वेडं मन

कथा * ममता राणे

इथं आल्यापासून ईशानं चिनार वृक्षांचा सहवास मनमुराद अनुभवला. त्याच्या पानांचा सुवास तिच्या मनांत, देहात मिळाला. प्रत्येक प्रेक्षणीय स्थळावरून ती चिनारचं एक पान डायरीत ठेवायला उचलून घ्यायची. चिनार वृक्ष तिचा अत्यंत आवडता होता.

‘‘ईशा…’’ आपल्या नावाची हाक ऐकून ती भानावर आली. त्या उताराच्या पायवाटेवरून ती धावत, उड्या मारत हॉटेलच्या समोरच्या रस्त्यावर आली.

‘‘बराच उशीर झालाय, निघूयात आता.’’ शर्मिलानं म्हटलं, ‘‘सकाळी लवकर पहलगामसाठी निघायचंय, आता थोडी विश्रांती घेतली पाहिजे.’’

‘‘ईशा वहिनी इथं आल्यावर एकदम लहान मुलगी झाल्या आहेत. मी बघितलं मघाशीच टेकडीवर फुलपाखरामागे काय छान धावत होत्या.’’ विरेंद्रनं म्हटलं. ईशा लाजली. ती स्वत:तच इतकी गुंग झाली होती की नवरा परेश अन् त्याचा मित्र व त्याची बायको या सर्वांचा जणूं तिला विसर पडला होता. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याबद्दल तिनं खूप ऐकलं आणि वाचलं होतं. सिनेमात हिरोहिरोईन बर्फात प्रणय करताना, प्रणय गीत गाताना बघितलं होतं. स्वत: काश्मीरला आल्यावर तिला जणू पंख फुटले होते.

इतक्या लांब आपण काश्मीरला कधी येऊ असा विचारही तिनं केला नव्हता. इथं आल्यावर किती तरी दिवसांनी तिला इतकं मोकळं मोकळं अन् आनंदी वाटत होतं. दिवसभर फिरून झालं होतं. आता हॉटेलात परतायची वेळ झाली होती.

सायंकाळनंतर डोंगरावर रिमझिम पाऊस झाला होता. हवेतला गारवा वाढला होता. हॉटेलातल्या मऊ गुबगुबीत अंथरूणावर ईशा मात्र कूस पालटत झोपेची आराधना करत होती. शेजारी परेश, तिचा नवरा गाढ झोपेत होता. रात्र बरीच झाली असावी. तिनं घड्याळात बघितलं, वेळ संपता संपत नव्हता. दिवसभर भरपूर फिरणं झाल्यावरही तिला दमणूक अजिबात जाणवत नव्हती.

मनांत विचारांची गर्दी झाली होती अन् अवचित दोन निळे डोळे तिच्यापुढे आले. निळ्या सरोवरासारखे रशीदचे निळे डोळे. गेले दोन तीन दिवस तो त्यांचा गाईड कम ड्रायव्हर म्हणून त्यांच्याबरोबर होता. ते ज्या दिवशी हॉटेलात पोहोचले तेव्हापासून परेशनं त्याची गाडी बुक केली होती. दिसायला रशीद खूपच देखणा होता. एखाद्या युरोपियन मॉजेलसारखा गोरा, गुलाबी रंग, निळे डोळे, धारदार नाक आणि बोलायला गोड, वागायला नम्र. मदतीला तत्पर असलेला रशीद जवळच राहत असल्यामुळे केव्हाही बोलावलं तरी पटकन् हजर व्हायचा.

marathi-love-story

दोन दिवसांतच रशीदनं त्यांना किती तरी प्रेक्षणीय स्थळं दाखवली. त्याला प्रत्येक जागेची संपूर्ण माहितीही होती अन् सांगण्याची पद्धतही आकर्षक. ईशाला डायरी लिहिण्याची आवड होती. ती प्रत्येक स्थळाची सगळी माहिती डायरीत टिपून घ्यायची. बरोबर असलेली इतर तिघं फक्त जेवढ्या, तेवढं बोलत असत पण ईशाच्या बोलक्या स्वभावामुळे ती रशीदला सतत प्रश्न विचारत होती. रशीदही अगदी तत्परतेनं त्याला माहित असलेल्या गोष्टी तिला सांगायचा. बरोबरीच्या वयामुळे असेल कदाचित. दोघांच्या बऱ्याच आवडी निवडी एकसारख्या आहेत हे दोघांनाही कळलं होतं.

ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेल्या ईशाचं सहजच समोर लक्ष गेलं तर समोरच्या आरशात तिला रशीदचे डोळे तिचाच शोध घेताहेत असं जाणवायचं. ती पटनकन् आपली नजर इतरत्र वळवायची. रशीददेखील थोडा कावराबावरा व्हायचा. त्याच्या बोलण्यात आलं होतं की तो सुशिक्षित आहे, चांगलं काम शोधतो आहे, तोवर हेच काम त्याला आधार देतंय. धाकट्या बहिणीचं लग्न करायची त्याच्यावर जबाबदारी आहे, त्यासाठी तो पैसे जमवतोय. त्याचा साधेपणा, प्रामाणिकपणा यामुळे ईशाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. मैत्रीची भावनाही निर्माण झाली होती.

परेश आणि ईशाच्या लग्नाला फार दिवस झाले नव्हते. पण हे लग्न ईशाच्या इच्छेविरूद्ध झाल्यामुळे ती मनोमन नाराज होती. ईशाला भरपूर शिकून स्वत:च्या पायावर उभं रहायचं होतं, पण घरचे लोक तसे जुन्या वळणाचे होते. तिचं शिक्षण अपूर्ण असतानांच त्यांना हे परेशचं स्थळ मिळालं. चांगला व्यवसाय, आटोपशीर कुटुंब, शिकलेला, निरोगी, निर्व्यसनी मुलगा बघून त्यांनी ईशाचं लग्न करून टाकलं.

ईशानं बराच विरोध केला होता पण वडिलांनी हार्टअटॅक आल्याचं जबरदस्त नाटक केलं. घाबरून ईशानं विरोध मागे घेतला. आईनंही समजावलं. श्रीमंत व्यवसायी घरातल्या सुनांनी थाटात राहून घर सांभाळायचं असतं.

लग्नानंतर ईशाला जाणवलं की परेशच्या अन् तिच्या स्वभावात, आवडीनिवडीत खूप तफावत आहे. आधीच मनाविरूद्ध लग्न झालेलं त्यातून ही तफावत त्यामुळे दोघांची मनं जुळली नव्हती. दोघांमधला मानसिक दुरावा दूर करण्याचा प्रयत्न ईशानं केला नाही, परेशच्या तर ते गावीही नव्हतं. दोघांचे देह जरी भेटत असले तरी मन अलिप्तच होते. तो त्या घरातला एकुलता एक मुलगा होता. व्यवसायासाठी भरपूर वेळ देत होता, मात्र बायकोसाठी वेळ द्यावा हे त्याला समजत नव्हतं.

नदीच्या दोन काठांसारखं त्यांचं आयुष्य सुरू होतं. समांतर असूनही एकमेकांशी भेट नाही, अशी अवस्था होती. इतका मोठा नावारूपाला आलेला व्यवसाय सांभाळणं सोपं नाही. घरातली सुबत्ता घरातील दोन कर्त्या पुरूषांच्या कष्टामुळेच आहे हे ईशाला कळत होतं…पण ती सुखी नव्हती हेच तिचं दु:ख होतं.

ईशा अवखळ, बडबडी होती पण लग्नानंतर मात्र ती उदास, अबोल झाली होती.

खरंतर परेश इतर नवऱ्यांसारखा अरेरावी करणारा नव्हता. तसं म्हटलं तर दोघांमध्ये वाद, भांडणं असंही काही नव्हतं. पण लग्नानंतरच्या नव्या नव्हाळीत एकमेकांविषयी जी ओढ तरूण दाम्पत्यात असते, तीही नव्हती.

विरेंद्र अन् परेशची जुनी मैत्री होती. त्याच्या बायकोशी, शर्मिलाशी ईशाची बऱ्यापैकी मैत्री झाली होती. विरेंद्रला परेशच्या अत्यंत साध्या स्वभावाची चांगलीच ओळख होती. त्याच्या लक्षात ईशाचं अबोलपण आलं. त्यांनंच सुचवलं की परेश ईशानं दोघांनीच कुठं तरी फिरून याव. घराबाहेरच्या मोकळ्या वातावरणांत दोघंही थोडे खुलतील.

विरेंद्र परेश-ईशाचा हितचिंतक आहे हे ईशा जाणून होती. पण प्रॉब्लेम असा होता की ईशाला अजून परेशचा स्वभाव नीटसा कळलेलाच नव्हता. तो अबोल होता पण त्याला खुलवण्याचा प्रयत्न ईशानंही केला नव्हता. एक तऱ्हेनं ती मनाविरूद्ध लग्न झाल्याचा सूड उगवत होती.

तिच्या मनांत तिच्या आईवडिलां एवढाच परेशही दोषी होता. त्यानं तिला नाकारलं असतं तर हे लग्न झालंच नसतं. हे लग्न तिला पसंत नाही हे तिला लोकांना दाखवून द्यायचं होतं.

लग्नानंतर दोघं हनीमूनसाठी जाऊ शकले नव्हते. ईशानंही कधी बाहेर कुठं जाऊयात असा उत्साह दाखवला नव्हता. ईशाला भीती वाटली की दोघंच प्रवासाला गेले तर कदाचित दोघांनाही कंटाळवाणं होईल, त्यापेक्षा अजून कुणी बरोबर असलेलं चांगलं, म्हणून तिनं विरेंद्र अन् शर्मिलालाही बरोबर चलण्याचा आग्रह केला. सगळ्यांनी मिळून काश्मीरची निवड केली अन् ते आता काश्मीरला आले होते.

रात्रीच्या अंधारात शिकारा (हाऊसबोट)च्या दिव्यांचं प्रतिबिंब सरोवरातल्या पाण्यात पडलं, तेव्हा हजारो हिरे झगमगताहेत असं सुंदर दृष्य दिसतं, मंद लाटांच्या हेलकाव्यानं प्रतिबिंबही हलायचं अन् त्यातून अनेक मजेदार आकार निर्माण व्हायचे. तासन् तास त्याकडे बघत बसायची ईशा. त्या निसर्गरम्य वातावरणांत खरं तर ईशाच्या प्रणय भावना उचंबळून आल्या होत्या, तिला वाटत होतं की परेशनं तिच्या जवळ यावं, तिला मिठीत घ्यावं, मनांतलं गूज तिला सांगावं. खरं तर तिनं पुढाकार घेतला असता तर कदाचित परेशनं तिला साथ दिली असती पण तिचा अहंकार आडवा येत होता. त्यामुळेच काश्मीरच्या असा नयनरम्य वातावरणांतही ती दोघं एकमेकांपासून दुरावलेलीच होती.

शर्मिलाशी ईशाची मैत्री अलीकडचीच, त्यामुळे त्या दोघी जिवलग मैत्रिणी नव्हत्या. तिच्याशी मनातलं बोलावं एवढी जवळीक नव्हती. म्हणूनच ईशाला फारच एकटं एकटं वाटत होतं.

कंटाळून ईशा खोलीत आली. अजून परेश खोलीत आला नव्हता. तिनं एक पुस्तक वाचायला घेतलं. पण त्यात मन रमेना. वैतागून पुस्तक आपटलं.

शर्मिला जागी असेल तर गप्पा मारूयात असा विचार करून ती त्यांच्या खोलीकडे आली. बंद दारावर टकटक केलं. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही तेव्हा ती उलट पावली आपल्या खोलीत येऊन अंथरूणावर आडवी झाली. तिला खूप एकटं एकटं वाटलं अन् रडू फुटलं. तिच्या अश्रूंनी उशी चिंब भिजली. आज झोप नाराजच होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा भटकंती सुरू केली. नेहमीप्रमाणे रशीद वेळेवर येऊन उभा होता. आज डोंगरावर जायचं होतं. पायीच डोंगर चढायचा होता. ती अवघड चढाची वाट ईशानं सहज पूर्ण केली अन् सर्वात आधी ती उंच पठारावर पोहोचली. तिला खूप बरं वाटलं. ती खळखळून हसली. रशीदनं तिला पाण्याची बाटली दिली. वरून ईशानं बघितलं चढाईच्या पायवाटेवरून तिघे हळूहळू येत होते. घनदाट जंगलानं वेढलेला डोंगर किती सुंदर दिसत होता.

‘‘मॅडम, तुम्ही तर कमाल केलीत. किती चपळाईनं अन् त्वरेनं डोंगर चढून आलात. शहरातल्या नाजूक मुलींना हे जमत नाही.’’ रशीदनं म्हटलं.

ईशानं दोन्ही हात पसरून एक दीर्घ श्वास घेतला. जंगलातल्या त्या शुद्ध प्राणवायूंचा वास तिनं आपल्या शरीरात करून घेतला.

‘‘रशीद, तू किती सुंदर जगात राहतोस रे.’’ ती कौतुकानं म्हणाली.

रशीदनं हसून मान तुकवली. इतक्या प्रेमानं आजवर रशीदशी कुणी वागलं नव्हतं. ईशाचे प्रश्न संपत नव्हते अन् रशीदही शांपणे तिच्या प्रश्नांना उत्तरं देत होता.

एव्हाना इतरही मंडळी वर पोहोचली होती. तिघंही धापा टाकत होती. थकलेल्या परेशनं एका दगडावर बैठक मारली. ईशाला त्याच्याकडे बघून हसायला आलं. धंद्यात कितीही कामं असली तरी स्वत:ला निरोगी अन् फिट ठेवायला परशेनं रोज व्यायाम करायला हवा. हे तिला प्रकर्षानं जाणवलं.

विरेंद्रने सर्वांचे फोटो काढले. सगळे त्या सुंदर वातावरणाचा आनंद घेत असतानांच एकाएकी ढग दाटून आले आणि जोराचा पाऊस सुरू झाला. घाईनं त्यांनी एक आडोसा गाठला.

बराच वेळ पाऊस पडत होता. खालून काही घोडेवाले पर्यटकांना घ्यायला आले. सर्वांनी घेड्यावरून खाली उतरायचं ठरवलं. उतरताना रस्ता उताराचा होता. ईशाच्या घोड्याबरोबर रशीद चालत होता. ईशा फार घाबरत होती. त्यामुळे तिचा घोडा हळू चालत होता. बाकीची तिघं पुढे निघून गेले. ईशा रशीदला म्हणाली, ‘‘रशीद घोड्याला हळूहळू चालू दे. मला भीती वाटतेय, मी पडेन म्हणून.’’

‘‘घाबरू  नका मॅडम, अजिबात घाबरू नका. तुम्हाला काही होणार नाही. पण आधीच आपण फार मागे राहिलो आहोत. पुढे गेलेले आपले लोक आपली काळजी करत असतील.’’ रशीद तिला धीर देत होता. पावसामुळे वाट निसरडी झाली होती. घोडा थोडासा ठेचकळाला अन् वर बसलेली ईशा घोड्यावरून घसरली. घाबरून तिनं किंकाळी फोडली.

रशीदनं चपळाईनं तिला धरलं खरं, पण ओल्या जमीनीवरून पाय निसटल्यामुळे रशीद खाली पडला…ईशा त्याच्या अंगावर कोसळली. तिचे ओेले मोकळे केस त्याच्या चेहऱ्यावर विखुरले. घाबरल्यामुळे तिची छाती धडधडत होती. दोघं एकमेकांच्या इतके जवळ होते की त्यांचे श्वास एकमेकांना जाणवंत होते. त्याच्या स्पर्शानं ईशाला जणू विजेचा झटका बसला.

ईशा कशीबशी सावरली, उठून बसली. रशीदही उठला. भिजल्यामुळे ईशाचे कपडे अंगाला चिकटलेले होते. रशीदकडे बघताच ईशा लाजेनं लाल झाली. त्या एका क्षणांत त्यांच्यातली सहज मैत्री जणू संपली होती. एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं.

संपूर्ण वाटेत दोघंही गप्प होते. ईशाला खरं तर काहीच समजत नव्हतं. कधी ते हॉटेलात पोहोचले तेही तिला कळलं नाही. समोरच शर्मिला, विरेंद्र आणि परेश तिची काळजी करत असलेले दिसले.

पटकन् परेश तिच्याजवळ आला. ईशाच्या कपड्यांना चिखल लागला होता. तिनं सांगितलं, ती घोड्यावरून पडली तेव्हा तर परेश, शर्मिला विरेंद्र सगळ्यांनाच खूप काळजी वाटली की ईशाला काही गंभीर दुखापत तर द्ब्राली नाहीए? पण ईशानं त्यांना आश्वस्त केलं तिला लागलं नाहीए, पण ती पडल्यामुळे अन् तुम्ही लोक न दिसल्यामुळे खूप घाबरली होती. आता ती ठीक आहे. तुम्ही सर्व दिसल्यावर तर आता मुळीच भीती वाटत नाहीए.

बाथरूममध्ये गरम पाण्याच्या शॉवरखाली ईशा स्नान करत होती. तिला तिच्या मनांतल्या भावनांचा कल्लोळ समजत नव्हता. राहून राहून तिचं घोड्यावरून पडणं, तिला रशीदनं सावरणं…दोघांचं चिखलात पडणं, त्याचा निकट स्पर्श, त्या स्पर्शानं जाणवलेला करंट पुन:पुन्हा आठवत होता. असं पूर्वी कधी जाणवलं नव्हतं. परेश रात्रीच्या अंधारात तिच्या शरीराला स्पर्श करायचा तेव्हाही शरीराला अशा झिणझिण्या जाणवंत नव्हत्या.

जेवताना तो म्हणाला, ‘‘ईशा, घरून फोन आला होता, मला उद्याच जावं लागेल…’’

‘‘अचानक? तसेही दोन दिवसांनी परतणारच आहोत ना आपण?’’ ईशानं विचारलं.

‘‘तू इथंच थांब, मला एकट्यालाच जावं लागेल. दुकानांत काही अडचण आली आहे. तू काळजी करू नकोस. तुझी इथली सर्व व्यवस्था करूनच मी जाईन. उद्या आपण श्रीनगरला जातो आहोत. तिथूनच मी एयरपोर्टवरून परत जातो.’’

‘‘पण मग मला एकटीला इथं बरं वाटणार नाही. बघा ना दोन दिवस राहता आलं तर?…’’ ईशाला परेशचं वागणं आकलत नव्हतं. एकत्र आलोय तर एकत्रच जाऊयात, ती इथं शर्मिला अन् विरेंद्रसोबत एकटी कशी राहील?

‘‘ईशा, समजून घे, धंद्यात असे प्रसंग येतात. हे एक मोठं डील आहे आणि मी गेलो नाही तर फार मोठं नुकसान होईल. तशीही तुला अजून इथं थांबायची इच्छा आहेच ना? पुन्हा विरेंद्र अन् शर्मिला वहिनीही आहेत सोबतीला. तू अगदीच एकटी नाहीएस. तुझ्यासाठी रोख रक्कम, चेक, हॉटेल रिझर्वेशन, टॅक्सी बुकिंग सगळी व्यवस्था अगदी चोख करतोय मी.’’

परेश तसा मनाचा उदार होता. इथेच काय पण घरीही ईशाला तो काही कमी पडू देत नव्हता. फक्त ईशाशी अजूनही त्याचे मनाचे तार जुळले नव्हते. खरं तर ईशानंही तसा प्रयत्न कुठं केला होता? मुळात हे लग्न ईशाच्या मर्जीविरूद्ध झालंय हेही त्याला ठाऊक नव्हतं. ईशाला त्याचा उगीचच राग आला. तो तिला समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाहीए? जेवण आटोपून शाल पांघरून ईशा बाल्कनीत येऊन उभी राहिली.

ईशाचं लक्ष गेटजवळ उभ्या असलेल्या गाडीकडे गेलं. सकाळी लवकर निघायचं होतं म्हणून रशीदनं गाडी आतच पार्किंगमध्ये लावून ठेवली होती. रशीद गाडीला टेकून उभा होता. तिच्याकडेच बघत होता. त्यानं हात हलवून तिला येण्याची खूण केली.

परेश टीव्हीवर बातम्या ऐकत होता. ती बाल्कनीचा जिना उतरून खाली गेटापाशी आली. ‘‘काय झालं?’’ तिनं विचारलं… एका ड्रायव्हरच्या बोलण्यावरून आपण इथवर आलो याचा तिला विषाद वाटला.

रशीद जवळ आला. त्यानं मूठ उघडली. ईशाच्या कानांतला द्ब्राबा होता. नकळत ईशानं आपले कान चाचपले. एका कानातला द्ब्राबा नव्हता. ती घोड्यावरून पडली तेव्हा त्या घाईगर्दीत कानांतून तो पडला असावा. पण तेवढ्या एका द्ब्राब्यासाठी रशीद इतका वेळ वाट बघत उभा होता. एव्हाना त्यानं निघून जायला हवं होतं. ईशानं त्याच्याकडे बघितलं, तो टक लावून तिच्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यातले भाव ईशाला खटकले.

‘‘उद्या सकाळी हे देता आलं असतं.’’ तिच्या आवाजात राग अन् जरब होती. ती खोलीत परत आली. परेश टीव्ही बंद करून ढाराढूर झोपला होता. ती आपली डायरी घेऊन सीटिंग एरियात आली. बराच वेळ ती डायरी लिहित होती. लिहिणं थांबलं तेव्हा विचार चक्र पुन्हा सुरू झालं.

लग्न झाल्यापासूनचे दिवस तिला आठवले. परेश त्याच्या परीनं तिची काळजी घेत होता. ती आनंदी राहील, मोकळेपणानं राहील यासाठी प्रयत्न करत होता. पण हट्टीपणानं ही गोष्ट ती  नजरेआड करत होती, मान्य करत नव्हती. तिच्या अहंकारानं तिला पत्नी म्हणून पूर्णपणे समर्पित होऊ दिलं नव्हतं. परेशनं स्वत:ची इच्छा तिच्यावर कधीही लादली नव्हती.

ती कधीच परेशबरोबर मोकळेपणानं बोलली नव्हती. फक्त त्याचा रागराग करत होती. तिनं मोकळेपणानं बोलायला काय हरकत होती. इतका अहंकार कशाचा होता? पुढाकार परेश घेता आला नव्हता तर तिनं पुढाकार घ्यायला काय हरकत होती?

पण आज मात्र तिच्या मनांत परेशविषयी कोमल भावना निर्माण झाल्या होत्या. त्याच्याविषयी प्रेम अन् आदर दाटून आला होता.

खूप उशीरा केव्हा तरी ईशाला झोप लागली. परेश तिला वारंवार जागं करण्याचा प्रयत्न करत होता. थोड्याच वेळात त्यांना निघायचं होतं. शेवटी ईशा धडपडून उठून बसली. तिला खूपच संकोचल्यासारखं झालं. पटापट सर्व आवरून ती सगळ्यांच्याबरोबर गाडीत जाऊन बसली.

गाडी जोरात धावत होती. सभोवारचा सुंदर निसर्ग मागे जात होता. जेव्हा जेव्हा ईशाची नजर समोर जायची तेव्हा रशीदचे दोन निळे डोळे तिच्याकडे बघत असायचे. निसर्गाकडे बघताना सर्वच अबोल झाले होते. गाडीतल्या रेडियोवर किशोर कुमारच्या मादक आवाजात एक धुंद गाणं सुरू होतं. ‘‘प्यार कर लिया तो क्या, प्यार है खता नहीं.’’ रशीदनं मुद्दामच व्हॉल्यूम वाढवला अन् पुन्हा एकदा आरशातून थेट तिच्याकडे बघितलं.

ईशाला वाटलं, तिच्या मनांतला चोर जणू गाडीतल्या इतरांनी पकडला. तिला खूपच लाज वाटली. ती विवाहित आहे. चांगल्या कुळातली लेक आणि सून आहे. तिनं अशी मर्यादा ओलांडणे बरोबर नाही. आज परेश परत जाणार अन् उरलेली तीन माणसं अजून दोन दिवस रशीदच्या गाडीतून भटकणार. ईशाच्या जीवाला टोचणी लागली, काही तरी चुकतंय नक्कीच!

कालची घटना तिच्या मनांत ताजी होती. रात्री तिचा कानांतला द्ब्राबा परत करताना रशीदची नजर काही वेगळंच बोलत होती. यापुढे दोन दिवस अजून ती त्याच्या सहवासात राहिली तर कदाचित तिचाही स्वत:वरचा संयम सुटेल. छे छे असं होता कामा नये. एकाएकी तिला वाटलं परेशच्या मिठीत असावं. ती त्याची पत्नी आहे. इतर कुणी तिला कुठल्याही हेतूनं मोहात पाडू शकत नाही.

तिनं मानेला जोरात झटका दिला. मनातले विचार झटकून टाकले. तिनं मनांला बजावलं, असं वेड्या कोकरागत इकडे तिकडे हुंडायचं नाही. जबाबदार शालीन कुलवधूसारखं वागायचं. परेशचं अन् तिचं नातं असायला हवं तेवढं घट्ट अन् आत्मीय नाहीए, पण ती आता त्यासाठी पुढाकार घेईल. इतर कुणीही त्यांच्या नात्यात असणार नाही.

गाडी एयरपोर्टवर पोहोचली. सगळे उतरले. परेशच्या सामानाबरोबर ईशानं आपली बॅगही काढून घेतली.

‘‘तुझी बॅग का काढते आहेस?’’ परेशनं आश्चर्यानं विचारलं.

‘‘मी तुमच्याबरोबर परत चलते आहे, मला तिकिट मिळेल ना?’’ तिच्या या आकस्मिक निर्णयानं विरेंद्र अन् शर्मिलाही चकित झाली. अजून दोन तीन दिवस इथं राहण्यासाठी कालपर्यंत तिचाच हट्ट सुरू होता.

‘‘आता समजलं, ईशावहिनी परेश भाऊंशिवाय एक दिवसही राहू शकत नाहीत. परेश भाऊजी, भाग्यवान आहात, इतकं प्रेम करणारी बायको मिळालीय तुम्हाला.’’ शर्मिलानं दोघांकडे कौतुकानं बघत म्हटलं.

परेशलाही सुखद आश्चर्य वाटत होतं. वरकरणी कोरडी वाटणारी ईशा मनांतून त्याच्यासाठी इतकं प्रेम बाळगून आहे?

ईशाच्या डोळ्यांवर गॉगल होता. तिनं डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलं. रशीद आपल्या निळ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत त्यांचीच वाट बघंत होता.

परेश व ईशाला आत जायचं होतं. विरेंद्र अन् शर्मिलानं हात हलवून त्यांना निरोप दिला. ईशानं वळून बघितलं, रशीदच्या चेहऱ्यावर आश्चर्य अन् उदासीचे भाव होते. ईशा मात्र अगदी शांत होती. तिला एकाएकी काही तरी आठवलं. ती भराभर चालत रशीदजवळ आली.

दुखावलेल्या सुरात रशीदनं म्हटलं, ‘‘तुम्ही जाताहात हे सांगितलं नाही?’’

ईशानं आपली पर्स उघडून आतून एक पाकीट काढलं अन् रशीदपुढे धरलं.

त्यानं प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं.

‘‘तुझ्या बहिणीच्या लग्नाला मी येऊ शकणार नाही. छान कर तिचं लग्न. तिला माझ्याकडून ही छोटीशी भेट.’’

‘‘नको, नको…’’ रशीदनं नकार दिला तेव्हा एखाद्या मोठ्या बाईच्या अधिकारानं तिनं रशीदचा हात धरून त्याच्या हातात पाकिट दिलं.

पुन्हा एकदा चार डोळे भेटले. ईशानं गोड हसून मुक्त मनानं त्याचा निरोप घेतला.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें