सांझ की दुलहन – दूसरा भाग

दिर्घ कथा * मीना गोगावले

(भाग दूसरा)

पूर्व कथा : राजन त्याच्या वहिनीशी, राधिकाशी खूपच मोकळेपणानं बोलायचा. त्यानं त्याच्या मनातील भावी पत्नीबद्दलचे विचार राधिकाला सांगितले. त्याच्या स्वप्नातली सुंदरी कशी अन् कुठं शोधायची ते राधिकाला समजेना.

शेवटी एकदाची ती स्वप्नं सुंदरी सापडली, खूप थाटात लग्न झालं. पण घरात नव्यानं प्रवेश करणाऱ्या नववधूनं सुरूवातीपासूनच आपले रंग दाखवायला सुरूवात केली. घरातलं वातावरण तंग झालं होतं. पण स्वप्नसुंदरीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या राजनला ते काही कळत नव्हतं. खूप शिकलेली आहे. होस्टेलला राहिल्यामुळे मोकळ्या स्वभावाची आहे हे त्यानं मान्य केलं होतं…

आता पुढे वाचा :

सुंदरी रात्री घरी परतली, तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. बाबांनी सहजच खिडकीतून बघितलं तर सुंदरी कुणा मुलाच्या हातात हात घालून खिदळत कारमधून उतरताना दिसली.

बाबांना कसंबसं झालं. त्यांचं घराणं सात्विक शालीन माणसाचं, सुसंस्कारी माणसांचं होतं. असा थिल्लरपणा तिथं अपेक्षितच नव्हता. सगळीकडे नववधूच्या या वागण्याची चर्चा होणार याची त्यांना कल्पना आली. कारण सगळ्यांच्या खिडक्यांमधून दिवे लागलेले अन् माणसं उभी होती. चकित होऊन बघत होती.

पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. सुंदरीला घरी सोडून तो तरूण जायला निघाला तसं बाबांनी त्याला थांबवलं.

‘‘नाव काय रे बेटा तुझं?’’

‘‘अनुभव…’’

‘‘चांगल्या घरातला दिसतोस…सुंदरीला कधीपासून ओळखतोस?’’

‘‘आम्ही एकत्र शिकत होतो.’’ तो जायला निघाला बाबांनी त्याला थांबवलं. अत्यंत शांत, संयम सुरात ते म्हणाले, ‘‘तुला आमच्या घराण्याचीही रीत कळायला हवी. आता फक्त सुंदरीशीच तुझा संबंध नाही तर तिच्या कुटुंबाशीही आहे. तुझी क्लासमेट होती सुंदरी, पण आता ती विवाहित आहे. कुणा दुसऱ्याची पत्नी आहे. आमच्या घराण्याची सून आहे, त्यामुळे तिचं असं सतत तुझ्याबारेबर भटकणं बरोबर नाही.’’

अनुभव काहीही न बोलता निघून गेला. इकडे सुंदरी आपल्या खोलीत येऊन राजनवर भडकली. ‘‘बाबांना हा भोचकपणा कुणी सांगितलाय? विनाकारण त्याला बोलले. घराण्याची रीत, मर्यादा याचं स्तोम माजवतात. काय करू मी या मर्यादेचं लोणचं घालू? सगळा दिवस घरात बसून राहू? मला नाही जमणार…माझा मित्र मला घरापर्यंत सोडायला आला तर बिघडलं कुठं?’’

राजननं तिला शांतपणे समजावलं, ‘‘प्रश्न मित्राचा नाहीए. संस्काराचा आहे. तो फक्त तुला सोडून निघून जातो. त्यानं आमच्याशी कुणाशी ओळखही करून घेतली नाही…’’

त्याला पुढे बोलू न देता सुंदरीनं म्हटलं, ‘‘राजन, तूही असं बोलतोस? मला हे मान्य नाही.’’

मग तर हे नित्याचंच झालं. आता कोणीच या विषयावर काहीच बोलत नव्हतं.

एवढ्यावरही भागलं नाही. ही सांझ की दुलहन आता आणखी उशीरा घरात येऊ लागली. राजनला कळेना काय करावं? निदान बाबांना त्रास नको म्हणून तो सरळ वेगळं घर घेऊन राहू लागला.

राजन दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचा. इकडे सुंदरी आपल्या मित्रांबरोबर बाहेर वेळ घालवायची. कधी कधी तर दोघं एकाच वेळी घरात प्रवेश करायची. तिला काहीही म्हणणं व्यर्थ आहे हे राजनला कळून चुकलं होतं. तिच्या चुका त्याला कळत नव्हत्या असं नाही पण तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. आज नाही उद्या तिला समजेल, ती सुधारेल या भाबड्या आशेवर जगत होता.

एकदा तर तो घरात असतानाच सुंदरी व अनुभव त्याच्या खोलीत एकत्र होते. तो बघत होता. एवढंच म्हणाला, ‘‘यात तुला काय मिळतं?’’

‘‘जे तुझ्याकडून मिळत नाही ते! कारण तो माझं प्रेम आहे, माझं पहिलं प्रेम!’’

‘‘माझ्याकडून काय कमी पडलंय तुला? अन् तुमचं प्रेम होतं तर माझ्याशी लग्न कशाला केलंस?’’

वडील म्हणाले, ‘‘आधी लग्न करून आमच्या घरातून चालती हो, मग हवं ते कर.’’ निर्लज्जपणे सुंदरी उत्तरली.

‘‘अन् तुझ्या मर्जीचे फटकारे मला बसताहेत.’’ पहिल्यांदाच राजन गरजला.

‘‘हो! कारण तू मला बांधून ठेवलं आहेस.’’

‘‘बंधन तुला नकोय, खरे ना?’’

‘‘म्हणजे तू आम्हाला अंधारात ठेवलंस, आमचा विश्वासघात केलास. तुला सुखी ठेवण्यासाठी काय केलं नाही मी? माझी स्वप्नं सुंदरी म्हणून पायघड्या घालून घरात आणली तुला. तुझं स्वांतत्र्य म्हणून बाबांचं घर सोडून वेगळं घर केलं. वडिल, भाऊ, वहिनी सगळ्यांना सोडलं…केवळ तुझ्यासाठी. पण तरी तू नाखुश आहेस. चूक माझीच झाली की मी वेड्यासारखा तुझ्यावर प्रेम करतोय पण तुला मी आवडतो की नाही, तुला माझी गरज आहे की नाही याचा मी विचारच नाही केला.’’

‘‘खरंय, मला तुझी गरजच नाहीए. तुझ्या आधी अनुभव माझ्या आयुष्यात आला. मी त्याच्या प्रेमात आहे. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. तुझ्याबरोबर मी माझ्या अटींवर राहीन,’’ निर्लज्जपणे सुंदरी किंचाळली.

राजन तरीही तिच्यावर प्रेम करत होता. कधी तरी तो राधिकेकडे जायचा. स्वत:च्या घरी जात नसे. पण सुंदरीनं त्याला घरी का आला नाहीस असंही कधी विचारलं नाही. त्या दिवशीही तो ऑफिसमधून सरळ राधिकेकडे गेला आणि स्फुंदून रडायला लागला.

‘‘काय झालं भाऊजी?’’

त्यानं सगळी हकीगत सांगितली. मग म्हणाला, ‘‘यावर उपाय काय?’’

‘‘काय उपाय सांगणार भाऊजी? तुमच्या मर्जीनं सगळं घडलंय…मला तेव्हाही शंका होती, पण तुम्ही म्हणालात की तुम्ही सर्व सांभाळून घ्याल…’’

‘‘खरंय वहिनी, चूक माझीच आहे. माझी कल्पना सुंदर होती, सौम्य आणि कोमल होती, म्हणूनच ती पटकन् मोडली. सुंदरी फार कठोर आहे. माझ्या कल्पनेतल्या सुंदरीशी ती कुठेच जुळत नाही. मी अशी कल्पनाच करायला नको होती. ती चूक मी केली. त्याचं प्रायश्चित्त पण आता भोगतोय. माझ्या डोळ्यांदेखत ती दोघं माझ्या शयनमंदीरात एकत्र झोपतात अन् मी मूर्खासारखा बघत असतो. मी कोर्टात जाऊन काय सांगू? माझी बायको बदफैली आहे असं सांगू?’’

‘‘तर मग काय असेच बघत बसणार?’’

‘‘मी काय करू तेच मला समजत नाहीए.’’

‘‘हाकलून लावा तिला. घराबाहेर काढा. घरातली अब्रू स्वत:च चव्हाट्यावर जाऊन नाचतेय तर तिला घरात ठेवावी कशाला? ती चवचाल आहे, निर्लज्ज आहे, तर तुम्ही स्वत:ला त्रास का करून घेता? सरळ घटस्फोट द्या तिला.’’

‘‘पण वहिनी…’’

‘‘पण बीण काही नाही. एवढं सगळं सोसूनही जर आयुष्य असंच जाणार असेल तर या आयुष्यातून मुक्त व्हा. आज तुमचं वय तरूण आहे. उत्तम नोकरी, बंगला, गाडी सगळं आहे, मग कशाला त्या अप्सरेच्या मागे धावताय? अप्सरा कधी कुणाची पत्नी झालीय का? ती तुमच नाही हे स्वत:च तिनं सांगितलंय…तुम्ही असे हताश होऊ नका. हार मानू नका. ज्या वळणावर तुम्ही उभे आहात, तिथून पुढे जाणारे अनेक रस्ते आहेत. आता मागे वळून बघू नका. जुनं आयुष्य आठवू नका. सोडा तिचा नाद अन् चांगलं सुखाचं आयुष्य जगा. नव्या वाटेवर सोनेरी पहाट उगवेल.’’

राजनला पुन्हा रडू आलं. राधिकानं त्याला शांत केलं, धीर दिला…सुंदरीपासून घटस्फोट घ्यायला राजी केलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरी पोहोचल्यावर त्यानं घराचा दरवाजा उघडला अन् सुंदरीच्या खोलीच्या दारावर जोरजोरात घक्के मारायला सुरूवात केली. जोरजोरात हाका मारू लागला. सुंदरीनं संतापून दार उघडलं, ‘‘काय चाललंय? दरवाजा तोडायचाय का?’’

‘‘माझ्या घरातून बाहेर निघ…हे धंदे इथं चालणार नाहीत.’’ केवढ्यांदा गरजला राजन. त्यानं धक्का देऊन सुंदरीला बाजूला ढकललं.?खोलीत शिरून अनुभवची मानगूट धरून त्याला खोलीबाहेर काढलं अन् घराबाहेर हाकलून दिलं. सुंदरी ओरडत होती, पण तिलाही समजलं की आता तिला कुणा एकाचीच निवड करावी लागणार आहे. तिनं अनुभवसकट राजनचं घर सोडलं. सायंकाळपर्यंत तो आपल्या दुर्देवाच्या तुकड्यांना गोळा करत होता. सगळं घर स्वच्छ करून त्यानं हात झटकले. एक अध्याय संपला होता.

कोर्टात फक्त इतकंच बोलला, ‘‘ही माझ्यासाठी नाहीए. ज्याच्याबरोबर राहायचं आहे तिला, त्याच्याबरोबर राहू दे. तो तिचा हक्क आहे. तिचे भ्याड आईबाप तो हक्क तिला देऊ शकले नाही…पण मी देतोय…तो हक्क आणि ते स्वातंत्र्य. ती पूर्णपणे मुक्त आहे.’’

घटस्फोट घेऊनही बरेच दिवस झाले. पण राजन अजून गुमसुम होता. राधिका त्याचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. पण तो लग्नाचा विषय काढला की, ‘‘अजून नाही…’’ एवढंच बोलायचा.

कठोर कल्पनेचं कटुसत्य त्याच्या आयुष्याला इतकं कडवट करून गेलं होतं की अजून तो ती चव विसरू शकत नव्हता. त्यातून बाहेर पडायचा एकच मार्ग होता. दुसरं लग्न करून नव्यानं आयुष्य सुरू करणं.

‘‘भाऊजी, खरंच सांगते, तुम्ही पुन्हा लग्न करा. छान आयुष्य जगा. ती मजेत आपलं आयुष्य जगतेय अन् तुम्ही तिच्यासाठी झरताय? का?’’

‘‘मी आयुष्य जगत नाहीए…आयुष्य मला जगवतंय…’’ ‘‘मुळीच नाही.’’ राधिका हसून म्हणाली.

‘‘हे आयुष्य तुम्ही स्वत: निवडलंय. ते ही सुंदरीच्या दु:खात. फेकून द्या ती दु:खाची काळी हिडिस चादर…असं प्रेतासारखं आयुष्य जगू नका. घाण सुटलीय सगळीकडे…ते प्रेत, पुरा, नदीत वाहवून द्या…पण त्यातून मोकळे व्हा…या दुर्गंधीनं सगळ्यांपासूनच तुटताय तुम्ही…आत्ताच सावध व्हा. अजून वेळ गेलेली नाही…नव्यानं आयुष्य सुरू करा.’’

सगळी रात्रं राजननं विचारात घालवली. सुंदरी अजूनही त्याच्या मनांतून गेली नव्हती. दुसरीचा विचार मनात येणार कसा? त्याचा निर्णय होत नव्हता. वहिनीचं म्हणणं पटत होतं. तिची कळकळ त्याला समजत होती. पण दुसरं लग्नं करायचं म्हटलं अन् तिही तशीच निघाली तर? नकोच ते…! पण वहिनी म्हणाली तेही खरंच, तो सगळ्यांपासून दुरावला होता. त्यानंच स्वत:ला दु:खाच्या कोषात बंद करून घेतलं होतं. खरं तर सुंदरीचा आगाऊपणा, अति मॉडर्न असणं राधिकेला मंजूर नव्हतं. पण केवळ त्याच्या हट्टापायी ती घरात आली होती. आता वहिनी निवडेल तिच्याशी लग्न करायचं…शालीन, साधी, घर सांभाळणारी, समजूतदार…अगदी वहिनीसारखीच… पण अशी मिळेल का?

सगळी रात्र झोपेविना गेली. सकाळी त्यानं तारवटलेल्या डोळ्यांनीच घराला कुलुप घातलं अन् तो बाबांच्या घरी पोहोचला.

राधिक त्यावेळी बाबांना सकाळचा चहा देत होती. एवढ्या सकाळी त्याला बघून घाबरलीच! ‘‘काय झालं भाऊजी? आजा इतक्या सकाळी?’’

‘‘खूपच दिवसात तुझ्या हातचा चहा घेतला नव्हता. म्हटलं, चहा घ्यावा,

बाबांजवळ बसून गप्पा माराव्यात. आज अनायसे सुट्टी आहे…’’ राजननं म्हटलं.

आज राजन मोकळेपणानं बोलतोय. त्याचा मूड बदलला आहे. नेहमीच्यापेक्षा ताजातवाना अन् प्रसन्न वाटतोय हे राधिकेला जाणवलं. तिनं चहाचा कप त्याला दिला अन् खुर्ची ओढून घेत आपला चहाचा कप घेऊन ती बाबांजवळ बसली.

बाबांनाही बरं वाटलं. तेही खूप दिवसांनी अगदी मोकळेपणानं हसले. ‘‘खरचं छान झालं…मला तर वाटतं तू आता ते घर सोडून इथंच आमच्यात राहायला ये. शिब्बूही सतत बाहेर असतो. एकटी राधिकाही कंटाळते..’’ ते मनापासून बोलले.

‘‘नाही बाबा, त्या सुंदरीमुळे मी तुम्हाला खूपच दुखावलंय. मला शिक्षा मिळायलाच हवी.’’

‘‘नाही भाऊजी, तुम्ही मर्जीनं गेला नव्हता. फक्त तिच्यासाठी वेगळे झाला होता. कारण तिच्यावर तुम्ही प्रेम करत होता. त्यावेळी ते योग्यही होतं. पण या घराची दारं तुमच्यासाठी नेहमीच उघडी होती. अजूनही आहेत. बाबांना तर तुमच्या आठवणीनं सतत रडायला येतं. बाबांना वाटायचं ती हडळ आहे, चेटकीण आहे. तुम्हाला खाऊन टाकेल.’’ राधिकेचे डोळे भरून आले.

आपल्यावर ही माणसं आजही इतकं निर्व्याज प्रेम करताहेत हे बघून राजनही भावनाविवश झाला. ‘‘तुमच्या मर्जीबाहेर मी नाही.’’  त्यानं दाटल्या कंठानं म्हटलं.

राजनच्या निर्णयानं बाबा आनंदले. त्यांनी सगळ्या नातलगांना कळवलं की राजन दुसऱ्या लग्नाला कबूल झाला आहे. साधीशी, शालिन मुलगी शोधा.

पुन्हा खूप मुली सांगून येऊ लागल्या. यावेळी बाबा अन् राधिका खूपच सावध होते. मुलगी बघायला गेले की बाबा तिला बरेच प्रश्न विचारायचे. घरी आल्यावर त्यावर बराच विचार व्हायचा, चर्चा व्हायची. होस्टेलवाली तर अजिबात नको होती. घरगुती असावी, कुलीन, शालीन, फार शिकलेली नसली तरी चालेल पण प्रेमळ अन् सांभाळून घेणारी हवी.

खूप प्रयत्नांती शेवटी एक मुलगी पसंत केली गेली. बऱ्याच मागास भागातली होती. गरीब घरातली होती. जेमतेम दहावीपर्यंतचं शिक्षण झालेलं. रंगरूप अगदी बेताचं. तरीही बाबांना ती पसंत पडली. राजननंही होकार दिला.

लग्नाची तारीख ठरली. राधिकेनं विचारलं, ‘‘भाऊजी, नवरीचा शालू पसंत करायचा ना?’’

उदासपणे राजन म्हणाला, ‘‘तूच कर पसंत वहिनी, नवरी तू निवडली आहेस ना?’’

यावेळी लग्न अगदी साधेपणानं झालं. चोवीस तास सनई वाजली नाही. वधूनं उंबऱ्यावरचं माप ओलांडलं, अगदी जपून. तांदूळ अगदी हलकेच विखुरले. राजनंनं एका झटक्यात ते गोळा केले. पण सुंदरीच्या आठवणीनं त्याचे डोळे भरून आले होते.

नवी सून शांतपणे घरात वावरत होती. सगळ्यांचे स्वभाव, आवडीनिवडी समजून घेत होती. सासऱ्यांची काळजी घेत होती. जावेला बरोबरीनं घरकामात मदत करत होती.

राजन आपली कामं आपणच करत होता. त्यानं यावेळी अनूला, नव्या नवरीला आधीच सांगितलं, ‘‘जे काही विचारायचं आहे, ते वहिनीला विचारून कर.’’

नव्या नवरीनं हुशारीनं सर्वांची मनं जिंकली. सुंदरीच्या कटु आठवणीतून सगळेच मुक्त झाले. बाबा, शिब्बू, राधिका सगळे तिच्यावर खूष होते. राजनलाही तिनं जिंकून घेतलं.

घरातली बरीचशी जबाबदारी आता राधिकेनं अनुवर सोपवली होती. एक दिवस तिजोरी उघडत तिनं म्हटलं, ‘‘अनू, आता हे सगळं तुझं आहे. नीट सांभाळायचं.’’

‘‘अजून अनु नवी आहे. एवढी जबाबदारी तिच्यावर सोपवू नकोस…थोडा वेळ जाऊ दे…’’ बाबांनी म्हटलं, त्यांना वाटत होतं, राजनला राग तर येणार नाही ना?

‘‘जबाबदारीच समर्थ बनवते माणसाला. मीही आले तेव्हा नवीच होते…शिवाय एकटी…पण सांभाळलंच ना? आता तर आम्ही दोघी आहोत.’’ राधिकेनं अनुला जवळ घेत म्हटलं. बाबांना खूप आनंद झाला.                                                                    – क्रमश :

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें