‘बंजारा’च्या २० फूट भव्य पोस्टरचे अनावरण

* नम्रता पवार

स्नेह पोंक्षेचे दिग्दर्शनात पदार्पण मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करत असलेल्या ‘बंजारा’ या चित्रपटाचा शानदार पोस्टर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटाच्या २० फूट उंचीच्या भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सोहळ्यात विशेष लक्षवेधी ठरली ती शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे आणि स्नेह पोंक्षे यांची बाईकवरील ग्रँड एन्ट्री. स्नेह पोंक्षे लिखित, दिग्दर्शित ‘बंजारा’ या चित्रपटात प्रेक्षकांना मैत्रीचा प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. ‘बंजारा’ चित्रपट येत्या नाताळमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये तीन वयस्क मित्र सिक्कीमच्या पर्वतरांगांमध्ये बाईकराईडचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांचा हा प्रवास त्यांच्यासाठी किती आनंददायी आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत आहे. अनेकदा कुठे जायचंय, यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा अनुभव सुखकारी असावा, ही गोष्ट प्रवासात नेहमीच महत्वाची असते आणि आपण याच आनंदाला बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा ‘बंजारा’ आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शरद पोंक्षे निर्मितीत आणि स्नेह पोंक्षे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.

निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, “हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनाची कथा सांगणारा आहे. स्नेहने हा विषय खूपच सुंदर हाताळला आहे. तीन मित्रांच्या प्रवासाची ही कथा प्रेक्षकांचे मतपरिवर्तन करणारी आहे. पोस्टरवरून प्रेक्षकांना साधारण कथेचा अंदाज आला असेलच. मला खात्री आहे, चित्रपटही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतात, “माझ्या पहिल्या चित्रपटात वडिलांसोबत, भरत जाधव, सुनिल बर्वे अश्या दिग्गच कलाकारनसोबत काम करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा मला या चित्रपटासाठी निश्चितच फायदा झाला आहे. ‘बंजारा’ चित्रपटाच्या संकल्पनेतून मला एक गोष्ट सांगायची होती – असं म्हणतात की कुठे जायचंय त्यापेक्षा तिथे जाण्याचा प्रवास आनंददाई असायला हवा पण आपण तो आनंद कधी लुटतच नाही बंजऱ्यासारखं जमलं पाहिजे आनंदाने प्रवास करता आला पाहिजे, फिल्म मधला प्रवास ही प्रेक्षकांना नक्की अवडेल याची खात्री आहे मला.’’

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!

* नम्रता पवार

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये चतुरस्त्र अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता वर्गही त्यांनी  निर्माण केला. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले. मराठी रंगभूमीवर ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याकडे भरत जाधव यांचा कायमच कल राहिला आहे. त्यामुळे यंदाही असेच काहीतरी नवीन घेऊन येण्यास भरत जाधव सज्ज झाले आहेत. काही वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला होता. याच खास क्षणाचे औचित्य साधत भरत जाधव येत्या १५ ऑगस्ट रोजी नाट्यरसिकांसाठी ट्रिपल धमाका घेऊन येत आहेत. यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रयोग होणार असून या दिवशी रसिकांना भरत जाधव यांच्या वेगवेगळ्या पात्रांची झलक अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सकाळी ‘अस्तित्व’,  दुपारी ‘मोरूची मावशी’ तर सायंकाळी ‘पुन्हा सही रे सही’ या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. वैशिष्टय म्हणजे ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग यावेळी होणार असून या प्रयोगाला राज ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे.

भरत जाधव आणि चिन्मयी सुमीत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘अस्तित्व’ या नाटकाची निर्मिती भरत जाधव यांनी केली असून या नाटकाला महाराष्ट्र शासनचा व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कारही मिळाला आहे. तर भरत जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या नाटकाचे आतापर्यंत ५८ प्रयोग झाले आहेत. तर मोरूची मावशी या नाटकाने आतापर्यंत ८६२ प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे हा ट्रिपल धमाका प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

याबद्दल भरत जाधव म्हणतात, ” प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा माझा प्रयत्न असतो. यावेळी १५ ऑगस्ट रोजी मी तीन वेगवेगळ्या धाटणीची नाटके नाट्यप्रेमींसाठी घेऊन आलो आहे. या नाटकांवर आणि माझ्या भूमिकांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळेच ही ऊर्जा मला मिळू शकते. ही तीनही  नाटके प्रेक्षकांसमोर घेऊन येताना मला प्रचंड आनंद होतोय. मला खात्री आहे, प्रेक्षक या तिन्ही नाटकांना प्रतिसाद देतील.”

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें