एक्ससोबतही होऊ शकते मैत्री

* पूनम अहमद

ज्या कोणाचे कधी ब्रेकअप झाले असेल त्याला माहित असेल की ब्रेकअप करणे सोपे नसते. पण कधीकधी जेव्हा दोघेही समजूतदार असतील, तर एक्स असल्यावरही आपसांत मैत्री टिकवता येते. जर नातेसंबंधात सर्व काही ठीक होत नसेल, तर जोडप्यांना अनेकदा ब्रेकअपचा निर्णय घ्यावा लागतो. ही दु:खाची बाब असते की जी व्यक्ती आतापर्यंत तुम्हाला सर्वात प्रिय होती, आता तुम्ही त्याच्यासोबत तुमचे सुख-दुख शेअर करू शकणार नाहीत. पण ही एक चांगली गोष्ट आहे की आजची पिढी अतिशय व्यावहारिक आहे आणि या प्रकरणावर वेगळा विचार करते. कोणतेही नाते कोणत्याही कारणास्तव संपुष्टात येऊ शकते.

विचारसरणी बदलत आहे

जर तुमच्या आयुष्यात कोणी एका भूमिकेत बसत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तो दुसऱ्या भूमिकेतही बसणार नाही.

२६ वर्षीय रूही तिच्या एक्ससोबत इतकी कंफर्टेबल आहे की ती आजही त्याच्यासोबत अनेक गोष्टी शेअर करते. तिच्या कोणत्याही समस्येमध्ये तिला तोच आठवतो. अगदी तिच्या एक्सची मैत्रीणही आनंदाने हे स्वीकारते.

रुही म्हणते, ‘‘आमचे ब्रेकअप झाले. काही गोष्टी जमल्या नाहीत, पण मला माहित आहे की तो मला नेहमी योग्य सल्ला देईल, मला त्याच्यासमोर कोणत्याही गोष्टीत अस्वस्थ वाटत नाही. तो माझा चांगला आणि खरा मित्र आहे. माझे कुटुंब अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवते.’’

असे बनवा आपल्या एक्सला मित्र

फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर एक्ससोबत मैत्रीची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. जरी तुमचे ब्रेकअप झाले असेल, तरीही तुम्ही ज्या व्यक्तीवर दीर्घकाळ प्रेम केले असेल, त्याची काळजी घेतली असेल त्याच्याशी तुम्ही मैत्री टिकवून ठेवू शकता. हे कठीण असू शकते, परंतु काही मार्ग आहेत जे अवलंबून तुम्ही तुमच्या एक्सचे मित्र बनून राहू शकता आणि ते आपल्याला विचित्रदेखील वाटणार नाहीत. जसे :

* ब्रेकअपचे कारण नेहमी तुम्ही चुका केल्या असे नसते. कधीकधी असे घडते की नातेसंबंध कार्य करत नाहीत. जे नातं काम करत नाही ते सोडून द्यायला शिका. एकमेकांच्या चुका सांगू नका. जे झाले ते विसरून जा, एकमेकांना क्षमा करा. ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तुम्ही वाद घातला तर परिस्थिती आणखी वाईट होईल. तुमच्या दोघांमधील कटुता आणखी वाढेल.

* नातेसंबंध टिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ब्रेकअपनंतर हे नातं वाचवण्यासाठी तुम्ही किती वेळ वाया घालवला, किती ऊर्जा वाया गेली याचा विचार करत बसू नका. यामुळे तुम्हाला फक्त वाईटच वाटेल. आता एकमेकांना मित्र अवश्य समजा. तुम्ही एकमेकांना ओळखत तर आहातच. एकमेकांच्या अडचणींमध्ये एकमेकांना साथ देणे थांबवू नका.

* ब्रेकअप झाल्यानंतर लगेच मैत्रीच्या गाडीमध्ये चढू नका. स्वत:ला थोडा वेळ द्या. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करा आणि त्याच खांद्यावर डोके ठेवून पुन्हा रडू नका, कारण शेक्सपिअरनेही म्हटले आहे की आशा हे सर्व दु:खाचे मूळ आहे.

* नाते संपले आहे, तुम्ही दु:खी आहात, दु:खी व्हा, तुम्हाला जितका शोक-विलाप करायचा आहे तितका व्यक्त करा. जोपर्यंत रडू यायला होतं तोपर्यंत रडा. त्यानंतर तुमच्या मित्रांसोबत बाहेर जा आणि ब्रेकअपबद्दल बोलू नका.

* लगेच घाईत बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड शोधू नका. समंजस आणि परिपक्व विचारसणी ठेवा.

* स्वत:ला अशा उपक्रमांमध्ये गुंतवा, जे तुम्हाला करायचे होते पण या नात्यामुळे शक्य होत नव्हते.

* तुम्हाला तुमच्या एक्ससोबत मैत्री करण्याबद्दल शंका आहे का? हे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा की तुम्हाला तुमच्या एक्सशी मैत्री का करायची आहे. एकाच फ्रेंड सर्कलसाठी, की कॉलेजमधील एकाच वर्गासाठी?

* जर तुमची तुमच्या एक्स सोबतची केमिस्ट्री तुम्ही नातेसंबंध सुरू करण्यापूर्वीसारखी नसेल तर या मैत्रीसारख्या भावनेला फुलू देण्याचा जास्त विचार करू नका. हा प्रयत्न तुम्हाला इतर काही गोष्टींमध्ये दुखावू शकतो तेदेखील तेव्हा, जेव्हा तुम्ही तुटलेल्या नात्यातून बाहेर पडत आहात.

* जर ती इतर लोकांसोबत बाहेर जात असेल तर या गोष्टीचा आदर करत आयुष्यात तुम्ही स्वत:ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा. फक्त तिच्या डेटिंग पॅटर्नवर लक्ष ठेवण्यासाठी तिच्याशी मैत्री केल्याने तुम्हाला त्रास होईल. म्हणून सकारात्मक रहा आणि स्वत: ही जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा.

ब्रेकअप

कथा * शकुंतला सोवनी

ब्रेकअप,’’ अमेरिकेतून आलेल्या फोनवर रागिणीचे हे शब्द ऐकताच मदनला कानांत कुणीतरी उकळतं तेल ओतल्याचा भास झाला. अभावितपणे त्याच्या डोळ्यांत अश्रू आले.

‘‘काय झालं रे मुन्नु? डोळ्यांत पाणी का आलं?’’ उमा वहिनीच्या या प्रश्नावर तो पार उन्मळून पडला. ‘‘सगळं, सगळं संपलंय गं वहिनी…पाच वर्षं माझ्यावर प्रेम केल्यावर रागिणीनं आयुष्याचा जोडीदार म्हणून दुसऱ्यालाच निवडलंय.’’ त्याला रडू अनावर झालं.

‘‘मुन्नु, खरं सांगू का? तू तिला विसर. खरं सांगते, ती तुझ्यासाठी योग्य मुलगी नव्हतीच,’’ उमावहिनीनं म्हटलं.

उमावहिनी मदनची एकुलती एक वहिनी. वयानं त्याच्याहून जवळजवळ १२ वर्षं मोठी. मदनला ती प्रेमानं मुन्नु म्हणते. मदन महाराष्ट्रातला. मुंबईतल्या एका उपनगरात त्याचे वडील सरकारी नोकरीत होते. स्वत:चं छोटसं घर होतं. आई साधीशी, व्यवस्थित घर सांभाळणारी गृहिणी होती. मदनचा मोठा भाऊ त्याच्याहून जवळजवळ १५ वर्षं मोठा होता. मदनचा भाऊ आईवडिलांना घेऊन एक दिवस व्हीटी स्टेशनला गेला होता. २६ नोव्हेंबरचा दिवस. त्याच दिवशी झालेल्या अतिरेक्यांच्या गोळीबारात ती तिघं मृत्यूमुखी पडली होती. मदन तेव्हा ११वीत होता. हुशार मदनला इंजिनियर व्हायचं होतं. पण एका झटक्यात घरातील तीन माणसं गेल्यानं तो अगदीच पोरका झाला होता.

आता घरात फक्त उमावहिनी अन् तिचा लहानसा मुलगा एवढीच माणसं होती. मात्र उमावहिनी आपल्या मुलाएवढंच मदनवरही प्रेम करत होती. तिनं जणू त्याच्या आईची जागा घेतली होती. उमाला राज्य सरकारनं नोकरी दिली, शिवाय तीन माणसांच्या मृत्यूची नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम मिळाली. तिनं मदनच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्याला इंजिनियर करायचा उमानं चंग बांधला होता.

मेरिट बेसिसवर मदनला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश घेता आला. इथं बिहारमधून डोनेशन देऊन प्रवेश मिळवलेले अनेक विद्यार्थी होते. रागिणी त्यापैकीच एक होती. मदनच्याच बॅचला होती. अभ्यासात यथातथाच होती. म्हणूनच वडिलांनी एवढं मोठं डोनेशन देऊन तिचं एडमिशन करून घेतलं होतं. वडिल केंद्र सरकारच्या नोकरीत होते. पगाराव्यतिरिक्त भरपूर पैसा हातात येत होता. वडिल तिलाही चिकार पैसे पाठवायचे. तिचं स्वत:चं एटीएम कार्ड होतं. ती भरपूर पैसे खर्च करायची. मित्रांना हॉटेलात जेवू घालायची. कधी पिक्चरला न्यायची. त्यामुळे तिच्याभोवती पिंगा घालणारे चमचे भरपूर होते. सेकंड इयर संपल्यावर तिची मदनशी मैत्री झाली. मदन मुळात हुशार होता. आपला अभ्यास पूर्ण करून तो रागिणीलाही अभ्यासात मदत करत होता. त्याच्या हुशारीमुळे अन् सज्जन स्वभावामुळे रागिणीला तो आवडायचा. शिवाय तो तिला निरक्षपणे मदत करत होता. त्यामुळे हळूहळू ती त्याच्याकडे आकर्षित झाली. थर्ड इयर संपता संपता दोघांची मैत्री वाढली.

पुढे शनिवार, रविवार दोघं कधी कॉफीहाउसमध्ये तर कधी हॉटेलात लंचला भेटू लागली. अर्थात पुढाकार रागिणीचा असायचा. कारण भरपूर पैसे तीच खर्च करू शकत होती. दोघांनी अमेरिकेतून एमएस करायचं ठरवलं होतं. त्यासाठी जरूरी असलेल्या परीक्षांचीही त्यांची तयारी सुरू होती. मदन त्याच्या उमावहिनीपासून कोणतीही गोष्ट लपवत नसे. त्यानं रागिणीबद्दल वहिनीला सांगितलं होतं. स्कॉलरशिप मिळाली तर फारच छान होईल असं दोघांना वाटत होतं.

अमेरिकेतल्या शिक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च होता. रागिणीसाठी ते सहज शक्य होतं. कारण वडील करोडपती होते. प्रश्न मदनचा होता. स्कॉलरशिप त्यालाही मिळाली नाही.

स्टुंडट व्हिसा एफ१ साठी अभ्यास व राहाणं, जेवणखाणं एवढा खर्च करण्याची ऐपत असावी लागते. त्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमध्ये तेवढा पैसा दाखवावा लागतो. रागिणीच्या अकांउटला तिच्या वडिलांनी तेवढा पैसा भरला होता. मदनला मात्र फारच काळजी लागली होती.

उमावहिनीचं त्याच्याकडे लक्ष होतं. तिनं त्याला दिलासा दिला, ‘‘मुन्नु, तू जायची तयारी कर. मी आहे ना? तुझं स्वप्नं नक्की पूर्ण होईल.’’ उमानं गावाकडची काही शेतजमीन विकून, काही दागिने गहाण ठेवून अन् काही शिल्लक पैसा काढून त्याच्या अकाउंटला पैसे भरले. रागिणी अन् मदन दोघांनाही व्हिसा मिळाला. दोघांच्या एडमिशन्स मात्र वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत झाल्या. पण दोघंही अमेरिकेला पोहोचले एकदाचे.

दोघांच्या कॉलेजमध्ये केवळ एक तासाचं कार ड्राइव्हचं अंतर होतं. रागिणीला कॅलिफोर्नियातल्या सांता क्लारा युर्निव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती तर मदनला जागतिक कीर्तीच्या वर्कले युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. श्रीमंत बापाची पोरगी रागिणीला वडिलांनी तिथं कारही उपलब्ध करून दिली. दोघं वीकेंडला भेटायची. भेटणं, एकत्र राहाणं, जेवणखाणं, अभ्यासाची चर्चा सगळंच त्यामुळे शक्य व्हायचं. बहुतेक वेळा रागिणीच कारनं मदनकडे यायची. क्वचित कधी मदन बसनं तिच्याकडे जायचा. तीच त्याला कारनं माघारी आणून सोडायची. एकमेकांच्या वाढदिवसाला, व्हॅलेंटाइन डेला दोघं एकमेकांना गिफ्ट द्यायची. अर्थात्च रागिणीच्या भेटवस्तू महागड्या असायच्या.

उमावहिनीला मदन सगळं सांगत होता. तिच्या फक्त एवढंच मनांत आलं होतं की इतक्या श्रीमंतीत वाढलेली मुलगी आपल्या निम्न मध्यमवर्गीय घरात रूळेल का? पण उघड ती काहीच बोलली नव्हती. तिची पूर्ण संमती होती. फक्त चुकीचं पाऊल उचलू नकोस अन् कुणा मुलीचा विश्वासघात करू नकोस एवढं तिनं मदनला बजावलं होतं.

रागिणीनंही घरी आईवडिलांना आपलं प्रेमप्रकरण सांगितलं होतं. त्यांचा मदनच्या मराठी असण्यावर आक्षेप नव्हता. पण त्याची आर्थिक परिस्थिती मात्र खूपच खटकत होती. मदनपेक्षा चांगल्या, श्रीमंत मुलाशी लग्न करण्याबद्दल त्यांनी रागिणीला सुचवलंही होतं. पण रागिणीनं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मदन रागिणीचं प्रेम अबाधित होतं. लग्न करून आयुष्य एकत्र घालवण्याच्या आणाभाका घेऊन झाल्या होत्या.

दोन वर्षांत मास्टर डिग्री घेऊन मदन भारतात परतला होता. येताना रागिणीही त्याच्यासोबत मुंबईला आली होती.

दोन दिवस ती त्याच्या घरीच राहिली. उमावहिनीनं विचारलं, ‘‘आता तुमचा दोघांचा काय बेत आहे?’’

रागिणी म्हणाली, ‘‘वहिनी, मास्टर्स केल्यावर एक वर्ष आम्हा दोघांना पी.टी म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण करावं लागेल. यात आम्ही कुठल्याही कंपनीत एक वर्षं काम करतो. आम्हाला दोघांना नोकरीही मिळाली आहे. या वर्षभराच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगनंतर आम्ही लग्न करणार आहोत. मदननं तुम्हाला सांगितलंच असेल ना?’’

‘‘होय, मदननं सांगितलंय, पण मला असं विचारायचं आहे की लग्नानंतर तुम्ही, म्हणजे तू नोकरी अमेरिकेत करणार की भारतात?’’ उमानं विचारलं.

रागिणी म्हणाली, ‘‘ते सगळं मी मदनवर सोपवलंय. त्याला योग्य वाटेल ते तो करेल. वहिनी, तुम्ही अगदी निश्चिंत असा.’’

दोन दिवस मुंबईत राहून रागिणी बिहारला आपल्या घरी गेली.

रागिणीच्या बोलण्यानं उमालाही दिलासा मिळाला. घरी गेल्यावर रागिणीचे वडिल म्हणाले, ‘‘हे बघ मुली, तुझ्या आनंदातच आमचाही आनंद आहे. पण तू विचारपूर्वक निर्णय घे. मदन मुलगा चांगलाच आहे…तरीही त्याच्या कुटुंबात तू व्यवस्थित ऍडजस्ट होशील याची तुला खात्री आहे का?’’

रागिणी म्हणाली, ‘‘मदनच्या कुटुंबात सध्या तरी मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाहीए.’’

‘‘तरीही मला एकदा त्याला भेटायचं आहे.’’ वडिल म्हणाले.

‘‘ठीक आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा त्याला बोलावून घेईन.’’

‘‘नको, आत्ता नको, मी स्वत:च जाऊन भेटेन त्याला.’’ वडिलांनी सांगितलं.

सुमारे दोन आठवड्यांनी मदन व रागिणी अमेरिकेला परत आले अन् त्यांची नोकरी सुरू झाली. पण आता दोघांची नोकरी दोन टोकांना होती. एक ईस्ट कोस्टला तर दुसरा वेस्ट कोस्टला. विमान प्रवासातच सहा-सात तास लागणार. आता भेटी फारच क्वचित व्हायच्या. इंटरनेटवर, स्काईपवर भेट व्हायची तेवढीच.

रागिणीच्या कंपनीत कुंदन नावाचा एक नवा भारतीय मुलगा आला. त्याचे वडिल मुंबईतले प्रसिद्ध ज्वेलर होते. तो दोन बेडरूमच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहात होता. स्वत:ची एसयूव्ही होती. रागिणीचीही छोटी गाडी होती. रागिणी त्याच्या श्रीमंत राहणीमुळे भारावली होती. एका वीकेंडला कुंदननं रागिणीला गाडीतून ऑरलॅन्डोला नेलं. तिथं एका हॉटेलात दोघं थांबली होती. नंतरच्या पंधरवड्यात कुंदननं तिला डिस्ने लॅन्डला फिरवून आणलं. मदनशी हल्ली रागिणीचा संपर्क कमी द्ब्रा झाला होता. तिनं कुंदनबद्दल मदनला सांगितलं होतं. पण त्याच्याशी     इतकी जवळीक झाली आहे हे मदनला ठाऊक नव्हतं.

मदन कॅलिफोर्नियामध्ये एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहात होता.  स्वत:च स्वयंपाक करून जेवत होता. एक छोटी टूसीटर कार होती. एक दिवस अवचित रागिणीचा फोन आला. ती वडिलांना घेऊन शनिवारी त्याला भेटायला येतेय. रविवारी राहून सोमवारच्या फ्लाइटनं परत जाईल.

गडबडीनं मदननं तीन दिवसांसाठी भाड्यानं एक कार घेतली. त्यांच्या वास्तव्यासाठी बाहेर गेलेल्या मित्राच्या फ्लॅलटची किल्ली मागून घेतली. शनिवारी एयरपोर्टवरून त्यांना तो घेऊन आला. त्यादिवशी मदननं केलेला स्वयंपाकच सगळे जेवले. नंतर मात्र हॉटेलातच जेवायला पसंती दिली. हॉटलचं बिल मदनलाच द्यायचं होतं.

रागिणीच्या वडिलांनी मदनला त्याचा पुढचा कार्यक्रम विचारला, ‘‘अंकल, मला हे वर्ष पूर्ण झाल्यावर भारतात परत जावं लागेल, वहिनीला माझी गरज आहे. शिवाय इथली माझी कंपनी त्यांच्या भारतातल्या मुंबई ऑफिसात मला पोस्ट करायला तयार आहे.’’
रागिणीचे बाबा फक्त ‘‘हूं,’’ म्हणाले. रागिणी वडिलांबरोबर परत गेली.

आता तिचे वीकेंड कुंदनबरोबरच जायचे. मदनसोबत व्हिडिओचॅटिंगही बंद झालं होतं. आठवड्यात कधी तरी चॅट करायची तेवढंच. याच अवधीत रागिणीचा वाढदिवस आला.

मदननं एक लेडीज पर्स तिला भेट म्हणून दिली. तर कुंदन सोन्याचे सुंदर इयररिंग्ज घेऊन आला. न्यू जर्सीत त्याचे नातलग होते. त्यांच्या दुकानातून त्यानं ते घेतले, रागिणीचे वडील अजून तिथेच होते. त्यांनी कुंदनबद्दल विचारलं, तेव्हा तिला जे काही त्याच्याबद्दल ठाऊक होतं ते तिनं सांगितलं.

योगायोग असा की त्याच शनिवारी कुंदन स्वत:ची गाडी घेऊन तिथं पोहोचला. रागिणीनं त्याची वडिलांशी ओळख करून दिली. तो उत्साहाने म्हणाला, ‘‘अंकल, आपण फ्लोरिडाला जाऊया का? उद्या तिथून रॉकेट लाँच होतंयं. आपण रॉकेट लाँचिंग बघू अन् तिथं मजेत राहू.’’

तिघं फ्लोरिडाला निघाले. कुंदन गाडी चावलत होता. वडील त्याच्या शेजारी बसले होते. बोलता बोलता त्यांनी कुंदनला त्याच्या पुढच्या प्लॅन्सबद्दल विचारलं. तो म्हणाला, ‘‘मी तर इथंच सेटल व्हायचं ठरवलंय. माझी नोकरी आहेच. अजून एक चांगली ऑफर आलीए. अन् मला इथं ज्वेलरीचा बिझनेसही सुरू करायचा आहे.’’

कुंदननं एका फोर स्टॉर हॉटेलात रूम बुक केली होती. तिघंही एकाच खोलीत होती. रॉकेट लाँचिंग बघून, फ्लोरिडा फिरून मंडळी परत आली. जोवर बाबा होते, मदन रोज हॉटेलमधून जेवण पॅक करून घरी आणायचा.

एकदा बाबा म्हणाले, ‘‘मला तर कुंदन अधिक योग्य मुलगा वाटतोय. तुझं काय मत आहे?’’

ती म्हणाली, ‘‘तो चांगला आहे, पण सध्या तरी आम्ही फक्त मित्र आहोत. त्याच्या मनांत काय आहे ते मला कळलेलं नाही.’’

वडील म्हणाले, ‘‘थोडा पुढाकार घेऊन तूच त्याचं मन जाणून घे. इतकी काळजी घेतोय तुझा, इतका खर्च करतो, त्याच्या मनांत लग्न करण्याचा विचार असेलच! असं बघ रागिणी, तुम्हा दोघी बहिणींवर मी इतका खर्च करतोय, तो एवढ्यासाठीच की तुम्हाला काही कमी पडायला नको. मदन मुळात गरीब, त्यातून तो वहिनी व तिच्या मुलासाठी भारतातच रहायचं म्हणतोय…’’

रागिणी त्यावेळी काहीच बोलली नाही.

बाबा परत जायला निघाले तेव्हा कुंदनने त्यांना विमानतळावर पोहोचवलं, शिवाय त्यांच्यासाठी व रागिणीच्या आईसाठी भेटवस्तूही दिली.

मदनशी आता रागिणीचा संपर्क नव्हता. कधीतरी फोन, कधीतरी चॅटिंग…वडील निघून गेल्यावर रागिणीला कळेना, मदन अन् कुंदनमधून नवरा म्हणून कुणाची निवड करावी? बाबा तर सतत कुंदनचीच वाहवाही करत होते. कुंदनशी तिची मैत्री वाढत होती तर मदनशी दुरावा वाढत होता.

त्याचवेळी एक दिवस कुंदननं तिला प्रपोज केलं. ‘‘रागिणी, तू माझ्याशी लग्न करशील? नीट विचार करून उत्तर दे, कारण मी अमेरिकेतच स्थायिक होणार आहे.’’

रागिणीला अमेरिका अन् इथली जीवनशैली आवडत होती. तरीही तिनं कुंदनकडून थोडावेळ मागून घेतला.

भारतात उमावहिनीला हार्ट अॅटक आला होता. तिला चारपाच दिवस इस्पितळात रहावं लागलं होतं. पण तिच्या भाऊ, भावजयीनं सगळं व्यवस्थित सांभाळलं.

मदनला फोन आला. उमा स्वत:च फोनवर बोलली, ‘‘आता मी बरी आहे मुन्नु, माझी काळजी करू नकोस. इथं माझे दादा वहिनी माझी काळजी घेताहेत.’’

त्यानंतर महिन्याभरातच मदन भारतात परतला. मुंबईतच त्याला पोस्टिंग मिळालं होतं. येण्यापूर्वी तो रागिणीला भेटला. तिच्याशी सविस्तर बोलला, ‘‘मी तर आता भारतात परत जातोय. मी तिथंच राहाणार आहे. तुझं पी.टी.ही आता संपतंय, तेव्हा तू भारतात कधी परत येणार? की अजून काही दिवस इथंच नोकरी करायचा विचार आहे?’’

रागिणीला नेमकं काय करावं ते कळत नव्हतं. मनाची दोलायमान अवस्था होती. ती म्हणाली, ‘‘अजून लगेचच मी इंडियात येत नाहीए. कारण मला एच वर्क व्हिसा मिळालेला आहे. अजून काही दिवस मी इथं नोकरी करून बघणार आहे. मला नोकरी मिळते आहे. मी तुला कुंदनबद्दल बोललो होते ना? त्यालाही वर्क व्हिसा मिळाला आहे. तोही सध्या इथंच राहातोय.’’

मदन भारतातल्या नोकरीवर रूजु झाला. उमा वहिनीला सध्या विश्रांती हवी होती. तिचा मुलगा अन् मुन्नु दोघं मिळून तिची काळजी घेत होते. घरकाम, स्वयंपाक करायला छान बाई मिळाली होती.

रागिणीचे आईवडिल तिला कुंदनशीच लग्न करण्यासाठी आग्रह करत होते. रागिणीलाही त्याच्याविषयी ओढ वाटत होती. कुंदननं तर अमेरिकेत एक मोठंसं घरही लीजवर घेतलं होतं.

सहा आठ महिने गेले. मदनने रागिणीला फोन केला. ‘‘रागिणी, तू भारतात येण्याबद्दल काय ठरवलं आहेस? तू इथं आल्यावर आपण लग्न करूयात. निर्णय लवकर घे. मी भारतातच राहाणार आहे.’’

रागिणी म्हणाली, ‘‘मी भारतात येणार नाही. तू जर अमेरिकेला येत असलास तरच लग्नाबद्दल विचार करता येईल. आता निर्णय तू घ्यायचा आहेस…’’

मदननं म्हटलं, ‘‘आईसारख्या उमावहिनीला मी सोडू शकत नाही. मी अमेरिकेत येणार नाही. तू सांग, काय म्हणतेस?’’

‘‘तर मग वाद कशाला वाढवायचा?’’ रागिणी पटकन् म्हणाली, ‘‘समज ब्रेअप झाला.’’ तिनं फोन बंद केला.

मदनला धक्का बसला…ती कुंदनच्या प्रेमात पडली आहे. त्याच्या वैभवाला भाळली आहे हे ही त्याच्या लक्षात आलं. त्यानं वहिनीला रडतंच सगळं सांगितलं.

मदननं फोन लावून दिला. उमानं रागिणीला विचारलं, ‘‘तू खरंच मदनशी लग्न करणार नाहीस?’’’

रागिणी म्हणाली, ‘‘मी तिथं येऊ शकत नाही अन् मदन इथं येऊ शकत नाही. तेव्हा मी इथंच माझ्या आयुष्याचा जोडीदार शोधलाय. मदनला म्हणावं, तू ही तसंच कर.’’

उमावहिनी मायेनं बोलली, ‘‘रागिणी, अगं मदन इथं रडतोय. पाच वर्षं तुम्ही प्रेमात होता. मैत्रीचं, प्रेमाचं, विश्वासाचं नातं तू असं तडकाफडकी कसं तोडू शकतेस? एकदा पुन्हा विचार कर.’’

रागिणी म्हणाली, ‘‘आता उगीचच वेळ घालवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. मदनला म्हणावं रडणं सोड, नवा जोडीदार शोध.’’

थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. मग उमा म्हणाली, ‘‘मग मी मदनला काय सांगू? तू कुंदन…’’

तिला पुढे बोलू न देता संतापून रागिणी ओरडली.

‘‘ब्रेकअप…ब्रेकअप…ब्रेकअप…फुल अॅण्ड फायनल.’’ फोन कट झाला.

उमा मदनच्या जवळ बसली. प्रेमानं त्याला थोपटत म्हणाली, ‘‘शांत हो. रडू तर अजिबात नकोस. रागिणीला कुंदन हवाय…सोनंनाणं, पैसा अडका, मोठं घर, आधुनिक राहणी अन् सुखासीन आयुष्य…तू दुसरी मुलगी बघ. तुझ्या परिस्थितीशी जुळवून घेईल अशी. खरं सांगते रागिणी कधीच तुझ्यासाठी योग्य जोडीदार नव्हती. तिला जाऊ दे. तिला विसर. नव्यानं आयुष्य सुरु कर.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें