“स्कूप” मधून अभिनेत्री करिश्मा तन्नाने घातली प्रेक्षकांना भुरळ ! 

* प्रतिनिधी

सोशल मीडियावर सध्या एका वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे ” स्कूप ” ! या हिट वेब सिरीजने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. उत्कंठावर्धक अभिनय असलेल्या करिश्माची ही सीरिज चर्चेचा विषय ठरते आहे. करिश्मा तन्नाने पत्रकार म्हणून साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घरात करून गेली. प्रतिभावान दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ही वेब सीरिज उत्तम प्रकारे दिग्दर्शित केली आहे. ही मालिका पत्रकारितेच्या गुंतागुंतीचा शोध घेते असताना यातली सगळी पात्र कथा खिळवून ठेवतात. करिश्माने साकारलेलं पात्र जागृती पाठक हा एक चर्चचा विषय ठरला आहे. ” स्कूप” पत्रकारितेच्या प्रवासावर अनोखा प्रकाश टाकतो.

एका प्रतिष्ठित पुरुष पत्रकाराच्या हत्येनंतर प्रसारमाध्यमांनी तिला गुन्हेगार ठरवले आणि इथून गोष्ट सुरू होते. ” स्कूप” मध्ये असलेली महिला पत्रकार तिच्या वैयक्तिक आयुष्यातले चढ उतार आणि पत्रकारिता मधला आव्हानात्मक प्रवास अश्या अनेक गोष्टी यातून बघायला मिळतात.

“स्कूप” मध्ये करिश्माच्या तन्ना हिच्या आकर्षक कामगिरीच जगभरात कौतुक झालं. उत्कृष्ट कथा असलेली स्कूप सध्या सगळ्यांची मन जिंकत आहे.

“स्कूप” नंतर करिश्मा तन्ना मनोरंजन इंडस्ट्रीत आता नवीन काय करणार आहे याचा चर्चांना उधाण आलं आहे. अलीकडेच ती धर्मा प्रॉडक्शनमध्ये दिसल्याने आता करिश्मा नक्की काय करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

कामात कुटुंबियांचा खंबीर पाठिंबा – रश्मी अनपट

* सोमा घोष

मराठी टीव्ही इंडस्ट्रीत काम करणारी महाराष्ट्रीयन अभिनेत्री रश्मी अनपटला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिच्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रात नसले तरी तिला मात्र प्रेक्षकांसमोर एखादी भूमिका साकारायला खूप आवडायचे. पुण्याची असलेल्या रश्मीची कामादरम्यान अभिनेता आणि पती अमित खेडेकरशी ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर २ वर्षांनी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी मुलगा अभीर झाला. तो वर्षाचा झाल्यानंतरच तिने अभिनयातील कारकिर्दीला पुन्हा सुरुवात केली. तिच्या कामात संपूर्ण कुटुंब तिला पूर्ण सहकार्य करते. त्यामुळे तिचा कुटुंबासोबत कामाचा चांगला ताळमेळ बसला आहे. सुंदर आणि हसतमुख रश्मी सध्या सन मराठीवरील ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. चित्रिकरणाचा व्यस्त दिनक्रम असूनही तिने वेळात वेळ काढून ‘गृहशोभिका’साठी गप्पा मारल्या. चला, तिच्याच तोंडून तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही अभिनयाच्या क्षेत्रात नव्हते. मी वयाच्या १० व्या वर्षांपासून व्यावसायिक नाटकात काम करायला सुरुवात केली. एक ऐतिहासिक नाटक होते, त्यात मी ५ वर्षांपर्यंत राजाराम महाराजांची भूमिका केली. त्यानंतर दोन वर्षे काहीही केले नाही. बारावीनंतर पुन्हा व्यावसायिक नाटक करू लागले. ग्रॅज्युएशननंतर मुंबईत येऊन मराठी टीव्ही इंडस्ट्रीसाठी काम करू लागले. ८ वर्षांपर्यंत मी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीकडे वळले.

आता या मालिकेत काय काम करत आहेस? त्यात तुझी भूमिका काय आहे?

यामध्ये मी एका महाविद्यालयात जाणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे, जिथे तिच्याबद्दलचे सर्व निर्णय तिचे वडील घेतात. तिच्या जेवणापासून ते रात्री झोपण्यापर्यंतचा दिनक्रम वडिलांनीच ठरवलेला असतो आणि ती आनंदाने त्याचे पालन करते. ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा आहे, ज्यात एक वडील मुलीची काळजी घेणारे, तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे आणि मुलीबद्दल मोठे स्वप्न पाहणारे आहेत.

तुझ्या अभिनय कारकिर्दीत कुटुंबाचे सहकार्य किती मिळाले?

सगळयांनी खूप साथ दिली. अनेकदा रात्री जेव्हा मी नाटक संपवून घरी परतायचे किंवा एखाद्या नाटकात काम करायला जायचे तेव्हा माझे वडील मला नाट्यगृहातून घ्यायला यायचे. लग्नानंतर सासू-सासऱ्यांचेही मला चांगले सहकार्य मिळत आहे. माझे पतीही मला खूप पाठिंबा देतात. त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.

टीव्ही इंडस्ट्रीत पहिला ब्रेक मिळण्यासाठी तुला किती वेळ लागला?

पुण्यात राहून मी टीव्हीवरील मालिकांसाठी दोन ते तीन वेळा ऑडिशन दिले होते. नंतर मला प्रोडक्शन हाऊसचा फोन आला. मला नकारात्मक भूमिका मिळाली होती, त्यावेळी मी मास्टर डिग्री घेण्यासाठी रांगेत उभी राहून शुल्क भरणार होते. तितक्याच प्रोडक्शन हाऊसचा फोन आल्यामुळे मी गोंधळून गेले. मी काय करू? अभिनय की शिक्षण? शुल्क भरण्याची रांग सोडून मी सर्वात आधी वडिलांना भेटून त्यांचे मत विचारले. त्यांनी मला जे आवडेल ते करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी मुंबईत अभिनयासाठी आले.

मुंबईत आल्यानंतरचा तुझा प्रवास कसा होता?

मी अनेक मोठया मराठी कलाकारांसोबत काम केले. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. माझा हा प्रवास जवळपास १३ वर्षांचा आहे. मला या काळात कोणताही वाईट अनुभव आला नाही. लोक मनोरंजन क्षेत्राबद्दल खूप काही बोलतात, पण मला कधीच तसे काही जाणवले नाही. मुळात प्रत्येक व्यक्तीसाठी या इंडस्ट्रीचा अनुभव वेगळा असतो. करिअर म्हणून हे क्षेत्र निवडल्याचा मला आनंद आहे.

पती अमित खेडेकरशी तुझी कशी ओळख झाली?

मी जे पहिले मराठी नाटक केले त्यात माझा पतीही अभिनय करत होता. नाटकादरम्यान आम्ही दोघे भेटलो आणि दोन वर्षांनी मैत्रीचे रुपांतर लग्नात झाले. माझा मुलगा ४ वर्षांचा आहे.

मुलासोबत काम करण्यासाठी तू कसे जुळवून घेतलेस?

गरोदर राहिल्यानंतर काही दिवसांनी मी कामातून ब्रेक घेतला. त्यानंतर मुलगा एक वर्षाचा झाल्यावर, पुन्हा काम सुरू केले. माझे आई-वडील आणि सासू-सासरे मिळून त्याची काळजी घेत होते. त्यामुळे काम करणे माझ्यासाठी अवघड नव्हते. माझा मुलगा अजिबात त्रास देत नाही. त्याला दोन्ही घरातल्या आजी-आजोबांसोबत राहायची सवय झाली आहे.

तू आतापर्यंत कोणकोणत्या भूमिका साकारल्या आहेस? कोणती भूमिका तुझी सर्वात आवडती आहे? कोणत्या भूमिकेने तुला ओळख मिळवून दिली?

माझ्या पहिल्या मालिकेत मला नकारात्मक भूमिका साकारायची होती. त्यावेळी मी माझ्या मित्र-मैत्रिणींना विचारले होते की, मला अशी भूमिका का मिळाली, मी नकारात्मक दिसते का? त्यांनी हसून मला समजावले की, स्वत:च्या स्वभावापेक्षा वेगळी भूमिका साकारणे हे सर्वात मोठे आव्हान असते. पहिल्याच मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणार असल्यामुळे मला खूपच निराश झाल्यासारखे वाटत होते. स्वत:पेक्षा वेगळी भूमिका साकारणे माझ्यासाठी अवघड होते, पण हळूहळू सवय झाली. दिग्दर्शकांनी खूप मदत केली. या मालिकेनंतर मी अनेक सकारात्मक भूमिकाही साकारल्या. प्रत्येक भूमिकेत काही ना काही आव्हान असतेच. भूमिका कुठलीही असो ती कलाकारासाठी खूप खास असते आणि ती साकारण्यासाठी तो जीव तोडून मेहनत करतो.

‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेत मी ‘ईश्वरी’च्या मुख्य भूमिकेत होते. या मालिकेने एक हजार भाग पूर्ण केले. त्या मालिकेमुळे माझी ओळख मिळाली. त्यादरम्यान बाहेर गेल्यावर लोक माझे कौतुक करायचे. एका महिलेने तिच्या मुलीचे नाव इश्वरी ठेवले होते, माझ्यासाठी हे खूपच हृदयस्पर्शी होते. एकदा मी पुण्याला गेले होते, तिथे बाईकवरील एक काका-काकूने मला ओळखले. गाडी थांबवून ते माझ्याशी बोलले आणि रडू लागले. मी घाबरले, विचारल्यावर समजले की, मालिकेत एके दिवशी माझ्या सासूने माझ्या कानाखाली मारले होते. ते पाहून खूप वाईट वाटले, असे काकूंनी रडत सांगितले. ती जखम बरी झाली आहे की नाही, हे मी पाहातेय, असे त्या म्हणाल्या. दैनंदिन मालिकांशी प्रेक्षकांचे घट्ट नाते असते. ते अनुभव खूप वेगळे असतात. प्रेक्षकांची आवड हेच तिथे मी काम करण्यामागचे कारण आहे. त्यातून मला खूप आनंद मिळतो.

तुला कधी नकाराचा सामना करावा लागला का? त्यावेळी तू त्याला कशी सामोरी गेलीस?

रिजेक्शन किंवा नकार हा अभिनयाचा एक भाग आहे. कधीकधी त्याला सामोरे जावे लागतेच, कारण कधीकधी चेहरा हा व्यक्तिरेखेला साजेसा नसतो. मी यावर जास्त विचार न करता पुढे जाते. यामुळे अनेकदा तणाव येतो. अशावेळी मी माझ्या पतीने सांगितलेले आठवते. तो म्हणतो की, एक काम झाले नाही तर तर दुसरे खूप जास्त छान होईल. तो तणाव येऊ देत नाही, मीही त्याने सांगितल्याप्रमाणेच वागते. मी नेहमी सकारात्मक विचार करते.

हिवाळयात सौंदर्याची काळजी कशी घेतेस?

मी नेहमीच माझ्या आहाराकडे जास्त लक्ष देते. मध्येच भूक लागल्यावर सुका मेवा, फळे खाते, पण मला वडापाव खायला खूप आवडतो. तो मी कधीतरी खाते. मी खवय्यी आहे. मी साधारण डाएट करते. सकाळी उठून गरम पाणी, ब्राऊन ब्रेड, लोणी, पोहे, उपमा इत्यादी खाते. माझ्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात चपाती, हिरव्या पालेभाज्या, डाळ इत्यादी असते. पुरेसे पाणी पिते.

आरोग्याची काळजी कशी घेतेस? काही संदेश द्यायचा आहे का?

मी योगासने, व्यायाम करते. प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स इत्यादींचा माझ्या आहारात समावेश असतो. या सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. मी जंक फूड खाणे टाळते. मी सर्व महिलांना नैसर्गिक अन्न, तूप, पाणी, हिरव्या भाज्या इत्यादींचे सेवन करण्याचा सल्ला देईन.

आवडता रंग – लाल.

आवडते वस्त्र – पारंपरिक साडी.

आवडते पुस्तक – स्वामी, रणजीत देसाई.

वेळ मिळाल्यावर – कुटुंबासोबत वेळ घालवणे.

आवडता परफ्यूम – जाराचे सिक्रेट.

पर्यटन स्थळ – जम्मू आणि काश्मीर, लंडन.

जीवनातील आदर्श – गरजूंना मदत करणे.

सामाजिक कार्य – अनाथ आणि वृद्धांसाठी काम करणे.

स्वप्न – समाजासाठी काहीतरी करायचेय.

प्रतिक्षा शिवणकरः मालिका शोधण्याची गरज भासली नाही

* सोमा घोष

‘कॉलेज डायरी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मराठी अभिनेत्री म्हणजे प्रतिक्षा शिवणकर. ती गडचिरोलीची आहे. तिची आई भारती सुनील शिवणकर आणि वडील सुनील एकनाथ शिवणकर हे दोघेही शिक्षक असून कलाप्रेमी आहेत. त्यामुळेच त्यांनी मुलींना लहानपणापासूनच कलेच्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. प्रतिक्षा शिवणकर सध्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. प्रतिक्षाचे लग्न नोव्हेंबर २०१९ मध्ये डॉ. अभिषेक साळुंके यांच्यासोबत थाटामाटात झाले. ते मूळचे बारामतीचे असून मुंबईत रेडिओलॉजिस्ट आहेत. प्रतिक्षाला अभिनयासोबतच नृत्याचीही प्रचंड आवड आहे. महाविद्यालयात असताना ती कायम सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची. अभिनयाची प्रचंड आवड तिला प्रशांत दामले यांच्या टी स्कूलपर्यंत घेऊन गेली. प्रशांत दामले यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

सोनी मराठीवरील ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत प्रतिक्षा रेवतीची प्रमुख भूमिका साकारत आहे, ज्यामध्ये ती कन्नड कुटुंबातील मुलगी आहे. ही मुलगी घरात काहीही बोलायला घाबरते, पण बाहेर बिनधास्तपणे वागते.

लहानपणापासूनच प्रतिक्षाला कलेची प्रचंड आवड आहे, मात्र भविष्यात अभिनेत्री होऊ, असे तिला वाटले नव्हते. ही भूमिका तिच्या व्यक्तिगत आयुष्याशी मिळतीजुळती आहे, कारण ती घरात कोणाला काही बोलत नसली तरी बाहेर बिनधास्त राहाते. मालिकेतील रेवती हे पात्र बरेचशे प्रतिक्षासारखे आहे. या मालिकेसाठी प्रतिक्षाने बरेच ऑडिशन्स दिले होते. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रिकरणात व्यस्त असूनही प्रतिक्षाने वेळात वेळ काढून ‘गृहशोभिका’शी गप्पा मारल्या. त्यातील हा काही खास भाग :

तू अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार कसा केलास?

माझ्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रातील नाही. माझे पालक शिक्षक आहेत. लहानपणापासूनच मी नृत्य शिकले. शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमात मी माझ्या वडिलांनी लिहिलेल्या छोटया एकांकिका स्टेजवर सादर करायचे. माझे आई-वडील खूपच हौशी आहेत आणि त्यांनी मला लहानपणापासूनच क्रीडा, नृत्य, नाटक इत्यादींमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. माझी लहान बहीणही खूप चांगली नृत्यांगना आहे.

तुला कुटुंबीयांचे किती सहकार्य मिळाले?

सुरुवातीला माझ्या आई-वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला, पण हळूहळू त्यांनी माझी इच्छा समजून घेतली. माझे आजोबाही शिक्षक होते, त्यामुळे हे क्षेत्र समजून घेणे त्यांच्यासाठी अवघड होते, कारण त्यांना वाटत होते की, मी चुकीचे काहीतरी बोलत आहे. नंतर सर्वांनीच सहकार्य केले. आता मी मराठी मालिकेसह ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकातही आहे. तिथे मला पहिला ब्रेक मिळाला तेव्हा माझे घरचेही आनंदी झाले, कारण मी प्रशांत दामले यांच्या नाटकात काम करणार होते. अशा महान दिग्दर्शकासोबत नाटकाच्या माध्यमातून अभिनयाचे थेट सादरीकरण करणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

तूला पहिला ब्रेक कधी मिळाला?

मला ‘कॉलेज डायरी’तून ब्रेक मिळाला. त्यानंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकातून मला खूप मोठा ब्रेक मिळाला. यात खूप मोठमोठे कलाकार आहेत आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. खूप काही शिकायला मिळाले. त्यानंतर मला मालिका मिळाली. त्यासाठी मी अनेक ऑडिशन्स दिल्या.

तूला किती संघर्ष करावा लागला?

संघर्ष करावाच लागतो, पण मला तो जास्त करावा लागला नाही, कारण जेव्हा मी नाटकात काम करत होते, त्यावेळी माझ्याकडे अनेक मालिकाही होत्या. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित केले होते. मला मालिका शोधण्याची गरज भासली नाही. त्यामुळे मला जास्त संघर्ष करावा लागला नाही.

डॉ. अभिषेक साळुंके यांना तू कशी भेटलीस?

हे एक अॅरेज्ड कम लव्ह मॅरेज आहे. मी २०१७ मध्ये प्रशांत दामले यांच्या पुण्यातील टी स्कूलमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. तिथे अभिनय, गाणे आणि नृत्य शिकवले जायचे. तिथे अभिषेकही गाण्यासाठी आला होता. तेथेच आमची ओळख झाली. त्याच दरम्यान मी एका नाटकाच्या निमित्ताने अमेरिकेत गेले. तिथून आल्यावर अभिषेकने मला लग्नासाठी मागणी घातली. आम्हाला फिरायला जाण्याची फारशी संधी मिळाली नाही, कारण ६ महिन्यांतच आमचे लग्न झाले.

तुला लग्नानंतर अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना काही अडचणी आल्या का?

ज्याप्रमाणे माझ्या घरातील कोणी अभिनय करत नाही, त्याचप्रमाणे अभिषेकच्या घरातही कोणी अभिनय क्षेत्रात नाही. त्यामुळेच त्याला माझा अभिमान असून माझा गर्व वाटतो. माझी प्रत्येक मालिका तो आवडीने पाहातो आणि नातेवाईकांनाही मालिका पाहाण्यास सांगतो.

हिंदी मालिका, वेब सिरीज, चित्रपटांमध्ये काम करण्याची तुझी इच्छा आहे का? एखादे स्वप्न आहे का?

हिंदीबाबत अजून विचार केलेला नाही, कारण मी एकावेळी एकच काम करते, जेणेकरून त्या कामाकडे शंभर टक्के लक्ष देऊ शकेन. हिंदीतली एखादी चांगली स्क्रिप्ट आली तर मला आवडेल. रणवीर सिंहसोबत एखादा हिंदी चित्रपट करायला मिळाला तर मला खूप आवडेल. त्याला पाहताच मी एकतर जोरजोरात उडया मारायला किंवा रडायला लागेन.

पावसाळयात तू त्वचेची आणि केसांची काळजी कशी घेतेस?

मला जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा मी त्वचेला आणि केसांना दही लावते. याशिवाय बेसन, हळद आणि त्यात दूध मिसळून पेस्ट तयार करून ती चेहऱ्याला लावते. भरपूर पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेट ठेवते. हायड्रेशन सीरमही लावते.

तू किती खवय्यी आणि फॅशनेबल आहेस?

मला खायला प्रचंड आवडते. चायनीज, मेक्सिकन, पंजाबी, दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेले मासे, चिकन खूप आवडतात. आईने बनवलेली डाळ-खिचडी खूपच आवडते. फॅशन मला आवडते. मी स्वत: पुरणपोळी आणि वडापाव चांगला बनवते. मला पारंपरिक लुक जास्त आवडतो. साडी आणि पंजाबी ड्रेस आवडतात. मला नृत्यही फार आवडते, पण वेळेअभावी मी ते फारच कमी करते. मी कथ्थक शिकायचा खूप प्रयत्न केला, पण वेळ मिळत नाही.

आवडता रंग – काळा.

आवडता पेहेराव – पारंपरिक, पंजाबी ड्रेस आणि साडी.

आवडते पुस्तक – ययाती.

आवडता परफ्यूम – अत्तर.

आवडते पर्यटन स्थळ – देशात केरळ आणि विदेशात अमेरिकेतील सेन हौजे.

वेळ मिळाल्यावर – झोपणे आणि स्वयंपाक बनवणे.

जीवनातील आदर्श – माझ्यामुळे कोणी दुखावले जाऊ नये.

सामाजिक कार्य – वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम एकत्र उघडणे.

ड्रीम प्रोजेक्ट – स्पोर्ट्स परसन आणि शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे बायोपिक.

प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि ‘प्रोजेक्ट बाला’ संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल हॉटसीटवर!

* सोमा घोष

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात ‘प्रोजेक्ट बाला’ संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या उपस्थित राहणार असून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहे. सईबरोबर सौम्या डाबरीवालही ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होणार आहेत. या दोघी जणी नागपूर येथील ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत या भागांत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम, संदीप वासलेकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात प्रसिद्ध आणि लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल या मंचावर उपस्थित राहून ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या दोघी नागपूर येथील वारांगना व त्यांची मुले यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. १९९२ साली ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना झाल्यापासून ही संस्था उपेक्षित व वंचित मुलांचं पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून स्वावलंबी बनवत आहे. तर ‘प्रोजेक्ट बाला’ या संस्थेच्या अंतर्गत सौम्या डाबरीवाल आणि त्यांचे सहकारी मासिक पाळी संदर्भात महिलांमध्ये जनजागृती करतात.

मूळची सांगलीची असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या अभिनय कारकिर्दीचा सुरुवातीपासूनचा प्रवास ‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात  उलगडला. ‘आयुष्यात मिळालेले अनुभव हे सगळ्यात मोठे गुरू असतात’, असे मत सईने या कार्यक्रमात व्यक्त केले. वयाच्या १७ व्या वर्षी सईने काम करण्यास सुरुवात केली. सईचं सांगलीवरचं प्रेम, सांगलीच्या भाषेवर, लहेजावर असणारं प्रेम तिनी या भागात आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर सई आणि तिची आई यांच्यामधले नाजूक बंधही ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडण्यात आले. समाजकार्य आणि मनोरंजन क्षेत्र यांतले मोठं नाव असा मेळ असणारा, हा विशेष भाग निश्चितच रंगतदार ठरणार आहे.

पाहा, ‘कोण होणार करोडपती’- विशेष भाग, शनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें