंदर होता की, नर्ससुद्धा त्याला मांडीवर घ्यायच्या.

अभिनवने नेहाकडे पाहिले आणि दोघेही हसले. नेहाची आई कुठे माघार घेणार होती? ती लगेचच म्हणाली, ‘‘ताई, माझ्या सासूबाईंनी मला गरोदरपणात विविध प्रकारचे आयुर्वेदिक काढे आणि फळांचे सूप दिले होते. त्यामुळेच नेहा लहानपणापासून कधी आजारी पडली नाही आणि तिचा रंग किती गोरा आहे. माझ्या वहिनीच्या मुलाला लहानपणी कधी खोकला तर कधी ताप यायचा, पण नेहा खेळत-उडया मारत मोठी झाली.’’

हे ऐकून अभिनवची आई लगेच म्हणाली, ‘‘अहो ताई, बाळ गर्भात असताना असा कोणता काढा तुम्ही प्यायला दिला होता जो प्यायल्यामुळे तुमची मुलगी अजूनपर्यंत निरोगी राहिली? असे कधी काही घडत नसते. तुम्ही कोणत्या भ्रमात जगत आहात?’’

‘‘ताई, मी भ्रमात जगत नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच मी हे सर्व सांगत आहे. माझ्या परिसरात कोणाची सून गरोदर राहिली तर तिच्या सासूबाई आधी तिच्या सुनेच्या खाण्यापिण्याची काळजी कशी घ्यायची, याचा सल्ला घ्यायला माझ्याकडे येतात. भ्रमात तर तुम्ही जगत आहात.’’

नेहमीप्रमाणे दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. नेहा आणि अभिनव नेहमीप्रमाणे भांडण मिटवू लागले. आता हे रोजचेच झाले होते. कधी होणारे बाळ हे मुलगा असेल की मुलगी, यावरून दोघी भांडायच्या. त्यामुळे नेहा आणि अभिनव या दोघांचाही दिवस दोघींचे भांडण सोडवण्यात जायचा. एकमेकांसोबत प्रेमाने वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळत नव्हती.

एके दिवशी अभिनव म्हणाला, ‘‘नेहा, आता आपल्या या समस्येवर उपाय शोधायलाच हवा.’’

‘‘आपण एक गंमत करूया,’’ असे म्हणत नेहाने अभिनवच्या कानात काहीतरी सांगितले आणि दोघेही हसले.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाच्या वडिलांचा फोन आला. त्यांना त्यांच्या पत्नीशी बोलायचे होते.

नेहाच्या आईने फोन उचलला, ‘‘कसे आहात?’’

‘‘फक्त तुझी खूप आठवण येत आहे, राणी साहेब.’’

‘‘माझी आठवण का येत आहे? मी तर नुकतीच इकडे आले आहे.’’

‘‘अगं, तू २ महिन्यांपूर्वी तिकडे गेली आहेस आणि तुला माहीत आहे का, मी गेल्या रविवारपासून खूप आजारी आहे.’’

‘‘का? काय झाले तुम्हाला? मला कळवलेत का नाही?’’ नेहाच्या आईने काळजीच्या स्वरात विचारले.

‘‘अचानक रक्तदाब वाढला आणि मला चक्कर आली. मी बाथरूममध्ये पडलो. उजव्या पायाचा गुडघा दुखावला. मला चालता येत नाही. सुनेकडून सर्व सेवा करून घ्यायला बरे वाटत नाही. आपल्या मुलाने काठी आणून दिली आहे. पण असे वाटते की, तुझ्या खांद्याचा आधार मिळाला असता तर खूप बरे झाले असते.’’

‘‘अहो, इतके सगळे घडले आणि तुम्ही मला आता सांगताय? तुम्ही आधी फोन केला असता तर मी लवकर आलो असतो.’’

‘‘काही हरकत नाही, आता ये. मी अभिनवला तुझे तिकीट काढून द्यायला सांगितले आहे. फक्त तू ये.’’

‘‘येते, लवकर येते. तुम्ही काळजी करू नका. मला फक्त नेहाची काळजी वाटत होती, म्हणून मी इथेच थांबले होते,’’ त्यांनी नेहाकडे बघत सांगितले.

‘‘नेहाच्या सासूबाई आहेत ना तिकडे? त्या घेतील तिची काळजी. तू माझा विचार कर,’’ नेहाचे वडील खट्याळपणे हसत म्हणाले.

नेहाची आई हसली, ‘‘तूम्ही कधीच बदलणार नाहीस. चला, येते मी लवकर.’’

अभिनवने तिकीट काढून दिले. दुसऱ्याच दिवशी नेहाला हजार सूचना देऊन नेहाची आई तिच्या घरी गेली. नेहा आणि अभिनवने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता नेहाच्या सासूबाईही तिला आवश्यक तेवढयाच सूचना करू लागल्या. नेहा आणि अभिनवला एकमेकांसाठी वेळ मिळू लागला.

अशातच दीड महिना निघून गेला. नेहाला आठवा महिना लागला होता. आता ती कोणतेही काम करू शकत नव्हती. घरातली सर्व कामे मोलकरीण करायची आणि सासू नेहाला सांभाळायची.

सर्व काही ठीक चालले होते, मात्र एके दिवशी अचानक नेहाच्या आईचा पुन्हा फोन आला, ‘‘बाळा, आता तुझे वडील बरे आहेत. मी उद्या-परवा तुझ्याकडे राहायला येते.’’

‘‘पण आई, आता तुला घाई करून यायची गरज नाही.’’

‘‘गरज कशी नाही, बेटा? हे तुमचे पहिले बाळ आहे. मी तुझ्याजवळ असायला हवे. मलाही काही डझनभर मुले नाहीत. तू आणि तुझा भाऊ. मला तुझी काळजी घ्यावीच लागेल. तुझ्या सासूबाईंच्या हातून काही होणार नाही. चल, फोन ठेव, मला तयारी करू दे.’’

फोन ठेवत नेहा घाबरलेल्या स्वरात म्हणाली, ‘‘अभिनव आता काय करायचे? पुन्हा तेच महाभारत सुरू होणार आहे.’’

‘‘काय झाले नेहा?’’ अभिनवने विचारले.

‘‘आई पुन्हा राहायला येणार आहे. किती दिवस वडील पाय दुखत असल्याचा बहाणा करणार?’’ नेहा उदासपणे म्हणाली.

‘‘निराश होण्यासारखे काही नाही. आता तीच युक्ती माझ्या आईसाठी वापरायची. तू थांब, मी काहीतरी विचार करतो.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी अभिनव त्याच्या आईकडे गेला. ‘‘आई, तुला आठवते का? गेल्या वर्षी तू शिमलाला होणाऱ्या महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात सहभागी होणार होतीस. तुला तिथे होणाऱ्या कार्यशाळेत भाग घ्यायचा होता. पण शेवटच्या क्षणी लतिका काकूंची तब्येत बिघडली आणि तुम्ही दोघीही जाऊ शकला नाहीत.’’

‘‘हो बेटा, तुझ्या लतिका काकूंची तब्येत बिघडली होती आणि मला तिच्याशिवाय एकटीला जायचे नव्हते. त्यामुळे मी जाऊ शकले नाही.’’

‘‘यावेळेस लतिका काकूंनी पूर्ण तयारी केली आहे. तू जाशील ना त्यांच्यासोबत?’’

‘‘नाही बाळा, यावेळेस मी जाऊ शकणार नाही. माझा नातू येणार आहे. पुढच्या वर्षी जाईन.’’

‘‘पण आई, कदाचित तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, कारण पुढच्या वर्षी लतिका काकू त्यांच्या सूनेसोबत हैद्रराबादला असेल. तुझ्यासाठी ही सुवर्णसंधी आहे आणि तू नातवाची काळजी का करतेस? तू जोपर्यंत शिमल्यात असशील तोपर्यंत नेहाची आई त्याची काळजी घेईल. दोन-तीन दिवसांत ती येणार आहे.’’

‘‘पण बेटा…’’

‘‘काही पण वगैरे नाही. तू जास्त विचार करू नकोस, आताच तयारी कर. तुला ही संधी पुन्हा मिळणार नाही, कारण तू पुन्हा एकटी जाऊ शकणार नाहीस.’’

‘‘ठीक आहे बेटा. सांग लतिका काकूंना की, माझेही तिकीट काढ.’’ अभिनवची आई सामान भरू लागली.

‘‘आई शिमल्याहून परत येईपर्यंत आपले बाळ या जगात आलेले असेल आणि त्यामुळेच पुन्हा दोन आईंच्या सल्ल्यांमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही,’’ असे म्हणत नेहा आणि अभिनवने पुन्हा एकदा सुटकेचा नि:श्वास सोडला.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें